Saturday, December 18, 2010

आमची शाळा, आमचे शिक्षक..

विचारांच्या तंदरीत असताना, आज एकदम काहीतरी झालं आणि शाळेचे दिवस आठवले.. आणि मग ते लहानपण, शाळा, आजी, माऊ-बाबा, शेजारच्या टिळक मामी, बंडू मामा आणि बरच काही काही... जुने दिवस आठवले की एक हुरहुर लागते, गोड नॊस्टेल्जिया सतावतोच.. मग आठवणींच्या ह्या मोहजळात किती डुबक्या मारल्या तरी समाधान होत नाहीच, दर वेळा तळाला वेगळाच मोती मिळतो. कसं अजब आहे ना हे सगळं.. कित्येक वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी बारीक तपशीलासह अशा नजरेसमोर येतात, अगदी अनलिमिटेड स्टोअरेज आणि किती जोरदार अनुक्रम लावलाय त्याचा इवल्याश्या मेंदूनं, काही क्षणात त्या मन:पटलावर येतात सुद्धा, चक्क धक्काबुक्की करत गर्दी करतात मुंबईतल्या रेल्वेच्या डब्यासारखी.

चिकीत्सक शाळेतल्या छोट्या शिशुतल्या प्रवेशाचा हा प्रसंग. मला चांगलाच आठवतोय. रांगेत उभं राहून अगदी फॊर्म वगैरे आणला होता, तेव्हा मुलाखत की काय माहित नाही पण मला आईबरोबर एका खोलीत बोलावलं आणि बाईंनी काहीतरी प्रश्न विचारला. मी आपला औत्स्युकाने सगळ्या खोलीतल्या गोष्टी न्ह्याहाळतोय. टेबलावर एक खेळण्यातला पिंजरा आणि त्यात पोपट ठेवला होता. आठवत असेल तर बयाच ठिकाणी दारावरच्या बेलसाठी तो पूर्वी वापरायचे, म्हणजे बेल वाजवली की हा पोपट ’विठू विठू’ करणार. तर त्यावेळी तो पोपट आणि पिंजरा मला इतका आवडला की मी कुठल्याही प्रश्नाच उत्तर न देता, तो पिंजरा घेऊन तेथून बाहेर जो धुम्म पळालो की बस्स! अर्थातच आमच्या व्रात्यपणामुळे पुढे काय वाढून ठेवलय हे बाईंच्या लक्षात आलं असावं आणि साहजिकच त्यावर्षी शिशु वर्गात प्रवेश मिळाला नाही. माझं वर्ष आता वाया जाणार की काय अशा चिंतेत असतानाच, गिरगावात त्याच वर्षी जयाताईंनी (रेळेकर) शिशु वर्ग सुरु केल्याचं बाबांना कळलं आणि मग त्यांच्या शिशु निकेतनचा मी पहिला विद्यार्थी झालो. तिथून मला शाळा ह्या प्रकाराची आवड निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही (श्रेय जयाताईंनाच). थोडं असही आठवतय की त्याआधी (बहुधा घरी खूप्पच त्रास देत होतो म्हणून ) मी देवभुवन मध्येही काही दिवस डबा खायला जायचो.

असो, तर पहिलीला पुन्हा प्रवेशासाठी अर्ज करुन (आणि मी मागच्यावेळसारखा पुन्हा गोंधळ करणार नाही असा सज्जड दम खाऊन) चिकित्सक समूहाच्या पोतदार प्राथमिक शाळेत प्रवेश करता झालो. पहिली, दुसरी दुपारचे वर्ग असायचे, एका सुरात आम्ही कविता म्हणताना, गाताना जो ताल असायचा तो अजून कानात घुमतोय. पुतळ्याच्या मागचाच वर्ग होता आमचा. अगदी तिसरी पर्यंत हा पुतळा कोणाचा हे तिथे नाव लिहिलेले असूनही (श्री. पोतदार) मला कळले नाही बहुतेक. पगडी घातलेले एकमेव पुरुष पुतळ्याच्या रुपात माहिती होते ते म्हणजे लोकमान्य टिळक. शाळेतल्या प्रत्येक वर्गात असलेल्या वीणाधारी, मोरावर बसलेल्या सरस्वतीचा फोटॊ हे त्याकाळातलं अतिशय आकर्षण. वर्ग सुरु होताना सुरुवातिला जी प्रतिद्न्या आणि मग जन-गण-मन म्हणायचो त्यातून जे भारलेलं वातावरण निर्माण व्हायचं त्याची तुलना फक्त सार्वजनिक गणेशोत्सवात गुरुजींनी केलेल्या सामूहिक मंत्रोच्चाराशीस होऊ शकेल. शाळा संपताना वंदे मातरम, अहाहा काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे कानांचे! त्यातला तो ’जाड्या’ शब्द मला आजपावेतो कळला नाही. पहिलीच्या वर्गात्तील ’फुलपाखरु छान किती दिसते’ हे तर अजून आठवतेय मला, गाण्याच्या आंतरकरबाईंनी शिकवलेल्य हावभावासहित. दुसरीत असताना आम्ही दिंडी काढली होती तेव्हा वारकयांच्या वेषभूषेतला फोटॊ जपून ठेवलाय अजून :) तेव्हा प्राथमिक शाळेच्या सहली नॆशनल पार्क, तानसा वैतरणा अशा गेलेल्या आठवतात. शाळेत शिरतानाच प्रवेशद्वाराजवळ एक फळा आहे. त्यावर सुविचार आणि मग प्रदर्शने, आंतरशालेय स्पर्धा, नाटके ह्यात बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे नाव लिहिले जायचे. वर्षानुवर्षे तेच वळणदार अक्षर. फळ्यावर नाव लागणे म्हणजे अटकेपार झेंडा, अगदी अभिमानास्पद गोष्टच. तिसरीमध्ये असताना ऐन परीक्षेच्या धामधुमित म्हणजे मार्च मध्ये माझी मुंज झाल्याचे आठवतेय. बयाच जणांची त्यावर्षी मुंज झाली होती, तुळतुळीत गोटे करुन शाळेत बिचकत यायचो तेव्हा वेगळंच वाटायचं. माझा वाढदिवस मे मध्ये असल्याची मला कायम बोच होती. एकतर वाढदिवसाच्या दिवशी गणवेशा व्यतिरीक्त छान छान ड्रेस घालायची चैन, मग तुमचा वेगळा ड्रेस बघून तुम्हाला त्या दिवशी असलेला स्पेशल भाव असलं काही मिळायचं नाही मला. तसच वाढदिवसाच्या दिवशी शाळेत गिफ्टपण वाटता यायची नाहीत कधी, एकेकाचे नशीब! चौथीचं शिष्यवृत्तीचं वर्ष. जयकर बाईंनी विशेष मेहनत घेतली तेव्हा आमच्यावर. सकाळी साडेसहाला मोजक्या मुलांसाठी जास्तीचे वर्ग घ्यायच्या बाई. कष्टाचं चीज झालं आणि मिळाली स्कॊलरशीप. तेव्हा पेपरात फोटो आलेला जपून ठेवलाय, त्यावेळी आजीच्या चेहयावरचं कौतुक अजून आठवतय.

प्राथमिक शाळेतली ही वर्ष भुर्रकन उडून पाचवीत आलो आणि हुशार मुलांची ’क’ तुकडी असायची त्यावेळी शाळेत, त्यात येऊन पोहोचलो. ’क’ तुकडी साठी एन.सी.आर.टी. असल्याने तेव्हाच भौतिक आणि रसायनशास्त्राशी ओळख झाली, तसच इंग्लिशही शिकणं सुरु झालं. पाचवी मध्ये प्राविण्य आणि प्रद्न्या ह्या गणिताच्या परीक्षा उत्तीर्ण झालॊ आणि सहावीला बालवैद्न्यानिकसुद्धा. ह्या दोन तीन वर्षात टीळक विद्यापीठाच्याही काही परिक्षा दिल्या, का दिल्या माहिती नाही! पाचवीपासून मी शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात (त्याला आम्ही गॆदरींग म्हणत असू) भाग घेत असे. दीड एक महिना आम्ही सराव करत असू. कधी बेडेकरांच्या गच्चीत तर कधी कुणाच्या घरी. 'डोल डोलतय वायावर बाय माझी' ह्यावर कोळी नाच, 'ए नाम रे सबसे बडा रे तेरा नाम उचे शेरोवाली' ह्यावर गरबा तसच 'डोगराचे आडून एक बाई' ह्यावर असे नाच बसवलेले आठवतायत. मयुरी पालेकर आमचे नाच बसवायची. डिसेंबर महिना आला की मग स्पोर्ट्स आणि शाळेतल्या विद्न्यान प्रदर्शनाची धामधुमही असायची. वर्गाच्या लंगडीच्या टीममध्ये मी असायचो नेहमी. माझा एखादा प्रोजेक्ट असायचाच प्रदर्शनात. बक्षिसाच्या आशेने नव्हे तर माहिती व्हावी, चौकसपणा यावा, सभाधीट पणा यावा ह्यासाठी भाग घ्यायलाच हवा असा आजीचा कटाक्ष असे. मरीन लाइन्सच्या मैदानात आमचे तीन दिवस स्पोर्ट्स असायचे. मी कधीच खेळात चमकलो नाही पण हे तीन दिवस म्हणजे धमाल असायची नुसती. एकीकडे शाळेत ही धामधुम सुरू असताना संक्रांतीचे वेध लागलेले असायचे. पतंगासाठी जीव टाकायचो अगदी.. वाईट्ट म्हणजे वाईट्ट वेड होतं (अजूनही आहे!) आणि शाळेत तिळगूळ समारंभ असायचा. मग आम्ही सगळी मुलं वर्ग सजवून तिळगूळ वाटायचॊ, खायला आणायचो, फिशपॊंड द्यायचो. मुले-मुली एकत्र असल्याने एक वेगळीच मजा असायची त्या वयांत, त्या दिवसांत..

शाळेला खाली पटांगण, मागच्या बाजूला अंगण आणि सगळ्यात वरती मोठ्ठी गच्ची. तिसया मजल्यावर वागळे सभागृह आहे. त्यात कितीतरी जणांच्या हातून बक्षिस घेण्याचा आणि कित्येकांची भाषणं ऐकायचा योग आला. पाचवी पासून वक्तृत्व स्पर्धात भाग घ्यायचो तेही आठवतेय. टिळक पुण्यतिथीनिमित्त एक ऒगस्टला स्पर्धा असायच्या. पण एकूणात वक्तृत्वात मी मागेच असायचो (आमचे उद्योग पडद्यामागचे)! सातवी पुन्हा शिष्यवृत्तीच वर्ष, त्यात गोट्या, पतंग आणि क्रीकेट मुळे पुढे काय अशी घरच्यांना काळजी असतानाच, शिष्यवृत्ती मिळाली, नंबरही बराच वरचा आला. मिळणारी रक्कम अगदी दहा-पंधरा रुपये असायची महिन्याला पण ती घ्यायला बोलावलाय खाली ऒफिसात अशी नोटीस आली वर्गात किती एकदम ढॆंट्डढॆंड वाटायचं. मग आठवीत पुन्हा प्राविण्य आणि प्रद्न्या मिळवून बालवैद्न्यानिक उत्तीर्ण झालो. तेव्हा रुपारेल मध्ये बी.टी.एस. चे वर्ग भरायचे, त्यात मात्र मी रमलोच नाही विशेष. पण दर शनिवारी रेल्वेने माटुंग्याला जायचॊ, मजाच. त्यावेळीच मुंबईतल्या हुशार विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्या (अमित पटवर्धन, जो आमच्या ९३ च्या बॆचमध्ये गुणवत्ता यादीत पहिला आला तो इथेच मित्र बनला). बालमोहन, पार्लेटिळक, चोगले हायस्कूलच्या माझ्या बॆचच्या बयाच हुशार मुलांच्या इथे ओळखी झाल्या. आठवीत आमचा वर्ग होता त्यात सांगाडा होता कपाटात कोपयात ठेवलेला. प्रयोगशाळेच्या बाजूचा हा वर्ग, सापळ्याचा वर्ग म्हणायचो त्याला. बेफाम मस्ती, इतकी की एकदा वर्गातल्या ३० मुलांपैकी २८ जणांना शाळेतून बाहेर काढले होते, कारण काय तर कागदी रॊकेट बनवून उडवणे. तरीही, पुढे एकदा कागद दुमडून ते रबरबॆंडमध्ये अडकवून जोरात मारणे आणि त्याने बेंचवर उड्यामारत युद्ध खेळणे ह्यावरुन बराच प्रसाद खाल्लेला आठवतो. आठवीत असताना आम्ही कुमार कला केंद्रातर्फे घेण्यात येणाया आंतरशालेय स्पर्धेत ’तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटक बसवलं होतं, शिंदेबाई सर्वेसर्वा त्या नाटकामागे. अखिल मुंबईत प्रथम क्रमांक मिळवला, कौस्तुभ सावरकरनं त्यात जोतिबाचं काम केलं होतं. आठवीमध्ये आंतरशालेय विद्न्यान प्रदर्शनातही बक्षिस मिळालं होतं. परेश वैद्य (आमच्या मागच्या म्हणजे ९४ च्या बॆचमद्ये मुंबईत गुणवत्ता यादीत प्रथम) बरोबर ह्या प्रदर्शनात मांडलेल्या प्रकल्पावर आणि कुमार कला केंद्राच्या नाटकात कामही केल्याचं आठवतय. खूप शिकायला मिळालं ह्या काळात बरोबरीच्या मुलांकडून. माझ्याबरोबरची बहुतेक मुलं ह्यावेळी तबला, पेटी किंवा मग तालमीत व्यायाम असं काहीतरी शिकत असताना माझ्या मात्र सर्रास उनाडक्याच चालू होत्या ह्या दिवसांत, नाही म्हणायला वाचनाची गोडी लागली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामुळे. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही शाळेत सकाळी सहाला बॆडमिंटन खेळत असू. आठवी आणि नववी एन.सी.सी. चं वर्ष. उंची चांगली असल्याने मी एअरविंग मध्ये निवडलो गेलो पण तासन तास परेड करण्यात आणि जड बूट पायात घेऊन उन्हात फिरण्यात मला रस नसायचा. पण तरीही कडक पॊलिश असलेले बूट, स्टार्च केलेला तो निळा ड्रेस, बिल्ला असलेली टोपी असा मोठा रुबाब असायचा. ते कपडे धुवायला सुद्धा आम्हाला वॊशिंग अलाउन्स मिळायचा. नववी मध्ये आम्ही अंबरनाथला एन.सी.सी. च्या कॆंपला गेलो होता. घरापासून दूर, फक्त मित्रांसोबत आठ दिवस राहाण्याचा माझ्या (आणि बरोबरच्या जवळजवळ प्रतेकाच्या) आयुष्यातला पहिला प्रसंग. सकाळी पाच वाजता उठून आवरून परेड ते रात्री दहा पर्यंत दंगा चालूच. इतकं असूनही घरच्यांची आठवण यायचीच. विनायक पंडितने तबलावादनाने आणि मी आंतरशालेय चेस मधे अशी दोन पदक कॆंपमध्ये शाळेला मिळवून दिल्याचं आठवतय.

पुढे दहावीच वर्ष सुरु झालं आणि शाळा, क्लास ह्यांच वेळापत्रक सांभाळताना तारांबळ व्हायला लागली. गोडबोले सरांचा दादरला व्हेकेशन क्लास असायचा तेव्हा. इतरही क्लास होतेच. शाळेत सगळ्याच शिक्षकांनी मेहनत घेतली आमच्यावर. अभ्यासाच्या नादात दहावीच वर्ष कधी गेलं कळलंच नाही. तसं सेंड ऒफच्या वेळी थोडं जड वाटलं होतच पण एकतर येऊ घातलेल्या परिक्षेचं टेंशन आणि पुढच्या कॊलेज जीवनातल्या स्वातंत्र्याची ओढ त्यामुळे तेव्हा ते विशेष जाणवलं नसावं. आता मागे वळून पाहाताना, सगळं लख्ख दिसतय. इतके कसे मोकळे झालो शाळेपासून पटकन ह्याचं आश्चर्य वाटतय.

शाळेचा फोटॊ ठेवलाय माझ्या ओर्कुटवरच्या अल्बम मधे. कुणितरी म्हटलं, हे काय किती वर्षात रंग काढला नाहीये शाळेला! अरे हो खरंच की, पण मला कसं खटकलं नाही हे, कदाचित शाळेचं अंत’रंग’, तिची माया अनुभवली असल्याने तिच्या बाहेरच्या रंगाकडे, दिखाऊपणाकडे लक्षच गेलं नसावं. खरं सांगायचं तर, जगात कुठेही गेलो तरी मनाच्या कुपीत लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत आणि एखाद्या निवांत क्षणी ज्या मोराच्या पिसांर्या सारख्या फुलून समोर येतात त्यात ह्या शाळेतल्या वर्षांच्या (की भुर्रकन उडालेल्या क्षणांचा!) मोरपिसांचा मोठ्ठा वाटा आहे. ’मज आवडते मनापासूनि शाळा, जशी माऊली लळा लाविते बाळा’ ह्याचा तंतोतंत प्रत्यय.

सहज मनात आलं की शाळेतल्या प्रत्येक इयत्तेच्या वर्गशिक्षकांची नावं आठवतायत का पहावं आणि गंमत म्हणजे ती आठवली सुद्धा.. मलाच खूप प्रसन्न वाटलं अंगावरुन आठवणीची ही मोरपिसं हलकेच फिरवताना..

पहिली ’अ’ - फडणीस बाई
दुसरी ’अ’ - पेवेकर बाई
तिसरी ’अ’ - गोडबोले बाई
चौथी ’ब’ - साने बाई
प्राथमिक मुख्याध्यापिका - वालावलकर बाई/ जयकर बाई
पाचवी ’क’ - राजवाडॆ बाई
सहावी ’क’ - पाटील बाई
सातवी ’क’ - भातखंडे बाई
आठवी ’क’ - देशमुख बाई
नववी ’क’ - पाटील बाई
दहावी ’क’ - मांजरेकर बाई
उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका - केळकर बाई, पाडगावकर बाई
शिपाई - रघू काका, गायकवाड
ऒफीस स्टाफ - विचारे सर

यांखेरीज ज्या शिक्षकांच्या मुशीतून घडलो ते श्री. घरत सर, भूगोलाचे नारखेडे सर, चित्रकलेचे जोशी सर, मराठीच्या परांजपे बाई, संस्कृतच्या गारखेडकर बाई तसेच दळवी बाई, पीटीचे नलावडे सर, गणिताच्या पाठारे बाई, राणे बाई, इंग्लिशच्या प्रभू बाई, केणी बाई, मुलांवर जीव लावणारे पालकर सर तसेच पालकर बाई अजून कितीतरी नावे घेता येतील. लहानसहान प्रसंगातून ह्या सगळ्यांनी आमच्या संस्कारक्षम वयात पाठ्यपुस्तकाबाहेरचं किती तरी शिकवलं. पु.लं चे चितळेमास्तर वाचताना, बोकीलांचं शाळा वाचताना किंवा प्रकाश संतांच लंपन वाचताना मनातल्या मनात माझी शाळा आणि त्यातले कैक प्रसंग माझ्यासमोर आले ते ह्यातल्या कुण्या ना कुण्या शिक्षकाबरोबरच. विद्यार्थी हा परिक्षार्थी हवाच पण त्यापलिकडे एक चौफेर, चौकस व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आणि तेही एकावेळीस अनेक गोळ्यांवरुन हात फिरवण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलं. शिक्षकी पेशा पलिकडे जाऊन ह्या शिक्षकांनी जे काही दिलय त्याच्या त्रुणात राहाणच परम भाग्याचं. कधी मायेने गोंजारून, कधी पाठीवर शाबासकी देऊन तर कधी घणाचे घाव घालून ह्या सायांनी वर्षामागून वर्षे विद्यार्थी ’तयार’ केले, त्यांच भविष्य अक्षरश: विणलं, घडवलं. ’शीलं परम भूषणं’ हे शाळेचं ब्रीदवाक्य आम्हाला घडवत गेलं ते अशा शिक्षकांमुळेच. आज ह्या सगळ्या शिक्षकांची आठवण यायला गुरुपौर्णिमेचं निमित्त नाही आणि हा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रमही नाही. एका निवांत क्षणी, मागे वळून बघताना, शाळेतल्या क्षणांचा हा धांडॊळा आहे आणि ते क्षण उजवळवणाया ह्या शिक्षकांविषयी मनातली अपार कृतद्न्यता कागदावर उतरते आहे.

दरम्यान इतकी वर्ष उलटली शाळेतून बाहेर पडून, तर पुन्हा एकदा जमता येतय का पहावं असा उत्साही प्रयत्न मिलिंद दामले, वैशाली दळवी, प्रिया बेडेकर, स्वप्निल जोशी यांनी एक-दोनदा केलाय. ह्या फेसबुक आणि ऒरकटच्या कृपेने आम्ही बरेच जण एकमेकांच्या संपर्कात आहोत इतकच, त्यापुढे जाऊन एकत्रित भेटण्याची शक्यता आता बहुतेक म्हातारे होऊन सांसारिक जबाबदाया संपल्यावरच. नाही म्हणायला आमचा वर्गातल्या मुलांचा खास ग्रुप अजून एकत्र जमतो, कधीतरी गिरगावतल्या व्हॊइस ऒफ इंडियाच्या इराण्याकडे चार कप चहावर शाळेतल्या दिवसांच्या रम्य आठवणी अजूनही रंगतात. असंच गप्पांच्या ओघात, आम्ही वर्गातल्या मुलांची सगळी नावं त्यांच्या हजेरीपटाच्या अनुक्रमासहित आठवायचा प्रयत्नही करतो.. धम्मालच!

आता भारतात गेलो की प्रत्येक वेळी शाळेत जातो, स्टाफ रुम मध्ये ओळखीच्या बाई भेटतायत का बघतो, भेटता क्षणीच ओळख पटतेच, कुठल्या बॆचचा वगैरे सांगावं लागत नाही. शिक्षकांच्या चेहर्यावरचा आनंद, अभिमान, कौतुक ह्याचं मिश्रण सारं सारं बघून घेतो, मनोमन सुखावतो. मग खाली तळमजल्यावर येतो, घंटा आहे मोठी तासाचे टोले रघूकाका द्यायचे, जे घरपर्यंत ऐकू येतात. तिच्या खाली उभे राहून अंगणात बेफाम धावणाया मुलांकडे बघत हातात वडापाव घेऊन उभा राहतो. ह्यातलाच कोणीतरी उद्या जगाच्या दुसया टोकावर जाईल आणि ह्याच क्षणांची त्तेव्हा अशीच उजळणी करेल काय, आठवण काढेल काय असा विचार करत भरलेल्या डोळ्यांनी, डॊळे भरुन, त्या धावणाया मुलांना मी कौतुकाने पहात रहातो.. पहातच रहतो.

Sunday, December 12, 2010

दाम करी काम येड्या दाम करी काम..

सध्या ऒफिसात बराच व्यग्र असलो तरी एकीकडे वाचन चाल्लय याचं समाधान आहे. एक महत्त्वाचं म्हणजे पूर्वी सारखं एखादं पुस्तक घ्यायचं आणि मग ते डोक्यात घोळवत चवीचवीने वाचायचं किंवा एकदम तुटून पडून संपवायचं असं हल्ली होतं नाही. नेट वरच्या मुबलक लिखाणाच्या वाचनाची आता इतकी सवय आणि चटक लागलेय की निरनिराळे ब्लॊग्स, मराठी संस्थळे, दिवाळी अंक, रोजची वर्तमानपत्रे असं बरच काही डोळ्या खालून जातच. तसंच हे वाचलस का? इथे काय आहे ते पाहिलस का? अशी इ-मेल्स येऊन पडलेली असतातच. त्यामुळेच बरेच विचार घोळतायत सद्ध्या, खूप विषयही आहेत हातावेगळे करण्यासाठी जसं जमेल तसं लिहीनच.

दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांनी निवडणूक एक हाती जिंकली, ती सुद्धा अशी की लालूसह कॊंग्रेसचा सुकडा साफ. बिहारी जनतेचे अभिनंदन करायलाच हवे. भारतात लोकशाहीची मूळे घट्ट असल्याचे पुन्हा एकदा जाणवले हेच खरे. गुजराथ पाठोपाठ आता बिहारनेही जनतेला लागलेली विकासाची ओढ दाखवून दिलेय. ह्याचे दूरगामी परिणाम केंद्रातील राजकारणावर न झाले तरच नवल. जे आमचा विकास करत नाहीत त्यांना आम्ही हकलवणारच हे समीकरण जर लोक दाखवून देत असतील तर निदान जनभयास्तव इतर राज्यसरकारांना आणि केंद्र सरकारला विकास करुन दाखवावा लागणारच. अर्थात नितिशकुमार सरकारवर बिहारला पुढे न्यायची जबाबदारीही आहेच पण तूर्त तरी बिहारच्या विकासासाठी त्यांची अत्तापर्यंतची वाटचाल स्पृहणीयच आहे.

जगाच्या दुसया टोकावरुन ह्या सगळ्याकडे बघताना भारतात एकाच वेळी परस्परविरोधी राजकीय, सामाजिक बदल घडताना दिसतायत. उदाहरणच द्यायची झाली तर, बिहार आणि गुजराथ विकासाच्या रथावर घौडदौड करत असताना, तिथे दक्षिणेत आंध्र आणि कर्नाटकात तसेच आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या नाटकांचे दोन-तीन अंक झाले, राजकारणाला ऊत आला अगदी. एकीकडे भारताची वेगात होत असलेली आर्थिक प्रगती, शिक्षणाचा वाढलेला स्तर, वाढता शेअरबाजार आणि बाहेरच्या जगातून येणारा पैशांचा ओघ, ’तुम्ही ग्रेट आहात’ हे येऊन सांगणारा ओबामा, कॊमनवेल्थ मध्ये कमावलेली पदकं, भारतीय क्रीकेट संघाने मिळवलेले सलग विजय ह्यामुळे भारतीय म्हणून अभिमान वाटत असतानाच एकामागोमाग बाहेर पडणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे (राष्ट्रकूल स्पर्धेतला भ्रष्टाचार, ’आदर्श’ चा भ्रष्टाचार, २ जीस्पेक्ट्रम चा भ्रष्टाचार, कॊंग्रेसच्या महाअधिवेशनात झालेला भ्रष्टाचार, पेण अर्बन बॆंकेचा भ्रष्टाचार इ. इ.) राज्यस्तरीय आणि केद्रस्तरीय पातळीवर वर्षभर चालूच राहीली. म्हणजे करदात्यांचा पैसा ह्या लबाड आणि लुच्च्या, भ्रष्ट राजकाराण्यांनी खाऊन लोकांना हातोहात फसवलेय. जोपर्यंत एखाद्या भष्ट व्यक्तिला (आणि त्याच्या लाभार्थींनाही) तातडीने शिक्षा (प्रसंगी फाशीही) होत नाही, तोपर्यंत भष्टाचार करू पाहाणारे हात आणि मने तयार होत राहाणारच. शैक्षणिक संस्थांमध्ये निती मुल्ये शिकवण्याचे आणि त्यांची जपणूक करण्याचे महत्त्व ठसवण्याचे दिवस आता गेलेत असं निराश होऊन म्हणावसं वाटतं. भष्ट वागण्याविरोधातला शैक्षणिक आणि सामाजिक धाक कमी होत चाल्लाय, जिथे शैक्षणिक संस्थाच डोनेशनचा हट्ट करतात आणि भरमसाट फीया वसूल करतात तिथे त्या मुलांवर त्याविरोधात कसे संस्कार करतील हा प्रश्नच आहे. २०१० हे वर्ष भारतासाठी घोटाळ्यांचे वर्षच ठरावे इतके काळे धंदे एकामागोमाग उजेडात येत आहेत. अति झाले अन हसू आले, अशातला प्रकार होत असून आणि सगळेच राजकीय पक्ष ह्या भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने (आठवा साधनशुचितेच्या गप्पा मारणार्या भाजपाच्या अध्यक्षांनी पैसे घेतल्याची दिलेली कबुली) कुणालाही नैतिक पाया नाही भष्टाचाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी उभे राहाण्याचा, आणि अधिक दुर्देवाची गोष्ट म्हणजे ’हे असंच होणार.. आपण काही करु शकत नाही’ ह्या अगतिकतेपायी, वैषम्यापायी जनता अधिकाधिक उदासीन होत चाल्लेय, ह्या दाहकतेची संवेदनशीलता गमावत चाल्लेय. एकीकडे आपण म्हणतो ’यथा राजा तथा प्रजा’ तर दुसरीकडे ’People deserves the Governance’ म्हणजे लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते असेही परस्परविरोधी बुद्धीभेद करतो. होते काय की एक्मेकांवर ढकलण्यापलिकडे ह्यातून मार्ग निघत नाहीत.

हे असे विचारांचे कल्लोळ चालू असतानाच उदास वाटू लागते, आपला युद्धभूमितला अर्जुन झाल्यासारखं वाटतं आणि मग थोडं खोलात शिरल्यावर, म्हणजे, जे काही भष्टाचार उघड झालेत ह्यावर्षी ते सगळे ह्याच एका वर्षातले आहेत की वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत, मग काय वेगळं घडलं ह्यावेळी.. अशा मार्गाने विचार केला तर मग जाणवतं.. किती तरी समाजसेवकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत, ह्यातले बरेच घोटाळे बाहेर काढलेत. माहितीच्या अधिकाराबाबतची सजगता जसजशी वाढेल आणि त्याचा धाक जसजसा निर्माण होईल तसतशी भष्टाचाराची वृत्ती कमी होईल अशी आशा करायला जागा नक्कीच आहे. शिवाय, युयुआयडी (म्हणजे प्रत्येक माणसास एक क्रमांक, अमेरिकेत एसे.एस.एन. आहे तसा..) योजना जसजशी मार्गी लागेल तस तसा समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत मोजदाद (अकांऊंटिबिलिटी) वाढेल, भष्टाचारास मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.

भारतातील पिढी आता विकासाच्या वेगाला सरावतेय. महाराष्ट्र जर २०१२ पर्यंत वीजेच्या बाबतित स्वयंपूर्ण झाला तर बराच फरक पडेल. रोटी, कपडा, मकान और बॆंडविड्थ ह्यातल्या शेवटच्या उद्देशाला आपल्याला लवकरात लवकर हात घालायला हवा, टेलिकॊमचे जाळे जितक्या लवकर आणि स्वस्त पसरेल तितकी महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या कायमस्वरुपी विकासासाठी ती लाभदायी ठरेल. आमेन! त्याचबरोबर, लवासा सारखे जागतिक पातळीवर दखल घेतलेले प्रोजेक्ट्स आणि जैतापूरचा अणूउर्जा प्रकल्प हे औद्योगिक दृष्टया स्पृहणिय वाटत असले तरी सामाजिक विषमता आणि स्थैर्य अबाधित राहील हे पहाण्यातच सरकारची परीक्षा आहे. आपल्याला ’इंडिया आणि भारत’ तसेच ’भारत आणि हिंदुस्थान’ ह्यांमधले धुमशान परवडणारे नाही त्यामुळे स्थानिक, प्रादेशिक आणि प्रांतिक अस्मिता जपत जग जिंकायचं हे लक्षात ठेवायला हवं.

नुकताच काही म्युच्युअल फंड्स पाहात असताना,
http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=15774 हा लेख वाचनात आला. सद्ध्या, अमेरिकेने नोटा छापायला घेतल्याने डॊलरचं अवमूल्यन झालय. अर्थात हा प्रश्न माझ्या सारख्या अनिवासी भारतियांना अर्थकारणासाठी जिव्हाळ्याचा असल्याने जागतिक अर्थकारण आणि घडामोडींवर लक्ष असतेच. असो, तर प्रस्तुत लेखांत, चीनने जर त्यांच्या मालाला अंतर्गत बाजारपेठ निर्माण केली नाही (internal consumption वाढवले नाही) तर तो स्वत:सकट सगळ्या जगावर आर्थिक संकट ओढवू शकतो. तसेच भारताचा विकासाचा दर हा चीनच्या तुलनेत थोडा मागे असला तरी भारतातला विकास हा भांडवलशाही रुजत असल्याचे आणि पर्यायाने कायमस्वरुपी तसेच स्वयंपूर्ण विकास असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे भारतात लोकशाही असल्याने दाखवलेले आकडे हे चीनच्या आकड्यांपेक्षा विश्वासार्हच आहेत. सांगायचा मुद्दा काय, तर चीनची भीती बाळगायचं कारण नाही, इतके कोट्यावधी रुपयांचे भष्टाचार उघडकीला येऊनही जागतिक बाजार भारतात पैसे गुंतवतोय म्हणजे आज जग भारताकडे विश्वासाने, आशेने बघतय, आपण तो विश्व्वास सार्थ ठरवायलाच हवा. चीनमध्ये मानवी मूल्यांची होणारी पायमल्ली, सरकार करत असलेली सामाजिक दडपशाही, मिडीयाला नसलेले स्वातंत्र्य, इटरेनेटवर प्रतिबंध ह्यामुळे समाजवादापुढे अपारदर्शकतेचे, स्वातंत्र्याच्या गळचेपीचे प्रश्नचिन्ह. रशिया आणि इतर ठिकाणी झालेला साम्यवादाचा पाडाव. इथे अमेरिकेत अनिर्बंध भांड्वलशाही आणि Too big to fall म्हणत नंगानाच करणाया बड्या कंपन्यांनी सरकारला वाकवूवन जनतेचे पैसे TARP (Troubled Assets Relief Program) द्वारा हडप करुन वर त्यातून बोनसही घेतल्याचे आपण पाहिले, भारतात लायसन्स राज, लाल फितीचे राजकारण संपून कॊर्पोरेट स्पर्धेतून विकास सामान्य माणसापर्यंत पोहोचतोय पण ह्या भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय आणि किती खोल लागलेय वाळवी कळत नाहीये, मग काय योग्य या जगात हेच कळेनासं झालय ह्या क्षणाला, पुन्हा एकदा युद्धभूमीवरचा अर्जुन!

मिसळपावर सुधीर काळे यांनी http://www.misalpav.com/node/15799 येथे एका पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केलेय, "भारतीय - कसा मी? असा मी". वाचायला हवंच हवं असं हे पुस्तक, मूळ लेखक आहेत श्री. पवनकुमार वर्मा (भारताचे सद्ध्याचे भूतान येथील राजदूत). आजच्या घडीच्या भारताच्या प्रगतीचा वेग, भारताची जगाला असेलेली ओळख ह्याचा यथार्थ आणि अभ्यासपूर्ण उहापोह या पुस्तकात केलेला आहे असं कळतं.

एकूणच, समाजवाद की भांडवलशाही हे द्वंद्व डोक्यात सुरु झालं की लहानपणी चाळीत वासुदेव गिरक्या घेत गायचा त्याचं हटकून आठवणारं गाणं.. बाबूजींनी गायलेलं माझं अतिशय आवडतं.. लोकसंगीताचा उत्तम नमुनादेखील..

वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


पैशाची जादू लयी न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागून धाव
जल्मापासनं साधी मानसं ह्या पैशाची गुलाम रे..
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

कुनी जुगार सट्टेबाज, कुनी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुनी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखूर सुटला फेकला त्याने लगाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

या कवडी दमडी पायी कुनी राखूस ठेवी जीव
कुनी डाका दरोडा घाली कुनी जाळून टाकी गाव
बगलं मंधी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळाला फास
ठरल्यालं लगिन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं श्रीमंतिनं हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

वाड्यात पंगती बसल्या लयी अग्रव जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आगं
संसाराचं ओझं घेउन कुनी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नाचते नारीची अब्रू छन छुम्मक तालावरती
पैशानं बायको खूस पैशानं बोलते पीरती
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम..
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

आपले भ्रष्टाचारी तर हेच म्हणत नसावेत, दाम करी काम? :(

Tuesday, November 2, 2010

आली माझ्या घरी ही दिवाळी..

ह्या दिवाळीला बायको आणि मुलगा ’माझ्या माहेरी’ आहेत, त्यामुळे इथे एकटाच.. अर्थात तरी दिवाळीचा उत्साह कमी नाहीच. कंदील लावला आज आणि हो फराळ केलाय, म्हणजे बनवलाय :-))

अर्थात वैदेहीने http://www.chakali.blogspot.com/ इथे दिलेल्या आधाराशिवाय हे कठीणच होतं, म्हणजे पूर्वी कधितरी मी ओगले आजींच्या पुस्तकांचे संच आणले होते वाहून अमेरिकेत, पण मायबोली, मिसळपाव आणि मुख्यत्वे चकलीवर वैदेहीच्या रेसिपीज मुळे ती पुस्तक उघडायची आताशा गरज राहीली नाही.

शंकरपाळे करताना मैदा मस्त मळला, कणकेचा वापर कटाक्षाने टाळला. थोडं मोहन घातलं मैदा मळत असताना, त्यावरुन आठवलं - ’मोहन’ हा शब्द कुठून आला असावा ह्या स्वयंपाकात? मला शब्दांची व्युत्पत्ती शोधायला फार आवडतं, त्यातून जुन्या संस्कृतीचं एखादं रुपडं, त्या काळातील माणसांची विचार करण्याची पद्धती चटकन उडी मारुन डोळ्यासमोर येऊ शकते. असो, तर माझ्या दोन्ही आज्या पट्टीच्या सुगरणी. दोन्हींमध्ये साम्य म्हणजे स्वयंपाक करताना त्यांचं नामस्मरण तरी चालू असे किंवा अभंग, ओव्या ह्यांचा स्त्रोत गोड गळ्यातून अखंड सुरु असे. शिवाय पदार्थ तयार झाला की आधी देवापुढे ठेवणे असेच. त्यामुळे नेहमीचा स्वयंपाक करतानाही त्यांची एकतानता, तलिन्नता बघण्यासारखी असे, आणि असे दिवाळीचे पदार्थ करायचे असले तर बघायलाच नको. एकमेकीकडे जाऊन सगळ्या बायका अतिशय उत्साहाने पदार्थ करणार दिवाळीचे. तर देवाचे चिंतन करत स्वयंपाक करताना त्या मन-मोहनाचा मोह पडल्याने, तेलाच्या फोडणीला मोहन नाव पडले असेल का? असेलही, कुणास ठाऊक!!

लाडू करताना केवळ वासावरुन आणि रंगावरुन बेसन कसं आणि किती भाजलं गेलय ओळखण्याच काम जमून आलं आणि लाडू मनासारखे छान वळलेही गेलेत. शंकरपाळे तळतानासुद्धा तेल किती तापायला हवं, कोणत्या रंगावर ते तळून काढायला हवेत हे एकदा लक्षात आलं की काम सोप्प होतं. पूर्वी आजी करायची तेव्हा नाही म्हटलं तरी थोडी लुडबूड असायची स्वयंपाक घरात, बोलता बोलता आजीही स्वयंपाकातल्या खाचाखोचा सांगायची. मग नंतर स्वयंपाकघर जे सुटलं ते सुटलं. इथे एकटा असतानाही कधी तळणीचा विचार केला नाही (बॆचलरपणीचा सामूहीक आळस बहुधा) नंतर बायकोने लाड पुरवले, पण ह्यावेळी ओट्याशी उभं राहून फराळ करताना खरच मजा आली, बायकॊचाही टेलिफोनिक सपोर्ट होताच :) त्यामानाने चिवडा सरळ सोप्पा करायला, अर्थात तो खालून न जळून देता मिक्स करणं आणि पोहे कच्चे न राहाणं हे साधलं की झालं.


असो, तर शंकरपाळे, पातळ पोह्याचा चिवडा आणि बेसनाचे लाडू असा फराळ दिवाळीला तय्यार, सोबत कंदील आणि तोरणं आहेतच. फटाक्यांची अनुपस्थिती अर्थातच जाणवतेय पण फटाके न लावण्याची सवय आता अंगवळ्णी पडलेय, मुलाबरोबर पुन्हा लहान होईन तेव्हा करुच धमाल.

तमसो माSSSS ज्योतिर्गमय:
सगळ्याना शुभ-दिपावली !

Tuesday, October 19, 2010

आमचे साहेब..

खरं म्हणजे इतक्या दिवसांनी लिहितोय, इतका खंड पडेल लिखाणात असं वाटलं नाही, पण चलता है, गेले काही माहिने घर आणि नंतर कामात इतका व्यस्त होतो की वाचन तसं थंडावलच पण मनात असूनही कागदावर उतरवण्या इतका वेळ काढू शकलो नाही. लक्षमणचे ते लाजवाब डाव, सचिनने दिलेले दणके, कॊमनवेल्थ मधला भ्रष्टाचार आणि मग भारतियांनी लुटलेली पदक, बिहारच्या निवडणूकांतली रणधुमाळी, अयोध्याकांडाचा पुढचा अध्याय आणि असं बरच काही बघत, वाचत होतो.. बरेचदा मनात असूनही लिहायचं राहून गेलं, असो.. पण बाळासाहेबांची दसयाची डरकाळी ऐकली आणि अगदी उचंबळून आलं सगळं, म्हटलं लिहून मोकळं व्हायलाच हवं.

तर, परवाच्या सेनेच्या (आता सेना म्हटली कि फक्त ’शिव’सेनाच, आता ’शिव’ हा शब्द वड्यापासून उद्योगापर्य़ंत वापरून टाकलाय तो भाग सोडा!) दसयाच्या सभेचा इतिवृत्तांत वाचला आणि जुने दिवस आठवले. गिरगावात शाखा म्हणजे संघाची नाही तर सेनेचीच असं त्यावेळी वातावरण. दसयाची सभा म्हणजे घरचं कार्य असल्यासारखी तयारी असे. म्हणजे सकाळी घरोघरी पूजा करुन, उन्हातान्हात शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे विचार ऐकायला वडिल-काका आणि आजूबाजूचे सगळेच जात असू. तो भगव्याचा गजर, बाळासाहेबांचा करारी आवाज आणि मिश्कील चिमटे, परखडपणा.. त्यांच्या विचाराचं सोनं लुटत आम्ही पांगायचो एक समाधान घेऊन. एक तरी व्यक्ती आहे जी मनापासून आणि मनातलं बोलते, निर्भिडपणे आग ओकते आणि हो, मराठी माणसाचा विचार करते हे सुखावणारं होतं, निदान त्या काळात तरी. तेव्हा शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करणारी होती म्हणून असेल पण मध्यमवर्गीय तरुणांत आणि नवतरुणांत (केवळ मराठीच नाही तर गुजराथीही) बाळासाहेबांनी एक चैतन्य निर्माण केलं होतं. शिवसेनेचा बंद म्हणजे बंद (धाकामुळे किंवा केवळ साहेबांचा शब्द म्हणून) असे मंतरलेले ते दिवस. ९२-९३ च्या दंगलीत बाळासाहेबांचा निर्भीडपणा आणि वचक आम्हा गिरगावकरांना तरी सुखावूनच गेला होता. पुढे ९५ मध्ये युतीचं सरकार आलं आणि शिवशाही येणार अशा अपेक्षांच ओझं घेऊन सेना भाजपाने कारभार सुरु केला. त्याक्षणी बाळासाहेबांनी स्वत: मुख्यमंत्री पद न घेता (रिमोट कंट्रोल हातात ठेवून अर्थत) जे शुचितेचं दर्शन घडवलं (न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चारं!) ते त्यांच्याविषयी आदर द्विगुणीत करणारं ठरलं. पण हा सगळा इतिहास झाला, केव्हा.. जेव्हा सेनेचा हा वाघ, ढाण्या वाघ, स्वत:च्या कर्तुत्वावर जंगल गाजवत होता, जीवाला जीव देणाया मराठ्यांची फौज उभी करुन भिडत होता, आपल्या निर्भीड. तर्कशुद्ध वकृत्वाने सभा गाजवत होता. पण मग निसर्गनियमाप्रमाणे उतरती कळा लागली आणि गेल्या काही वर्षात जे बघायला मिळतय त्याने वाईट, विषण्ण, उद्विग्न, असहाय्य आणि हो लाजिरवाणं ही वाटतय. ज्या बाळासाहेबांववर जीवापाड प्रेम केलं, प्रसंगी, त्यांनी पु.ल. / सचिन ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मोहयांवर केलेला शाब्दिक हल्ला सुद्धा दुर्लक्षित केला, त्या बाळासाहेबांबद्द्ल आता केवळ सहानुभूतीच वाटून राहिलेय.

तर परवाच्या भाषणाच्या अनुषंगाने.. शरद पवारांनी कोलांट्या मारल्या तर आपण स्वीकारतोच हो, पण बाळासाहेबांनी तसं करावं हे कसं पचनी पडणार? आयुष्यभर, घराणेशाहीचा आरोप करत शेवटी मुलगा कार्याध्यक्ष म्ह्णून पुढे आणून वर ही घराणेशाही नाही ही मखलाशी कशासाठी ते कळलं नाही. शिवसेनेत सगळे निर्णय बाळासाहेबच घेतात ना, मग हा निर्णय कृष्णकुंजवरुन घेतला गेला ह्याला काय अर्थ आहे, जर बाळासाहेबांना तो पटला नस्ता तर तुम्ही तेव्हाच कार्याध्यक्ष पद दुसया कुणाला तरी द्यायला हवं ना! ते जाउंदेच पण आदित्यला लॊंच करताना त्याचा भाऊ म्हणजे दुसरा नातू माझ्यासारखाच हे सांगण्याचा केविलवाणा अट्टाहास कशासाठी? त्यांना (आदित्य/ तेजस) करु दे ना त्यांच्या लढाया, घेऊ देत ना केसेस अंगावर. गेले कित्येक दिवस सामन्यात पद्धतशीर पणे आदित्यला फोकस केलं जातय, त्यामुळे त्याला लॊंच करणार हे अभिप्रेत होतच पण मग प्रश्न पडतो सामान्य शिवसैनिकाचं काय? शिवाय तुम्ही घराणेशाही विरुद्ध वाजवलेल्या फुसक्या बाराचं काय? शिवसैनिकांनीच निवडून दिलं आणि त्यांच्या इच्छेखातर असं झालं हे म्हणायचं असेल तर तसच राजीव गांधी, राहूल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्याबाबतर्ही म्हणता येईल की. उलट त्यांनी घराणेशाही नको अशा घोषणा तरी दिल्या नाहीत. माझ्या मते घराणी शाही असण्यात खास चूकही नाहीच कारण घरात ज्या वातावरणात तुम्ही वाढता त्याचा तुम्हाला लहानपणापासून व्यावसायिक गोष्टी जवळून अनुभवता आल्याने फायदा होतोच (जसा इंदिरा गांधींना नेहरूंचा झाला), पण पुढच्या पिढीला त्यासाठी तयार करणं एकवेळ समजू शकतो, आदित्यला पुढे आणणं हा त्याचाच एक भाग असू शकतो हे ही बुद्धीला पटतं पण ’ही घराणेशाही नाही’ ही मखलाशी करणं, ती करावी लागणं आणि ते ही बाळासाहेबांना ह्याच वाईट वाचल्यावाचून राहत नाही. प्रबोधनकारांनी असं बाळासाहेबांना लॊंच केल्याचं ऐकीवात नाही आणि राज ठाकरेंना बाळासाहेबांनी लॊंच केल्याचं ऐकीवात नाही, असो कालाय तस्मै नम:!

साहेबांनी भाषणात म्हटलं की ज्या मुद्द्यावर सेना उभी राहीलीत्याच जुन्या मुद्द्यावर ते (राज) लढतायत. आता साहेबांच्या ह्या विधानात अनेक अर्थ निघतात, एक म्हणजे मराठी हा मुद्दा अजून इतक्या वर्षांनतरही राजकीय होऊ शकतो ह्यात नाही म्हटलं तरी सेनेचं अपयश आहेच की. दुसरं म्हणजे, मराठीचा मुद्दा सेनेने सोडलाच, त्याशिवाय राजसाहेबांना एवढा पाठींबा मिळालाच नसता. ’दोपहर का सामना’ मुंबईत काढण्याची गरज तेव्हा सेनेला का भासली? ह्यातून कुणाचं लांगुलचालन चाल्लल होत, हे मराठी माणसाला कळत नव्हतं का? सेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मजबूत होण्यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावर पसरायचा प्रयत्न केला. झाले काय की इथले बुरुज ढासळत गेले. शिवसेनेसारखी एक संघटना उभारण्यात बाळासाहेबांचे जितके यश, कौतुक आहे तितकेच खंदे शिलेदार गमवून ती एकसंध ठेवण्यात आलेले अपयशही आहे. भुजबळ, राणे, गणेश नाईक ह्यांसारखे पुढच्या फळीचे नेते तसेच बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, सदा सरवरणकर ह्यांसारखे तरुण रक्त शिवसेना एक संघटना म्हणून बांधून ठेवू शकली नाही, ह्यां सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षांचे मेळ, एक नेता म्हणून, बाळासाहेब घालू शकले नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव असं वाटल्यावाचून राहात नाही. परवाच्या भाषणात त्यांनी भुजबळांचा उल्लेख केला, मला तर हसू आले. लखोबा म्हणून एके काळी सैनिकांनी ज्याला दणका दिला, ज्याने बंडखोरी म्हणजे काय हे सेनेला पहिल्यांदा दाखवून दिले एवढेच काय तर बाळासाहेबांना अटक करण्याचे मनसुबे केले, त्यांची सदिच्छा भेट! राजकारणात सगळं क्षम्य असतं मान्य, पण बाळासाहेबांना हे शोभत नाहीच, अहो त्यापेक्षा राज आणि उद्धव एकत्र यावेत यासाठी जे शिवसैनिक प्रयत्न करतायत त्यांचा तरी उल्लेख करायचा, बरं वाटलं असतं! बाळासाहेबांच्या भाषणात प्रमुख हल्ला होता राज ठाकरेंवर ह्यातच सगळं आलं. राजसाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावर जे वातावरण पेटवलय त्याचे चटके सेनेला बसत आहेतच. मला खात्री आहे कुठेतरी मनाच्या कोपयात बाळासाहेब राजचं कौतुक करत असणारच. इतक्या छोट्या कालावधित मनसेने जे आक्रमक धोरण ठेवलय त्याची दखल बाळासाहेबांनी घेतली हीच पोचपावती.

दरम्यान, अयोध्येच्या निकालानंतर सामान्य जनतेने दाखवलेला समजूतदारपणा, प्रसार माध्यमांनी आणि राजकारण्यांनी दाखवलेली परिपक्वता (असन्माननीय अपवाद वगळता) पाहून खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. गेल्या १७ वर्षात शिक्षण वाढलेय, जागतिकरण वाढलय, जीवनाचा वेग वाढलाय, लोकांना विकासाचं वेड लागलय. आपापसात लढ्ण्यात काहीच हशील नाही, प्रगति करायला हवी असं नवी पिढी, प्रसंगी जुन्या पिढीला सांगतेय, त्यामुळेच हे शक्य झालं असं वाटतय. उदाहरणच द्यायचं झालं, तर १७ वर्षांपूर्वी माझे अयोध्येविषयी दृष्टीकोन होते ते आमूलाग्र बदलले आहेत, तेव्हा ते चूक होते असं म्हणणार नाही, त्यावेळच्या परिस्थितीत ते योग्य असतिलही, पण आता आपण एक समाज म्हणून पुढे जायला हवं हे उमगतं आणि असं एकत्रित प्रगती करण शक्य, आवश्यक आणि अपरिहार्य आहे हे ही समजतं. तर ह्यातून सांगायचा मुद्दा हा की, जसं शिक्षणाचं प्रमाण वाढतय, माहितीचा अधिकार वापरण्याचं प्रमाण वाढतय, परकीय गंगाजळी वाढतेय, उद्योगधंदे वाढताहेत तस तस लोकांना समृद्ध जीवनाचे फायदे दिसायला लागलेत, त्याची फळं चाखायला मिळालेयत. असं असताना भावनेच्या राजकारणातून विशेष काहीही होणार नाही हे आता राजकीय पक्षांनाही जाणवू लागलेय. गुजराथचे उदाहरण पाहाता तर हे अधोरेखित होतय. नरेंद्र मोदींनी केवळ ’समतोल विकास’ ह्या एका मुद्द्यावर अगदी पंचायत समित्या आणि नगरपालिकाही निर्विवाद जिंकून आणल्या. बिहार मध्ये नितिशकुमारही विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करत आहेत. दक्षिणेत चंद्राबाबूंनीही तो प्रयत्न केला पण विकासात ते समतोल साधण्यात अपयशी ठरले. केंद्रात मनमोहनसिंग सरकारही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन भारताच्या अर्यव्यवस्थेच्या वाढीच्या गतीची स्वप्ने जगाला दाखवत आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, बाळासाहेबांच्या भाषणात, ’विकास’ हा मुद्दा अभावानेच आढळला. वीस वर्षांपूर्वीचा तरूण आणि आजचा तरूण ह्याच्या विचारात बराच फरक आहे हे समजायला हवे. केवळ अर्वाच्य शब्दात इतरांची हेटाळणी करुन मने जिंकण्याचे दिवस गेले, त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेत इतके वर्ष सत्ता असताना सेनेने काय काय केले ह्यावर लक्ष वेधले असते तर नक्कीच छान वाटले असते.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, आदित्यच्या बरोबरीने आदेश बांदेकरांचे सेनेने केलेलं लॊंचिंग. गेले कित्येक दिवस त्यासाठी सामन्यात मोर्चेबांधणीसुरु होती, म्हणजे आज भाऊजींनी बाळासाहेबांची भेट घेतली, भाऊजींनी मराठी दांडीया सुरु केला वगैरे वगैरे! ज्या भाऊजींवर दादर मधून पडण्याची नामुष्की आली (कारण काहीका असेना!) त्यांना शिवसेनेत सचिवपद? म्हणजे इतके वर्ष घासलेल्या शिवसैनिकाने करायचं काय? कुठल्याही पक्षात सचिवपद म्हणजे कार्याध्यक्षाशी समन्वय साधण्यासाठी, थिंक टॆंक म्हणून तसेच लोकांकडून कामं करुन घेण्यासाठी अतिशय महत्त्वांचं, जबाबदारीचं आणि तितकच व्यस्त पद. इतर उद्योग सांभाळताना ह्या पदाला भाऊजी न्याय देऊ शकतील ? त्यांचं पहिलं ध्येय मिडीया म्हणूनच राहाणार ना मग डमी म्हणून त्यांना इथे पुढे केलय की काय अशी शंका यायला जागा आहेच, म्हणजे एखाद्या सच्चा शिवसैनिकाची ह्या पदासाठीची जागा बाहेरून आलेल्याने घेतली, हेच अगदी विधानसभा निवडणूकीत झालं दादर मतदारसंघात आणि परिणाम दिसलेच. व्यक्तिश: कुणाला विरोध नाही पण कुठेतरी चुकतय असं वाटत राहातं.

एकंदर, हे असं आहे. शिवसेनेचा प्रवास म्हणजे माझ्यासारख्या कित्येकांचा तारुण्याचा प्रवास. बाळासाहेबांचे विचार ऐकत आम्ही घडलॊ, एका दिशेने पुढे गेलो. त्यामुळे हे असं काही पाहिलं की पोटतिडकीने तितक्याच हक्काने काही सांगावसं वाटतं, चुकीचं वाटतं असलं की मन मोकळं करावसं वाटतच. असेच पुढचे दसरे मेळावे येतील, पन्नाशीही पार करतील, पिढ्यान पिढ्या वाघाची डरकाळी ऐकायला येतील पण जर आवाजातील धारचं कमी होत चालली असेल, तर न्यायालयाला डेसिबल मध्ये आवाजाची क्षमता घालायची वेळच येणार नाही हे तितकच खरं!

Sunday, July 11, 2010

If you can..

गेले काही दिवस, कामाचा वाढलेला व्याप आणि पसारा, घरात तारक बरोबर जगत असलेलो माझं बालपण, तसेच समर मधील भटकंती ह्यामुळे इच्छा असूनही इथे लिहिता आलं नाही. अकरावीच्या प्रवेशांचा खेळखंडोबा, फुटबॊलचा विश्वचषक, राज-का-रण, बेळगावप्रश्नी केंद्र सरकारने घातले वाकडे शेपूट, वाढती महागाई, त्यातून झालेले बंद, ’डबल डीप’ रिसेशनची इथे अमेरिकेत जाणवत असलेली भीती खूप काही लिहीण्यासारखं आहे, पण सद्ध्या वेळेचं गणित काही जमत नाहीये. वाचनही थांबलय म्हणावं इतपत थंडावलय.
स्पेन जिंकली आज.. मस्त झाली आजची मॆच. इतकी पिवळी कार्ड एका गेम मध्ये कधी बघितली नव्हती. खूप धुसमसळा झाला आजचा खेळ पण हॊलंडला त्याच्यामुळेच दहा खेळांडूंनी शेवटी बचाव करायला लागला आणि तिथेच स्पेनने संधी साधली. एकंदर विश्वचषकच मस्त झाला, कायम लक्षात राहील असाच.

दरम्यान एक नितांत सुंदर कविता वाचनात आली ती इथे लिहितोय -
एका वडिलांनी मुलाला उद्देशून लिहिलेली.. कसं जगावं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय करु नये ह्याची परिपूर्ण जंत्रीच जणू. एकेका ओळीत विलक्षण अर्थ भरला आहे. वाचताक्षणी भारुन टाकलं, जिंकलं ह्या ओळींनी.. कवीचे मनापासून आभार.

"If"
If you can keep your head when all about you
Are losing theirs and blaming it on you;
If you can trust yourself when all men doubt you,
But make allowance for their doubting too;
If you can wait and not be tired by waiting,
Or, being lied about, don't deal in lies,
Or, being hated, don't give way to hating,
And yet don't look too good, nor talk too wise;

If you can dream - and not make dreams your master;
If you can think - and not make thoughts your aim;
If you can meet with triumph and disaster
And treat those two imposters just the same;
If you can bear to hear the truth you've spoken
Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to broken,
And stoop and build 'em up with wornout tools;

If you can make one heap of all your winnings
And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
And never breath a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
To serve your turn long after they are gone,
And so hold on when there is nothing in you
Except the Will which says to them: "Hold on";

If you can talk with crowds and keep your virtue,
Or walk with kings - nor lose the common touch;
If neither foes nor loving friends can hurt you;
If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
With sixty seconds' worth of distance run -
Yours is the Earth and everything that's in it,
And - which is more - you'll be a Man my son!

--Rudyard Kipling

Monday, March 15, 2010

विंदा

विं.दा. गेल्याची बातमी आली. वाईट वाटलं, पण एक समृद्ध आणि यशस्वी जीवन जगलेल्या मनस्वी माणसाला दीर्घायुष्याचं वरदान लाभलं हे समाधान होतं. पाडगांवकरांइतक्या सहजतेने मला विं.दां.च्या खूप काही कविता ऐकायला मिळाल्या नाहीत पण ज्या ऐकल्या त्यांनी अशी पकड घेतली की बस्स.. ’शुभ्र फुलांची ज्वाळा’ ही कॆसेट मला भेट मिळाली होती, त्यातल्या सगळ्याच गझला आम्हाला दोघांनाही इतक्या आवडल्या की मागच्या भारत भेटीत सीडी आणली. पद्मजा फेणाणीचा आवाज तर मस्तच, पिळवटून टाकणारा..अप्रतिम.. गझल आवडणाया व्यक्तिकडे संग्राह्य असायलाच हवी ही सीडी.

राज्यसभेत महिला विधेयक पारित झालेलं ऐकलं तेव्हा खरं तर विंदांचेच शब्द ओठावर आले आणि मागोमाग ते गेल्याची बातमी. त्यांच्याच ह्या दोन्ही गझल इथे लिहून विंदांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.










सर्वस्व तुजला वाहूनी

मागू नको सख्या रे

सर्वस्व तुजला वाहूनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहूनी ॥

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतूनी ॥

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती कांच रे, दिसतोस मजला त्यांतूनी ॥

संसार मी करीते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आद्न्या तुझी ती मानूनी ॥

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानूनी ॥

- विं. दा. करंदीकर

मागू नको सख्या रे, माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले ।।

स्वप्नांतल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग का रे, सर्वस्व वाहिलेले ।।

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू, अन हात शापिलेले ।।

स्वप्नात पाहिलेले, म्हणूनी कसे असत्य
स्वप्नास सत्य सते, सामिल जाहलेले ।।

स्व्प्नातल्या कळीला, स्वप्नात ठेवूनी जा
हे नेत्र घेउनी जा, स्वप्नांत नाहलेले ।।

जा नेर घेउनी जा, स्वप्नांध पांगळीचे
आता पहावयाचे, काही न राहिलेले ।।

- विं. दा. करंदीकर

Thursday, February 25, 2010

विठठला....



प्रिय सचिन, काल तू द्विशतक काढलंस आणि आपल्या घरातला कोणी बोर्डात आल्यावर जसा आनंद होईल तसं झालं अगदी, अटकेपार झेंडा लावल्यावर तेव्हा मराठ्यांना वाटलं असेल ना तस्सच.. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची आणि ’सचिनने आता निवृत्त’ व्हायला हवं’ म्हणणाया ढुढ्ढाचार्यांची एकाच वेळी पिसं काढत ज्या कमालीच्या एकाग्रतेने तू २०० काढलेस नतमस्तक तुझ्यापुढे राजा. तुझी ती नजर, बॊलवर तुटून पडणं, रनिंग बिट्विन विकेट्स, फूटवर्क, टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन म्या पामराने काय बोलावं ह्या सगळ्याबद्दल. काल पुन्हा पुन्हा हायलाईट्स पाहिले आणि डोळ्यांचं पारणं फिटलं अगदी कडा ओलावल्या सुद्धा. कालचा दिवस तुझा होता असं म्हणून मी अन्याय करणार नाही तुझ्यावर, तू म्हणशील तो दिवस तुझा हे सगळ्यांनाच माहित झालय आता. २४ तारीख काल (तुझी जन्म तारीखही २४ च, संख्याशास्त्रीय अनुकूलता असणार म्हणजे :) आणि आज नुकतच वाचलं की, विनोद बरोबर शारदाश्रम मध्ये बरोबर २२ वर्षापूर्वी, म्हणजे २४ फेब्रु. १९८८ रोजी ६६४ धावांची जगप्रसिद्ध भागीदारी केली होतीस. असो, मागे ऒस्ट्रेलियाविरुद्ध १७५* काढताना तू रीटायर्ड हर्ट झालास, न्यूझीलंड विरुद्ध १८६* पेक्षा जास्त करायची संधीच मिळाली नाही पण मला माहितेय तू त्या दोन्ही खेळीतून बरच शिकलास (आणि तू असं अनुभवातून शिकत खेळाची पातळी उंचवू शकतोस म्हणून तू तू आहेस). त्यागोष्टींची तू पुनरावृत्ती होऊन दिली नाहीस हे लगेच जाणवलं. सईद अन्वरने काढलेले ते १९४ आठवतायत.. मे महिना होता आणि खोटं कशाला बोला सॊलिड जळली होती, निम्म्याहून अधिक डाव तर रनर घेऊन खेळला तो. असो, पण स्टॆमिना काय असतो हे तू काल दाखवून दिलस. तुझ्या पहिल्या शभर धावात एकही षटकार नसावा ह्यात संयम म्हणजे काय ते दाखवलस आणि इतकं करुन स्ट्राईक रेट आठ आणि नऊ? तुला महान हे विशेषणसुद्धा तोकडं पडावं. अगदी दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज सुद्धा तुझ्या वादळापुढे काल नतमस्तक झाले असतील.

तुझं कौतुक काय करावं महाराजा, स्टेनची बॊलिंग बघितली मी, कॆलिस सुद्धा जीव तोडून टाकत होता. अशा बॊलिंगची लिलया पिसं काढणं आणि समोरच्या कार्तिक, पठाण, धोनीला प्रोत्साहन देत राहाणं तुलाच जमणार. बॊलरच्या डोक्यावरुन उलट टोलवलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बायसेक्ट करत जाणारा चेंडू खासा मेजवानी होती काल. स्टेनचा ऒफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तू ऒफला शफल होत फ्लिक करुन लेग ला टोलवलास, कसं काय जमतं तुला इतकं अतर्क्य टायमिंग, स्टेन सारख्या फास्ट बॊलरपासून निघालेला चेंडू तुझ्या पर्यंत पोहोचेपर्यंत हे सगळं करायला वेळ आणतोस कुठून? इतकं पदलालित्य, ठेका तुला जमतं कस? आणि ते ही ह्या वयात?? १९९* वर असताना धोनीने तुला नॊन स्ट्रायकींग एन्ड वरुन परत पाठवलं ना तेव्हा सांगतो, ठोका चुकला होता.. अंग ठणकत असणार ना इतक्या झटपट हालचाली करत असताना.. पण २०० च्या सिंहासनावर तुलाच विराजमान झालेलं बघायचं होतं.. तू ’छ्त्रपती’ आहेस, दुसया कोणी तिथे जाण्याआधी तू तिथे जाणंच आम्ही स्विकारु शकतो. २०० हा जॆकपॊट असूच शकत नाही तो फक्त एक क्लास आहे. काल रात्री भारतातला प्रत्येक गरिब श्रीमंत ज्याची क्रिकेटवर श्रद्धा आहे, तो तृप्त झाला असेल, दोन घास जास्तीचे जेवला असेल. दिवाळी, गणपती दरवर्षी येतात पण तुझं असं येण आणि बरसणं त्यात न्हाऊन चिंब होणं ह्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं बाबा. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे!! तसं आहे हे..
असाच खेळत राहा, मनमुराद! गावस्करने घेतलेली ती १०००० वी धाव आणि तुझी २०० वी, भारत काय करु शकतो हे जगाला दिलेलं एक सणसणीत उत्तर.. आमचं भाग्य की आम्ही तुझ्या पिढीत जन्मलो आणि तू भारतात, तुझ्याबरोबर मोठं होत तुझा प्रत्येक चौकार, षटकार उपभोगण्याचा निर्भेळ आनंद दिलास, त्या आनंदाने कित्येक दु:ख, प्रसंगी एकाकीपण विसरायला लावलय.. तुझ्या आणि तुझ्या खेळाच्या त्रृणात राहाण्यातच धन्यता बाबा.. आज तुझ्या खेळाचं वर्णन इथे अमेरिकन, पाकिस्तानी आणि जमैकाच्या मित्रांमध्ये बसून करताना कसं वाटतय काय सांगणार, माझीच कॊलर ताठ. भारतीय आणि मुंबईकर असल्याचा यथार्थ अभिमान वाटतोय आणि तू.... मॆच नंतर तुझं नेहमीचच, dinesh, pathan & Dhoni played well, ball was coming on to the bat.. वगैरे वगैरे.. किती हा विनम्रपणा, बाबा रे, बॊल सगळ्यांच्या बॆटवर येत होते पण त्यांना अचूक दिशा देणं, टायमिंग साधणं, क्षेत्ररक्षकांच्या मधून किंवा डोक्यावरुन भिरकावणं आणि २०० धावा जमवणं, हे फक्त तुझ्या बॆटला आणि थंड डोक्याने खेळणाया तुलाच जमणार ना! कसे रे राहातात तुझे पाय इतके घट्ट जमिनीवर, कोणती वीट पायी घेतलेयस.. विठ्ठला.. ’तुझाच झेंडा माझ्या हाती...........’

एक साठवण:
पंधराव्यावर्षी मुंबईतल्या आझाद मैदानावर टॊम अल्टरने घेतलेली सच्च्याची कटींग पिताना घेतलेली अनौपचारीक मुलाखत..
http://www.youtube.com/watch?v=oez4TSdZvJI

- गेल्या २८ वर्षांपासूनचा तुझा भक्त

Friday, January 22, 2010

कुण्या देशांचं पाखरू...

बयाच दिवसांनी लिहितोय, घरात लहान मूल असलं की वेळ कसा जातो कळत नाही, ह्याचा प्रत्यय घेतोय, ’बाप’ होण्याचा सुखद अनुभव आणि वाढत्या जबाबदायाही.. :-)

तसे बरेच विषय डोक्यात आहेत लिहिण्यासाठी पण सद्ध्या सगळ्यात जोरात विचार चाल्लेत ते "For here or to go?" चे :-) अपर्णा वेलणकर च्या ह्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी ह्या ब्लॊगवर लिहिलं होतं आणि त्यातलं नेमकं पुढे कुठे जायचं त्या दृष्टीने पावलं टाकायची वेळ आता आली आहे असं वाटायला लागलय, आम्हाला सगळ्यांनाच. योगायोगाने हे डोक्यात घोळत असतानाच मायबोलीवर रैनाने ’परतोनि पाहे’ हा बीबी सुरु केला आणि मग ह्या प्रत्येक भारतीय इमिग्रेंट्सच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सखोल लिहावसं वाटलं. ह्या अनुषंगाने येणारे मुद्दे, उपमुद्दे ह्यांची सविस्तर चर्चा घरातील सगळ्यांबरोबर बरेचदा झालेय शिवाय समकालीन, समवयीन आणि समस्थितीतिल मित्रमंडळींमध्येही झालेय. प्रत्येकाने आपापल्या परिने "For here or to go?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलय, शोधायला घेतलय किंवा नंतर बघू म्हणून चक्क पुढे ढकल्लय. तर ह्या ब्लॊग मध्ये माझ्या मायबोलीवरच्या लेखातले मुद्दे उचलून ’अमेरिकेत थांबायचं कि भारतात परतायचं?’ ह्याचं उत्तर शोधताना एखाद्यास कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो आणि कशी तयारी करावी लागते ह्याबद्दल लिहीणार आहे. हे वाचणायास अमेरिकेतल्या आयुष्याची कल्पना नसेल तर थोडी माहिती मिळेल पण माझ्यासारख्याच X = X + 1 सिंड्रोम (ह्या बद्दल पुढे लिहीलय) मधल्या कुटुंबास मुद्देसूद विचार करण्यास चालना मिळेल.

हे लिहिताना माझी थोडक्यात पार्श्वभूमी अशी की मी सध्या अमेरिकेत आयटी मध्ये आहे, व्यावसायिक आयुष्याला भारतात सुरुवात केली मग दोन वर्षे भारतीय कंपनीतर्फे अमेरिकेत काम केले, पुन्हा भारतात जाऊन भारतीय़ कंपनीत वर्षभर काम केले. त्यानंतर पुन्हा अमेरिकेत येऊन गेले पाच वर्ष इथे काम करतोय. हे सगळं सांगायचा उद्देश असा की, भारतात तसेच अमेरिकेत (प्रॊग्रेमर लेव्हलपासून प्रॊजेक्ट मॆनेजर, आर्कीटेक्ट लेव्हलवर) काम करण्याची आणि करुन घेण्याची पद्धत, दोन्हीकडचे बदलते जीवनमान, राहाणीमान, सामाजिक प्रश्न अशा संक्रमणातून एकापेक्षा अधिक वेळा गेल्यामुळे काही गोष्टी खूप जवळून अनुभवल्यात. एक महत्त्वाचे म्हणजे माझे व्यावसायिक अनुभव अमेरिका आणि भारत ह्या दोन देशांपर्यंतच आणि सांसारिक अनुभव फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादीत आहेत. तसेच सुदैवाने भाषा हया महत्वाच्या माध्यमाचा मोठा प्रश्न (जो जपान, चायना मध्ये काम करणायांना अपरिहार्यपणे येतो) आपोआपच नाहीये.

मूळातून विचार करण्यासाठी ’जाओनी किंवा राहोनी पाहे’ या अनुषंगाने आधी मुद्दे माडतोय म्हणजे परतण्याचा विचार त्या त्या गटात वेगळा कसा हे लक्षात येईल. आपले प्रश्न त्याची उत्तर वैयक्तीक पातळीवर बदलतात पण मग जी कारण असतात निर्णय प्रक्रीयेमागे (परतण्याच्या किंवा न परतण्याच्या) ती कोणती ह्यांच्या अभ्यासाचा (analysis) जेव्हा विचार होतो तेव्हा ज्या मुद्द्यांवर एखादा निर्णय घेतला जाईल ते मुद्दे कोणते, प्रत्येक मुद्द्याचं (त्या व्यक्ती/कुटुंबसापेक्ष) महत्त्व काय [म्हणजे तो मुद्दा घडेल ह्याची शक्यता (probability) किती आणि त्याचा परिणाम (impact) किती] ह्या सगळ्यांचा आपल्या अनुभव आणि सदसदविवेकबुद्धीला अनुसरून एकत्रित विचार केला गेला पाहिजे. हे एकदा समजलं की मग उकल काढण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय बैठक मिळू शकते.

असो, तर अमेरिकेत येणारा प्रत्येक जण एकाच सारख्या मार्गाने येत नाही, शिवाय येणाया प्रत्येकाचे उद्दीष्ट ’अमेरीकन ड्रीम’ हेच असते, असेही नाही उलट बरेचदा ते बदलत असते मृगजळासारखे, तर ढोबळमानाने इथे भारतातून आलेल्यांपैकी काही महत्त्वाचे गट -
१. अमरिकेत एम एस किंवा एम बी ए किंवा पीएचडी करू म्हणून उच्च शिक्षणासाठी आलेले लोक
२. भारतात शिकून अमेरिकेत नोकरीसाठी म्हणजे पैसा कमवण्यासाठी आलेले लोक
२.अ. एल १ म्हणजे कंपनी ट्रान्सफर वर आलेले जे इथे नोकरी बदलू शकत नाहीत आणि कंपनीच्या इशायावर केव्हाही परत जावे लागू शकते
२.ब. एच १ म्हणजे जे इथे नोकरी बदलू शकतात आणि नोकरी सुटल्यास व दुसरी न मिळाल्यास काही एक दिवसात परत जावे लागण्याची शक्यता असते
३. भारतातून येनकेनप्रकारेण नातेसंबंधातून इथे ग्रीनकार्ड घेऊन आलेले लोक (उदा. बरेचसे पटेल आपण बघतो..)
४. अमेरिकेत असणाया वरील पहिल्या दोन प्रकारच्या भारतीयांबरोबर लग्न करून आलेले डीपेंन्ड्ट व्हिसावरचे लोक
५. इमिग्रेशनची अडथळा शर्यत पार करून आलेले लोक - जीसी किंवा सिटीझनशिप असलेले

आता ह्या गटांच्या ढोबळ आर्थिक स्थैर्य आणि साधारण अपेक्षांचा आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर (कौटुंबिक पातळीवर थोडं नंतर पाहू) परतीच्या शक्यतेवर होणाया परिणामाचा थोडक्यात विचार करु -

गट १.
ह्यातील बयाचशा लोकांनी इथे येऊन शिकण्यासाठी पदरमोड केलेय अगदी स्कॊलरशिपवर आला असाल तरी किमान दोन वर्षे वेळेची गुंतवणूक केलेय. शिवाय, स्टुडंट लाईफ मधे कॊलेज फुटबॊलपासून एक वेगळी अमेरिका अनुभवलेय, त्यांची अमेरिकेशी थोडी वेगळीच नाळ जुळलेय. शिवाय, वैयक्तीक पातळीवर व्यावसायिक आयुष्यात त्यांना अमेरिकेत शिकल्याने प्रचंड संधी आहे, मागणी आहे. त्यामुळे रीटर्न ऒन इन्व्हेस्ट्मेंट तसेच ऒनर ऒफ टेलेंट ह्या दोन्हीवर विचार करता अशी लोक अमेरिकेत पटकन स्थिरावू शकतात, बरेचदा ह्याच गटातला जोडीदार ते निवडतात. आर्थिक प्रॊब्लेम सुटलेले असतील तर परतण्याचे विचार मनात येऊ शकतात किंवा अमेरिकन ड्रीमच्या दिशेने वेगात वाटचाल तरी करू शकतात. अर्थात, इथे शिकूनही नोकरी मिळत नसेल, ओपीटी नंतर एच वन आणि एच वन नंतर जीसी होत नसेल तर शिक्षणावरचा खर्च, लग्नाचे वय ह्यातून बरीच ओढाताण होऊन परतीच्या शक्यता सक्तीच्या होऊ शकतात. अर्थात ह्या गटातील लोकही गट २ बच्या माध्यमातूनच इमिग्रेशन मधून जात असल्याने त्यांना बयाच सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

गट २.
ह्यातील २.अ. लोकांना अमेरिकेत कायम राहाणे तसे फार शक्य नसल्याने त्यांना कधी ना कधी परतायचेच आहे हे लक्षात ठेवावेच लागते.
२.ब. अमेरिकेतले मार्केट, तुमच्या व्यावसायिक निपुतणतेला इथे असलेली मागणी, तुमचा अनुभव आणि मुख्य म्हणजे इमिग्रेशनचे नियम ह्या सगळ्या कचाट्यात ही लोक व्यवस्थित भरडून निघत आहेत. लग्नाची समस्या होऊ नये किंवा नक्की काय करायचे हे ठरत नाही किंवा कंपनी तयार होत नाही अशा विविध कारणांनी जीसी लांबणीवर पडले की मग एक चक्र सुरु होते. वर्षानुवर्षे जीसीची वाट पहाणे आणि त्याअनुषंगाने येणारे निर्वासिताचे जीवन चालू होते. बद्लती प्रोजेक्ट्स, जीसी फाईल केलेल्या कंपनीकडून होणारी अडवणूक, ऒनसाईट ऒफशोअर मॊडेल असेल तर कामाचे विचित्र तास ह्याबाबींमुळे अस्थिर जीवनमान सुरु होते. प्रोजेक्ट एकाच ठिकाणी असेल ह्याची खात्री बहुधा नस्तेच शिवाय एच वन वर असल्याने घर घेऊन राहाणे ही मोठीच रीस्क बनते. ह्या मंदी मध्ये होत्याचे नव्हते झालेल्या फॆमिली आपण पाहिल्या असतीलच. शिवाय जीसी येईपर्यंत तांत्रिक दृष्ट्या तुम्ही वर्षानुवर्षे तुमचा कामाचा प्रोफाईल वाढवू शकत नाही त्यामुळे प्रसंगी व्यावसायिक हतबलताही येऊ शकते. समजा एखाद्याला वयाच्या पस्तीशी पर्यंत जरी जीसी मिळाले तरी त्यानंतर वीस वर्षांचे होमलोन, इतका वेळ नोकरी टिकवून ठेवणे आणि संसार उभा करणे म्हणजे मोठी जबाबदारी होऊ शकते. ह्याचा एकत्रित विचार करता ग्रीनकार्ड हा एक जुगार झाला आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे ग्रीनकार्ड मिळूनही सीटीझन शीप मिळेपर्यंत ह्यातून सुटका नाहीच.

गट ३.
ह्यांचा इथे येऊन राहाणे हा एकच उद्देश असल्याने परतीचा काही प्रश्न येत नाही.

गट ४.
हा एक महत्त्वाचा घटक आहे. ह्यात आपण बहुसंख्य शिकलेल्या मुली निव्वळ एच ४ वर नोकरी करणे शक्य नाही म्हणून घरी बसलेल्या बघतो. ह्यात त्यांचे करीअरचे वैयक्तिक नुकसान झाल्याची बोच असतेच पण जर अशा व्यक्तीने ड्राइव्हीग, सोशल नेटवर्कींग, इथे वेळेचा स्वत:साठी कसा सदुपयोग करता येईल ह्याचा विचार केला नसेल तर अमेरिकेचा कंटाळा येऊ शकतो आणि मग भारतात परत जाऊया असा दबाव त्यांच्याकडून येऊ शकतो किंवा उलटपक्षी इथले सांसारिक स्वातंत्र्य आवडायला लागून भारतात जायलाच नको असाही सूर आळवला जाऊ शकतो. थोडक्यात, परत जायचं का ह्या मुद्द्यावर ह्या गटाचा प्रभाव अपरिहार्यपणे असतोच.

गट ५
ह्या गटातली माणसं बहुतांश इथे पोहोचेपर्यंत आर्थिक दृष्ट्या यशस्वी, स्थिरावलेली असतात. इतके वर्ष जीसी/सिटिझनशीप साठी लढलॊ त्याचे फळं खाण्याचे दिवस असं मनात येतं असतं. कुटब सुद्धा बरच स्थिरावलेलं असतं. अशावेळी आई वडिलांसाठी इथली बसलेली घडी मोडायची असेल तर कुटुंबाला खूप विश्व्वासात घेणं गरजेच वाटतं. परत जाण्यासाठी ह्यांना थोडं जास्तच धैर्य दाखवावं लागतं., इतके वर्षात इथे चांगला जम बसला असेल तर ह्यावर्षी जाऊ पुढच्या वर्षी जाऊ म्हणत (क्ष + १ सिंड्रोम) इथेच राहातात लोकं असं बरेचदा दिसतं.

एक कुटुंब परततं म्हणजे त्यात साधारणपणे कमावणारी (एक वा क्वचित अधिक)व्यक्ति आणि अवलंबित व्यक्ती (जी इथे कमवू शकत नाही पण कमवण्याची पात्रता आहे किंवा जी शिकतेय किंवा शिकण्यायोग्य होतेय). आता परतणाया कुटुंबप्रमुखास तीन पिढ्यांचा विचार करायचाय, आधीची (म्हणजे आई वडील..), स्वत:ची म्हणजे स्वत: तसेच बायको कसा परतीचा बदल मानवू शकेल आणि पुढची पिढी म्हणजे मुलं. हल्ली बयाच वेळा ’मागच्या पिढीसाठी परत जायचं’ ह्याला सरसकट टाळ्या वाजवल्या जातात, पण ते एका चौकटीतच खरं आहे. म्हणजे वृद्ध आई वडिलांसाठी परत जात असाल पण मुलांचे नुकसान होतेय तिथे गेल्याने किंवा अमेरिकेतल्या शिक्षणाची त्यांची संधी हुकली अशी बोच असेल तर मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचे नुकसान केले असं म्हणायला वाव आहे. ह्याउलट पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी इथे थांबलं तर मागच्या पिढीवर अन्याय होण्याची शक्यताही आहेच. सगळ्यांना पटेल असं ह्याचं उत्तर काढण म्हणूनच शक्य नाही हा असा वैयक्तीक प्रश्न आहे की जिथे तुम्हाला काय हवय आणि काय नकोय हे नीट माहिती असायला हवं आणि जो निर्ण्य घेऊ तो ठामपणे तडीस नेऊन जीवनाची अपरिहार्यता समंजसपणे स्वीकारता यायला हवी.

-- ’मी इथे का आलो?’ ह्याचं उत्तर अमेरिकेत जगायला, अमेरिकन ड्रीम पूर्ण करायला असं असेल तर तुमची दिशा अमेरिकेत राहाण्याकडे झुकतेय त्यामुळे गणिताची उकल सोप्पि हॊइल. जर फक्त पैसे कमवायला, जगाच्या दुसया टोकावर काय चाल्लय पहायला हे उत्तर असेल तर अजूनही परतीची धुकधुकी व्यवस्थित आहे. तुमची आर्थिक उद्दीष्ट जेवढी सुस्पष्ट असतिल तेवढं परतीच गणित सोप्प होईल.
-- इथल्या इमिग्रेशन सिस्टीमच्या कचाट्यात २ब गटामधील बहुसंख्य लोकं मोडतात. जीसी फाईल करण्याचा उपयोग फार तर एच वन सहा वर्षांपलिकडे वाढवायला होईल पण जीसी मिळायला (इबी२ किंवा इबी३ असेल) तरी अंदाजे दहा एक वर्षे लागतील. एवढे वर्ष निर्वासितासारखे (आपण आणि कुटुम्बियांनी) आयुष्य जगायचे का हे ज्याचे त्याने ठरवायचे. स्थैर्य हे तुमचे प्रमुख उद्दीष्ट असेल तर अशा स्थितीत नोकरीत, घर खरेदी, मुलांच्या शाळा, त्यांचा कौटुंबिक सहवास ह्या सगळ्या प्रकारांत स्थैर्य मिळणे दुरापास्त आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे इमिग्रेशन लॊज. ह्या गटातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय नाही (तसं अपेक्षित आहे असं नाही, पण नाहीये हे महत्त्वाचं) कारण ग्रीन कार्ड -सिटीझन आणि एच वन ह्यांना कामाचे स्वरुप, मर्यादा, संध्या ह्यात फरक आहे.
-- जोडीदार जर नोकरी करु शकत नसेल (उदा. एच ४ किंवा मुलांना द्यावा लागणारा पूर्ण वेळ किंवा नोकरीची संधी नसणे) आणि महत्वाकांक्षी असेल तर इथे घालवलेला प्रत्येक दिवस त्याच्या व्यावसायिक आयुष्यास त्रासदायक ठरु शकतो आणि कुटुंब अस्थिर करु शकतो.
-- इथली प्राथमिक शिक्षणसंस्था एका मर्यादेपर्यंतच चांगली आहे असे वाटते. म्हणजे लॆब, हुशारीप्रमाणे शिक्षण, व्यावसायानुषंगिक शिक्षण हे सगळ छान आहेच पण इथल्या शालेय वातावरणात मुल वाढवायला तुमच्या मनाची तयारी असायला हवी. तसच तुम्ही जितक्या लवकर अमेरिकन कल्चर आत्मसात कराल तितकं मुलांना सोप्प जाईल. तिथे शिकले तर आपल्यातले पुष्कळ जण आले तसे उच्चशिक्षणासाठी मूल इथे येऊही शकेल मोठे झाल्यावर. भारताल्या प्राथमिक शिक्षणपद्धतीत मुलांवर बोजा खूप आहे, मान्य पण आता तिथेही शाळा अभ्यासक्रमांत हा मुद्दा विचारात घेत आहेत आणि घरी स्पर्धेतून मुलाचा कोंडमारा होत नाही ना ही काळजी आपण घेतली तर बराच फायदा होऊ शकतो.
-- इथे ठरलेले सणवार (बयाचदा) सोयीस्कर विकेंडला करायचे, दोन वर्षातून एकदा भारतात तीन आठवडे जाऊन ’जी ले तेरी जिंदगी’ करायचं आणि त्यावर समाधान मानायचं हे तात्पुरतं जमेल पण कायमस्वरूपी जमेल का ह्याचा नक्की विचार करायला हवा. अमेरिकेत म्हातारपण घालवायची तयारी आहे का ह्याचाही विचार करायला हवा.
--एक पालक म्हणून, मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण व्हावी असं मनापासून तुम्हाला किती वाटतं आणि ते किती गरजेचं वाटतं? वाटत असेल तर इथे राहून ते अजिबात सोप्प नाही. तुम्हाला वाटेल ते पुण्यातही शक्य नाही पण ते पटत नाही. अजूनतरी पुण्यामुंबईत मराठी मेलेली नाही उलट ’राज’कीय कारणांमुळे तिला पुन्हा बळ येतय. नुसती भाषा नाही तर मराठी संस्कृतीशी पुढच्या पिढीची (ती त्याच्या पुढच्या पिढीत्त तशीच जुळलेली राहावी असा हट्ट नाही) नाळ जुळावी असं वाटत असेल तर नीट विचार होणं आवश्यक आहे. उदा. ’पु.लं. चा नारायण’ मी मुलाला समजावू शकलो पाहिजे, ’चाफ्याच्या फुला’ त्याच्याबरोबर बसून समरसून ऐकू शकलो पाहिजे साहित्याची, वाद्मयाची गोडी त्याला लावता आली पाहिजे अशी इच्छा असेल तर ते इथून वर्षाकाठी काही पुस्तक मागवून पूर्ण होण कठीण वाटतं. शिवाय, ते तिथे (हो बदलत असले तरीही) वातावरणामुळे आपोआप घडून येईल इथे राहिलो तर मात्र नाही म्हटलं तरी मुलांवर मराठी लादावं लागेल आणि जे मराठी भाषेचं आहे तेच अभिजात हिदुस्थानी संगीताच. तिथे सवाई गंधर्व, वसंतोत्सवासारखे उत्सव आणि जर त्याला आवड असेल तर दिग्गज संगीत तन्द्न्य गुरुस्थानी मिळू शकतील, इथून ती आवडं निर्माण करणं थोडं आडवळणाच हॊईल असं वाटतं. अर्थात उदा. इथे राहून व्हायोलिन शिकता येईल तिथे जाऊन हिंदुस्थानी संगीत मुलाने शिकायलाच हवे असे नाही असे एखाद्यास वाटत असेल तर ते वावगे नाही. पालकत्व हा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. हा फक्त मराठीचा मुद्दा झाला पण जर पुढे संस्कृत, उर्दू शेरो शायरी असं काही वेगळं शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते भारतातच जास्त सोप्प आहे.

’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’, प्रत्येकाला इथे राहा किंवा तिथे राहा समस्या आहेत. आपण जगतोय म्हणजेच चांगले वाईट असे भोग भोगतोय. त्यामुळे आपल्याला येणाया समस्यांवर आणि त्यांच्या निवारण्यावर आपलं किती नियंत्रण आहे हे महत्त्वाचं. भारतात तुमच्याकडे पैसा असेल तर बयाच प्रश्नांवर चांगले नियंत्रण येऊ शकते असे म्हणतात.

कौटुंबिक पातळीवर -
इथे जोडपं काम करत असेल तर विकेंड घरकामात, पुढच्या आठवड्याच्या पूर्वतयारीत जातात, रोज सकाळ संध्याकाळ ताजं जेवण मिळतच असं नाही, मुलांना डेकेअर मध्ये ठेवणं अपरिहार्य असतं. ह्याउलट भारतात मनुष्यबळाचा अभाव नाही. तुमचं आर्थिक नियोजन नीट असेल आणि विश्व्वासू माणसं तुम्ही निवडू आणि टिकवू शकलात तर बरीच काम आऊटसोर्स करता येऊ शकतात. शिवाय, आइ वडिलांचा तसेच शेजार्यापासून इतर नातेवाईकांचा आधार मिळवू शकता, धोबी, इस्त्री, पोळ्याला बाई, स्वयंपाकाला बाई, केरवारं करायला बाई अशा अनेक पातळ्यांवर आपण आपली काम करवून घेऊ शकता आणि वेळ वाचवू शकता. नातेवाईकांबरोबर येणार्या लग्न मुंजी बारशी डोहाळेजेवणं अशा कार्यांना पैठण्या नेसून दागिने घालून मिरवणे अशा मजांबरोबरच कुत्सितपणा, भोचकपणा, चोमडेपणा अशा अवगुंणांचाही आपल्याला सामना करावा लागतो पण ते कसं परतून लावायचं की त्याचा ताण घ्यायचा हे पूर्णत: तुमच्यावर आहे. एकूणात दहीहंडी, संक्रांत, गणपती, दिवाळी, पाडवा आणि प्रत्येक सणच जोरदार उत्साहात साजया होणाया ठिकाणी (उदा. गिरगाव, दादर, ठाणे) तुमचं आयुष्य गेलं असेल तर एका उत्सवी जीवनाच आकर्षण आपल्याला असतं, अमेरिकेतलं जीवनमान त्यामुळेच कित्येकदा तेच ते आणि चाकोरीबद्ध वाटू शकतं.
भारतात परतल्यावर तुमचे तसेच जोडीदाराचे आई वडील जवळ असतील, त्यांनाही बरं वाटेल, सहवासाचं प्रेम वाढेल, त्यांच्या तब्येतीची इथे राहुन जी काळजी असेल तर ती उरणार नाही. त्यांनाही मुला-नातवाबरोबर जीव रमवता येईल, नातवालाही डेकेअरची गरज भासणार नाही असं सगळं जूळून आलं तर तुमचं काम सोप्पच होईल खूप.
तिथले गड किल्ले, धार्मिक स्थळे किंवा डोंगर दया, गावं, शेतं तुम्हाला खुणावत असतील तर भारतात असाल तर निदान काही महिन्यातून रजा टाकून ह्यातलं थोडं थोडं तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. प्राजक्त, रातराणी, सोनटक्का, चाफा, मोगरा, बकुळी अशा नानाविध फूलांचे सुगंध तुम्हाला नॊस्टेल्जिक करत असतील किंवा देवगड हापूस तुम्हाला इथे अमेरिकेत कोरडे उसासे टाकायला लावत असेल तर भारतात हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना भरभरून आहे हे लक्षात असलं पाहिजे.

व्यावसायिक पातळीवर-
भारताच्या विकासाचा वेग अमेरिकेच्या विकासाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे. मान्य आहे भारतात भ्रष्टाचार आहे पण त्यामुळे अब्दुल कलाम आणि नारायण मुर्थी घडायचे थांबत नाहीत. भ्रष्टाचारामुळे, राजकारण्यांमुळे वेग कमी होत असेल पण जागतिक रेट्यामुळे, माहितीच्या स्त्रोतांमुळे बरेच फायदे होत आहेत. कोणी सांगावे. अशाच वेगात धावत राहिला तर भारत येत्या पंचवीस वर्षात अमेरिकेच्या आसपास येईलही, हे स्वप्नरंजन मुळीच नाही. शिवाय, भारत विकसनशील असल्याने आणि आपल्यासारख्यांनी विकसित देश म्हणजे काय हे अनुभवले असल्याने भारतात लघु उद्योगाच्या (विशेषत: आय टी क्षेत्रात) प्र चं ड संधी आहेत. एस एस एन सारखी सिस्टीम भारतातही येतेय. आर्थिक क्षेत्रातही सेबीने बरीच शिस्त आणलेय, आयसीआयसीआय डीरेक्ट सारखी पोर्टल्स व्यवस्थित काम करताहेत. लोकसंख्येचा बोजा भारतावर आहे हे मान्य पण हीच लोकसंख्या शिकतेय, ह्यात सुशिक्षित तरुणांचे प्रमाण वाढतेय आणि त्यांना संधी उत्पन्न करुन दिली तर खूप काही करता येईल (जे टाटा, अंबानीने केलं..). त्यामुळे परत गेल्यावर काय असा प्रश्न तूर्त तरी पडत नाही, थोडक्यात इथल्या अनुभवाला भारत बयापैकी न्याय देऊ शकेल असा विश्वास वाढतोय.
कामाच्या बाबतीत अमेरिकेतल्या लोकांना जरा जास्त सहानुभूती मिळतेय असं वाटतं. एन जे (जर्सी सिटी नव्हे) मधे राहून न्यू यॊर्कला अपडाऊन करणारे मित्र सकाळी सहाला जाणार ते रात्री आठ्ला घरी, अगदी कडाक्याच्या थंडीतही. याउलट पुण्यात बाईक वरुन मी १५ मिनिटात ऒफीसला जायचो. मला एवढच म्हणायचं की तुम्ही योग्य ठिकाणी असाल आणि तुमचा व्यावसायिक अनुभव पाठीशी असेल तर घराच्या जवळ किंवा वर्क फ्रॊम होम असा जॊब तुम्ही कुठेही मिळवू शकता नाहीतर कार पुलिंग सारखा उपाय आहेच. इथे अमेरिकेत आयबीएम मधे काम करताना आठवड्यातून चार दिवस क्लायंट कडे आणि एक दिवस घरुन काम अशी कन्स्ल्टींग जॊब मधे जबाबदारी पेलणारे पाहिलेत, त्यांच्या घरच्यांना खरच सलाम.

सामाजिक पातळीवर-
भारतातलं जीवनमान नक्की सुधारतय. प्रत्येक भारतवारीत ते प्रकर्षाने जाणवतय. आज इंटरेनेटवरुन पुण्याच्या जागेचं विजेचं बील मी भरू शकतोय. रस्ते, वाहतूक ह्या समस्या आहेत मान्य पण त्यांना कसं टाळायच हे तुमच्यावर आहे. मुंबईतल्या गर्दीला घाबरून तुम्ही मुंबईत गेलाच नाहीत तर तुम्हाला मुंबईची नशा कशी कळणार.. आणि गर्दी शिवाय मुंबई हा तुमचा हट्ट असेल तर ते शक्य नाही हे स्वीकारता यायला हवंच, कुरबूर करुन काहीच साध्य होणार नाही. एकंदर भारतातही सुविधा येत आहेत. वीज, पाणी अशा समस्या जरूर आहेत, लोकसंख्येचा बोजा आहे पण भारताने शिक्षणाबरोबर दिलेल्या इतर अनेक चांगल्या गोष्टीबरोबर ही कडू गोळीही गिळायला हवी ना. तिथेही माणसं राहात आहेत आपण नक्की ऎडजस्ट करू असा विश्वास आहे.

मग करायचं काय?
एक मात्र नक्की, भारतात जाणार असाल तर व्यवस्थित आर्थिक नियोजन करुनच (त्यात बॆंक बॆलन्स बरोबर योग्यवेळी घर घेणे आलेच) जायला हव असं मनापासून वाटतं. दुसरं म्हणजे तुम्ही योग्यवेळी निर्ण्य घेतला नाहीत किंवा तो लांबवणीवर टाकत राहिलात तर तुम्ही वेळेचा अपव्यय करण्याची शक्यता बळावते. जेथे तुम्हाला आयुष्यातील जास्त काळ राहायचे तिथे कौटुबिक जीवनास लवकर सुरुवात करणे (होमलोन, स्कूलिंग वगैरे च्या दृष्टीने) कधीही सयुक्तिक आहे. म्हणूनच मुलांना थोडे इथले आणि थोडे तिथले असे प्राथमिक शिक्शण द्यायला लागणार नाही ह्याचा जरूर विचार करायला हवा. अशावेळी मुलांना मित्रमैत्रिणी जोडणे, सोशल एक्सेप्टन्स ह्या पातळ्यांवर ताण सहन करायला लागण्याची शक्यता आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व ज्या काळात घडते त्याकाळात अस्थैर्यामुळे किंवा बदलांमुळे त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्ण अमिरेकेतले की पूर्ण भारतातले शिक्षण द्यायचे हा निर्णय मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत घेता आला तर केव्हाही उत्तमच अर्थात तुमचा ’पॊईंट ऒफ नो रीटर्न’ तुम्ही ठरवायचा.

परतीची वा न परतीची एका पेक्षा अधिक कारणं असू शकतात, ती किती सबळ आहेत हे ठरवता येण्यासाठी अशा चर्चेचा अंशत: तरी उपयोग होऊ शकेल असं वाटतं. तशी ती पुरेशी सबळ असतील तर घेतलेला निर्णय हा जाणीवपूर्वक असल्याने कुठलीही (इथे राहिलात तर इथे किंवा तिथे गेलात तर तिथे) एडजेस्टमेंट होऊ शकतेच. तर आपल्यापुरतं ती कारणं शोधणं आणि त्यांची सबळता ठरवणं महत्त्वाचं.

शुभं भवतु!