Sunday, November 29, 2009

कोण मेले? कुणासाठी? रक्त ओकून..

२६ नोव्हेंबर च्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला एक वर्ष झालं. अशा प्रसंगी हुतात्म्यांची आठवण काढायची आणि भरत आलेल्या जखमांवरच्या खपल्याही काढायच्या. होय! असं मुद्दाम म्हणतोय कारण एकूणच प्रशासन मुर्दाड झालय़ आणि लोकांचं आयुष्य इतकं वेगवान झालय की काळाचं औषध बेमालूम वठतं आणि लोक विसरतात, पचवतात आघात.

एका वर्षापूर्वी ह्याच ब्लॊगवर लिहीलेल्या उतायाची ही लिंक.. सरणार कधी रण..प्रभोsssssssss.

काय झालं एका वर्षात --
१. पाकिस्तानने अतिरेकी हे पाकिस्तानी आहेत हे आधी जाहीर नाकबूल केलं पण काही दिवसांनी ते तेथलेच आहेत हे कबूलही केलं. तोयबाच्या नेत्यांना अटक करण्याची नाटकं केली आणि मग सोडूनही दिलं. भारतीय राजकारणी आणि प्रशासन, अमेरिका आणि जगाला पुरावे देऊन आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन हातावर हात ठेवून गप्प राहिलं.
२. करकरेंचं बुलेटप्रूफ जॆकेट हरवलं म्हणून देशाच्या ग्रृहमंत्र्यांनी वीरपत्निची जाहीर माफी मागितली. ते जॆकेट निकृष्ट दर्जाचं होतं म्हणे! :(
३. कसाबचा खटला कोर्टात उभा करून त्याच्या सुरक्षेवर अत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्चे करावे लागलेत, आणि एकीकडे आपदग्रस्तांना पूर्ण मदत मिळू शकली नाही सरकारकडून. त्याचा खटला अजून किती दिवस चालेल प्रश्नचिन्हच आहे आणि एवढं करुन दयेचा अर्ज राष्ट्रपतींना करुन तो अफझल गुरू सारखी फाशी रद्द करवून घेतो की काय बघायचे, सगळाच पोरखेळ.
४. महाराष्ट्र पोलिसदलातले वाद चव्हाट्यावर आलेत आणि गफूर, रॊय, मारीया आणि वरिष्ठ पोलिस अधिकायांतली वादावादी जनतेपुढे उघड झाली. २६ नोव्हेंबरला दुसरा कसा बेजबाबदार वागला हे सांगण्याची सगळ्य़ांतच अहमहमिका लागलेय.
5. राम प्रधान समितीचा अहवाल नेमके काय सांगतो कळू शकेल काय? त्यात मांडलेल्या त्रुटी काय आहेत आणि त्या कश्या दुरूस्त केल्या गेल्या ह्याचे नि:पक्षपाती उत्तर मिळेल काय?
६. अतिरेक्यांचे मृतदेह रासायनिक प्रक्रीयेने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानने ते घेण्यास इन्कार केलाय आणि भारत सरकारही त्यांची विल्हेवाट लावण्यास उत्सुक दिसत नाही.
७. भारताच्या सागरी सीमा खरचं सुरक्षित आहेत काय याचे अजूनही ’होय’ असे ठाम उत्तर देता येत नाही. समुद्रमार्गे पूर्वी आलेले आरडीएक्स. अत्ता आलेले अतिरेकी आणि त्यानंतरही गस्त नौकांमधल्या त्रूटी, समन्वयाचा अभाव हीच त्याची मुख्य कारणे.
८. महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी कमांडॊंचे एक खास पथक तयार केले आहे, ही एक खरोखरच चांगली बाब. तसेच सरकारने काही अद्ययावत शस्त्रे खरेदी करुन पोलिस खाते अधिक शस्त्र सज्ज केले आहे.

पुढे काय? काही प्रश्न..
१. आजही माझ्यासारख्या एखाद्या सामान्य नागरीकास आपत्कालीन परिस्थितीत कसे तोंड द्यायचे, काय करायचे आणि काय करायचे नाही ह्याचे प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे का? असे उपक्रम राबवून सुजाण नागरिकांची फळी निर्माण करता येणे का शक्य नाही? सरकार नाही तर निदान एखादी सेवाभावी संस्था यात लक्ष घालु शकेल का?
२. मिडीया ही आज एक अतिशय संवेदनशील बाब झाली आहे आणि वेगवान माहिती स्त्रोतांमुळे ती अधिक जबाबदार असणे आवश्यक आहे. हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ८०% मोबाईल्स मधे दृक-श्राव्य रेकॊर्डींगची सुविधा असतेच. शिवाय एसेमेस मुळे बातम्या (खया किंवा खोट्या) भराभर पसरतात. एकूणच ह्या मोबाईल नेटवर्क्सवर ल्क्ष ठेवणे, अतिरेक्यांनी मोबाईल वापरले तसे कोणाला वापरता येऊ नयेत ह्याची अंमलबजावणी करणे आवश्यक नाही का? सरकारने ह्यासाठी काय पाऊले उचलली आहेत ते कळायलाच हवे.
३. वरच्याच मुद्द्याला अनुसरून पीत पत्रकारीते पासून लांब राहून आपला टी.आर.पी वाढावा म्हणून कुठल्याही थराला न जाता, लोकांच्या संवेदनशील भावनांना भडकवण्याचे साधन होऊ न देण्याची जबाबदारी हे सत्राशे साठ चॆनेल्स घेतील का? ते स्वत:च अशी एखादी आचारसंहीता तयार करतील का किंवा तसा त्यांच्यावर दबाव आणता येईल का?
४. दुर्दैवी रीत्या अशा किंवा दुसया कुठलाही प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडून झालाच तर भारत सरकारची भूमिका काय असेल? ते असेच गप्प राहाणार का? शिवाय, मुंबईतल्या जनतेच्या सुरक्षितेविषयी महाराष्ट्र सरकारची, भारत सरकारची नेमकी जबाबदारी विषद होईल काय, जेणे करुन एकमेकांकडे बोटे दाखवली जाणार नाहीत.
५. आपली गुप्तहेर यंत्रणा ह्या हल्ल्याची आधीच माहिती काढण्यात अपयशी ठरली, असे का झाले आणि ही जबाबदारी कोणाची हे कळू शकेल का, आणि पुन्हा असे कूचकाम गुप्तहेर यंत्रणेकदून होणार नाही याची हमी भारत सरकार देईल काय? तसेच ह्या यंत्रणेतील पोकळ्या भरण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरात काय केले ते कळू शकेल का?

एका वर्षानंतर मुंबईकरांच्या मनातली भीती अजूनही डोळ्यांत तशीच दिसतेय, सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येईल ह्याची खरच शाश्वती उरलेली नाही. प्रचंड वाढलेली गर्दी आणि सोयी सुविधा, प्रशासनावर त्यामुळे पडणारा ताण ह्यात सामान्य मुंबईकर पूर्वीसारखाच होरपळून निघतोय आणि अपरीहार्यपणे व अगतिकपणे (मुंबई स्पिरीट हे त्याचं गोंडस नाव) ट्रेनला लोंबकाळत खस्ता खातोच आहे, दुसरा इलाजच काय म्हणा.. !!

ह्यावेळी २६-नोव्हेंबरला रक्तदान शिबीरे आणि वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ह्या ब्लॊग मार्फत माझ्या भावनांना वाट देऊन माझीही श्रद्धांजली.

"पब्लिक मेमरी इज शॊर्ट" म्ह्णणणायांना तसेच येणाया पिढ्यांना हा हल्ला नेमका कसा होता त्याची दाहकता, विषण्णता कळत राहाण आवश्यक आहे. नाहीतर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचे विस्मरण जसे आमच्या पिढीला होतेय तसे कैक वर्षांनी ओंबाळे, साळसकर, कामटे, शिंदे विसरले जातील.. "कोण मेले कुणासाठी रक्त ओकून.." असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल.
म्हणूनच २६-नोव्हेंबर-०८ च्या थराराचे हे फोटो इथे देत आहे.

विशेष सूचना
ह्या फोटॊतील काही फोटॊ खूप्पच अंगावर येणारे, मन, बुद्धी आणि संवेदना बधीर करुन सोडणारे आहेत त्यामुळे ही खालची लिंक आपल्या जबाबदारी वर उघडावी.
२६-नोव्हें. २००८ चा थरार पहाण्यासाठी इथे क्लिक करा..

जय हिंद!

Sunday, November 22, 2009

मराठी बाणा..

बरेच दिवसांत खूप काही घडून गेलं आणि काळ एकदम पुढे गेल्यासारखं वाटलं, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरांवर सगळीकडेच. वेगात घटना घडत आहेत आणि त्या त्यावेळी मनात असलेलं बोलायचं, लिहायचं राहून जातय असं वाटू लागलं. थोडं लिहिलं किंबहुना लिहू म्हटलं तरी विचारांत सुसंगती येते (आल्यासारखी वाटते) शिवाय जाता जाता आपल्या मताची नुसती पिंक टाकण्यापेक्षा एखाद्या प्रश्नाचा, मुद्द्याचा अधिक सखोल विचार केला जातो. दुसरा मुद्दा म्हणजे माझ्या मनातले विचार इतरांपर्यंत पुन: पुन्हा पोहोचू शकतात त्याचं समाधान मिळतं ते वेगळच.

असो, तर मराठीच्या मुद्द्यावर मराठी मतांची व्यवस्थित फोडाफोडी करुन आघाडीचे सरकार सत्तेवर आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढच्या निवडणूकीपर्यंत सुखाने पादा पण नांदा म्हणून शुभेच्छा! मनसेने जी मुसुंडी मारलेय त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. उद्धव साहेबांनी कॊर्पोरेट कल्चर आणण्याचा प्रयत्न केला जरुर, पण निकाल पहाता त्यांच्या बयाचश्या खेळी चुक्या म्हणजे खूप्पच चुक्याच! सदा सरवणकराची वासलात लावून, काल पक्षात आलेल्या आदेश बांदेकरला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली आणि दोघेही (आदेशराव आणि शिवसेना) दादरसारख्या ठिकाणी तोंडावर आपटले, त्यातही सदा सरवणकर कॊग्रेसला जाऊन उमेदवारी मिळवता झाला (तेथल्या स्थानिक कॊग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्यायच तो!) आणि त्यात फायदा मात्र झाला मनसेचा. जय हो! एकूण निकाल पाहाता, मराठी मतदारला चुचकारण्यात राजसाहेबांना यश येतेय यात वाद नाही आणि मला व्यक्तिश: ह्याचा आनंदच वाटतो. निदान कोणीतरी मराठी बाणा (आठवा डोंबिवली फास्ट) दाखवतो आणि मी मराठी आहे असे अभिमानाने सांगतोय (मतांसाठी का होईना!), हे ही नसे थोडके. खरं सांगायचं म्हणजे, माझ्या लहानपणी पाहिलेली शिवसेना मला आज मनसेमध्ये दिसतेय आणि माझाच कुठलातरी इगो सुखावतोय. शिवसेनेची राज्यस्तरीय पक्ष म्हणून वाढ होत असताना भाजपासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाबरोबर युती असल्याने शिवसेनेची वैचारीक दमछाक आणि कोंडी होतेय. आजही ठाकरेंना सामन्यात अग्रेलेखातून आगपाखड करावी लागतेय, कारण शिवसेनेची अशी ठसठशीत भूमिकाच राहिलेली नाही. निवडणूकीतल्या पराभवानंतर सुद्धा बाळासाहेबांची उद्विग्नता, हतबलता, नैराश्य सामन्याच्या अग्रलेखांतून दिसले पण एक नेता म्हणून उद्धव साहेब पत्रकारांना सामोरे गेलेत, जबाबदरी स्विकारलेय असं चित्र कुठेच दिसलं नाही. तरुणांचा ओढा शिवसेनेकडे पूर्वी इतका राहिला नाही, एक तर राहूल गांधीनी कॊंग्रेसमध्ये युवा कॊंग्रेसच्या माध्यमातून सुशिक्षित तरूण उमेद्वार देऊन तरूण फळी उभारलेय त्यामुळे तरूण मुले तिथे तरी जात आहेत किंवा राजच्या आंदोलनातल्या ग्लॆमर मुळे मनसेकडे तरी. त्यामुळे शिवसेनेचे पुढे काय होणार हा प्रश्नही विषण्ण करतोच. बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिंणग्यांतून उभारलेली शिवसेना, जिने बरंच काही दिलय महाराष्ट्राला, मुंबईला आणि मराठी माणसाला तिचा भाऊबंदकीमुळे कडेलोट होत असेल तर त्याचं वाईट वाटतच. मनसे आणि शिवसेना एकत्र यावेत आणि बाळासाहेबांनी शिवसेनेचं सुकाणू आपणहून राजच्या हाती द्यावं असं गोड स्वप्न माझ्यासारख्या कित्येकांना पडत असावं पण बाळासाहेबांचा ह्याबतीत तरी धृतराष्ट्र झालाय असं दिसतं. मराठी माणसाचं दुर्दैव, दुसरं काय, मराठीच्या भल्यासाठी इतकं करू शकाल तुम्ही बाळासाहेब?

विधानसभेत मस्तवाल अबू आझमीला चोपला तेव्हा मनात कुठेतरी बरं वाटलंच. विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी असं व्हायला नको होतं असे नक्राश्रूही कित्येकांनी ढाळले, पण चोर देवळात लपल्याने साधू होत नाही त्याला प्रसंगी मंदिरात घुसून चोपावे लागते, त्यामुळे झाले ते बरेच झाले. त्या एकंदर प्रकरणाबाबत वृत्तपत्रांत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आलेल्या बातम्या वाचल्या आणि काही मूलभूत प्रश्न पडले त्यांची उत्तरे शोधायचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केलाय. मुळात मी संकुचित दृष्टीचा मुळ्ळीच नाही आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती, देश, भाषा ह्यांच्याशी माझं नातं वेगळं आहे, असायलाच हवं. त्यामुळे प्रांतियता, भाषा एका प्रतलात, चौकटीत जपायलाच हवी असं मला मनापासून वाटतं. तसच डावा हात श्रेष्ठ की ऊजवा अशा फालतू वादातही मला अर्थ वाटत नाही त्यामुळे हिंदी भाषा मोठी कि मराठी, भारत जवळचा कि महाराष्ट्र असे प्रश्नच मला अस्थानी वाटतात, दोघेही एकमेकांस पूरक आहेत एवढंच म्हणता येईल.
मी मराठी आहे म्हणजे माझ्यापुरतं नेमकं काय?
१. माझी मातृभाषा मराठी आहे. मी मराठी बोलू, वाचू आणि लिहू शकतो. मला मराठीतून विचार व्यक्त करायला आवडतात. मला मराठी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचायला आवडतात.
२. मी मराठी साहित्य वाचण्याचा आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी तुकाराम, रामदास, द्न्यानेश्वर, अत्रे, पुल, जीए, ग्रेस, पाडगावकर, कुसुमाग्रज, सावरकर तसेच इतर कैक मराठी साहित्यकांचा वारसा सांगतो.
३. मराठी रंगभूमी (व्यावसायिक तसेच प्रायोगिक) तसेच मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मला प्रेम आहे.
४. मी मराठी माणसाशी मराठीतूनच बोलतो.
५. मी शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. त्यांनी आम्हाला स्वाभिमान, धाडस, शौर्य दिले हे अभिमानाने सांगतो. शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित ही भाषा, धर्म, संस्कृती मला मिळालीही नसती ह्याची मला जाणीव आहे (न होता शिवराय, तो सुंता सबकी होती, असे कविवर्यांचे बोल आहेत!).
६. महाराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात दिलेल्या योगदानाचा मला अभिमान असून, टिळक, तात्याराव सावरकरांसारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वेचलेल्या आयुष्याची आणि भोगलेल्या कष्टांची मला जाणीव आहे.
७. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती, ती कशी आणि का झाली ह्याची माहिती मी घेतली आहे शिवाय माझ्या बरोबरीच्या तसेच पुढील पिढीपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे (ह्यावेळच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात केदार जोशी यांनी ह्यासंबधी विस्तृत लेख लिहिला आहे.) मुंबई ही महाराष्ट्रात राहावी आणि ती मराठी भाषिकांची व्हावी म्हणून ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडले त्यांसाठी मी सदैव कृतद्न्य आहे. आज केवळ त्यांच्यामुळेच मी माझ्या महाराष्ट्राचा वारसा सांगू शकतो.
८. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नविन वर्ष सुरू होत असून गणपती, गोविंदा, दसरा, दिवाळी असे मराठी मनाच्या जवळचे सण मी उत्साहाने साजरे करतो.
९. महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर आणि वनसंपत्तीवर माझा जीव आहे.महाराष्ट्रात राहाणाया मग तो कुठूनही येवो, प्रत्येकाने इथल्या मातीवर, भाषेवर आणि संस्कृतीवर भरभरून प्रेम करावे, इथे समरसून जावे असे मला मनापासून वाटते.
१०. पुरणपोळी, कांद्याचे थालिपीठ, झुणका भाकर, भरले वांगे असे अस्सल मराठी पदार्थ मला मनापासून आवडतात.
११. महाराष्ट्र राज्यापुढचे प्रश्न तसेच बेळगाव सीमा प्रश्न ह्याबद्दल मी जागरुकतेने माहिती करुन घेतो. तसेच महाराष्ट्रात काम करणाया विविध सामाजिक संस्था, त्यांची कामे आणि समाजसेवक (गाडगेबाबा, फुले, आमटे, लहाने, बावीस्कर इ.) ह्यांविषयी मी सदैव कृतद्न्य आहे.
१२. भारतीय स्तरावर किंवा इतर राज्यातील मित्रांशी बोलताना मी महाराष्ट्राची बाजू मांडतो. मेहनती, स्वयंसिद्ध, हुशार, प्रामाणिक, शूर, पापभिरू, साहित्यप्रेमी अशी मराठी माणसाची प्रतिमा मी इतरांपुढे मांडतो. मराठा रेजिमेंट आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल अभिमानाने सांगतो. आत्ममग्न, कूपमंडूक, एकीचा अभाव, भाऊबंदकी, व्यापार तसेच खूप पैसे कमाण्याविषयी अनास्था असे मराठी माणसाचे दुर्गुणही मी मान्य करतो :)

मुख्य म्हणजे माझी मातृभाषा मराठी असणं आणि मी महाराष्ट्रीय असणं हे मी भारतीय असण्याच्या कुठेही आड येत नाही. जसे की मी एकाचवेळी कोणाचा तरी नवरा आहे, मुलगा आहे, भाऊ आहे आणि बापही. त्यांच्याशी माझी नाती ही परस्परपूरक राहातील अशी ठेवणे मला महत्त्वाचे. तसच भाषेचं. घटनेने आपल्याला भाषावार प्रांतरचना दिली आहे. घटनात्मक लढा देऊन मुंबई महाराष्ट्राने मिळवली आहे. मुंबईचं मराठीपण टिकवण्याची जबाबदारी आपली. हिंदीचा, इंग्रजीचा दुस्वास न करताही मराठी आपली आहे. मुंबई ही सगळ्या भारतियांचीही नक्कीच आहे, पण इथे येऊन दादागिरी करणाया उपयांची नक्कीच नाही. ती महाराष्ट्राची आहे आणि तिची अधिकृत भाषा मराठी आहे हे मान्य करा आणि मग इथे राहा. मराठी माणूस सहिष्णु आहे ह्याचा अर्थ तो षंढ आहे असा काढू नका. चवताळून उठला तर मदांध तख्त फोडण्याचे सामर्थ्य मराठी भाषेत तसेच माणसांत नक्कीच आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने ते सप्रमाण सिद्ध केलय. दुर्दैवाचा भाग असा की, पूर्वापार महाराष्ट्राला दुही ने स्वकीयांचा जेवढा त्रास झालाय तितका त्रास इतर राज्यांना झाला नसावा. अबू आझमी सारखा उपरा मराठी अस्मितेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत करतो आणि मनसे सोडली तर इतर मराठी भाषिक आमदार गप्प राहातात साधा निषेध सुद्धा करत नाहीत हे मराठीचेच दुर्दैव, मला खरच त्या सगळ्या आमदारांची लाज वाटते.. आज अत्रे असायला हवे होते, मराठात एक सणसणीत अग्रलेख वाचायला मिळाला असता असं वाटल्यावाचून राहावत नाही. स्वत:ला छत्रपती म्हणवून ताठ मानेने उभे राहाणारे शिवराय एकच, बाकी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असं आपण म्हटलं तरी बयाच मराठी सरदारांनी दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्यातच समाधान मानलं आणि त्यांची गादी पुढे ह्या महाराष्ट्रातल्या कॊंग्रेजी नेत्यांनी चालवली, यशवंतराव, शंकररावांपासून अगदी अंतुले, देशमुख, अशोकरावांपर्यंत. इतकेच काय जेव्हा वरळीच्या पूलाचे उद्घाटन झाले तेव्हा शरद पवारांनी पूलास राजीव गांधींचे नाव द्यावे असे भाषणात सांगून सोनियाजींना खूष करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या सागरी सेतूवर टांगला. ह्याच साठी राष्ट्रवादीची स्थापना झाली होती का हा प्रश्न त्यांना कोण विचारणार? मराठी माणूस कितीही कर्तुत्ववान म्हटला तरी असा दिल्लीपुढे नतमस्तक होण्यात धन्यता मानतो हेच महाराष्ट्रचं दुर्दैव.

तर यातून पुढे काय? राजसाहेबांनी सुरुवात तर चांगली केलेय. त्यांचे ४ आमदार गेले पण त्यांनी बरच काही कमवलय. पुढच्या निवडणूकांत ह्याचा मनसेला फायदा नक्की होणार. बसेस जाळणे, तोडफोड असले प्रकार थांबवून काही विधेयक कामे राजसाहेब करतात का हे पहायचे. सचिनला मुद्दाम अस्थायी प्रश्न विचारून हिंदी माध्यमांनी पुन्हा एकदा मराठी माणूस फोडायचा प्रयत्न केलाय आणि सचिनच्या वक्तव्यावर टीका करून बाळासाहेबांनी पुन्हा आफत ओढवून घेतलेय.(आठवा पूर्वी महाराष्ट्रभूषण पु. लं वर बाळासाहेबांनी अशीच आगपाखड करुन मराठी मनाला नख लावलं होतं), तर उद्धवसाहेब गप्प! (सेनेचे असं सगळंच चुकत चाल्लय का?) सगळ्यात म्हणजे मराठी माणूस फक्त प्रांतिक आणि संकुचित विचार करतो असं गरळ ओकून हिंदी मिडीया धूळफेक करू पाहात आहे. राष्ट्रीयत्वाचा हिरीरेने पुरस्कार करणाया आणि त्यासाठी सर्वस्वाची होळी करणाया टिळक, आगरकर, फडके, सावरकर ह्यापासून अगदी कामटे, ओंबाळे, करकरे आणि साळसकर सगळ्यांच्याच कर्तव्यदक्षतेचा, राष्ट्रभक्तीचा हा अपमान आहे. ह्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवं. ह्यासाठी मी काय करू शकतो --
१. मराठी बाणा आणि राष्ट्रभक्ती ह्या परस्पर पूरक गोष्टी आहेत हे ठणकावून सांगायला हवं.
२. मुंबईत काम करणाया परप्रांतियांना सामावून घेताना ते इथल्या संस्कृतीत सामावले जातील हे बघायला हवं. घटनेने दिलेले स्थानिकांचे हक्क डावलून बाहेरून आलेल्यांचे फाजील लाड होणार नाहीत हे पहायला हवं
३. स्थानिकांना कामात, नोकयांत प्राधान्य मिळेल (उदा. स्थानियलोकाधिकार समिती) ह्याचा पाठपुरावा करायला हवा
४. पुढची पिढी जागतिक स्पर्धेसाठी तयार करताना (इंग्रजी माध्यमात शिकण्यात काहीच गैर नाही, उलट आवश्यकच आहे) त्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीची ओळख आणि आवड राहील ह्याची जबाबदारी घ्यायला हवी.
अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे पण मराठीच्या मुद्द्यावरुन सजग राहाण हे तूर्त महत्त्वाचं.
जय हिंद! जय महाराष्ट्र! (होय, महाराष्टाच्या जयजयकारा आधी भारताचा जयजयकार होतोच नेहमी, त्यामुळे मराठ्यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेण्याची गरज नाही!)