Friday, December 26, 2008

सरणार कधी रण... प्रभोsssssssss

बयाच गोष्टी खूप वेळ मनात असूनही लिहायला वेळ मिळत नव्हता आणि शांतपणाही. मुंबईत अतिरेक्यांनी घडवलेलं हत्याकांड, मिडीयाचा नंगा नाच आणि राजकारण्यांचे बळी, अगदी काही दिवसात खूप उलथापालथ झाली. खूप काही वाचायला, ऐकायला मिळालं ह्या दरम्यान. आता नक्की काय झालं, का झालं ह्याचा अंदाज आल्याने लिहायच ठरवलं आज..

वयाची २२ वर्ष दक्षिण मुंबईत गेल्याने गेट वे, ताज, सी.एस.टी. सगळ्याच ठिकाणांशी माझं अतूट नातं आहे. आजही चर्चगेट, व्ही.टी., महानगरपालिका, फ़ाउंटन च्या इमारती, राजाबाई टॊवर पाहिला की माझं उर भरून येत. त्या दगडी इमारतींचा गारवा आणि भक्कमपणा अगदी नवख्या माणसास सुद्ध रोमांचित करेल. सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, रस्त्यावरचे विक्रेते, मार्केट मधे काम करणारे कामगार, मुंबई बघायला तसच तिची झिंग अनुभवायला आलेले जगप्रवासी सगळ्यांची इथे रेलचेल. अगदी सळसळत्या तारूण्यापासून वाकलेल्या काठीपर्यंत प्रत्येकाची ही मुंबई. दहा पोरसवदा माणसं बोटीने येतात काय आणि मुंबईला ओरबडतात काय, सगळं अविश्वसनीय होतं. तिथे त्यारात्री फायरींग सुरु झालं आणि दुसया मिनिटाला याहू वर बातमी आली. ही बातमी इथे सी एन एन, फॊक्स न्यूज वर पुढचे दोन दिवस ब्रेकींग न्यूज म्हणून कव्हर करत होते. बयाच अमेरीकन लोकांशी ह्यावेळी बोलताना जाणवलं की एकूणच इथल्या जनमानसात भारताविषयी आणि भारतीयांविषयी आपुलकी निर्माण होतेय. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर तुमचा आणि आमचा शत्रू एकच असं काहीसं.

साळसकरांसारखा पोलिस अधिकारी ज्याने मुंबईतलं गॆंगवॊर मोडून काढलं, कामठे, करकरेंसारखे अधिकारी मिसरूड सुद्ध न फुटलेल्या टिनपाट पोरांच्या अंदाधुंद गोळ्यांना बळी पडले हे पचवण अजूनही जड जातय. दहशतवादी हल्ला, त्यातून घडलेले राजकीय नाट्य तसेच पुढे काय ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडलेत, त्यांची उत्तरे मिळतील किंवा नाही पण प्रश्न विचारून तरी चिडचिड, विषण्णता, असहाय्यता बाहेर पडेल म्हणून हे लिहायच झालं --

१. अतिरेक्यांचा हल्ला होताक्षणी ’दक्षिण मुजाहीदीन’ कडून एका चॆनेलला मेल गेलं असं म्हटलं गेलं. प्रत्यक्षात असा ग्रूप आहे का? नसल्यास त्याचं नाव कोणी पुढे आणलं? पाकिस्तानने आपला हात झाकण्यासाठी हे खोटं पिल्लू सोडलं नसेल ना? हा धागा पोलिस खणून काढतील?

२. गुप्तचर यंत्रणा नावाचा काही प्रकार असतो हे सांगाव लागेल असा अश्लाघ्य प्रकार घडलाय. आपल्या देशाच्या सागरी सीमा सुरक्षित नसल्याने शत्रूची हिम्मत झाली आतपर्यंत पोहोचायची. गुप्तचर यंत्रणा आणि गस्तपथकाने त्यांच्या कामात कसूर केल्याने कर्तबगार अधिकायांना प्राण गमवावे लागलेत ह्याची किंमत कधीच भरून येणार नाही. हे असे पुन्हा घडू नये म्हणून सरकारने काय खबरदारी घेतली आहे? दुसरं म्हणजे गुप्तचर यंत्रणांचा हल्ली राजकीय वापर होतोय असं जाणवू लागलय. राजकारणी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, दुसयास कोंडीत पकडण्याची संधी साधण्यासाठी किंवा आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यास कोण कुठे भेटला ह्याची इत्यंभूत माहिती ठेवण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा वापरत असल्याचे दिसते. शिवाय पोलिस तपासातही राजकीय दबाव आणला जातोय. पोलिसांच्या सगळ्या नाड्या प्रशासनाच्या हाती असल्याने कर्तव्यपूर्ती म्हणजे पुढायांची हाजी हाजी असं समीकरण बनलय. जर एखादा पोलिस अधिकारी खरच प्रवाहाविरुद्ध पोहायचं धाडस दाखवू लागला तर त्याची बदली कर किंवा त्याच्या मागे विभागीय चौकशी लाव असं केल जातय. सारांश हा की पोलिस खात्यातला राजकीय हस्तक्षेप काढायला किंवा निदान कमी करायला हवा. पोलिसांना न्यायव्यवस्थेसारखी थोडी स्वायत्तता असायला हवी. हे सोप्प नाही हे मान्य पण त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असं काही करता येऊ शकेल?

३. पोलिस अपुया शस्त्रांनी लढतोय. एके-४७ शी लढायला तो प्रशिक्षितही नाही आणि शस्त्रसिद्धही. तरीही केवळ धाडस आणि शौर्याच्या बळावर तो अतिरेक्यांशी भिडला. सी.एस.टी स्थानकात पिस्तुलानिशी शिंदेनी केलेला सामना आणि चौपाटीवर ओंबाळेंनी अतिरेक्याच्या गोळ्या अंगावर झेलत स्वीकारलेलं हौतात्म्य. एखादा जीवावर उदार झालेला जिहादी अतिरेकी जिवंत पकडण्याच धाडस जे जगात कोणी करू शकलेलं नाही ते मुंबई पोलिसांनी केलं ते ओंबाळेंसारख्या शूरवीरामुळेच शक्य झालं. एफ. बी. आय., मोसाद चे अधिकारी कसबच्या जबानीतून खूप सारी नवीन माहिती मिळवत आहेत. पोलिसांना पुरेश्या शस्त्रांनी, शिक्षणाने कधी सुसज्ज करणार? आम्हाला नुसती आश्वासन नको, कृती आणि अमंलबजावणीचं वेळापत्रक हवय. दुसरं म्हणजे दहशतवादाशी मुकाबला करणारी स्वतंत्र शाखा हवी. त्यांना वेगळ्याप्रकारंच प्रशिक्षण तसेच अधिकार हवेत. दुसया विभागतल्या पोलिसांच्या इथे तात्पुरत्या बदल्या करून काम साधणार नाही. ह्या विशेष पथकातील पोलिसांकडे खास क्षमता असायला हवी. हे सगळ करायचं असेल तर राजकीय इच्छाशक्तीची आज गरज आहे. सरकार ह्याकडे प्राधान्याने लक्ष देईल का?

४. अतिरेक्यांनी गुगल अर्थ वापरून नकाशे अभ्यासले, व्ही. ओ. आय. पी. तंत्रद्न्यान वापरून फोन कॊल्स केले. आपले पोलिस दल, गुप्तहेर खाते ह्या आधुनिक तंत्रद्न्याने सुसज्ज करायलाच हवे. त्यासाठी संगणकीय तसेच आधुनिक तंत्रद्न्यान अवगत असलेले किंवा ते आत्मसात करु शकतील असे तुलनेने तरूण पोलिस तयार करावे लागतील, ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शासनाची योजना काय?

५. सामान्य नागरीकांनी दक्ष राहावं तसंच अशा काळात कसं वागावं ह्यासाठी त्यांच्यासाठी काही ड्रील्स (इथे अमेरिकेत जसे फायर ड्रील्स/ टॊर्नेडॊ ड्रील्स असतात त्यासारखे), छोटे अभ्यासक्रम ठेवता येतील का? अफवा पसरवू नयेत, तसच त्या पसरवणायांवर कडक कारवाई केली जावी म्हणून काही निश्चित उपाय योजना आवश्यक आहे. १९९३ च्या दंगली नंतर जशी मोहल्ला कमिटी बनवण्यात आली त्याचा पुढे बराच फायदा झालाय तसच काहिसं करता येणं शक्य आहे का? राज्यस्तरावर प्रशिक्षित कमांडॊजच पथक तयार ठेवण्याचा विचार स्तुत्य आहेच पण त्याही पुढे जाऊन सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं आवश्यक ठरेल. रेड क्रॊस सारखेच काही प्रथमोपचार करणारे प्रशिक्षित नागरीक आपण तयार ठेवायला हवेत. आपत्कालीन परिस्थितीत धाव घेऊन ते देवदूतासारखे काम करू शकतील. शासनाच्या, स्वयंसेवी संस्थांच्या ह्यासंदर्भात काय योजना आहेत?

६. अशा प्रकारच्या ह्ल्ल्यानंतर करण्याच्या उपाययोजना पुढे येत आहेत पण असं होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देणं अधिक महत्त्वाच आहे. आपल्या आजूबाजूस कॊण रहातय,काही संशयास्पद चालू आहे का हे सामान्य नागरीकास पोलिसांना पटकन कळवता यायला हवं. त्याला पोलिसाचा धाक किंवा कटकट न वाटता तो मित्र वाटायला हवा. नागरीक आणि पोलिसात सौहार्दाच नात निर्माण करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शासन काय करतय त्यादृष्टीने?

७. हल्ल्याचा एकंदर वृत्तांत पहात असताना एक लक्षात आलं की पोलिसांच्या कंट्रोल रुमला हल्ल्याचा अंदाज यायला वेळ लागला. त्यामुळेच नेमके किती अतिरेकी आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रे काय आहेत ह्याचा सखोल विचार न करता तीन मोठे अधिकारी एकाच गाडीतून कामा होस्पीटल जवळ गेले. क्लोज सर्किट टिव्हीवरून टेहळंणी करणारी खूप सारी पथके अविरत तयार असायला हवीत. हे सोप्प नाही ह्याची जाणीव आहे पण आवश्यक मात्र आहेच. जिथे शक्य होईल तिथे हीडन कॆमेरे लावले गेलेच पाहीजेत. सरकारी यंत्रणा यद्ययावत करण्यासाठी शासन काय पावले उचलत आहे?

८. मला आठवतय की पाच सहा महिन्यांपूर्वी सामना आणि सकाळमध्ये मुख्य बातमी होती की मुंबईला सागरी मार्गाने धोका संभवतॊ असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. असे बरेच इशारे गुप्तचर यंत्रणा देत असेलही पण (राज्य आणि केंद्र) शासनाने दुर्लक्ष का केले ह्याचं उत्तर कोण देणार? ज्यांनी आपल्या कामात बेजबाबदारपणा दाखवला त्यांना उघडं कधी पाडणार?

९. करकरे युद्धाला निघाले, त्यांनी चिलखत घातलय, हॆल्मेट घालत आहेत असं सगळं मिडीयावाले कव्हर करत होते. त्यातून नेमकं काय साधलं त्यांनी? समस्त मिडीया एक शुद्ध आचारसंहिता बनवू शकत नाही का? किंवा प्रसारभारती सारखी शासकीय संस्था बातम्या सेंसॊर करू शकत नाही का? तशी वेळ आता आलेय असं वाटतं. ब्रेकींग न्यूज मिळवण्यासाठी आणि टी आर पी वाढवण्यासाठी ह्या वाहीन्या कुठल्याही थराला जातील. ह्याच वाहिन्या सामान्य माणसाच्या बुद्धीभेदास आणि अफवा प्रसूत करण्यात आघाडीवर असल्याचं वाटतं. त्यांच्यावर चाप बसायलाच हवा ना? दुसरी धक्कादायक बाब म्हणजे वृत्तपत्रातील बातम्या. ’करकरेंची हत्या दहशतवाद्यांनी केली नाहीच?’ किंवा ’पाकिस्तानी सैन्याची सीमेवर जमवाजमव?’ अशा प्रक्षोभक बातम्या पुढे प्रश्नचिन्ह टाकून पेपरात दिल्या जातात. ह्या प्रकाराची मनस्वी चीड येते. उगाच काहीतरी पिल्लू सोडायचं आणि मग ’पेपरात आलय’ म्हणजे खरच असणार असं धरून चालणारा जो वर्ग आहे समाजात त्याची दिशाभूल करायची. बरीचशी वर्तमानपत्रे अशा बेजबाबदारीने वागताना दिसतात आणि मन अधिक विषण्ण होतं.

१०. दहशतवादी हा अतिरेकीच आहे, कुठल्याही धर्माचा का असेना. अशावेळी तो मुस्लिम असेल तर मुस्लिम संस्थानी पुढे येऊन त्याचा धिक्कार करायला हवा. हा जिहाद, ही नाहक निरपराध माणसं मारणं ही इस्लामची शिकवण नाही हे सगळ्या मुस्लिम धर्मगुरुंनी ठणकावून सांगायला हवय. तरच हे अतिरेकी एकटे पडतील. मेलेल्या अतिरेक्यांना इस्लाम धर्माप्रमाणे संस्कारीत न करता त्यांची बेवारस म्हणून विल्हेवाट लावण्यात आली तर इतरांना चांगलीच चपराक बसेल. त्यातूनच सामान्य हिंदू मुस्लिम जास्त जवळ येऊन दहशतवादी विरुद्ध भारतीय हे नवीन समीकरण तयार होईल. मुस्लिम धर्मगुरू ह्या दहशतवाद्यांना काफीर ठरवून मुस्लिम धर्मातून पदच्युत करतील काय?

११. संसदेवरील हल्ल्याला इतकी वर्षे झाली, तिथेही आपल्या प्राणांची बाजी लावून आर.एस.पी च्या जवानांनी आपल्या संसदेची लाज राखली. न्यायालयाने अफजल गुरुला दोषी ठरवून फाशी सुनावूनदेखील केवळ राजकारणाने त्याला अजून जिवंत ठेवलाय. उद्या असच कोणीतरी कंदाहारप्रमाणे विमान हायजॆक करून त्याला सोडवून नेतील आणि आपण बघत बसू. ह्याची विलक्षण चीड येतेय. पिचक्या कणाच्या ह्या राजकारणी लोकांनी देशाची सुरक्षा सुद्धा विकलेय का असं वाटायला लागतं. ह्याबातीत कितीही नाही म्हटलं तरी शिवसेनाप्रमुखांना आपण मानायलाच हवं. जिवंत पकडलेल्या कसबला त्याच सी. एस. टी. समोर किंवा ताज समोर हजार वेळा फाशी द्या अशी जरब बसवा की पुन्हा कोणी वाकडी नजर करून मुंबईकडे बघू शकणार नाही. पण मतांसाठी लाचार असलेल्या सरकारला हे जमेल काय?

१२. पाकिस्तानने फार फार कोलांट्या उड्या मारल्या आहेत ह्या संदर्भात. पुरावे नाहीत म्हणून गळे काढण्यापलिकडे ते काहीच करत नाहित. मागे पाकिस्तानची क्रीकेट टीम भारतात आली होती तेव्हा वानखेडेची खेळपट्टी उखडली होती शिवसैनिकांनी. तेव्हा शिवसेनेचं असं आंदोलन माझ्यासह सगळ्यांनाच खटकलं असलं तरी आता पाकिस्तानचा दौरा भारत सरकारने रद्द करायला लावला त्यात आपल्याला तथ्य वाटतय. शिवसेना प्रमुखांचं मोठेपण कशात असेल तर अशा द्रष्टेपणात आहे हे जाणवतं. माझही मत आधी; राजकारण, संगीत, क्रीडा ह्यात देश, धर्म आणू नये असं होतं पण आता डोक्यावरून पाणी जातय. सरकारने कडक धोरण अवलंबलच पाहिजे. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक सगल्याच पातळींवर आपण असहकार पुकारायला हवा. आपण वेळ पडलीच तर किंवा वेळ पाडूनच अतिरेक्यांचे अड्डॆ पाकिस्तानात घुसून उखडलेच पाहिजेत. भारत पाक सीमांवर तणाव निर्माण करून अफगाण तालिबान च्या सीमांवरच पाकिस्तानी सैन्य भारताच्या सीमांकडे वळवण्याचा तालिबान्यांचा प्रयत्न असेलही पण आपण केवळ राजकीय मुत्सद्दीचे, टीप्पण्यांचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यायला हवा. पाकिस्तान हे राष्ट्र दहशतवाद्यांना पोसून जागतिक भय निर्माण करत आहे हे आपण सगळ्या जगाला पटवून द्यायला हवय. तिकडे कराची चा शेअर बाजार पार ढासळलाय. पाकिस्तानातली अर्थव्यवस्था कोलमलडतेय. सामान्य लोकांची अन्नान्न दशा होण्याचा दिवस दूर नाही. सद्ध्या अमेरिका जो पैसा त्यांना पुरवतेय त्याचा त्यांना खूप आधार आहे. अजून डबघाईला गेल्यास कुरापती काढून युद्ध करण्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय दिसत नाही. युद्ध न करता त्यांची कोंडी करता आली तर आपल्याला तेही हवच आहे. संसदेवरचा हल्ला, बॆंगलोर तसेच इतर शहरांमध्ये झालेले हल्ले ह्यातून सरकारने काहीच बोध घेतलेला जाणवला नाही, आता तरी सरकार काही करेल अशी अपेक्षा करावी काय?

अशा अनेक प्रश्नांनी मी, माझ्यासारखे तरूण जर्जर आहोत. माहितीचा अधिकार असला तरी तो वापरण्याचे द्न्यान, उत्साह आणि पुढाकार घेण्याची कोणाची इच्छा नाही. पूर्वी सारखी तत्वद्न्यांनींची भाषण ऐकायला कदाचित मिळणार नाहीत पण ह्याविषयांवर लिहीणारे राजकीय मुत्सुद्यांचे, विश्लेषकांचे ब्लॊग्स मिळतील का ह्याचा शोध सुरु आहे. नुकतेच यु ट्युब वर अविनाश धर्माधिकारी यांनी केलेल्या भाषणांच्या, आवाहनाच्या चित्रफिती पहाण्यात आल्या. मनापासून आवडल्या, कोणतरी चांगलं करतोय, तळमळीने करतोय हे पाहून बरं वाटलं. रेडीफ वरचे अनेक विचारवंतांचे लेखही आवडले.

बातम्या पहाताना मला जाणवत होतं की ताज जिंकलं, ट्रायडेन मिळवलं अशा बातम्या येत होत्या. सखेद आश्चर्य वाटलं ते ह्या गोष्टीचं की आपल्या इथे घुसून अतिरेक्यांनी आपलीच वित्तहानी, जिवितहानी केली. त्यांच्याकडून आपण आपलाच भूभाग शूरवीर पोलिसांच्या बदल्यात मिळवला म्हणून जल्लोष करायचा? आपण त्यांना इतक्या सहज घुसू दिलं ह्याची आधी लाज वाटायला हवी. एखाद्या फितूरामुळे मुघलांना मिळालेला किल्ला परत मिळवताना तानाजी गेला तेव्हा राजे कसे हळहळले असतील ह्याची कल्पना येऊ शकते. अंगावर गोळ्या झेलत दोन्ही हातांनी दांडपट्टा चालवत शत्रूला एक इंचही पुढे येऊ न देणारे बाजी.. ’सरणार कधी रण..’ म्हणत तोफांचे आवाज येईपर्यंत यमाला सुद्धा थांबवणारे बाजी... आणि अतिरेक्याची बंदूक हातात पकडून ठेवून देहाची चाळण झाली तरी न कोलमडणारे ओंबाळे ह्यांच्या शौर्यात काहीच फरक नाही. असे आदर्श इतिहासाच्या पुस्तकातून तरुण पिढी पुढे यायला हवेत. ह्या पोलिसांच्या शौर्यावर प्रतिभावंतांनी पोवाडे लिहायला हवेत आणि प्रभातफेर्यांमध्ये किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये ते गौरवाने गायले जायला हवेत.

आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईचे रक्षण करणाया पोलिसांना/ सैनिकांना तसेच हॊटेलमधील, कामा रुग्णालयातील कर्मचारी ज्यांनी इतरांची सुटका केली त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. पोलिसांनी अतिरेक्यांना तिथेच रोखलं म्हणून पुढचा अनर्थ टळला ह्याची सगळ्यांना जाणीव आहेच. "भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी...." हे आज एकदिलानं मुंबई पोलिसांना, कमांडोज ना आपण सांगूया.

स्वतःच्या प्रांणांची पर्वा न करता सदरक्षणाय खलनिर्दालनाय सरसावणाया सगळ्या द्न्यात, अद्न्यात वीरांसाठी बोरकरांच्या शब्दात ही आदरांजली --

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती........

यद्न्यी ज्यांनी देऊन निजशिर
घडले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर
नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती.. !!

मध्यरात्री नभ घुमटाखाली
शांतिशिरी सम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती..
तेथे कर माझे जुळती.. !!

-------------------------------------------------------------------------------------
कोलंबिया डायरी:
कोलंबियामध्ये येऊन महिना उलटला, दोघेही स्थिरावलोय आता बयापैकी. थंडीच प्रमाण त्यामानाने कमीच दिसतय इथे, तसच अजूनही इथे हिरवी कंच झाडी आहेत, पूर्ण पानझड अजून तरी दिसत नाहीये. सकाळी बरच कुंद वातावरण असतं, अशावेळी दोन्ही बाजूंनी फांद्या झुकलेल्या दाट झाडीतून नाजूक थंडीने झाकोळलेल्या सूर्याचे कवडसे झेलत आणि कॆसेटप्लेअरवर कुमार सानू किंवा किशोरदाची गाणी किंवा मग परवीन सुलतानाची ठुमरी ऐकत जाण्यात एक वेगळीच मजा अनुभवायला मिळतेय. ऒफीस तसं १० मिनिटांच्या ड्राईव्हवरच आहे आणि वाहतूकही तुरळक त्यामुळे गाडी चालवताना वेळ कसा जातो कळतच नाही. रानडे रोड, मुंबई २८ आणि लक्ष्मी रोड, पुणे ३० इथे मिळत नाही (पु. लं. नी म्हटलय) तसच टू नॊच रोड, कोलंबिया, साउथ कॆरोलिना-२९२२३ इथे मिळत नाही असं काही नाही असं म्हणता येईल. वॊलमार्ट, टार्गेट, पोस्ट ऒफीस, सगळ्या प्रकारची हॊटेल्स, इंडियन ग्रोसरी स्टोअर सगळं सगळं इथे आहे, हाच इथला एक मुख्य रोड असल्यामुळेही असेल कदाचित, त्यामुळे एकाच फेरीत सगळी कामं होऊन जातात. एकंदर इथे जम बसायला लागलाय नवीन ओळखीही होत आहेत. शिवाय इथे अपार्टमेंट घेताना ते लेक फेसिंग (विंड्सर लेक) घेतलय त्यामुळे बाल्कनी मध्ये उभ राहून किंवा खुर्च्या टाकून तळं, त्यातली बदक, बगळे, होड्या, झाडं सगळं काही वेगळ्याच विश्वात घेऊन जातं, उन्हाळ्यात खूपच छान असेल इथे असं दिसतय.

Monday, November 3, 2008

एदिऒस डेलस..

तसं बघायला गेलं तर आम्ही कन्सल्टींग मधले सॊफ्टवेअर इंजिनिअर्स म्हणजे मुशाफ़ीरीत वाकबगारच. एके ठीकाणच काम संपलं किंवा अधिक चांगलं काम मिळालं की दुसरीकडे मुक्काम वळवणारे. त्यातूनच नविन माणसे, नविन ठिकाण, नविन अनुभव यांनी संपन्न होत जाणारं हे आयुष्य मला खूपच आवडतं. घराबाहेर पडलोच आहोत तर जग बघून घ्यावं हा हेतू कायम मनात असतोच त्यामुळे जिथे आपल्या बुद्धी आणि कष्टांच अधिक चीज होईल तेथे जाण्याकडे कल अधिकच असतो. ह्याचबरोबर आर्थिक जगतातील बद्लांचे आडाखे बांधत कामात सुरक्षितता, स्थैर्य, मोबदला ह्यात समन्वय साधायला जमणं हे देखील व्यक्तिगत आणि तितकच महत्त्वाचं.

या अवाढव्य अमेरीकेत एकूण सहा टाईम झोन आहेत आणि सगळीकडे भाषा एकच असली तरी हवामान, वाहातूक ह्यांच्याशी जुळवून घेताना दरवेळी वेगवेगळे अनुभव येतात. तरीही स्टारबक्स, डंकीन डोनट्स, वॊलमार्ट, सॆम्स क्लब, पिज्जा हट, सब वे सगळं प्रत्येक ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या कुठल्याही कोपयात गेलो तरीही एक साचेबंद जीवनमान आढळते. भारताशी तुलना केली तर हे विशेषत्त्वाने जाणवते. मुंबईच्या माणसाला पुण्याला राहायला जायचे असेल तरीही खाण्यापिण्याच्या, राहाण्याच्या आणि किराणामालाच्या खरेदी पासून सगळ्या गोष्टी नव्याने समजून घ्याव्या लागतात हा माझा स्वानुभव आहे. भारतात एका राज्यातून दुसया राज्यात जाऊन स्थायिक व्हायचे तर भाषेपासून अनंत अडथळ्यांवर मात करावी लागते (कॊस्मोपॊलिटन मुंबई पुण्यात येणारे बाहेरील लोक त्यातल्या त्यात नशीबवान म्हणायचे!). त्यामानाने इथे सगळंच सोप्प आणि साचेबद्ध आहे, आमच्यासारख्या फिरण्याची हौस असणाया जोडप्यांना खूप्पच सोप्प पडतय त्यामुळे. मर्यादित सांसारीक जबाबदयांमुळे ते सहज शक्य होतय हे ही तितकच खरं.

अमेरिकेतल्या माझ्या आयुष्याची सुरुवात लिंचबर्ग ह्या व्हर्जिनियातल्या लहानशा गावातून झाली. खूप सारे समवयीन तसेच शांतेश, अनिरुद्ध सारखे जीवाभावाचे मित्र, वॊल्डन पॊड सारखं सुंदर अपार्टमेंट कॊंप्लेक्स, शांत आणि प्रसन्न गाव. शिवाय डोंगरांच्या जवळ. काम खूप असलं तरी खूप फ़िरता आलं तिथे असताना. महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम सगळे लांब होत असले तरी मी ३-३ तास ड्राईव्ह करून जात असे. अगदी मंतरलेले दिवस होते ते. पुढचा टप्पा कॆसस मधल्या ऒव्हरलॆंड पार्कातला. सुदैवाने मुकुंद-वैशाली, उदय-गौरी ह्यांसारखे मित्र शिवाय शांतेश-सोनालीही तिथे असल्याने खूप आनंदात गेले दिवस. आमच्या कंपनीतल्या मित्रांचा खूप छान ग्रूप झाला होता, एक छोटस कुटुंबच. ह्या भागात सगळं सपाट, डोंगर दर्या समुद्र असलं काही नसलं तरी शेतं खूप. बरेच मित्र एकत्र असल्याने आणि सगळ्यांना भटकायची आवड असल्याने चिक्कार फिरलॊ. इथलं महाराष्ट्र मंडळ बर्यापैकी कार्यरत असल्याने बर्याच कार्यक्रमाना उपस्थिती लावता आली. नंतर मग न्यू जर्सी मध्ये होतो बराच काळ. तिथे ट्रफिक खूप असलं तरी एडीसनच्या जवळ राहाण्याची मजाच निराळी. कॆंसस मधे आणि मग इथे कडाक्याची थंडी म्हणजे काय ते अनुभवता आलं. मराठी विश्वच मनोहर सभागृह अगदी जवळच असल्यानं सगळ्याच कार्यक्रमाना माझी उपस्थिती असायची. शिवाय त्यांनी सुरु केलेल्या मराठी वाचनालयाचा मी पहिला सभासद होतो, ती भूकही छान भागवता आली. सेअरव्हिल्ली मधल्या तळ्याभोवतीचा दोन अडीच मैलाचा फेरफटका ही माझी विशेष आवडाती गोष्ट त्या दिवसातली. तळ्याकाठी तासंतास बसून वाचत किंवा सूर्यास्ताच्या रंगाची उधळण बघत किंवा पक्षी, फुलपाखरं पहात बसण्याची गोडी निराळीच.. मधे जेव्हा कौमुदी आणि मी न्यूजर्सी/ न्यूयॊर्क फिरायला गेलो तेव्हा मुद्दाम ह्या तळ्यापाशी घेऊन गेलो होतो तिला, असो! तर आता हे गेले सोळा सतरा महिने डेलस मधे कसे गेले खरच कळ्लं नाही. आशीष, सारीका सारखे जवळचे मित्र आणि किरण, कालिंदी सारख्या रसिक जोडप्याचा सहवास मिळाला हे आमचं अहोभाग्यच. इथून लांब गेल्यावर त्याची खरी किंमत अजून जाणवेल हे निश्चित. किरण कडची मराठी पुस्तके तसेच इथले कोजागिरी, गणपती सारखे घरगुती कार्यक्रम, क्रिकेट ह्यामुळे इथले सगळेच वीकेन्ड्स कुठे ना कुठे लागलेले असायचे. डेलास महाराष्ट्र मंडळ तसेच डेलास मेहफील ह्यांचे विशेष आभार मानायला हवेत. मेहफील ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे आम्हाला खूप साया शास्त्रीय गायकांना जवळून ऐकता आलं, ते क्षण कधीच विसरता येणार नाही.

सगळ्या ठिकाणांचा उल्लेख करताना अजून एक गोष्ट आठवते म्हणजे प्रत्येक ठिकाणची देवळे. ’जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरोनिया’ ह्या उक्तीवर दृढ विश्वास असल्याने प्रत्येक ठिकाणची देवळे हा आमच्या रोजच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनलाय. तेथे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे ह्यातून अतिशय ह्रुदय तसेच निस्पृह संबंध जोडले गेलेत. अनेक सदविचारी, सदविवेकी, विद्वान तसेच अभ्यासू माणंस मला इथूनच भेटलीत. पार्सिपेनितील इस्कॊनचे देऊळ तसेच डॆलस मधील इस्कॊनचे कालाचंदजी देऊळ मला विशेषत्वाने आवडते. न्यू जर्सी मधील ब्रिजवॊटर टॆंपल सुरेख आहेच पण तिथले उपहारगृह विशेष चवदार आहे! :-) डेलास मधल्या एकता मंदीरातले कार्यक्रम पण विशेष उल्लेखनीय आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे सरिता गायतोंडे यांनी घेतलेले आमचे योगाभ्यासाचे वर्ग ही इथली अजून एक उल्लेखनीय बाब. तसेच देवळात वरच्या मजल्यावर एक मेडीटेशन हॊल बांधलाय. तेथे मृगांक जोशी ह्या प्रसिद्ध चित्रक्रारांनी दोन वर्षे मुक्काम करून भारतातील संत महात्म्यांची आठ आठ फूटी चित्रे रेखाटली आहेत. अक्कलकोट स्वामी, संत रामदास, संत द्न्यानेश्वर तसेच मीराबाई, जलाराम बापा, कबीर अशा बयाच संतांचा मेळाच तिथे भरलाय. अवश्य भेट देण्याचे हे ठिकाण. विठठल रखमाईची मूर्ती तसेच दत्तात्रयप्रभूंची मूर्ती हा अजून एक सुखद धक्का देवळातला. अनल आपटेंचं उत्कृष्ट जेवण ही अजून एक तिथली आवडती गोष्ट.

सुरुवातीला मला लोकं प्रश्न विचारायचे काय मग, ’अमेरिका बरी वाटतेय की भारत?’ जसजसा काळ बदलला मी इथे फिरलो, रुळलो तसा प्रश्न बदलला आता. ’अमेरिकेतल काय आवड्त मग वर्जिनिया, कॆसस, न्य़ू जर्सी की डेलस?’ असं आता विचारलं जातं. गूळही गोड, साखरही गोड, मधही गोड. मेनका, रंभा सगळ्याच अप्सरा. तुलना करून मन संकुचित करणं मला तरी अवघड जातं, अयोग्य वाटतं. जे आहे ते तसं तिथल्या निसर्गासह, माणसांसह मला आवडलं, त्यांनीच माझं आयुष्य इतकं समृद्ध केलय असं मी आज आत्मविश्वासाने म्हणू शकतोय!

’चालणायाचे भाग्य चालते’ असं म्हणतात, पुढे जायलाच हवं.. नव्याच्या शोधात, जुन्या आठवणी सुगंधी कुपित ठेवून.. मग एखाद्या निवांत संध्याकाळी त्या सुगंधी आठवणींनी उजळून जायचं.. जुन्या डायरीच्या पानासारखं.. नविन माणसं, नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आयुष्याच्या कुठल्यातरी पुढच्या अद्न्यात टप्प्यावर मग तेही जुनं ठरवित अजून पुढे, अधिक नवीन.. अधिकाधिक नवीन..

असं मनमोकळं, नाविन्याला आसुसलेल आयुष्य जगण्यात विलक्षण नशा आहे, मजा आहे! जोपर्यंत साचेबद्ध आयुष्याची अपरिहार्यता समोर येत नाहीये.. निदान तोपर्यंत तरी, पुढे जायलाच हवं, आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने!

एक राह रुक गयी तो और जुड गयी
मै मुडा तो साथ साथ राह मुड गयी
हवा के परों पे मेरा आशियाना...
मुसाफीर हू यारो, न घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है.. बस्स चलते जाना..

Monday, October 20, 2008

तुझे नाम नाही असा श्वास नाही..

श्री स्वामी समर्थ
अक्कलकोटच्या स्वामींसाठी लिहिलेला हा गझलेच्या अंगाने जाणारा स्तुतिपाठ 'मायबोली गझल कार्यशाळा -२' मध्ये सामील करण्यात आला होता. 'नाही' असा रदीफ घेऊन कोणत्याही वृत्तात गझल लिहिण्याचा कार्यशाळेचा उपक्रम होता.

वृत्त - भुजंगप्रयात
गण - ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
उदा. : गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा


तुझे नाम नाही असा श्वास नाही
तुम्हावीण स्वामी दुजा ध्यास नाही

असे केशरी दूध नी गोड पोळी
दिल्यावीण त्वा या मुखी घास नाही

नको वेदशास्त्रे, नको कर्मकांडे
नको ध्येय ज्याला तुझी कास नाही

अणू आणि रेणू तुवा व्यापलेला
न ब्रह्मांड जेथे तुझा वास नाही

तुझ्या पादुकांच्या वरी डोइ माझी
कुठे पाप ज्याला तिथे नास नाही

तुझा हात पाठी भिऊ मी कुणाला
भवाच्या भयाचा मला त्रास नाही

गुरु मार्ग दावी घडे मोक्षप्राप्ती
प्रशांताप्रमाणे दुजा दास नाही

- प्रशांत

Wednesday, October 15, 2008

आर्थिक अस्थैर्याचे दिवस..

यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?
अर्थः जोपर्यंत जगताय सुखात जगा, कर्ज घ्या, तूप प्या.. एकदा हे शरीर गेलं (म्हणजे मृत्यू नंतर) ते पुन्हा कुठं येणार आहे?

तर एकंदर अमेरिकेचा हलणारा आर्थिक डोलारा पहाता हे त्यांच्या इन्वेस्ट्मेंट बँक्सचे तसेच ताकदीपेक्षा जास्त कर्ज घेणार्‍यांचे ब्रिदवाक्य असायला हरकत नाही. गेल्या काही दिवसात अमेरिकेत जो आर्थिक पेचप्रसंग उभा राहिलाय तो जवळून बघता आला, समजून घेता आला. त्यावर घडणार्‍या चर्चा, विवाद, बेल आउट प्रकरण, त्याला झालेला उशीर आणि त्यादरम्यान वाढलेले नुकसान, आकस्मिक तळ गाठणारा वॉलस्ट्रीटचा बाजार आणि मग मागोमाग कोसळणारे जगभरातले बाजार असं बरच काही घडत गेलं. अचानक आयुष्याचा वेग वाढल्यासारखं झालं. इथे अमेरिकेत सामान्य माणूस सुद्धा शेअर, म्युच्युअल फंड्स यामधे गुंतवणूक करतो. बर्‍याच निवृत्ती योजना (ज्यांना इथे ४०१के म्हणतात) त्या म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक करतात. त्यामुळे ज्यांच्या मुलांची शिक्षण आहेत किंवा जी निवृत्तीच्या जवळ आली आहेत त्यांचे ४०१के प्लान्स अक्षरश: वितळत आहेत त्यामुळे ते अतिशय चिंतातूर आहेत. तसच सामान्य माणूस आर्थिक मंदीच्या चाहूलीने हबकलाय. ह्या सगळ्याचे मूळ जो सबप्राइम घोटाळा झाला त्यात तसेच भरमसाठ नफा कमवण्याच्या हावरटपणातून झाल्याचं दिसून येतय. एकामागून एक बँका कोसळण्याच कारण हेच की लघुकालीन अमाप फायदा डोळ्यासमोर ठेवून अनेकांना वाजवी पेक्षा खूप जास्त तात्पुरती सवलत देऊन, पत न बघता घरांसाठी कर्जे दिली गेली आणि ती फेडता न आल्याने कर्जे घेणार्यांनी हात वर केले, हळूहळू वसुली करणे अशक्य झाले आणि कर्जे देणार्‍या बँका स्वत: आर्थिक चणचणीत सापडल्या. ही गुंतागुंत प्रचंड मोठी होत गेली तसेच सरकारचे ह्यावर काडीचेही नियमन नसल्याने सगळीकडेच लिक्विडीटी क्रंच निर्माण झाला. क्रेडीटवर चालणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेला तरण्यासाठी पैंशांचा तातडीने पुरवठा करण्याशिवाय सरकारकडे पर्याय नव्हता. खूप खोलवर जाऊन विचार केला तर अमेरिकी समाजाच्या चैनी वृत्तीत तसेच क्रेडीट वर आधारीत जीवनपद्धतीत ह्याच अजून एक मूळ लपलय हे दिसून येतय. ह्यावर वेंकटेश यांनी स्व्देशी जागरण मंचाच्या सभेत बोलताना केलेला *हा अभ्यासपूर्ण उहापोह* खूपच आवडला. भारततील एकत्र कुटुंबपद्धती तसेच जबाबदारीने वागण्याची सामाजिक समज ह्यामुळे आपल्या इथे जी सेव्हींग्ज बेस्ड आर्थिक जिवनपध्दती आहे त्यामुळे भारतात इथल्या इतकीत बिकट समस्या होण्याची शक्यता कंमी आहे असे दिसते, अर्थात भारतापुढे गरिबी, लोकसंख्या, भ्रष्टाचार असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेतच. एकंदर काय की भांडवलशाहीची शेखी मिरवणार्‍या अमेरिकेला आज त्यांच्या तत्वाविरुद्ध जावं लागतय. सरकारला हस्तक्षेप करावा लागतोय बँकांना पैसा पुरवण्यासाठी. दुर्दैवाची गोष्ट अशी की येउ घातलेल्या निवडणुकातील दोन्ही उमेदवारांमध्ये ह्याविषयी तितकी समज आणि दूरदृष्टी दिसत नाही. आमच्या शेजारीच इथे, मेरी म्हणून एक अमेरिकन बाई राहाते. तिला आशियाई संस्कृतीचे आकर्षण आहे आणि आम्हालाही इथल्या अमेरिकन सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल बरच कळत राहात तिच्याशी बोलताना, त्यामुळे आमच्या गप्पा नेहमीच रंगतात. अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगताना ती म्हणते की अमेरिकन आर्थिक जीवन म्हणजे मोठा ब्रॉड वे शो आहे. पुढे सगळं छान, आकर्षक तुम्ही अगदी ज्याला वर्ल्ड क्लास म्हणाल असं, पण मागे तो एक मोठ्ठा घोळ आहे जो निस्तरायची कोणाचीच इच्छा नाही आणि आता तर ताकदही नाही.
ह्या सार्‍यांतून एक गोष्ट निश्चित दिसतेय. येत्या काही वर्षात नोकरकपात, बेरोजगारी वाढेल. त्याला तोंड द्यायचे असेल तर सगळ्यांनीच आपली सेव्हिंग्ज क्षमता वाढवायला हवी, अनावश्यक खर्च टाळायला हवेत. इथे महागाई जाणवण्याइतपत वाढतेय. भारताच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या इथे बाहेरच्या संस्थानी पैसा काढून घेतल्याने बाजार कोसळलाय. स्वतःच्या पायावर उभ रहायला शिकायला हवं भारताने आता. अणुकरार झाला ही भारताची जमेची बाजू. पंतप्रधान तसेच सरकारी ज्येष्ठांनी दाखवलेल्या मुत्सुदेगिरीमुळेच हे शक्य झालं ह्यात वाद नाही. तसच गुंतवणूकदारांनी बाजारातल्या सगळ्या चढ उतारांकडे बारकाईने पहायला हवं. खाली आलेला बाजार ही गुंतवणूकीची उत्तम संधी असू शकतेही. माझ्या सारखे तरूण ज्यांचे भारत आणि अमेरिका ह्या दोन्ही दगडांवर पाय आहेत त्यांच्यासाठी येता काळ विशेष कसरतीचा आहे. ह्या जागतिकरणाच्या लाटेवर स्वार होणार्‍यात आम्हीही आहोतच. लहान वयात जग बघण्याची संधी, तौलनिक आर्थिक संपन्नता, विशाल दृष्टीकोन ह्या जमेच्या गोष्टींबरोबरच वैयक्तिक, कौटुंबिक पातळ्यांवर अस्थिरता, अपरिहार्य बदल, स्थित्यंतरे ह्यातून कमालिचे वेगवान आयुष्य, रॅट रेस मधे धावण्याची वृत्ती असं बरच काही वाट्याला येतय. त्यातूनच शिकायलाही मिळतय.

डॅलस डायरी:
महाराष्ट्र मंडळाचा गणपती उत्सव छान झाला. दोन छोटी नाटकं बसवली होती स्थानिक कलाकारांनी. शिवाय जेवणही उत्तम होते अनल आपटे यांचे. इथे बर्‍याच मित्रांकडे घरगुती गणपतीला जाण्याचाही योग आला ह्यावेळी. नवरात्रात देवळात नऊ दिवस गरबा होता. काही जणांच्या घरी घट बसले होते तिथे जाऊन आरत्या, जोगवे म्हणता आले. किरण आणि कालिंदी साठये यांच्याकडे कोजागिरीचा छान कार्यक्रम झाला. पु. लं ची 'एक शून्य मी' हा त्यांनी ७४ सालच्या म. टा. दिवाळी अंकात लिहिलेला लेख मी तेव्हा वाचला. भेळ, मसाले भात, मसाला दूध, गप्पा गाणी खूपच खास झाली कोजागिरी ह्यावेळची.
आता दिवाळीची तयारी सुरु आहे. इंडीयन असोशिएशनचा, महाराष्ट्र मंडळाचा असे दिवाळीचे भरघोस कार्यक्रम आहेत.
दरम्यान येथे विजय कोपरकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. खूप आवडला. त्यांनी वसंतराव देशपांडेंच 'सावरे अज्जय्यो' हे गाणं म्हटलं ते केवळ अप्रतिम. मुलतानी, राजहंस हे सायंकाळचे राग त्यांनि आळवले. ठुमरीही खास झाली. वियज कोपरकरांच्या गायन मैफलित व्हायोलिन, पेटी, तबला ह्यावर साथ देणारे कलाकार होते ते सगळे पुण्याचे. त्यांचा पूर्ण चमूच मला वाटतं 'सीओईपी' चा. ह्याच चमूचा 'भैरव ते भैरवी' हा अजून एक कार्यक्रम इथे झाला.
दरम्यान बरेच दिवस मनात असलेली गोष्ट अचानक जमून यावी असं घडलं, ज्याला आपण योग येणं असही म्हणतो. तर इथे सौ. सरिता गायतोंडे यानी प्राणायम, योगासने ह्यांचे अभ्यासवर्ग सुरु केलेत. सुदैवाने मला तिथे सामिल होण्याची संधी मिळाली. स्वत: सरिता काकू गेले दहाहून अधिक वर्ष योग शिकत आहेत. कैवल्यधाम येथे दरवर्षी जाऊन त्या पूर्ण योगाभ्यास शिकल्या आहेत. त्यांचा पातांजली योगाचा अभ्यास आणि ते शिकवण्याच कसब वादातीत आहे. दहा सप्ताहांतांच्या ह्या वर्गाचा आम्ही पंचवीस विद्यार्थी लाभ घेतो आहोत. श्वसनमार्गशुद्धी, कपालभाती ह्या शुद्धीक्रिया, पवनमुक्तासन, मार्जारासन, व्याघ्रासन, पवनमुक्तासन, वज्रासन, चक्रासन्, भुजंगासन ही आसने, त्राटक प्राणायामाचे प्रकार आणि प्रत्येकाचे फायदे हे सगळं छान समजून घेता येतय. मुख्य म्हणजे आम्हाला प्रत्येकाला सरिताकाकूंच वैयक्तिक मार्गदर्शन मिळतय. योग्य वयात काहितरी चांगलं शिकत असल्याच खूप समाधान मिळतय.

योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलम शरिरस्यच वैद्यकेन
योपाकरोत्तम प्रवरम मुनिनाम, पाताजलिं प्रांजलिरानतोस्मि

Monday, September 8, 2008

गणपती बाप्पा मोरया..

दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी मायबोलीवरील गणेशोत्सवात मी लिहिलेली आरती -

ओवाळू आरती देवा गणपती
माझी मति राहो दृढ तुझ्याप्रती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||धृ||

बुद्धिचा दाता तू, कलेचा प्रेमी
विघ्नांचा हर्ता, रिद्धि-सिद्धिंचा स्वामी
तुझ्या भक्तिने तुष्ट, शंकर पार्वती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||१||

माझी पूजा रत, तुझे चरणी
तूचि एक नित्य, नामस्मरणी
गोड घे मानुनि सेवा, मंगलमूर्ती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||२||

सर्वा सद्बुद्धी दे, ठेव समाधानी
मन रंगूनी जावो, गोड तुझ्या नामी
निरामय आरोग्य नि राहो सुख शांती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||३||

चालः ओवाळू आरती मदनगोपाळा किंवा ओवाळू आरती माता कलावती..

Thursday, August 28, 2008

कवितांच्या गावा..

संवेदने दिलेला खो पुढे मिनोतीने मला आणि स्वातीला दिला (ह्या ऒलिंपिकच्या वातावरणात अगदी पेटती मशाल दिल्यासारखा.. घे आणि धाव म्हणत) तेव्हा खरं तर दोन प्रश्न होते खो नेमका कुणाला द्यायचा आणि माझ्या इतक्या आवडत्या कवितांमधून नेमक्या कोणत्या लिहायच्या.. संदीप, पाडगावकर, बोरकर, गदिमा, शांताबाई, सुरेश भट, कुसुमाग्रज, केशवसूत, आरती प्रभू, ग्रेस, सुधीर मोघे कितीतरी..

मला आवडलेल्या दोन कविता ज्या मी केव्हाना केव्हातरी माझ्या ब्लॉग वर टाकल्या असत्याच त्याला हे निमित्त मिळालं इतकच :-)आणि हो असा उपक्रम चालवायचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या ज्या मित्रांचे ब्लॉग्स ह्या ना त्या कारणाने सुप्तावस्थेत गेले आहेत त्यांना पुनर्जागृती..

पहिली कविता बोरकरांची - यशस्वी जीवन म्हणजे काय हे अलगद आणि समर्थपणे उलगडवून दाखवणारी. ह्या कवितेशी माझी पहिली ओळख झाली ती पु. लं. च्या एका लेखामध्ये आणि आता जितकेवेळा वाचतो ऐकतो ती अधिक आवडत जातेय.. सुनीताबाई आणि पु.लं जो बोरकरांवर कार्यक्रम करायचे त्यात ही असायची नेहमीच.

दुसरी कविता पाडगावकरांची, इतकी चपखल लिहिलेय की वाटाव पाडगावकर नक्की एकदा प्रेमभंगातून गेले असावेत. ह्या कवितेशी माझी ओळख करून दिली क्षिप्राने, जिने मला कवितांच्या गावातल्या अशा कित्येक मातब्बर धुरणींशी खूप जवळून ओळख करून दिलेय, कवितांविषयी मला बहुश्रुत व्हायला मोलाची मदत केलेय.

अरुण आणि परागकणास् ही कवितावली पुढे चालवायला देतोय..

ह्या खॊ चे काही नियम संवेदने ठरवलेले त्याच्या ब्लॊगवरून उदधृत करतोय..
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)
----------------------------------------------------------------------------------

जीवन त्यांना कळले हो

जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो..

जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होऊनी जीवन
स्नेहासम पाजळले हो..

सिंधुसम हृद्यात जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर
घन होऊनी जे वळले हो..

दुरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने
फुलले अन परिमळले हो..

आत्मदळाने नक्षत्रांचे
वैभव ज्यांनी तुळले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
घरीच जयां आढळले हो,
उरीच जयां आढळले हो,
जीवन त्यांना क्ळले हो....

-- बा. भ. बोरकर
----------------------------------------------------------------------------------

तेव्हांची ती फुलं..
सगळं संपलं असं समजून उभे होतो
एकमेकांसमोरः आणि एकमेकांपलिकडे
पानगळतीच्या ओंजळीत होती साठवलेली
आपण एकमेकांना दिलेली तेव्हांची ती फुलं..

फुलणं ही जशी फुलाची भाषा असते
तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा
कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी
एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..

न बोलता उभे होतो एकमेकांसमोर
यापुढे भेटलो तरी आपण परके असणार
कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाहीत
हे ज्यांना क्ळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..

- मंगेश पाडगांवकर

डेलसचा ऒगष्ट..

डेलास डायरी:
हा ऒगष्ट तसा खूपच उन्हाळ्याचा होता इथे, तापमान बरेचदा दिवसा १०० फॆ च्या वर जायच (म्हणजे ३४ सें.) आणि भाजून काढणारं ऊन नको वाटायचं. पण महिना व्यस्त गेला खेळ आणि भटकणं अशी उत्तम चंगळ झाल्याने.

ऒलिंपिक्सच्या बयाच स्पर्धा बघता आल्या त्या केवळ एन.बी.सी च्या कृपेने. मायकल फ्लेप्स एक शतांश सेकंदाने जिंकला हे पहाताना डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कुठे पोहोचलय तंत्रशास्त्र की इतका सूक्षम फरक सुद्धा पकडता यावा! मायबोलीवर मुकुंदने ऒलिंपिक विषयी, त्यातले संभाव्य विजेते खेळाडू, वेगवेगळ्या स्पर्धा ह्यांची माहिती दिली होती त्याचा बराच फायदा झाला खेळ बघताना. बोल्ट्चा वेगही एकदम सुसाटच. ऒलिंपिक मध्ये पात्र ठरून देशाचे प्रतिनिधित्व करणार्या प्रत्येकाला माझा मनःपूर्वक सलाम. दुसरं आवडलं ह्यावेळी ते म्हणजे चीनची जिद्द. गेले कैक वर्ष अनेक दबावांना सामोरे जात चीनने ऒलिंपीकची तयारी चालवली होती. उद्घाटनाच्या आणि समारोपाच्या कार्यक्रमाने चीनने साया जगास तोंडात बोटे घालावयास लावली, शिवाय त्याबाबतीत त्यांनी एक नवीन मैलाचा दगड बनवून ठेवलाय. तसच नुसते सुनियोजनच नव्हे तर जास्तीत जास्त सुवर्ण घेऊन अमेरीकेच्या खेळातील वर्चस्वाला सरळ आव्हानच दिलेय. अभिनव बिंद्राला सुवर्णपदक देताना लावलेले भारताचे राष्ट्रगीत ऐकताना पुन्हा एकदा रोमांच उभे राहीले. भारताच्या दृष्टिने हे ऒलिंपिक चांगलेच गेले. हेच पथक ऒलिंपीकला जायच्या आधी कलमाडीनी मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते की आम्ही जातोय पण पदकाच्या अपेक्षा ठेवू नका, आणि ही बातमी पेपरात वाचून धक्काच बसला होता. जर एवढ्या जबाबदार पदावरच्या व्यक्तीमध्ये जर इतका कमी आत्मविश्वास असेल तर कसचे काय. ऒलिंपिक हा शारिरीक तर आहेच पण मानसिक कणखरपणाचा खेळ आहे. तुम्ही त्या क्षणाला दबाव कसा झेलता आणि कशी कामगिरी करता हे महत्त्वाचे. म्हणून ह्या पार्श्वभूमीवर भारतीय चमूने विशेषतः बॊक्सिंगपटूंनी केलेली कामगिरी स्पृहणीय वाटते. खूप काही शिकायला मिळालय भारताला यातून हे नक्की.

इतर कार्यक्रमांबरोबरच आठ दिवस सुट्टी टाकून अमेरीकेच्या पूर्व किनायावर फिरायला गेलो होतो. वॊशिंग्ट्न डीसी, न्यू जर्सी, न्यू यॊर्क मनसोक्त फिरून झाले. न्यू जर्सी मध्ये ओक ट्री रोड वर फिरलो, ब्रिजवॊटरच्या देवळात गेलो होतो आणि पॊईंट प्लेजर ह्या बीच वर. न्यूयॊर्क म़धे तर एक दिवस डाऊन टाऊन, एक दिवस अप टाऊन आणि एक दिवस मिड टाऊन अस खूप फिरणं झालं. आम्ही दोघही पक्के मुंबईकर असल्याने न्यू यॊर्क विशेषच आवडलं. प्रचंड महाग असलं तरी तितकच प्रेमळ शहर. न्यूयॊर्क म्युझियम मधून शहराचा पूर्ण इतिहास तसेच टाईम स्क्वेअर, युनियन स्क्वेअर, ब्रॊड वे वरचे शोज (ब्रॊड वे, ऒफ ब्रॊड वे, ऒफ ऒफ ब्रॊड वे) ह्यांची इत्यंभूत माहिती मिळाली. मोमा ह्या आर्ट गॆलरी मधेही पिकासो तसेच इतर जगद्विख्यात चित्रकारांच्या तसेच शिल्पकरांच्या कलाकृती बघता आल्या. अत्तापर्यंत कैक वेळा गेलोय न्यू यॊर्क मधे पण बरेचदा मित्रांना फिरवायलाच आणि मग इंपिरीयल टॊवर, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, टाईम स्केवर, ट्वीन टॊवर्सचा ग्राउंड झीरो, सेंट्रल पार्क ह्याच गोष्टी मुख्यत्वे बघून व्हायच्या. पण ह्यावेळी ह्या गोष्टींव्यतिरीक्त बरंच काही बघता आलं, एखाद शहर समजून घेण्याचा आनंद मिळाला. काहीतरी जागतिक (वल्र्ड क्लास) बघितल्याच समाधान मिळतच मिळतं न्यूयॊर्क फिरताना. शिवाय बस टूर घेतली होती आम्ही त्यामुळे बर्याच गोष्टी समजण्यास मदत झाली. एक अचानक मिळालेलं आणि अतिशय आवडलेल हे नाचो सॆंडविच - http://midtownlunch.com/blog/2008/07/07/off-the-menu-blimpie-sandwich/
एक दिवस संध्याकाळी ब्रुकलीन ब्रिजवर गेलो होतो, अर्ध्याहून पुढपर्यंत चालत गेलॊ आणि अचानक पाऊस आल. मग काय मस्त पैकी मनसोक्त भिजलो. ह्या अशा ठिकणी भिजणं अगदी कायम लक्षात राहील असच.पुन्हा कधीही असं न्यूयॊर्क मधे भटकायला आम्ही दोघेही तयार आहोत बघू कधी संधी मिळतेय का..

सद्ध्या थोडा निवांत झाल्याने पुन्हा वाचनाकडे वळतोय, शिवराज गोर्लेंच ’मजेत जगावं कसं’ हातात घेतलय. पुस्तक वाचायच्या आधीच मला प्रश्न पडला होता की, काय असेल इतकं ह्या पुस्तकात, आणि मजेत जगा हे सांगण्यासाठी आणि कसं ते सांगण्यासाठी पुस्तक कशाला वेगळं, दासबोधात सांगितलय की रामदासांनी, जे बरचस कालातीत आहे म्हणजे इतक्या वर्षांनंतरही समाजाला लागू आहे. पण पहिली काही पाने वाचल्यावर आवडायला लागलय. ह्या माणसाच वाचन चांगलं आहे आणि वेगवेगळ्या घटना, पाश्चात्य लेखकांचे लेखन तसेच पौराणिक दाख्ले उधृत करून बयाच गोष्टी समजावून दिल्यात. पाश्चात्य जग हे भोगवादी आहे तर आपली संस्कृती त्यागवादी. ह्या दोहोंमधे मेळ कसा घालता येईल ह्याचा अभ्यासपूर्ण उहापोह आहे, आवडतय..

आणि हो, मुंबईत पाट्या लागत आहेत बरं का मराठीत असं ऐकलं.. कोणी काही म्हणा हा विषय ढवळून काढायच बरंच श्रेय जातय राजला आणि सरकार सुद्धा ते तसं होऊन देतय थोड्या प्रमाणात कारण मूळ शिवसेनेचा हा मुद्दा नवनिर्माणाने ओढून घेतलाय. एकंदर काय कोणी कितीही भांडा श्रेयासाठी पण काम करा म्हणजे झालं आणि हो आता थोडी विधायक काम सुद्धा येउंदेत.

ठाण्यात ९ थरांचा गोविंदा लावला माजगाव वाल्यांनी असं ऐकलं. कौतुक वाटलं खूप. मी गिरगावतल्या अखिल खोताची वाडीबरोबर जायचो. व्यायामशाळेतली मुल असायचॊ सगळी. २ महिने कचून तयारी करायचो, वजनाचा तसाच तोलाचा सराव चालायचा. दमून भागून ऒफीसमधून आलो की रात्री १० वाजता सराव सुरु. आता बरच व्यावसायिक झालय पण. शिट्टीवर व्यवस्थित थर लावतात, उतरतानाही सांभाळून उतरतात. शिवाय गोविंदांचा विमा उतरवला जातोय. चांगलं वाटलं हे वाचून. माझ्या २००१ च्या गोविंदाच्या व्ही. सी. डी. करून ठेवल्यात त्या रविवारी बघून समाधान मानलं. दहीकाल्याचा आणि काकडीच्या कोशींबीरीचा प्रसाद केला होता.

अजूनही संक्रात, गोकुळाष्टमी आणि गणपती आले की कालवाकालव होते. गणपतीची तयारी सुरु झाली असेल आता, मांडव घातले गेले असतील. मग मांडवातले खेळ, लंगडी, टे टे, वगैरे. शिवाय आरत्या, आवर्तने, प्रसाद, फुले, आरास सगळ्याची तयारी. अगदी उत्सवी वातावरण असेल. दादर, लालबाग तर फुलून गेले असतील गर्दीने. खूपच नॊस्टेलजिक आणि भकास वाटतं इधे ह्यादिवसात.. तरीही इथे मित्रांकडे ग्णपती आहेत आणि महाराष्ट्र मंडळात देखील कायक्रम आहेत म्हणून बरं.

नवलाख विजेचे दीप तळपती येथ
तारकादळे उतरली जणू नगरात
परि स्मरते आणिक व्याकूळ करते केव्हा
ती माजघरातील मंद दिव्याची वात...
(- कुसुमाग्रज)

मिनोतीने नुकतच टॆग केलय, आवडीच्या कविता लिही म्हणून.. त्यामुळे पुढच्या पोष्टमधे ते..

Friday, July 18, 2008

सिंग इज किंग..

सद्ध्या भारतात अणुकरार आणि महागाई ह्या दोन गोष्टीवरून प्रचंड राजकीय आणि सामाजिक उहापोह चाललाय. महागाईमुळे सामान्य माणूस होरपळतोय पण तरीही अणुकराराविषयी सजगतेने बोललं जातय हे चांगलच आहे म्हणा. शिवाय मार्केट सुद्धा पडलेलच आहे त्यामुळे समाजातल्या सगळ्याच वर्गांना अशा एकाचवेळी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्याव लागतय. त्यातच ह्या राजकीय अस्थैर्याने भर घातलेय. माझ्या अल्पमतिने मी हा अणुकरार नक्की काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पण इतकी मतमतांतरे आहेत की बस्स! पण अब्दुल कलाम, तसेच मनमोहनसिंगांवर त्यांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास आहे म्हणूनच असं वाटतय की जर हे लोक पाठींबा देत असतील तर ते नक्कीच हिताच असणार.

पंतप्रधानांनी, ज्या राजकीय मुत्सुद्दीने विश्वास ठरावास सामोरे जाण्याचा निर्णय घेताला आणि तो तडीस नेला, त्याद्वारे त्यांनी एकाच वेळी डावे पक्ष, मायावती आणि नगण्य महत्त्व असणारे पण लुडबुड करणारे प्रादेशिक पक्ष ह्यांना सणसणीत चपराक हाणली. कोटी रुपयांच्या नोटांचा जो देखावा सगळ्यांनी बघितला त्याने भारतीय लोकशाही हादरली नसेल तरच नवल. पण हल्ली आपण एकंदर इतके उदासीन झालोत की साधनशुचिता, नितीमत्ता ह्या गोष्टींचे कुणालाच काही वाटेनासे झालेय. अशावेळी मग पाडगावकरांच्या 'सलाम' ची (पाडगावकरांवरील नक्षत्रांच्या देणे मध्ये शिवाजी साटम ने त्याचं अप्रतिम सादरीकरण केलेलं डोळ्यासमोर आहे ) किंवा 'उदासबोधाची' आवर्जून आठवण येते. अडवाणीं च्या भाषणात तर अभ्यासाचा अभाव, बेजबाबदार विधाने ह्यांची परिसीमा होती. हया माणसास देशाचे पंतप्रधान म्हणून पुढच्या निवडणूकीत निवडून द्यावे काय हा प्रश्न पडावा इतपत अडवाणींनी विश्वासार्हता गमावलेय. पंतप्रधानांनी अचूक धागा पकडून आपल्या भाषणात अडवाणींना सडेतोड उत्तर दिलय. शिवाय अडवाणींचे जे आत्मचरित्र प्रकशित झालय त्यातून त्यांनी जसवंतसिंह तसेच बर्याच भाजपातील नेत्यांची मने दुखावलेयत. अगदी कारगिल युद्ध, कंदाहार प्रकरण, संसदेवर हल्ला, गुजरात दंगल ह्या सगळ्यांत गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेण्याऐवजी कोलांट्या खात केलेल्या कसरती, पाकिस्तानात जाउन जिनांवर उधळलेल्या स्तुतीसुमनांमुळे संघाचा ओढवलेला राग त्यामुळे अडवाणींची स्थिती घर का न घाट का अशी झालेय. त्यातूनच ह्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी जे क्रॉस व्होटींग झालय आणि भाजपा खासदार फुटलेत त्यावरून अडवाणींची स्वत:च्या पक्षावरची पकड सुटतेय हे स्पष्ट दिसतेय. एकूण काय तर भाजपाचं काही खरं नाही आणि मुक्त अर्थव्यवस्थेची फळं चाखायची असतील तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. शिवाय काँग्रेस कडे तरूण नेत्रुत्व आहे आणि आगामी काळात त्याचा त्यांना नक्कीच मोठा फायदा होईल. खासदार खरेदी केले हो अशी ओरड करून गळा काढणार्‍या अडवांणींना मग पत्रकार परिषदेत ह्याला नीट उत्तरे देता आली नाहीतच, शिवाय ज्या पक्षाचे खासदार लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्याने निलंबित होतात तसेच ज्या पक्षाचे प्रमुख बंगारू लक्षमण, पक्षासाठी लाच घेताना पकडले गेल्याने त्यांना हाकलावावे लागले तो भाजप नैतिकता केव्हाच गमावून बसलाय. ह्या कोटींच्या लाचेचा खरा निकाल यथावकाश (सावकाश) लागेलच पण भाजप म्हणजे सरळ सूत, प्रामाणिक आणि नैतिक पक्ष हे केव्हाच मागे पडलय. असं जर असतं तर त्यांनी अणुकराराला विरोध करत डाव्यांची साथ दिलीच नसती. सगळेच आता एकदम तोंडावर आपटल्याने कधी नव्हे ते काँग्रेस जिंकल्याच समाधान सामान्य माणसाला वाटतय असं जाणवतय. ह्या सगळ्यांत पंतप्रधानांनी दिलेलं भाषण जबाबदार तर वाटतच पण सकारात्मक आहे. अणुकरार हे एकच उद्दीष्ट नसून सरकार पुढे महागाई, चलनवाढ, गरीबी असे अनेक जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या दृष्टीने सरकारचे काम चालू आहे अशी ग्वाही त्यांनी दिलेय हे नक्कीच स्तुत्य आहे. सामान्य माणसाला खरा दिलासा मिळाला असेल तर ह्यातून. शिवाय अणुकरार झाला तर वीजनिर्मिती वाढून भारनियमन कमी होईल अशी रास्त आशा प्रत्येकाला आहेच. त्यामुळेच विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने काँग्रेसची प्रतिम उंचावलेय बघू आता ते शिबू सारेन सारख्या असंतुष्टांना कस शमवतात ते. ओमर अब्द्दुल्लांच भाषण सुद्धा सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण झाल्याच वाचलं, असं तरूण नेत्रुत्व काश्मीर कडून हवंच आहे भारताला.

मला आठवतं मी तिथे असताना, असे काही विषय समाजापुढे असले की अभ्यासपूर्ण विचार असलेल्या आणि नावजलेल्या व्यक्तिंना बोलावून व्याख्याने आयोजित केली जात असत. लोकमान्य व्याख्यनमाला, टोपीवाला व्याख्यानमाला, उद्यान व्याख्यानमाला, अमरहिंद व्याख्यानमाला ही काही नावे मला प्रकर्षाने आठवतात. ह्या श्रेष्ठ वक्त्यांचे विचार समजावून घेणे, भाषणानंतर त्यांना इतरांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर त्यांची उत्तरे ऐकणे हा एक अतिशय आनंददायी अनुभव असायचा. ह्यातूनच कुठेतरी विचारशक्ती वाढायला मदत होत असणार. आता अशा व्याख्यानमाला किती होतात आणि किती जण तिथे जातात हे माहित नाही पण तरटा च्या सतरंजीवर बसून, पिशवीत चपला ठेवून त्यावर बसून भर रस्त्यात शिवाजीराव भोसले, मिलिंद गाडगीळ, मुजफ्फ्रर हुसेन, बाळासाहेब ठाकरे, माधव गडकरी, कुमार केतकर, विजय तेंडुलकर, प्रमोद नवलकर, प्रमोद महाजन, बाबासाहेब पुरंदरे आणि कित्येक दिग्गजांची भाषणे ऐकतच आम्ही मोठे झालो. कदाचित अजूनही तिथे अशाच वैचारीक मैफीली रंगत असतील, पण ते दिवस आठवल्यावाचून राहिले नाहीत. मिलिंद गाडगीळ असते तर असं सुद्धा क्षणभर वाटून गेलं.
-------------------------------------------------------------------------------------

डॅलास डायरी
असो!.. गेल्या आठवड्यात इथे राहूल देशपांडे आला होता त्याची गाण्यांची सुरेल मैफल ऐकता आली. अगदी घरगुती स्वरुपाची अशी मैफल मला आणि कौमुदीला खूपच आवडते. त्याने आजोबांची नाट्यगीतं, भजनं गायलीच शिवाय फर्माईशी सुद्धा घेतल्या. एक तरूण कलाकार जो गाण अगदी पुढपर्यंत यशस्वीरीत्या नेउ शकतो त्याच्याशी छान संवाद साधता आला. दरवर्षी पुण्यात जानेवरी महिन्यात वसंतोत्सव सुरु केला आहे राहूल आणि त्याच्या चमूने. त्या दरम्यान भारतात असलं तर जरुर जमवायला हवं. सवाई गंधर्वानंतरचा तेथला हा अजून एक मोठा उत्सव. पुणेकरांची चंगळ आहे हेच खर..

दुसर्‍यादिवशी रविवारी आषाढी एकादशी निमित्त अमित केळकर ह्या स्थानिक कलाकाराचा भजनाचा उत्तम कार्यक्रम देवळात झाला आणि प्रसाद म्हणून अनल आपटेंनी केलेली साबुदाणा खिचडी, काकडीची कोशींबीर, चटणी, खीर तर अप्रतिम.

बरं, तर सद्ध्या हातात पुस्तक नाहीये पण इकडलं तिकडलं असं वाचन चाल्लय. काही लिंक्स --

हेमलकसाबद्दल माहितीपूर्ण लेख --
http://www.maayboli.com/node/2479

समतोल - विजय जाधव ९८९२९६११२४
http://loksatta.com/daily/20080614/ch06.htm

लेले..
http://www.maayboli.com/node/2550

Thursday, June 26, 2008

बर्याच दिवसांनी बरच काही..

आज जवळ जवळ तीन महिन्यांनी लिहितोय इथे. वेळ झाला नाही असंही नाही,पण नाही वाटलं..अगदी वेळ काढून काही लिहावं असं. उन्हाळा सुरू झाला इथे आणि प्रत्येक शनिवार रविवार कुठे ना कुठे लागलेले. खूप कार्यक्रम होते इथे काही महिने गेले. अजूनही चालू आहेत.

देवकी पंडितांची शास्त्रीय संगीताची मैफल सुरेल आणि सुरेख झाली. कौमुदी बरोबर असल्याने गाणं ऐकायचं कसं हे सुद्धा कळायला लागलय हळू हळू आता.

फयूजन ग्रुप तर्फे ह्यावेळी "सुपर ८" अशी क्रिकेटची साखळी स्पर्धा ठेवली होती. "डलास मावळाज" असं आमच्या मराठमोळ्या संघाचं नाव ठेवून आम्ही स्पर्धेत उतरलो. फारशी तयारी नव्हतीच. टेप लावलेल्या टेनिसच्या चेंडूवर आठ आठ षटकांचे सामने झाले. पस्तीस संघ उतरले होते स्पर्धेमध्ये. शनिवार आणि रविवार अश्या दोन दिवसात ही स्पर्धा झाली. बाहेर १०३ फॅ. तापमानामध्ये एका मागोमाग एक सामने खेळणे खरोखरच आव्हानात्मक होते. आमच्यातील काही चांगल्या फलंदाजांच्या जोरावर आम्ही उप्-उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचलो. एकूणच स्पर्धेचे आयोजन आणि स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. गिरगांवात निकद्वारी लेन मधे मला आठवतय ओपन बॉक्स्चे असे सामने व्हायचे पूर्वी, मी रात्री उशीरापर्यंत जागून बघत असे. एकदा तर प्रेक्षकांत असताना डोळ्याला चेंडू इतक्या जोरात लागला माझ्या की सरळ बाजूला जैन हॉस्पीटल मधे जायला लागलं होतं. अर्थात तरीही हे गल्ली क्रीकेट मी सोडलं नाहीच. तेथेच मग सचिन आला होता एक वर्ष बक्षीस वाटायला, मला वाटतं तेव्हा तो पंधरा वर्षाचा असेल, त्याच्या आंतरराष्टरीय कारकीर्दीला सुरुवात व्हायची असावी तेव्हा. त्यावेळी मी त्याची स्वाक्षरी घेतली होती ती अजून जपून ठेवलेय. ह्यावरूनच आठवलं ते १९८३ च्या विजयोत्सवाविषयी. मी पाच वर्षाचाच होतो, पण तेव्हा कपिल चा मोठ्ठा फोटो आणि त्या कपाच्या प्रतिमेसह गिरगाव रोड वर मिरवणूका निघाल्या होत्या ते आठवतय. मला तर स्पष्ट वाटतं की भारत काही करू शकतो आणि जगात ठसा उमटवू शकतो हे कपिलच्या संघाने जगाला पटवून दिलं. त्यातूनच कपिलदेव हा अगदी सामान्यातल्या सामान्याचा एक आदर्श बनला. जिद्द, लढाऊ बाणा ह्या गोष्टी कपिलच्या त्या वर्ल्डकपने भारतीयांना दिल्या. ध्येय ठेवा आणि त्या ध्येयासाठी चिवटपणे लढा हे कपिलने स्वत: लढून दाखवून दिलं. ह्यातूनच भारत जगात ठसा उमटवू शकतो असा आत्मविश्वास तरुण पिढीस मिळाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर क्रीकेटची लोकप्रियताही प्रचंड प्रमाणात वाढली भारतामध्ये, ते शास्त्रीला मिळालेल्या ऑडी मुळे आणि अर्थात चँपियन्स ऑफ दी चँपियस ह्या किताबामुळे! पुढे मग अझर आणि गांगुलीने संघास कित्येक वर्षे उपांत्य, अंतिम् फेरीत आणले ते ह्याच जिद्दीच्या जोरावर...

असो, तर गेल्या काही दिवसात वाचन सुद्धा चाल्लय थोडफार, अर्थात वेग मंदावलाय हे नक्की.सद्धया व. पुं. काळेंच "आपण सारे अर्जुन" वाचतोय. हे पुस्तक वाचनीय म्हणण्यापेक्षा मननीय आणि चिंतनीय आहे. आपलं रोजच आयुष्य म्हणजे अर्जुनाच युद्धभूमीवरच संभ्रमित मनच आहे हे व. पु. नी छान मांडलय. ज्यांना व. पुं. च लिखाण अपील करतं त्यांनी जरुर जरुर वाचवं असं हे पुस्तक. दरम्यान, पी. एम. पी. ही प्रॉजेक्ट मॅनेजमेंटची परि़क्षा उत्तीर्ण झालो. त्याचा अभास चालू होता दोन महीने. कुणाला त्यासंदर्भात कुठलेही मार्गदर्शन हवे असेल तर मदत करायला नक्कीच आवडेल.

गेल्याच आठवड्यात आम्ही इथून जवळच असलेल्या केनडी म्युझियमला भेट दिली. त्याला सिक्स फ्लोअर मयुझियम असं नाव दिलय आता. १९६३ च्या नोव्हेंबर मधे अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष केनडी ह्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ते हे ठिकाण. ह्या संग्रहालयात केनडींच्या जीवनप्रवासाची संपूर्ण माहिती तसेच हत्येच्या दिवशी व नंतर कसे आणि काय काय घडले ह्याची विस्तृत माहिती चित्रफिती तसच प्रतिकृतींद्वारा देण्यात आली आहे. ज्या खिडकीतून कथित मारेकर्याने गोळी झाडली ती खिडकी अजून जशीच्या तशी जपून ठेवण्यात आली आहे. केनडी हे त्यांच्या पत्नीसह लोकांना अभिवादन करत त्यांच्या उघडया छताच्या लिंकन गाडीतून पुढे जात असताना जेव्हा त्यांची गाडी ह्या इमारती जवळून पुढे सरकली तेव्हा तीन गोळ्या त्यांच्या दिशेने आल्या आणि त्यातल्या एका गोळीने त्यांचा वेध घेतला. दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाल्याचे घोषित झाले. साधारण दीड च्या सुमारास ओस्वाड ह्या युवकास संशयित म्हणून पकड्ण्यात आले. ह्याच इमारतीत सहाव्या मजल्यावर एक रायफल सापडली आणि ओस्वाड ह्या इमारतीत काम करत असून ही त्याची असल्याचे पोलिसांनी तपासात शोधले. अर्थात ओस्वाड ने हत्येशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. ह्या कटामधे नक्की कोण आहे ह्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडे होते आणि दोनच दिवसांनी जेव्हा ओस्वाड ह्यास पोलिसांनी हस्तांतरणासाठी आणले तेव्हा काही कळायच्या आतच एका व्यक्तीने ओस्वाड वर गोळ्या झाडल्या आणि त्यास तिथेच कंठस्नान घातले. त्यांनंतर मात्र एकूणच केनडी हत्येमागचे खरे सूत्रधार कोण हे कायम अंधारात राहिले. वॉरेन कमिशनने ओस्वाड हाच खरा खुनी असल्याचा अहवाल मांडला तरीही प्रत्यक्षात केनडींची हत्या मागून येणार्या गोळीने झाली नसून त्याच दरम्यान एक गोळी पुढून आली होती असे बरेच जणांचे म्हणणे आहे. आशर्याची गोष्ट अशी की अमेरीके सारख्या देशातही, देशातील सर्वोच्च व्यक्तीला मारुन सुद्धा हत्येमागचे सूत्रधार मिळत नाहीत. एकूणच लाडक्या नेत्याची हत्या आणि त्यामागचे गणित सोडवण्यात आलेले अपयश ही अमेरीकन नागरींकाची ओली जखम आहे असे जाणवते. शेवटी कुठल्याही नवीन निकालाप्रत न येता ही केस अमेरीकन शासनाने १९८८ मध्ये म्हणजे पंचवीस वर्षांनी बंद केली. संग्रहालयाचा विचार करता, ह्या सहाव्या मजल्यावर ती खिडकी आणि आजूबाजूची परिस्थिती अतिशय व्यवस्थित जपून ठेवलेय. काहीतरी माहितीपूर्ण पाहिल्याचं समाधान मिळत हे नक्की! मनात आलच की भारताने असे दोन तीन धक्के सहन केलेत. गांधीजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांच्या हत्येसंदर्भात पण अशीच संग्रहालये उभारली तर येणार्‍या पिढीस बरच काही समजू शकेल. नाहीतर इतिहासाच्या पुस्तकातल्या पानावरच्या सनावळ्या आणि परीक्षेला किती मार्क असतील ह्याला, ह्याशिवय त्यांना ह्या घटनांमध्येच काहीच स्वारस्य रहाणार नाही कदाचित.....

Monday, March 24, 2008

SCJP5.0 Experiences

This is the first time I am putting something here in English.
Normally, the purpose of this blog is to write on the lines of 'Philosophy-Critic & Hunger' and then my feelings, sentiments, views and understandings of the events happening around me or for that matter all over the world. As an obvious effect, this also helps me keeping my sensitivity alive and encourages me to share my thoughts with others. At the same time, sharing information, knowledge is helping me in creating environment of openness, trust and moving forward with the people I come across in day-to-day life, helping each other in living this beautiful life cheerfully.

I am glad to convey that Yashashree (my significant other) cleared SCJP1.5 (http://www.sun.com/training/catalog/courses/CX-310-055.xml) with 90% score in her first attempt. Being into Java-J2EE profession for more than eight years it was immense enjoyment for me to guide her in certification planning and execution efforts. Many of our friends, especially who are already in Java field requested to let us know the strategies we applied and days we went through, while preparing for the exam. So, here are few points based on our experiences --

1. SCJP1.5 is very good certification to have on resume for any Java Programmer. First let us tell you that it is not easy to have it unless you plan for it and remain focused through out.

2. Start of the starting point -->
Understand the objectives of SCJP1.5, it’s scope and find out the answer why you want to go for it?
Having too much of information available, many times creates problems as it takes time to decide where to start from and what path to continue. Definitely, different people have different technical appetites and responsiveness but still there are few preferred tools, books and approaches.
http://saloon.javaranch.com/ is the site you never want to miss. Thanks to people who are doing good work in this forum. This is example of how, good people can help others and create chain for goodwill and encourage others to do better.
Thanks to Kathy Sierra & Bert Bates for their masterpiece they created in the form of SCJP5.0 study guide.
http://www.amazon.co.uk/exec/obidos/ASIN/0072253606/qid%3D1145235860/203-2307724-7521531

3. Plan your journey before you execute-->
Depending on the experience you have and your familiarity with language you can pace your journey. Thorough reading of SCJP5.0 guide is absolutely essential. We divided preparation in three phases.

Phase one:
1. Read SCJP5.0 guide word to word. Understand and assimilate each and every concept learned. This book definitely helps you remain focused. Solve the exercise questions at the end of each chapter.
2. Do use textpad or IDE (eclipse, WSAD etc.) to write java programs. Do get used to compiling and executing java programs through command line. Writing code is extremely important. Understand all the basic concepts making sure that you are in a position to guestimate compilation errors, runtime errors in the given program. Create your thumb rules and decide what you will do to see if there are compilation issues in the given program. This is where writing program helps.
3. Another important thing is to use java class decompiler tool (e.g. JAD). Get into habit of opening class files and understanding how java code is transferred into class files by compiler. Many times just looking in class files solves big puzzles.
4. Keep browsing through Java Ranch forum to get an idea of experiences of other SCJP students.
5. Keep reading through "2 minute drills" (in SCJP guide) at least once in two days for the chapters you have completed.

Phase two:
1. Reading SCJP5.0 again and this time concentrating more on the concepts which were difficult to digest. You can go for one more, i.e. third reading if required. Keep your focus only on the concepts where you feel, you need more preparations. This will save your lot of time.
2. This thorough reading will help you in building very solid technical base for the exam. From here you need to practice more on answering questions.
3. Keep browsing through Java Ranch forum and reading through "2 minute drills" at least once in two days.

Phase three:
1. To prepare for question answer mode, maintain an excel sheet where you will write answer to every question you ever solve. This is especially important to track your progress. You may give same exam again and again, thus keeping all the answers and score handy will help you measure your progress and build your confidence. This is also important to find out exactly when you will be ready to call prometric to schedule the exam.
The very important thing to keep in mind is "We learn more from mistakes than from correct answers". Thus doing thorough analysis of mistakes and developing attitude of not repeating them is absolutely important. As you progress based on the mistakes you are making you will like to put your own notes/points and append them to 2 minutes drill so that it will be part of your daily revision.
2. Start solving questions at the end of each chapter, 5 chapters at a time. This will bring your mindset in question-answers mode. This will also help you in keeping your concentration for long periods such as 3 to 3.5 hrs and make you sit at one place. This is important as exam lasts for nearly 3 hrs and you obviously have to look at every question & its options critically while answering it. If you are not used to, then keeping concentration high for such a long period is not easy at all.
3. Solve various mock tests mentioned in the forum. Again, key here is to write your answers in the excel, keeping track of your score and analyze every question you answered wrong. Keep appending your own 2 minute drill. In mock exams you will face questions from various topics randomly, e.g. first question may be from generics, next from threads and then next from fundamentals. You must get habitual to answer questions on random topics.
4. SCJP1.5 study guide also comes with Mock exam and bonus exam. It's difficulty level is almost same as that of actual SCJP.
Whizlab also have good set of mock tests. Do take all the tests and make sure that you give each test with enough seriousness. These tests are slightly difficult than actual SCJP. Besides here you do not know actual no. of correct answers out of the given options, so tests become more difficult.
5. In this phase your daily routine should be -
Take mock test(s)
Analyze previous mock test
Read 2 minute drill
Read Java Ranch forum
Generally, 2 to 3 weeks are required to complete all the mock tests or practice questions (i.e. Whizlab diagnostic tests & mock exams, tests mentioned in Java Ranch forum and SCJP guide mock exam & bonus mock exam).
6. Keep taking exams till you start scoring 80% consistently. This is time when you can call prometric and tell them you are ready.
7. Just sit back, concentrate and relax in the day prior to exam. Revise your 2 minute drill and get ready for the cracking score.

Quick tips:
1. There are around 8 to 10 drag and drop questions. Review function does not work in drag and drop so be careful.
2. You exactly get to know how many options to choose from given set of options to answer given question in actual exam.
3. If you are already working on Java 1.4 and planning to go for SCJP1.5 be cautious. Do make sure that you have understood the differences between Java1.4 & Java1.5 before you start your preparations. Also, do make sure that you are taking mock tests of Java1.5 and not that of 1.4 (for e.g. Java 1.5 has autoboxing and same question may end up in different answer based on which Java version you are using.)
4. Do keep practice of drawing object diagrams. This typically helps in answering questions related to garbage collection.

Few important points:
1. SCJP5.0 certified does not mean you are java guru. It only shows that you have general good understanding of Java as a language and your employer doesn’t have to send you for Java training.
2. SCJP5.0 certification is the basic building block and start of a bigger journey in Java technical world. More sound & confident, you are, better it is going to be. SCWCD, SCBCD, SCEA are other milestones you may want to think of once SCJP is completed.
3. Keep revising SCJP5.0, 2 minutes drill till the time you (or Java 1.5) remain in profession. Sadly, I have seen people who are certified long back and have completely lost grasp even on basic java concepts. This will degrade the certification as well as the certification holders.
4. Rather than the milestone of SCJP5.0 what you enjoy more is the journey and transformation you go through while preparing for it. This is as valuable as (or may be more valuable than!) the actual certification. It is definitely good achievement to have it on your professional resume.

If this inspires you to go for it, please proceed. Let us know if you need any kind of help. Our best wishes with you always!

As Bert says – If you're not on the edge, you're taking up too much room.

- Prashant & Yashashree

Saturday, March 8, 2008

आपले खरेखुरे आयडॊल्स..

आयुष्याला उधळीत जावे, केवळ दुसयापायी
या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे....

आजकालच्या जगात अशी समर्पित जीवनशैली असलेली माणसे विरळीच. पण तरीही आपल्याला आजूबाजूला अशी काही माणसं दिसतात की त्यांच कर्तुत्व समाज, देश, मानवता अशा कुठल्याना कुठल्या पातळीवर अतुलनीय कामगिरी करतं, इतकं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यातून स्फूर्ती, दिशा तर मिळू शकतेच पण अजूनही ध्येयवादी माणसं आपल्यात आहेत आणि आपणही मनात आणलं तर बरच काही करू शकतो, असा दिलासा त्यांच्याकार्याकडे बघता सहज मिळू शकतो. आज मी अशाच काही मला आवडलेल्या महाराष्ट्रातील आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीबद्दल थोडं लिहिणार आहे, संदर्भ आहे नुकतंच वाचलेलं युनिक फीचर्सचं ’खरेखुरे आयडॊल’ आणि हो, अत्यंत घाईगडबडीत असूनही मला हे पुस्तक आवर्जून भेट देणार्या सौ. शर्मिला फडके यांचे विशेष आभार.
आयडॊल, हा शब्द गेल्या काही वर्षात कानावर पडू लागला तो म्हणजे इंडीयन आयडॊल सारख्या टॆलंट सर्चला वाहिलेल्या कार्यक्रमांच्या भडीमारामुळे. माझ्या नेहमी मनात यायचं, की इथे लहान वयातले गायक मेहनतीने पुढे येतात आणि विख्यात गायकांनी गायलेली गाणी अतिशय मेहनतीने आणि प्रचंड व्यावसायिक स्पर्धेत सादर करतात. त्यांच्या स्पर्धात्मक आणि गुणात्मक मूल्याविषयी दष्टीकोन वेगळा पण त्यांना आयडॊल म्हणून संबोधणं मला तरी खटकलच. लताचं गाणं किंवा मुकेशच गाणं, जगजीतची गझल एखादा कलाकार छान गात असू शकेलही पण शेवटी त्यात कलाकारच स्वतःचं काही नवीन असंण्याला जास्त वाव नाहीच, म्हणजे केवळ अनुकरणात्मक गुणमूल्यांवर कोणाला ’आदर्श’ कसं म्हणाव? नेमका हाच सूर मला खरेखुरे आयडॊल्सच्या प्रस्तावनेत सापडला आणि तेथूनच त्या पुस्तकाच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली. आपण जे शोधत होतो ते हेच असं पहाता क्षणी वाटून गेलं.

आपल्या आधीच्या पिढीत खरेच ध्य्वेयवादी लोक होवून गेले, दुर्देवाने आपली पिढी तितकी संस्कारक्षमही राहिल्याचे वाटत नाही आणि मुख्य म्हणजे कोणाच्या पावलावर पाउल टाकाव, घर संसार ओवाळून टाकावा असा एकही विचारवंत, नेता राजकारणात किंवा समाजकारणात तळ्पताना दिसत नाही. ऐंशी ते पन्नासवर्षांपूर्वी स्वातंत्र्य आणि मग सुराज्य ह्या प्रेरणेने झपाटलेले अनेक नेते आपल्या देशाला मिळाले. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर काही जणानी गांधीवादाचे अनुकरण केले तर काही जणांनी आंबेड्करांचे. काही जण स्वातंत्र्यवीर तात्यारांवांच्या हिंदुत्ववादी तर काहीजण कॊ. डांगेंसारख्या समाजवादी विचारधारेत ओढले गेले. ह्या प्रत्येक नेत्याची अशी स्वतंत्र शैली, विचारधारा आणि व्यक्तीमत्वाची धार होती की त्यांच्या कर्तुत्वाकडे सहजच आकर्षले जाऊन सामान्य माणसांचे आदर्शस्थान ह्या व्यक्तीना आपोआपच मिळाले. दुसरे म्हणजे एखाद्या विचाराचे, सुधारणेचे चळवळीत रुपांतर करण्याचे महनीय काम ह्यांनी करून दाखवले म्हणून ते आयडॊल. आता असे आयडॊल होऊ न शकण्याची दोन कारण म्हणजे एखाद्या विचारधारेला सर्वसमावेशक बनवून त्याला बहुजनसमाजाचा पाठींबा मिळण्याइतपत आणि चळवळ उभारण्याइतपत कसलेलं नेतृत्व हल्ली बघायलाच मिळत नाही. दुसरं त्याहून अधिक महत्त्वाच म्हणजे सुशिक्षित पांढरपेशा वर्गात आलेली कमालीची सामाजिक अनासक्ती. मी, माझं आणि मला ह्यापलिकडे विचारशक्तीचा अभाव. खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा ह्या वर्गाला बर्याच प्रमाणात झाल्याने वाढलेले उत्पन्न, चैनीच्या बदलत्या सवयी, परदेशातील संधी, जागतिक स्तरावर विस्तारलेल्या दृष्टीबरोबर आलेला निकटदृष्टीता दोष, जास्त पैसा मिळवायचा हे एकच ध्येय आणि ते करताना हरपलेलं सामजिक भान, आनंद आणि मनोरंजनांच्या कल्पनांच बदलतं स्वरूप तसंच एकंदरच ’आहे रे’ आणि ’नाही रे’ वर्गात पडत चाल्लेल अंतर. व्यक्तीचा आर्थिक विकास होतोय पण त्यांमागे मूल्य नसतील तर समाजाचा, राष्ट्राचा विकास होणार नाही. एका गटाचा उत्कर्ष होत राहून दुसर्या गटाची मात्र फरफट होत राहील. शिवाय राजकीय अनभिद्न्यता, त्यातल्या वाईट गोष्टी बदलता येणार नाहीत असा चुकीचा अनुग्रह तसेच आपण काही चांगलं करू शकू ह्या आत्मविशासाच अभाव आणि मुख्यत्वे काहीतरी करायला हवं अशा अस्वस्थेचा अभाव त्यामुळे ह्या समाजाच मन दगड होतय. शेतकर्यांच्या आत्महत्या, कुपोषणाचे बळी ह्यातून ही वाढत असलेली दरी जाणवते आहेच. हे चित्र विदारक आहेच, पण मूठभर का होईना काही लोक तन मन धन अर्पून दिवसरात्र झटत आहेत, थोडेसे प्रकाशकिरण नक्कीच आहेत बोगद्याच्या शेवटी!


वैयक्तीक आणि मर्यादित स्वरुपातील सामाजिक पातळीवर असे काम करत असलेल्या बर्याच व्यक्तीची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख हे पुस्तक वाचताना झाली. ह्यातली बहुतेक नावं पेपर मधून किंवा टी. व्हीवर आपण बरेचदा पहातो, पण ह्या पुस्तकातून त्यांच्या जास्त जवळ जायला नक्कीच मदत होईल. अवचटांच कार्यरत वाचताना अशा अनेक व्यक्ती आपल्यलाला भेटल्या अगदी तशाच. श्री. सुहास कुलकर्णी यांनी पुस्तकाची प्रस्तावना इतकी समतोल आणि अचूक लिहिलेय की सगळेच मुद्दे तंतोतंत पटतात आणि विचार करायलाही भाग पाडतात.
पुस्तकाचा उद्देश विषद करताना लेखक म्हणतो, की नाचगाणी करून मनोरंजन करणायांना डोक्यावर घेण्यापेक्षा तळाच्या माणसांसाठी जे लोक काम करत आहेत त्या खयाखुया व्यक्तींकडे लक्ष देणे आज आवश्यक आहे. ’खरेखुरे’ आयडॊल्स कुणी असतील तर हे लोक आहेत. मला स्वतःला तरी हे पटलय.

कुणी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटतय तर कुणी संशोधन करून शेती उत्पन्न वाढवायला मदत करतय. कुणी रोंगांवर उपाय शोधून गोरगरीवांच्या आरोग्याची काळजी घेतय तर कुणी नियोजन आणि निधी यांची योग्य सांगड घालून प्रशासकीय व्यवस्थेवर ठसा उमटवत आहे. कुणी गावपातळीवर काम करताहेत तर कुणी राज्यपातळीवर तर काहींच्या कामाची जागतिक दखल घेतली जातेय. ही प्रत्येक व्यक्ती तुमच्या आमच्यासारख्याच परिस्थितीत वाढली असून संघर्षातूनच वर आली आहे.
हे सगळं इथे विषद करण्याचा उद्देश इतकाच, की ह्या काम करणाया व्यकींच्या प्रती आपण कृतद्न्य राहायला हवच शिवाय जमेल तसा त्यांच्या सामाजिक कार्याला हातभारसुद्धा लावता आला तर उत्तमच!

पुस्तकातल्या सगळ्या आयडॊल्सची नावं लिहून त्यांच्या कामाची एका वाकयात ओळख करून देतोय. त्यांचे पत्ते पुस्तकात दिले आहेत, कोणाला हवे असतील तर मी जरूर देईन.

१. डॊ. अभय आणि डॊ. राणी बंग - गडचिरोलीतील शोधग्राम, वैद्यकीय संशोधनाचा आदिवासींना फायदा. बालमृत्यूंचा अभ्यास व उपाययोजना. आरोग्यदूत प्रशिक्षण कार्यक्रम.

२. डॊ. आनंद कर्वे - हाडाचे संशोधक, शेतकी शास्त्रद्न्य, ग्रामीण विकासासाठी कार्यरत ’आरती’ (ऎप्रोप्रिएट रुरल टेक्नॊलॊजी इन्स्टीट्यूट) संस्थेचे सर्वेसर्वा.

३. डॊ. विकास आमटे - आनंदवनातलं पुढचं पाऊल, नियोजन आणि संवर्धन.

४. डॊ. हिंमतराव बावस्कर - जागतिक मान्यताप्राप्त विंचूदंशावरील संशोधन. हजारॊ विंचू दंश रुग्णांचा प्राणदाता.

५. मेधा पाटकर - नर्मदा बचाव आंदोलन, धरणांमुळे विस्थापित भूमीपुत्रांच्या प्रश्नाला वाचा आणि सामाजिक न्यायासाठी शासनावर दबाव. कुशल संघटक.

६. अण्णा हजारे - राळेगणसिद्धी आदर्श गाव. माहितीचा हक्क मिळवण्यासाठी सामजिक जन आंदोलन. त्यातील उणीवा दूर करण्यासाठी सत्याग्रह, उपोषण यांद्वारे सरकारवर दबाव.

७. डॊ. शशिकांत अहंकारी - हेल्थ ऎंड ऒटॊ लर्निंग ओर्गनायझेशन (हॆलो). मराठवाड्याच्या दुष्काळी भागात भरीव कार्य.

८. नसिमा हुरजूक - स्वतःच्या अपंगत्वावर मात करीत लाखो अपंगांसाठी भरीव सामाजिक कार्य, ’दिलासा’ हा मतिमंद मुलांसाठी निवासी प्रकल्प, ’स्वप्ननगरी’ हे अपंगांसाठी पुनर्वसन केंद्र. ’चाकाची खुर्ची’ हे त्यांनी लिहिलेंलं पुस्तक खूप यशस्वी. आजपर्यंत जवळजवळ ३२ पुरस्कारांनी सन्मानित.

९. सुरेश खोपडे - आय पी एस कॆडरमधील ज्येष्ठ पोलिस अधिकारी. समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन शास्राने अनेक जटील प्रकरणांची उकल आणि पोलिसदलात आमुलाग्र बदल. समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यावर भर. मोहल्ला कमिटी योजना आणि दंगलीवर प्रभावी उपाययोजना.

१०. सी. ए. जामगडे - गरीब आणि पिडित वर्गाला महिला बचत गटांद्वारे क्रांतिकारी मदत. प्रचंड जनसंपर्क. सूक्श्म त्रृण विभागाचे स्टेट बॆंकेचे प्रबंधक.

११. डॊ. नरेंद्र दाभोळकर- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नाजूक सामाजिक विषयांवर चर्चा, संघर्ष, आंदोलन ह्यांद्वारे जनजागृती.

१२. मनिषा म्हैसकर - रोजगार हमी योजना आणि जलसंवर्धनाची सांगड घालून दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात मोलाचं कार्य. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य यांची मोट बांधून अनेक अडचणींवर मात. कुशल प्रशास्कीय अधिकारी म्हणून कर्तुत्वाचा ठसा.

१३. वसंतराव टाकळकर - वनीकरण, जलसंवर्धन क्षेत्रांत अतुलनिय कामगिरी. माथा ते पायथा ह्या धोरणाच अवलंब करून पाणी अडवा, पाणी जिरवा ह्या सूत्रानुसार अनेक सलग समतल चर बांधण्यात आणि सुमारे पाच कोटी झाडे लावण्यात यश.

१४. डॊ. भारत पाटणकर - चळवळींद्वारे शेतकर्यांना समान पाणी वाटप मिळावे ह्यांसाठी प्रयत्न. शासनावर पाणी वाटपाच्या पुनर्नियोजनासाठी दबाव. धरणग्रस्तांच पुनर्वसन करण्यासाठी उभारलेल्या चळवळीच नेतृत्व.

१५. डॊ. माधव चव्हाण - मुंबईतील गरीब वस्त्यातं बालवाड्या सुरु करून ’प्रथम’ संस्थेद्वारे वस्तीतल्याच दहावी-बारावी शिकलेल्या मुलीस प्रशिक्षण देऊन शिक्षक बनवण्यास प्रोत्साहन. केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न रहाता, निधी मिळवण्यासाठी उद्योजक आणि आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मदतीचा ओघ मिळवण्याचं कसब.

१६. गणपतराव पाटील - कोंडिग्रे ग्रामपंचायत, परदेशापर्यंत किर्ती पोहोचलेल्या श्रीवर्धन ग्रीन हाउसचेसचे सर्वेसर्वा. प्रयोगशील, जागतिक आणि व्यावसायिक दृष्टीकोन असलेले शेतकरी. शेतीनिष्ठ शेतकरी, विद्न्याननिष्ठ शेतकरी, कृषिसम्राट पुरस्कारांनी सन्मानित. ७०% गुलाबांची परदेशात निर्यात. इंटरनेटद्वारा विक्री करणारा शेतकरी.

१७. आमदार नरसय्या आडाम - आडाम मास्तरांचा सोलापूरात दीड कोटी विडी कामगारांसाठी लढा. त्यांना हक्काच संकुल मिळवून देण्याचं मोलाचं काम. यंत्रमाग कामगारांसाठी दिलेल्या लढ्यात उल्लेखनीय कामगिरी. कार्यकुशल जनसेवक आणि लोकप्रतिनिधी.

१८.आमदार राजू शेट्टी - बड्या साखरसम्राटांविरुदध शेतकयांच्या न्याय्य संघर्षाचे नेतृत्व. जिगरबाज प्रवृत्ती आणि जनजागरणाद्वारे लोकांच्या मनात आपुलकीचे स्थान.

१९. पॊपटराव पवार - हिवरे बाजार गावाचे सरपंच. आदर्श गाव योजनेद्वारा हिवरे बाजारचा कायापालट. नशाबंदी, चराईबंदी, कुर्हाडबंदी, नसबंदी आणि श्रमदान ह्या सूत्राचा अवलंब. पाणलोट विकास कार्यक्रम आणि सुनियोजनाद्वारे झालेल्या हिवरे बाजाराच्या ग्रामविकासाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल.

२०. चंद्रकांत पाठक - अपारंपारिक उर्जा स्रोत आणि त्याचा शेतीसाठी वापर करण्यासंबंधी मोलाचं संशोधन. नवनवीन उपकरणांचा शोध लावून शेतीसाठी आधुनिक उर्जाय़ंत्राची निर्मिती.

२१.अशोक बंग - स्वावलंबी शेतीचा प्रयोग विकसित करण्यात मोलाचे योगदान. संशोधन आणि वैद्न्यानिक शेती करतानाच शेतकर्यांना पाण्याचे नियोजन आणि शास्त्रीय मार्गदर्शना करण्यात यशस्वी भूमिका.

२२. तीस्ता सेटलवाड - मुंबई दंगल, श्रीकॄष्ण आयोग, गुजराथ दंगल केसेस, झहिरा प्रकरण ह्यांसारख्या विषयांत जनजागरण. निर्भिड पत्रकार.

२३. उल्का महाजन - रायगड जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींसाठी मोलाचे कार्य. सर्वहारा संघटेनेद्वारे कातकर्यांच्या दळी जमिनिच्या प्रश्नाची शासनदरबारी सोडवणूक. दारुबंदी, शिक्षण, आरोग्य यांविषयी कातकर्यांमध्ये जाणीव जागृती.

२४. अविनाश पोळ - ग्रामीण भागात शेतकीविषयक सुधारणा राबवून गाव तन मन धनाने एकत्र ठेवून आदर्श बनवण्यात यश. निर्मल ग्राम पुरस्काराने साताया जिल्ह्यातील त्यांची गावे राष्ट्रपतींद्वारा सन्मानित.

२५. डॊ. बी. आर. बारवाले - संकरीत बियांणांवर यशस्वी संशोधन. कपाशीच वाण निर्माण करणारया सर्वात मोठ्या कंपनीच महिकोचं नाव आंतरराष्ट्रिय स्तरावर पोहोचवण्यात मोलाच योगदान.

Tuesday, February 26, 2008

भारतीय रेल्वे - राष्ट्राची जीवनरेखा..

लालू महाराज की जय!

लालूप्रसाद यादवांनी आपल्याभोवती नेहमीच एक प्रसिद्धीचं वलय ठेवण्यात यश मिळवलय. मुरब्बी राजकारणी आहेतच पण संधीचा फायदा कसा करून घ्यायचा आणि मॆनेजमेंटच्या बरोबरीने मार्केटींग सुद्धा कसं करायचं, स्वतःचा वेगळा ब्रॆंड तयार करून तो कसा पसरवायचा ह्याचं कसब त्यांच्याकडे आहे हे मान्य करावंच लागेल.

भारतीय रेल्वे हा एक मोठ्ठा हत्तीचं. लालूने Elephants can dance!! हे दाखवून दिलय. त्यानी मांडलेल्या ह्या पाचव्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणालाही तक्रारीला जागा ठेवलेली नाही. दरवेळेस भारतात मी तीन आठ्वड्याच्या सुट्टीवर गेलो तरी रेल्वेचा पास हटकून काढतो. गर्दी वाढतेय, अगदी अंगावर येण्याइतकी वाढतेय दरवर्षी हे जाणवतं पण रेल्वेचा मोह काही सुटतं नाही. गेल्यावेळी तर मी Office time मध्ये कित्येक वेळा सकाळ संध्याकाळ प्रवास केलाय रेल्वेने, गिरगांव बोरीवली असा. कारण Office time मधे तुम्ही रस्त्याने म्हणजे बस किंवा टॆक्सीने जायचा विचार केलात तरी दोन अडीच ताशांची गच्छंती आणि वाढणारं मीटर आणि भाडं ते वेगळच. शिवाय कार पुलिंग करणारे कमीच त्यामुळे प्रदुषणात भर, वाहतुकीत भर. ह्या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे उपनगरीय रेल्वे. वेळेची बचत, इंधनाची बचत, पैशांची बचत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे हया मुंबईच्या रक्तवाहीन्या झाल्यात, लाखो कामगार आज केवळ तिच्याच सहाय्याने मीठ भाकर कमवत आहेत. मुंबईकरांच्या जीवनात म्हणूनच रेल्वेला अनन्य साधारण महत्त्व आहे. हजारो चाकरमान्यांसारखाच मी ही मग सवयीप्रमाणे दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसतो, उत्सुकता असते की पासाचे दर किती वाढले, तिकीटांचे किती वाढले आणि काही नवीन सुविधा आहेत का? बोरीवली विरार मार्गाचं चौपदरीकरण तर वर्षानुवर्ष अडकून पडलं होतं, तर काही वेगळे प्रकल्प धसास लागत आहेत का?

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, रेल्वे केवळ नफ्यातच आणून न थांबता, लालू साहेबांनी २0२५ पर्यंत रेल्वेला कुठे न्यायचय ह्याचा चक्क आराखडाच मांडलाय. सगळ्याच थरातून रेल्वेच्या अर्थसंकल्पाच स्वागत गेले चार वर्ष होतय. हे होणं शक्य नाही असं म्हणणार्या भल्या भल्या मॆनेजमेंट गुरुंना लालूने विचार करायला भाग पाडलय. मालवाहातुकीतून जबरदस्त उत्पन्न वाढवून प्रवासी वाहतूकीवर ज्याचा सामान्य माणसावर सरळ परिणाम होतो, सुविधांचा वर्षाव केलाय. सामान्य प्रवासी डोळ्यासमोर ठेवून हे बजेट बनवल जातय असं लालू म्हणत आहेत ते खरं वाटतय.

आठवतय की कॊलेज मधे असताना एक फॊर्म भरून घ्यायचो रजिस्टारकडून आणि मग तो रेल्वेचा पास काढताना द्यायचो. विद्यार्थ्यांना अर्ध्या दरात पास मिळतो. ह्यावर्षी तर मुलांना १२ वी पर्यंत तर मुलींना पदवीपर्यंत फुकट पास देण्याची योजना मांडलेली बघून कौतुक वाटलं. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे. अजून एक आवडलेली बाब म्हणजे हाय टेक लालू. चर्चगेट किंवा सी.एस.टी. येथे ठेवलेल्या मशीन मधून लांब पल्ल्याच्या गाड्य़ांची टीकीट अगदी सामान्य माणसाला विनासायास काढताना, तंत्रद्न्यानाचा अगदी निम्नस्तरावरही होणारा उपयोग पाहून मला नेहमीच कौतुक वाटायचं. योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात तसं ह्या तांत्रिक गोष्टीचा कुशलतेने वापर करून घेणं महत्त्वाचं. लालूने रेल्वेला हायटेक करायचं मनावर घेतलेय हे अतिशय स्तुत्य आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी कशी होते हे बघणे महत्त्वाचे. कूपन्स टिकीटांसारख्या सोयी आहेत पण मशिन्स चालत नाहीत अशी स्थिती दिसून येते, असं काही होऊ नये ह्यासाठी खास लक्ष द्यायला हवं. सी. एस.टी सारख्या मोठ्या स्थानकांवर पार्कींग लॊट्स, तसेच अत्याधुनिक सोयी, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यासाठी विशेष प्रयत्न, गाड्यांमधे जास्त स्वच्छता ठेवण्यासाठी चांगल्या टॊयलेट्स चा वापर, मोबाईल वरून रेल्वे टीकीट बुकींगची सोय, सरकते जिने आणि येत्या दोन वर्षांत रेल्वे टीकीटांसाठी रांग हटवण्याचा उद्देश ह्या सगळ्याच योजना स्वागतार्ह आहेतच. ह्यातून टीकीटांच्या काळाबाजाराला आळा बसेलच शिवाय सामान्य माणसाचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.
इथे परदेशात बरेच ठीकाणी बस आणि रेल्वे ह्यांचा समन्वय दिसून येतो. म्हणजे एकच टीकीट दोन्हींच्या प्रवासाला चालते आणि ते खूपच सोयीचे होते. माझ्या मनात असा विचार नेहमीच यायचा की मुंबईसारख्या ठीकाणी ते का शक्य असू नये, म्हणजे रेल्वे साठी काढलेला पास बी. एस. टी. ला चालला तर बरे नाही का? ह्यावेळी लालूसाहेबांनी ’गो मुंबई स्मार्ट कार्ड’ ची योजना मांडलेय तिचे स्वरुप काहीसे असेच दिसतेय.

आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्शिततेच्या दृष्टीने बजेट मध्ये वेगळी सोय करण्यात आली आहे. शिवाय अजून एक चांगली गोष्ट म्हणजे काही हमालांना रेल्वेत गॆंगमन म्हणून भरती केले जाणार आहे.
रेल्वे कर्मचार्यांनाही ह्यातून आपण चांगले काम करत आहोत असा आनंद, समाधान मिळतंय असं लालू म्हणतात. त्यांनी ह्या कर्मचार्यांना सुद्धा खूष ठेवायचा प्रयत्न केलाय. सगळ्यात आनंदाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या सगळ्या वर्गांच्या भाड्यात थोडी थोडी कपात केलेय. ज्येष्ठ महिला नागरीकांना तिकीटात सवलत ३० टक्क्यांवरुन ५०% वर दिलेय. एवढं सगळं करून एकंदर बजेट कोट्यावधी रुपयाच्या नफ्याचे मांडलेय.

गेले चार वर्ष आणि आता अजून पुढचे एक वर्ष उपनगरीय रेल्वेच्या टिकीटांच्या किमती स्थिर ठेवण्याचं कसब लालूने दाखवलय, लाखो उपनगरीय प्रवशांना, चाकरमान्यांना त्याने दिलास दिलाय. अर्थात पुढच्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून त्याने हे केलय हे जाणवतय पण वारेमाप उधळंपट्टी करून लोकांना खूष करायचं तंत्र आहे असंही म्हणता येणार नाही, पुढच्यावर्षी आणि २0२५ पर्यंत काय उद्दीष्टे आहेत हे त्याने मांडलय. चारा घोटाळयात अडकलेल्या लालूने रेल्वेला मार्गाला लावलं असं म्हणायला, (निदान गेले पाच रेल्वे अर्थसंकल्प बघता ) आता नक्कीच वाव आहे!

लालू-आख्यान -
http://www.youtube.com/watch?v=iVe966Rrr5c&feature=related

अर्थसंकल्प मांडल्यावर -
http://www.youtube.com/watch?v=fhequbKB-bc

लालूच्या रेल्वे अर्थसंकल्पाचं सहर्ष स्वागत!

Sunday, February 17, 2008

प्रश्नच प्रश्न...

इथे प्रेसिडेंट डेची सुट्टी असल्याने आणि बाहेर वातावरण थोडे थंडच असल्याने सद्ध्या घरीच थोडा आराम. तर आज लिहीणार आहे मी एका चांगल्या कार्यक्रमाविषयी.

इथे डॆलास मध्ये पहिले २४X७ देसी एफ एम प्रसारण केंद्र (रेडीओ सलाम नमस्ते, १०४.९ एफ. एम.) आहे. खरं तर मी त्याच्या अतिशय प्रेमात असण्याची बरीच कारणं आहेत पण त्यातल्या त्यात काही प्रमुख म्हणजे वैविध्यपूर्ण कार्यक्रम, नवीन तसेच जुनी तुम्हाला आवडतील अशी गाणी, तदनुषंगे समालोचन आणि खिळवून ठेवतील असे कॊल इन प्रॊग्राम्स. जुनी फर्माईशी गाणी ऐकण्याव्यतिरीक्त नवीन टॊप टेन तसच ऐशी नव्वदच्या दशकातली उत्तम गाणी सुद्धा सहज जाता जाता कानी पडतात आणि आपण कधी शाळा कॊलेजच्या त्या दिवसात हरवून जातो कळत देखील नाही. त्याचबरोबर एखाद्या गायकाचा, गीतकाराचा, संगीतकाराचा, अभिनेत्याचा , अभिनेत्रीचा, निर्मात्याचा, दिग्दर्शकाचा वाढदिवस असेल तर काहीवेळा त्याचा स्पेशल प्रोग्राम ऐकायलाही तितकीच मजा येते. शिवाय मधून मधून बॊलीवूड ट्रीव्हीया क्वीझेस असतातच तुमचं बॊलीवूड्च अगाध द्न्यान तपासायला. त्याशिवाय बयाच आध्यत्मिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल असते. शनिवारी संध्याकाळची हिंदू देवळातली आरती सुद्धा प्रसारीत करण्यात येते. ह्या प्रसारणाचा मुख्य श्रोतृवर्ग देसी म्हणजे डॆलसस्थित भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी आणि बांगलादेशी असा असल्याने कार्यक्रम बहुढंगी होतात. शिवाय देसी डॊक्टर्स, सी.पी.एज, विमा एंजंट्स, हॊटेल्स ह्यांची माहिती सुद्धा मिळते. एकंदरच देसी कम्युनिटीच्या वाढीस आणि एकत्रिकरणास चांगलाच हातभार लागतोय ह्या प्रसारण केंद्रामुळे. तर आज मी मला ह्या केंद्रावरून प्रसारीत होणाया अशाच एका कार्यक्रमाविषयी लिहिणार आहे.

सदाफ म्हणून एक आर.जे (रेडीओ जॊकी) दर शुक्रवारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान हा कार्यक्रम सादर करते. एखादा राजकीय किंवा सामाजिक विषय घेऊन आणि त्याच सूत्र संचालन स्वतःकडे ठेवून सदाफ लोकांना त्यावर आपली मत प्रदर्शित करायचं आव्हान करते आणि मग वेगवेगळे लोक आपली मत मांडण्यासाठी ऒन एअर फोन करतात आणि मग एकावेळी एक एक कॊलरशी संभाषण करीत सदाफ कार्यक्रम छान रंगवते. म्हटलं तर तसं सोप्प आहे आणि म्हटलं तर हे काम कठीण सुद्धा. लोक बरेचदा भावूक होतात फॊन वर, शिवाय सगळ्यांना बोलायला संधी देता यावी म्हणून तिला बोलताना काटेकोरपणे वेळ द्यावी लागते प्रत्येकाला. मला ह्यात सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या लोकांची माहिती मिळते तसच वेगवेगळ्या शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या माणसांचे विचार, अनुभव ऐकायला मिळतात. अगदी मायबोलीवरच्या व्ही ऎण्ड सी (म्हणजे व्ह्यूज ऎण्ड कमेंट्स) सारखं.

दोन आठवड्यांपूर्वी सदाफने अमेरीकेतल्या प्रायमरी विषयी प्रश्न मांडला होतात त्यातून स्त्रीवर्गाचा पाठींबा हिलरीला का आणि किती आहे शिवाय ओबामालाही मिळणारा पाठींबा ह्याची झलक मिळाली. विशेषतः डॆलास मधे तरी बरेच देसी अमेरीकन्स आहेत ज्यांचा डेमोक्रेटीक पार्टीला पाठींबा आहे.

मागच्या वेळी सदाफने पाकिस्तानातले सद्य राजकारण हा विषय घेतला होता. बेनझीरची राजकीय हत्या आणि त्यानंतर आज होत असलेल्या निवडणूका ह्यावर बरीच चर्चा झाली. खूप पाकीस्तानी लोकांनी कॊल करून पाकिस्तानच्या सद्य परिस्थिती बद्दल चिंता तसेच विषाद व्यक्त केला. भारताशी तुलना करता पाकिस्तानची लोकशाहीतली अधोगती अर्थातच अधोरेखित झाली. गमतीची गोष्ट अशी की मुशर्रफ ह्यांना सगळ्याच थरातून वाढता पाठींबा दिसून आला. इथे असलेले पाकिस्तानी हे बरेचसे सुजाण आणि सुविद्य पाकिस्तानी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. एकंदरच पाकिस्तानात बोकाळलेली सरंजामशाही बेनझीर, नवाझ शरीफ ह्यांनी कमवलेली अफलातून संपत्ती, भ्रष्टाचाराचा कळस ह्यामुळे तेथील जनता इतकी जर्जर झाली आहे की विचारता सोय नाही. ह्या पार्श्चभूमीवर मुशर्रफांकडे दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने बघत लोक पाठींबा देत आहे. मूलतत्त्ववाद्यांचा धोका, दह्शतवाद आणि राजकीय अस्थैर्य ह्यात पाकिस्तानी जनता अक्षरशः भरडली जातेय. दुर्दैवाने दूरदृष्टी असलेला नेता त्यांच्याकडे नाही. शिवाय लष्करशाहीने लोकशाहीचा खेळ करून टाकलाय आणि ह्याचेच सुविद्य पाकिस्तानींना जास्त दुःख आहे. स्त्रियांचे शिक्षण, पुढच्या पिढीत मूलतत्ववाद्यांचे वाढते धोकादायक आकर्षण आणि वाढती धार्मिक. सामाजिक विषमता ह्यामुळे प्रगतीच्या विरुद्ध दिशेने पाकिस्तान जात आहे असं दिसतय. शिवाय तालिबान तसेच अफगाणिस्तानचा काही प्रदेश ह्यांकडून त्यांना टॊळ्यांचा धोका आहेच. अत्तापर्यंतचे सगळेच राज्यकर्ते भारताचा द्वेष हे एकच धोरण मध्यभागी ठेवून जनतेची दिशाभूल करत राहीले परिणामतः साठ वर्षांनतरही पाकिस्तानातली सुंदोपसुंदी संपताना दिसत नाही, उलट अस्थैर्य आणि आर्थिक विषमता वाढतच आहे. मूठभर धनिकांच्या हातात अजूनही देशाच्या नाड्या आवळलेल्या आहेत आणि लष्कराच्या अकारण हस्तक्षेपामुळे बर्याच राजकीय, सामाजिक निर्णयांना वेगळे वळण लागून सामान्य नागरीकाची सुरक्षितता आणि स्वातंत्र्यच धोक्यात येत आहे. पाकिस्तानात रहाणाया अतिशय थोड्या हिंदूचे हाल तर कल्पनातीत आहेत. इतर अनेक विषमतांबरोबर धार्मिक विषमता त्यांना सहन करावी लागते आणि अर्थात पाकिस्तान तसेच त्यांचा इस्लाम हा काही सहिष्णू नव्हेच. एका पाकिस्तानी हिंदूने रेडीओवर सांगितलेली प्रतिक्रीया पुरेशी बोलकी होती. सद्ध्या पाकिस्तानात रोटीचा प्रश्न गाजतोय. तेथे गव्हाचे उत्पन्न खूप होते. गहू हेच मुख्य खाणे आणि नंतर भात. तर अचानक गहू आणि आटा बाजारातून गायब झालाय. इतका की काळ्याबाजाराला उत येतोय. मुशर्रफ सरकार म्हणते गहू आहे पण तो लोकांपर्यत पोहोचत नाहीये. मधले दलाल त्याला परस्पर बाहेर विकत आहेत. इतकं टोकाला गेलय हे की लष्कराचे सैनिक गव्हाच्या गोदामांना राखण्यासाठी ठेवावे लागत आहेत. ह्याच खरं कारण असं दिसतय की सरकार जरी म्हणत असलं की गव्हाच चांगलं उत्पन्न झालय तरी बराचसा गहू त्यांना निर्यात करावा लागलाय, नाहीतर देशाला पैसा मिळणार कुठून. एकंदर कठीण काळातून जात आहे पाकिस्तान. त्यातच ह्या निवडणूकांचे ओझे. लालमशीद प्रकरण, अमेरीकेचा दबाव, संरजामशाहीकडे झुकलेल्या आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सिस्टीमचा आडमुठेपणा ह्या सगळ्यांशी लढताना मुशर्रफना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि त्यातूनच हाच एक माणूस पाकिस्तानासाठी निदान काहीतरी करू शकेल अशी भावना तेथे मूळ धरत आहे. जे असेल ते, पण भुकेने पेटलेल्या आणि बजबजपुरीने विटलेल्या जनतेचे लोंढे बांगलादेशासारखे पुन्हा इथे वळायला नकोत ह्यासाठी भारतीय लष्कराला मात्र डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करावं लागतय.

अजून एक विषय सदाफने चर्चेला घेतला होता तो म्हणजे जोधा अकबर आणि मतमतांतरे. त्याविषयी माझं मत. चित्रपट कितीही चांगला बनवला असला तरी तो करमणुकीसाठी आणि निव्वळ पैसे कमवण्यासाठी बनवलाय त्यामुळे हाच खरा इतिहास असं पुढच्या पिढीला सांगण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. आपल्या अभ्यासक्रमातल्या इतिहासात सन सनावळ्या पाठ करण्यावरच भर असतो आणि त्याच्याव्यतिरीक्त काय आहे खरा इतिहास हे वाचावं हे शालेय जीवनानंतर सहसा वाटत नाही आणि वाटलं तरी वेळ मिळतोच असं नाही. त्यामुळे असं चित्रपटात दाखवलेलं खरं मानून तेच इतिहास म्हणून पुढं केलं जातं. ह्यामुळे खरच नुकसान होतय इतिहासाचं. आशुतोष गोवारीकरने तरी चित्रपटाच्या सुरुवातीला हा खरा इतिहास असेलच असं नाही असंं लिहायला हवं होतं. राजपूतांच्या भावना दुखावल्या जाणारच ह्यात. राणाप्रतापासारखे तुरळक अपवाद सोडले तर बयाच राजपूत नायकांनी मुघलांबरोबर रोटी बेटी व्यवहार करून मांडिलकी पत्करली. जर राजपूत स्त्रियांच्या ह्या असहाय्यतेला प्रेमाचं स्वरूप दिलं गेल असेल तर ते कोणालाही आवडणार नाहीच, शिवाय मुगलांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करून प्राणार्पण करणाया कित्येक राजपूत स्त्रीयांचा तो अपमानही ठरेल. तुम्ही चित्रपटात अर्थात काहीही दाखवू शकता पण हाच इतिहास हे लादण्याचा अट्टाहास कशासाठी? ज्याला खरंच काय आहे खरं, ती जोधा होती की नव्हती, तिच शत्रूतुल्य अकबरावर प्रेम होतं की न्हवतं ह्याचा शोध घ्यायचाय तो संशोधन करेलही. शिवाय अकबर हा सम्राट असला आणि त्यातला त्यात बरा मुगल राजा असला तरी शेवटी परकीयच त्यामुळे स्थानिकांवर अत्याचार होतच असणार. बिरबल तसेच नवरत्नांमुळे आणि कलोपासनांमुळे तो चांगला प्रसिद्धिस पावला इतकेच. सांगायचा मुद्दा असा की जोधा अकबर जरुर पाहा पण एक निव्वळ करमणूक म्हणून, ऐश्वर्या छान दिसतेय म्हणून, लढाया चांगल्या चित्रीत केल्यात म्हणून, ह्रुतिक भरजरी कपड्यात उमदा दिसतोय म्हणून.. हा खरा इतिहास आहे असं समजून नको... उद्या अशुतोष गोवारीकरच्या लगान मधे जी मॆच झाली तशी खरोखरच झाली होती असं म्हटलं तर ते मान्य होईल का? शिवाय पुढे कोणत्या परराष्ट्रीय अभ्यासकाने ऐतिहासिक संदर्भ म्हणून हा चित्रपट घेतला तर योग्य होईल काय? आणि म्हणूनच शिवरायांविषयी किंवा आपल्या गणेशोत्सवाविषयी जेव्हा कोणी उद्दाम आणि सवंग लिहू पाहाते तेव्हा आपणास राग येत असेल तर तसाच राजपूतांना येणे शक्य नाही काय?

Sunday, February 10, 2008

"राज"कारण

उपास, मार आणि उपासमार मधल्या मार विषयी थोडसं लिहीणार आहे आज.. आणि तदनुषंगाने राज-कारणाविषयीही.

गेले आठ दिवस मुंबईत जे काही चालू आहे त्याविषयी ऐकतोय आणि वाचतोय. सगळ्या थरातून संमिश्र प्रतिक्रीया आहेत आणि खरं काय चाल्लय ह्याचा नीट उलगडा व्हायला वेळ लागतोय. खरं तर हे मिडीयाचं अपयश म्हणावं लागेल. सगळेच सवंग पत्रकारीतेच्या मागे असल्याने एखाद्या लहानशा गोष्टीचं भांडवल करून त्याला भडक रूप देऊन breaking news बनवायचं आणि आपला TRP वाढवायचा पद्धतशीर प्रयत्न मिडीया कडून होताना दिसतोय. ह्याची परिणिती मिडीयावरचा विश्वास कमी होण्यात होतेय आणि हे चांगलं लक्षण नाही.

प्रांतीय वाद आणि प्रादेशिक अस्मिता हा विषय तसा नाजूक आहे. भारतीय घटनेने भारतीयास भारतात कुठेही जाऊन राहाण्याचा, घर थाटण्याचा (दुर्दैवाने काश्मीर वगळता - कलम ३७०) हक्क दिला आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही जिकडे स्थायिक व्हाल तिथे तुम्ही शांतता, स्थैर्य राखून स्थानिकांच्या भावनांचा, स्थनिक म्हणून त्यांच्या हक्कांचा विचार करायलाच हवा. सांस्कृतिक, भाषिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक सगळ्या पातळ्यांवर समरसून एकत्र राहाण्याची तयारी असायलाच हवी. ह्या मुद्द्यांवर राज जे काही म्हणतोय त्यात तथ्य वाटतय. भारतातल्या इतर राज्यांशी तुलना करता मुंबईतला मराठी माणूस बराच सहिष्णू आहे, दिवसेंदिवस मुंबईत येणारा लोंढा बघून तो अजूनही शांत आहे. पण विशेषतः उत्तर प्रदेशातले, तेथे हरल्यामुळे रिकामटेकडे असलेले नेते पुनःपुनः मुंबईत येऊन इथले वातावरण विनाकारण कलुषित करत आहेत. तसं पाहाता तात्विक दृष्ट्या विचार केला तर केवळ भैय्या लोकांवर राग असण्याचे कारण नाही. जे जे मुंबईत राहून केवळ तिला ओरबाडतच नाहीत तर इथे येऊन हक्कांची आणि दादागिरीची भाषा करतात त्यांना मराठी माणूस म्हणून बाणा दाखवायलाच हवा. तुम्ही इकडे निष्ठा ठेवत असाल आणि इथल्या सांस्कृतिक आणि भाषिक वातावरणात जुळवून रहाणार असाल तर रहा नाहीतर चालते व्हा असं सांगण्यात काहीच गैर नाही. ह्या बाबतीत मला गुजराथी, जैन समाजाचे विशेष कौतुक वाटते. माझे कित्येक जैन, गुजराथी मित्र मराठी उत्तम बोलतातच शिवाय घरी गणपतीही बसवतात. ह्याला म्हणतात एकात्मता. अजून एक बातमी वाचून डोकं ठणकलं ती म्हणजे मुंबई महानगर पालिकेचा कारभार हिंदीतूनही चालवण्याचा प्रस्ताव. हा प्रस्ताव आणायची हिम्मत होते आणि कित्येकांना त्याबद्दल काही वाटत नाही हे मराठी माणसाच दुर्दैव आहे. हिंदी असेलही आमची राष्ट्रभाषा पण मराठीला ही मान्यताप्रत दर्जा आहे. भाषावार प्रांत रचनेत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्रीय माणसाने १०५ हुतात्म्यांचे मोल देऊन मुंबई मिळवलेय, तिचा कारभार मराठीशिवाय इतर भाषेत होऊ देताच कामा नये. बाहेरून येणायांना मराठीतला कारभार कळत नसेल तर मराठी शिकून या म्हणावं. चेन्नई, कोलकत्ता किंवा इतर कोणत्या ठिकाणी असा प्रस्ताव आणायची कोणी हिम्मत तरी करु शकेल काय? आज आपलं आयुष्य कमालीचं वेगवान झालय आनि सामाजिक मन प्रचंड निष्क्रिय. त्यामुळे मुंबईत मराठीचा टक्का घटण्याचे धोके काय आहेत ह्याचा विचार करायला वेळच नाहीये कोणाला. राज ते करतोय हे नक्कीच चांगलं आहे. शिवसेने सुद्धा मराठी माणसाची तळी उचलली काही वर्षांपूर्वी म्हणून मुंबई मराठी माणसाची अशी ओळख राहीली. पण मग राजकारण्यांनी रेशनीग कार्ड वाटली राजकीय स्वार्थासाठी आणि आता परप्रांतीयांचा टक्का इतका वाढलाय की त्यांचा राजकीय दबावगट तयार झालाय.

आता केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारातून आलेल्या भैय्यांच्या बाबतीत बोलायचं तर मला वैयक्तीक पातळीवर त्यांविषयी आदरच आहे. जे अनेक समूह मुंबईत आहेत त्यातल्या त्यात हा समाज मेहनत करून जगणारा आणी थोडासा पापभिरू. हातावर पोट असलेल्यांपैकी. राज ने ह्या समाजाला निषाण करायचं कारण अर्थात राजकीय जास्त आहे. पण मराठी माणसाच्या उद्योगातल्या उदासीनतुमुळे भैय्या लोकांनी अनेक धंदे काबीज केलेत. दूधवाला, पानवाला, इस्त्रीवाला, भेळवला, चणेवाला इतकच काय तर न्हावी, भाजीवाला अशा सगळीकडे आपल्याला भैय्येच दिसतात. जिथे तुमच्या कामातल्या कौशल्यापेक्षा ढोर मेहनत अधिक लागते तिथे भैय्ये लोक हमखास दिसतील. शिवाय एक भैय्या आला की तो थोडे दिवसानी रायबरेली किंवा तत्सम ठिकाणावरून दुसरा, तिसरा आणि मग त्यांची कुटुंब असं चालूच आहे. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही, मेहनत करणायाला तर कधीच नाही. पाडगावकर एका बोलगाण्यात म्हणतात तसं, कधी कधी एखादा भैया दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची आठवण काढत एकसुरी जगत असेलेला दिसतो. एका खोलीत दहा दहा जण राहून पैसे वाचवून गावाला पाठवताना बरेचदा दिसून येतं. अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाचा अभाव, लग्नावर ऐपतीबाहेर होणारे खर्च ह्यामुळे हा समाज तसा मागेच आहे. तिथल्या राजकरण्यांनी केलेल्या दिवाळखोरीमुळे आणि मुंबापुरीच्या आकर्षणामुळे भैय्ये लोक इथे येतात आणि दुय्यम दर्जाची कामे करून उरलेल्या वेळात भजन किर्तनात वेळ घालवतात. ढोबळ मानाने ह्या भैय्या लोकांच्या मेहनतीचा मुंबापुरीला उपयोगच होतोय. पण त्यांनी इथे समरसून जाणं आवश्यक आहे. रामलीला इतके वर्ष होत आहेच आणि होत राहीलही, पण आपल्या समूहाचा दबावगट तयार करून स्थानिकांवर कुरघोडी करू नये हे त्यांच्या नेत्यांना समजायला हवं.

राजचा मुद्दा तंतोतंत पटण्यासारखा आहे पण झुंडशाहीचा मार्ग बरोबर नाही असे वाटते. शिवाय हातावर पोट असलेल्या सामान्य भैय्याला मारुन काय होणार, आपली रेष मोठी कशी करायची ह्याचा मराठी मनाने विचार करायला हवा, दुसयाची रेष पुसायची गरज नाही, त्याचबरोबर भैय्याला दिली ओसरी भैय्या हात पाय पसरी हे ही होता कामा नये म्हणून स्थानिकांचा आवाज बुलंद असायलाच हवा.

ह्या ग्लोबल युगात संकुचित राहूनही अजिबात चालणार नाही त्यामुळे सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि प्रादेशिक अस्मिता ह्यांचा योग्य मेळ साधायला हवा. मराठी माणसानेही पोटापाण्यासाठी मुंबई सोडलेय तो देशा परदेशात रहातोय. त्यानेही महाराष्ट्र मंडळे चालवून ठिकठिकाणि मराठी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मुंबईतल्या आततायी पणाचा मुंबईबाहेरील मराठी माणसास त्रास होणार नाही हे ही बघणे महत्त्वाचे.

राजच्या मनसे कडून बर्याच अपेक्षा होत्या मला, विशेषतः त्याचा जाहीरनामा वाचला तेव्हा. अत्तापर्यंत त्याने काही ठोस केल्याचे जाणवले नाही आणि हे आंदोलन सुद्धा राजकीय जास्त वाटतय. झुंडशाहीचा त्याचा मार्ग पटत नाही पण मराठीचा मुद्दा बरोबरच आहे. शिवसेनेला काटशह देण्याचाही त्याचा हेतू स्पष्ट दिसतोच आहे. त्याने म टा मधे आपली भूमिका स्पष्ट मांडलेय ह्याचा त्याला नक्कीच उपयोग होतोय. शिवसेनेला मात्र आता थोडी भिती आहे की मराठी पणाच्या चलनी नाण्यात वाटेकरी झाला की काय? बाळासाहेबांना मराठी मक्तेदारी शिवसेनेकडेच हे ओरडून सांगण्यासाठी वेगळा अग्रलेख लिहावा लागला सामन्यात ह्यातच राजच्या करिष्म्याची झलक दिसतेय. बाळासाहेबांच्या बर्याच गुणांची छबी राज मध्ये तंतोतंत दिसतेय. बाळासाहेबांकडे पक्षाची भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवायला जसे मार्मिक आणि मग सामना ही पत्रे होती, तसं काहीतरी राजकडे असणं आवश्यक आहे. गुंडगिरी सोडून विधायक कामांवर राजने जास्त लक्ष दिलं तर एक चांगली लोकमान्यता त्याला नक्कीच मिळू शकेल.

जय हिंद, जय महाराष्ट्र!!

Saturday, January 26, 2008

आरोग्यंधनसंपदा..

मला आठवतय आकाशवाणीच्या मुंबई केद्रावर सकाळी बरोब्बर सात वाजता 'आरोग्यंधनसंपदा' हे शब्द आळवले जायचे आणि सुषमा हिप्पळगावकर कधी आजीचा बटवा सादर करायच्या तर कधी एखादे निष्णात डॊक्टर भेटीला घेऊन यायच्या. फक्त पाचच मिनिट असलेल्या कार्यक्रमाने घरातील सगळ्यांना वेड लावलं होतं ते सादरीकरण, जिव्हाळ्याचे आरोग्यविषयक सल्ले आणि विचार करायला लावणारे त्यातले मुद्दे यांमुळे. कित्येकदा रात्री सगळे एकत्र जेवताना आज 'आरोग्यं' मध्ये काय सांगितलं ह्यावर चर्चा घडत असे, तर हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे नुकतच अचानक हाती आलेलं डॊ. अभय बंग यांचं "माझा साक्षात्कारी हृदय रोग" हे पुस्तक.

मी बायपास सर्जरी म्हणजे काय हे कुटुंबातच अनुभवल्याने ह्या पुस्तकाविषयी उत्सुकता होतीच. लहाणपणापासून व्यायामाची आवड असली तरी सवड मिळायची नाही. पोहोणे, सायकल चालवणे ह्या गोष्टी त्यांची व्यायाम म्हणून उपयुक्तता कळण्या आधीच शिकल्या गेल्या, अंगवळणी पडल्या आणि मफतलाल बाथ मुळे, माझ्या सायकल मुळे माझं बालपण समृद्ध करून गेल्या. गिरगावातील ब्राह्मण सभेतील सोमण सर, सतीश सर, फेमस मधील राजू मास्तर, सदाशिव पेठेतील केळकर व्यायामशाळेतील मिलिंद सर ह्या सगळ्यांनी माझ्या मनात व्यायामाविषयी गोडी निर्माण केलीच पण मेहनत करून घेतली. घाम गाळण्यातून मिळणारा आनंद काय असतो त्याचा अनुभव यायला लागला तो त्यामुळेच. मी चेस्ट, आर्म्स, लेग्स असा संपूर्ण व्यायाम वेळापत्रकानुसार करू लागलो तरी त्यावेळी वेळेअभावी नियमितता नसायचीच, पण खूप काही शिकायला मिळालं त्या दिवसात. पुढे इथे आल्यावर बेली स्पोर्ट्स आणि २४ बाय ७ ह्या क्लब्सचाही उपयोग झाला. मग इथे पुस्तकं वाचून आणि इथल्या प्रशिक्षकांच्या मदतीने व्यायाम कसा करावा, तो करताना तुम्ही ठराविक ध्येय समोर ठेवणं किती आवश्यक आहे हे शिकवलं गेलं. तसच व्यायाम मोजावा कसा त्याची नोंद कशी ठेवावी ह्याची सुद्धा छान माहिती होत गेली. You can't manage, which you can't measure हे पक्क डोक्यात बसलं, डॊ अभय बंगांच हे पुस्तक वाचताना हे सगळं आठवलं आणि डोळ्यासमोर उभ राहीलं. व्यायाम करताना आपल्या कुठे चुका झाल्या आणि त्या कशा सुधारल्या हे ही आठवलं. शिकलेलं खूप काही पक्क झालं हे पुस्तक वाचून आणि अर्थात बरच नवीन काही कळलं सुद्धा.

एखादा शास्त्रद्न्य जसे प्रयोग करून आणि कुतुहलापोटी शास्त्रीय पद्धतीने तर्कशुद्ध माहिती साठवून निष्कर्ष काढेल तसं डॊ. अभय बंग यांनी त्यांना स्वतःला झालेल्या हृदयगोराबाबत केलं. मोठमोठ्या डॊक्टरांनाही ह्रुदयरोग झाल्याचे मी अनेकादा पाहिले आणि ऐकले होते. डॊक्टरीपेशातील व्यक्तीला हा रोग कसा काय फसवून बळी पाडू शकतो हे मला एक न उलगडलेले कोडे होते. डॊ. अभय बंगानी पुस्तकात त्याची समर्पक कारणमिमांसा दिली आहे. त्यांच सगळं लिखाण हे स्वानुभवातून असल्याने तसच वैद्यकीय क्षॆत्रातील त्यांच्या प्राविण्यामुळे पुस्तकातील सगळीच माहिती ही निःसंशय खात्रीदायक आहे. शारिरीक व्यायाम तसच कोलेस्टरॊलवरील नियंत्रणासाठी संतुलित आणि सुयोग्य आहार ह्याव्यतिरीक्त मनाच्या आरोग्याच्या अपरिहार्यतेचा त्यांनी छान उहापोह केला आहे. ध्यान, मनातील विचारांवर नियंत्रण असण्याची आवश्यकता, त्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळं व्यवस्थित मांडलय. शेवटी पुस्तकात त्यांनी काही प्रश्नावल्या दिल्या आहेत जेणे करून तुमच्या राहाणीमानामुळे आणि आहाराच्या सवयींमुळे हृदयरोगाचा किती धोका आहे हे कळायला मदत होते. पुस्तक वाचताना ह्या रोगासंबंधीचे काही भ्रम निश्चितच दूर झाले. शिवाय भारतीयांमधे हे प्रमाण जास्त का आहे ह्याचा विचार करताना नकळतच आजूबाजूला heart attack ने अकाली आणि अचानक गेलेल्या माणसांची यादीच आठवायला लागली आणि मग कुठे काय चुकत असणार ह्याचा अंदाज यायला लागला. प्रत्येकाने किमान एकदा वाचावं असं हे पुस्तक. ह्यातील काही माहिती मी इथे लिहून ठेवणार आहे जेणेकरून संदर्भासाठी त्याचा कुणालाही उपयोग होऊ शकेल.

हृदयरोग नियंत्रणासाठी चांगल्या सवयी:
१. शाकाहार - आहारातील कोलेस्टरॊल शून्य ठेवणे. कच्च्या भाज्या म्हणजे सॆलड, फळे ह्यांवर भर. भरपूर पाणी पिणे आवश्यक. साय, लोणी, तूप, तेल स्निग्ध पदार्थांचा अत्यंत काळजीपूर्वक वापर. दूध सुद्धा लो फॆट वापरणे उत्तम. अमेरिकन हार्ट असोसिएशन च्या म्हणण्यानुसार V8 हे पेय तसेच ओटमीलच्या पदार्थांचा आहारात वापर उपयुक्त आहे.
२. धूम्रपान आणि अल्कोहोल पूर्णपणे वर्ज्य
३. शरीराला नियमित व्यायाम आणि योगासनांची सवय.
४. मानसिक ताणमुक्तीसाठी प्राणायाम, शवासन करणे, तसेच आशावादी मनोवृत्ती आणि आनंदी प्रवृत्तीची जाणीवपूर्वक जपणूक. आयुष्यातील विनाकारण स्पर्धात्मकता नष्टकरून संयमित आणि साध्या जीवनपद्धतीचा अवलंब.
५. आपल्या मनातील भावनांशी संपर्क साधणे व इतरांसोबत मोकळेपणाने संबंध जोडणे.
६. नियमित म्हणजे किमान दर सहा महिन्यातून एकदा संपूर्ण शारिरीक तपासणी आवश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा ह्या गोष्टी हृदयरोगाला निमंत्रण देणाया आहेत. रक्तातील साखर, रक्तदाब, वजन, कॊलेस्ट्रॊल, बीएमाय ह्या गोष्टींची लेखी नियमित नोंद असणे निरोगी आयुष्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

नियमित व्यायाम का करावा?
१.उत्साह वाढतो, इच्छाशक्ती बळावते.
२.संरक्षक एच. डी. एल. वाढते. स्नायूंमधील ताण मुक्त होऊन हृदयास शुद्ध रक्त पुरवठा वाढतो.
३.अकाली मृत्युचं प्रमाण जवळपास निम्म होतं असं प्रयोगांनी सिद्ध झालय.

व्यायाम किती कराल आणि कोणता कराल?
१. प्रथम व्यायाम का करतो आहोत तो उद्देश ठरवा, म्हणजे चरबी कमी करण्यासाठी, फीटनेससाठी की स्टॆमिना वाढवण्यासाठी व्यायाम करायचा आहे हे नक्की असायला हवं. चरबी कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम हा सगळ्यात सोप्पा, साधा, मूलभूत आणि बिनखर्चिक व्यायाम होय. व्यायाम जास्त दमछाक होईल असा करू नये. त्यासाठी हृदय गती मोजण्याची सोप्पी पद्धत खाली सांगितली आहे.
२. (२२०-तुमचे वय) ह्याच्या ६०% ते ६५% इतकी हृदयगती ठेवून चालल्यास चरबी जाळण्यास खूपच मदत होते. दमलो, घाम आला की खूप चरबी कमी होईल हा सगळ्यात मोठ्ठा गैरसमज आहे. तुम्ही जर चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल तर तुमची हृदयगती वर म्हटल्याप्रमाणे ६०% ते ६५% ह्या दरम्यान असावी, त्याहून अधिक हृदयगतीने व्यायाम केल्यास तुमचा स्टॆमिना वाढेल पण चरबी एक तसूभरही कमी होणार नाही. साधारण तिसाव्या वर्षी (२२०-३० = १९०) च्या ६० ते ६५% म्हणजे १२० ते १२५ च्या दरम्यान हृदयगती ठेवून चालावयास हवे. चालणे लयबद्ध असावे. ट्रेडमिलचा ह्यासाठी छान उपयोग होतो.
३. सुरुवातीस रोज किमान अर्धातास तरी चालावे आणि मग दर आठवड्याला १० मिनिटे वाढवून किमान ५० ते ६० मिनिटे सलग चालण्याचा सराव ठेवावा. आठवड्यातून किमान ५ ते ६ वेळा हा व्यायम ठेवावा.
४. रोज व्यायाम सुरु करण्यापुर्वी स्नायू ताणणे म्हणजे स्ट्रेचिंग आवश्यक आहे आणि शेवटी पोटातील स्नायू बळकट होण्यासाठी ऎब्स सुद्धा. तसच मनाच्या आरोग्यासाठी आणि श्वासावरील नियंत्रणासाठी योगासने करावीत.
आपलं आपल्या शरीरावर प्रेम असेल तर आपण त्याला रोज इतका वेळ नक्कीच द्यायला हवा, नाही का?

हृदयाची गती कशी मोजाल?
मनगटाच्या आतील बाजूस, हाताच्या सांध्याच्या साधारण दोन इंच खाली नाडी असते. तीची स्पंदन ऐकण्याची, जाणवण्याची सवय करा. मन शांत ठेवून ती ऐका. दहा सेकंदाला तिचे किती ठोके होत आहेत ते मोजून त्यास सहा ने गुणले तर जे उत्तर येईल ती तुमच्या हृदयाची गती. आहे की नाही सोप्पं!

मी फीट आहे का?
१. वेस्ट हीप गुणोत्तर म्हणजे कंबरेचा घेर / हीप्स्चा घेर
हे गुणोत्तर ०.८५ पेक्षा कमी असणं अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात पोटाचा घेर कमी करायलाचं हवा. पोटावरची चरबी हटवायलाच हवी. आहारात बदल आणि नियमित व्यायामाने हे सहजसाध्य आहे.
२. बॊडी मास इंडेक्स (BMI) = किलोग्रॆम मध्ये वजन / मीटरमधील उंचीचा वर्ग
पूर्वी हा पुरुषांना २५ व स्त्रीयांना २८ सुरक्षित समजला जायचा पण ते खर नाहीये असं डॊ. अभय बंग सांगतात. तो पुरुषांनी २१ च्या आसपास ठेवणं जास्त हितावह आणि सुरक्षित आहे.
३. कॊलेस्ट्रॊलचे दोन भाग आहेत एल. डी. एल हा धोकादायक असतो आणि दुसरा एच. डी. एल हा संरक्षक असतो. पूर्वी डॊक्टरांचं म्हणणं असायचं की कॊलेस्ट्रॊल २४४ पेक्षा कमी असावं पण डॊ. अभय बंगाच्या मते ते १५० पेक्षा खाली असायला हवं तसच कॊलेस्ट्रॊल/ एच. डी. एल हे गुणोत्तर ३ च्या जवळपास असायला हवं.

नवीन सुरुवात करणार असाल तर सुरुवातीला थोडं जड जाईलही पण चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही. जिभेवर नियंत्रण आणि शरीराला वळण लावल्याचं जे मानसिक आणि अर्थातच दीर्घकालीन शारिरीक समाधान मिळतं तेच खर शरीरस्वास्थ्य!!

उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!