Sunday, December 12, 2010

दाम करी काम येड्या दाम करी काम..

सध्या ऒफिसात बराच व्यग्र असलो तरी एकीकडे वाचन चाल्लय याचं समाधान आहे. एक महत्त्वाचं म्हणजे पूर्वी सारखं एखादं पुस्तक घ्यायचं आणि मग ते डोक्यात घोळवत चवीचवीने वाचायचं किंवा एकदम तुटून पडून संपवायचं असं हल्ली होतं नाही. नेट वरच्या मुबलक लिखाणाच्या वाचनाची आता इतकी सवय आणि चटक लागलेय की निरनिराळे ब्लॊग्स, मराठी संस्थळे, दिवाळी अंक, रोजची वर्तमानपत्रे असं बरच काही डोळ्या खालून जातच. तसंच हे वाचलस का? इथे काय आहे ते पाहिलस का? अशी इ-मेल्स येऊन पडलेली असतातच. त्यामुळेच बरेच विचार घोळतायत सद्ध्या, खूप विषयही आहेत हातावेगळे करण्यासाठी जसं जमेल तसं लिहीनच.

दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांनी निवडणूक एक हाती जिंकली, ती सुद्धा अशी की लालूसह कॊंग्रेसचा सुकडा साफ. बिहारी जनतेचे अभिनंदन करायलाच हवे. भारतात लोकशाहीची मूळे घट्ट असल्याचे पुन्हा एकदा जाणवले हेच खरे. गुजराथ पाठोपाठ आता बिहारनेही जनतेला लागलेली विकासाची ओढ दाखवून दिलेय. ह्याचे दूरगामी परिणाम केंद्रातील राजकारणावर न झाले तरच नवल. जे आमचा विकास करत नाहीत त्यांना आम्ही हकलवणारच हे समीकरण जर लोक दाखवून देत असतील तर निदान जनभयास्तव इतर राज्यसरकारांना आणि केंद्र सरकारला विकास करुन दाखवावा लागणारच. अर्थात नितिशकुमार सरकारवर बिहारला पुढे न्यायची जबाबदारीही आहेच पण तूर्त तरी बिहारच्या विकासासाठी त्यांची अत्तापर्यंतची वाटचाल स्पृहणीयच आहे.

जगाच्या दुसया टोकावरुन ह्या सगळ्याकडे बघताना भारतात एकाच वेळी परस्परविरोधी राजकीय, सामाजिक बदल घडताना दिसतायत. उदाहरणच द्यायची झाली तर, बिहार आणि गुजराथ विकासाच्या रथावर घौडदौड करत असताना, तिथे दक्षिणेत आंध्र आणि कर्नाटकात तसेच आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या नाटकांचे दोन-तीन अंक झाले, राजकारणाला ऊत आला अगदी. एकीकडे भारताची वेगात होत असलेली आर्थिक प्रगती, शिक्षणाचा वाढलेला स्तर, वाढता शेअरबाजार आणि बाहेरच्या जगातून येणारा पैशांचा ओघ, ’तुम्ही ग्रेट आहात’ हे येऊन सांगणारा ओबामा, कॊमनवेल्थ मध्ये कमावलेली पदकं, भारतीय क्रीकेट संघाने मिळवलेले सलग विजय ह्यामुळे भारतीय म्हणून अभिमान वाटत असतानाच एकामागोमाग बाहेर पडणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे (राष्ट्रकूल स्पर्धेतला भ्रष्टाचार, ’आदर्श’ चा भ्रष्टाचार, २ जीस्पेक्ट्रम चा भ्रष्टाचार, कॊंग्रेसच्या महाअधिवेशनात झालेला भ्रष्टाचार, पेण अर्बन बॆंकेचा भ्रष्टाचार इ. इ.) राज्यस्तरीय आणि केद्रस्तरीय पातळीवर वर्षभर चालूच राहीली. म्हणजे करदात्यांचा पैसा ह्या लबाड आणि लुच्च्या, भ्रष्ट राजकाराण्यांनी खाऊन लोकांना हातोहात फसवलेय. जोपर्यंत एखाद्या भष्ट व्यक्तिला (आणि त्याच्या लाभार्थींनाही) तातडीने शिक्षा (प्रसंगी फाशीही) होत नाही, तोपर्यंत भष्टाचार करू पाहाणारे हात आणि मने तयार होत राहाणारच. शैक्षणिक संस्थांमध्ये निती मुल्ये शिकवण्याचे आणि त्यांची जपणूक करण्याचे महत्त्व ठसवण्याचे दिवस आता गेलेत असं निराश होऊन म्हणावसं वाटतं. भष्ट वागण्याविरोधातला शैक्षणिक आणि सामाजिक धाक कमी होत चाल्लाय, जिथे शैक्षणिक संस्थाच डोनेशनचा हट्ट करतात आणि भरमसाट फीया वसूल करतात तिथे त्या मुलांवर त्याविरोधात कसे संस्कार करतील हा प्रश्नच आहे. २०१० हे वर्ष भारतासाठी घोटाळ्यांचे वर्षच ठरावे इतके काळे धंदे एकामागोमाग उजेडात येत आहेत. अति झाले अन हसू आले, अशातला प्रकार होत असून आणि सगळेच राजकीय पक्ष ह्या भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने (आठवा साधनशुचितेच्या गप्पा मारणार्या भाजपाच्या अध्यक्षांनी पैसे घेतल्याची दिलेली कबुली) कुणालाही नैतिक पाया नाही भष्टाचाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी उभे राहाण्याचा, आणि अधिक दुर्देवाची गोष्ट म्हणजे ’हे असंच होणार.. आपण काही करु शकत नाही’ ह्या अगतिकतेपायी, वैषम्यापायी जनता अधिकाधिक उदासीन होत चाल्लेय, ह्या दाहकतेची संवेदनशीलता गमावत चाल्लेय. एकीकडे आपण म्हणतो ’यथा राजा तथा प्रजा’ तर दुसरीकडे ’People deserves the Governance’ म्हणजे लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते असेही परस्परविरोधी बुद्धीभेद करतो. होते काय की एक्मेकांवर ढकलण्यापलिकडे ह्यातून मार्ग निघत नाहीत.

हे असे विचारांचे कल्लोळ चालू असतानाच उदास वाटू लागते, आपला युद्धभूमितला अर्जुन झाल्यासारखं वाटतं आणि मग थोडं खोलात शिरल्यावर, म्हणजे, जे काही भष्टाचार उघड झालेत ह्यावर्षी ते सगळे ह्याच एका वर्षातले आहेत की वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत, मग काय वेगळं घडलं ह्यावेळी.. अशा मार्गाने विचार केला तर मग जाणवतं.. किती तरी समाजसेवकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत, ह्यातले बरेच घोटाळे बाहेर काढलेत. माहितीच्या अधिकाराबाबतची सजगता जसजशी वाढेल आणि त्याचा धाक जसजसा निर्माण होईल तसतशी भष्टाचाराची वृत्ती कमी होईल अशी आशा करायला जागा नक्कीच आहे. शिवाय, युयुआयडी (म्हणजे प्रत्येक माणसास एक क्रमांक, अमेरिकेत एसे.एस.एन. आहे तसा..) योजना जसजशी मार्गी लागेल तस तसा समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत मोजदाद (अकांऊंटिबिलिटी) वाढेल, भष्टाचारास मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.

भारतातील पिढी आता विकासाच्या वेगाला सरावतेय. महाराष्ट्र जर २०१२ पर्यंत वीजेच्या बाबतित स्वयंपूर्ण झाला तर बराच फरक पडेल. रोटी, कपडा, मकान और बॆंडविड्थ ह्यातल्या शेवटच्या उद्देशाला आपल्याला लवकरात लवकर हात घालायला हवा, टेलिकॊमचे जाळे जितक्या लवकर आणि स्वस्त पसरेल तितकी महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या कायमस्वरुपी विकासासाठी ती लाभदायी ठरेल. आमेन! त्याचबरोबर, लवासा सारखे जागतिक पातळीवर दखल घेतलेले प्रोजेक्ट्स आणि जैतापूरचा अणूउर्जा प्रकल्प हे औद्योगिक दृष्टया स्पृहणिय वाटत असले तरी सामाजिक विषमता आणि स्थैर्य अबाधित राहील हे पहाण्यातच सरकारची परीक्षा आहे. आपल्याला ’इंडिया आणि भारत’ तसेच ’भारत आणि हिंदुस्थान’ ह्यांमधले धुमशान परवडणारे नाही त्यामुळे स्थानिक, प्रादेशिक आणि प्रांतिक अस्मिता जपत जग जिंकायचं हे लक्षात ठेवायला हवं.

नुकताच काही म्युच्युअल फंड्स पाहात असताना,
http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=15774 हा लेख वाचनात आला. सद्ध्या, अमेरिकेने नोटा छापायला घेतल्याने डॊलरचं अवमूल्यन झालय. अर्थात हा प्रश्न माझ्या सारख्या अनिवासी भारतियांना अर्थकारणासाठी जिव्हाळ्याचा असल्याने जागतिक अर्थकारण आणि घडामोडींवर लक्ष असतेच. असो, तर प्रस्तुत लेखांत, चीनने जर त्यांच्या मालाला अंतर्गत बाजारपेठ निर्माण केली नाही (internal consumption वाढवले नाही) तर तो स्वत:सकट सगळ्या जगावर आर्थिक संकट ओढवू शकतो. तसेच भारताचा विकासाचा दर हा चीनच्या तुलनेत थोडा मागे असला तरी भारतातला विकास हा भांडवलशाही रुजत असल्याचे आणि पर्यायाने कायमस्वरुपी तसेच स्वयंपूर्ण विकास असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे भारतात लोकशाही असल्याने दाखवलेले आकडे हे चीनच्या आकड्यांपेक्षा विश्वासार्हच आहेत. सांगायचा मुद्दा काय, तर चीनची भीती बाळगायचं कारण नाही, इतके कोट्यावधी रुपयांचे भष्टाचार उघडकीला येऊनही जागतिक बाजार भारतात पैसे गुंतवतोय म्हणजे आज जग भारताकडे विश्वासाने, आशेने बघतय, आपण तो विश्व्वास सार्थ ठरवायलाच हवा. चीनमध्ये मानवी मूल्यांची होणारी पायमल्ली, सरकार करत असलेली सामाजिक दडपशाही, मिडीयाला नसलेले स्वातंत्र्य, इटरेनेटवर प्रतिबंध ह्यामुळे समाजवादापुढे अपारदर्शकतेचे, स्वातंत्र्याच्या गळचेपीचे प्रश्नचिन्ह. रशिया आणि इतर ठिकाणी झालेला साम्यवादाचा पाडाव. इथे अमेरिकेत अनिर्बंध भांड्वलशाही आणि Too big to fall म्हणत नंगानाच करणाया बड्या कंपन्यांनी सरकारला वाकवूवन जनतेचे पैसे TARP (Troubled Assets Relief Program) द्वारा हडप करुन वर त्यातून बोनसही घेतल्याचे आपण पाहिले, भारतात लायसन्स राज, लाल फितीचे राजकारण संपून कॊर्पोरेट स्पर्धेतून विकास सामान्य माणसापर्यंत पोहोचतोय पण ह्या भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय आणि किती खोल लागलेय वाळवी कळत नाहीये, मग काय योग्य या जगात हेच कळेनासं झालय ह्या क्षणाला, पुन्हा एकदा युद्धभूमीवरचा अर्जुन!

मिसळपावर सुधीर काळे यांनी http://www.misalpav.com/node/15799 येथे एका पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केलेय, "भारतीय - कसा मी? असा मी". वाचायला हवंच हवं असं हे पुस्तक, मूळ लेखक आहेत श्री. पवनकुमार वर्मा (भारताचे सद्ध्याचे भूतान येथील राजदूत). आजच्या घडीच्या भारताच्या प्रगतीचा वेग, भारताची जगाला असेलेली ओळख ह्याचा यथार्थ आणि अभ्यासपूर्ण उहापोह या पुस्तकात केलेला आहे असं कळतं.

एकूणच, समाजवाद की भांडवलशाही हे द्वंद्व डोक्यात सुरु झालं की लहानपणी चाळीत वासुदेव गिरक्या घेत गायचा त्याचं हटकून आठवणारं गाणं.. बाबूजींनी गायलेलं माझं अतिशय आवडतं.. लोकसंगीताचा उत्तम नमुनादेखील..

वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


पैशाची जादू लयी न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागून धाव
जल्मापासनं साधी मानसं ह्या पैशाची गुलाम रे..
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

कुनी जुगार सट्टेबाज, कुनी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुनी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखूर सुटला फेकला त्याने लगाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

या कवडी दमडी पायी कुनी राखूस ठेवी जीव
कुनी डाका दरोडा घाली कुनी जाळून टाकी गाव
बगलं मंधी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळाला फास
ठरल्यालं लगिन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं श्रीमंतिनं हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

वाड्यात पंगती बसल्या लयी अग्रव जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आगं
संसाराचं ओझं घेउन कुनी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नाचते नारीची अब्रू छन छुम्मक तालावरती
पैशानं बायको खूस पैशानं बोलते पीरती
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम..
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

आपले भ्रष्टाचारी तर हेच म्हणत नसावेत, दाम करी काम? :(

No comments: