Tuesday, February 26, 2008

भारतीय रेल्वे - राष्ट्राची जीवनरेखा..

लालू महाराज की जय!

लालूप्रसाद यादवांनी आपल्याभोवती नेहमीच एक प्रसिद्धीचं वलय ठेवण्यात यश मिळवलय. मुरब्बी राजकारणी आहेतच पण संधीचा फायदा कसा करून घ्यायचा आणि मॆनेजमेंटच्या बरोबरीने मार्केटींग सुद्धा कसं करायचं, स्वतःचा वेगळा ब्रॆंड तयार करून तो कसा पसरवायचा ह्याचं कसब त्यांच्याकडे आहे हे मान्य करावंच लागेल.

भारतीय रेल्वे हा एक मोठ्ठा हत्तीचं. लालूने Elephants can dance!! हे दाखवून दिलय. त्यानी मांडलेल्या ह्या पाचव्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणालाही तक्रारीला जागा ठेवलेली नाही. दरवेळेस भारतात मी तीन आठ्वड्याच्या सुट्टीवर गेलो तरी रेल्वेचा पास हटकून काढतो. गर्दी वाढतेय, अगदी अंगावर येण्याइतकी वाढतेय दरवर्षी हे जाणवतं पण रेल्वेचा मोह काही सुटतं नाही. गेल्यावेळी तर मी Office time मध्ये कित्येक वेळा सकाळ संध्याकाळ प्रवास केलाय रेल्वेने, गिरगांव बोरीवली असा. कारण Office time मधे तुम्ही रस्त्याने म्हणजे बस किंवा टॆक्सीने जायचा विचार केलात तरी दोन अडीच ताशांची गच्छंती आणि वाढणारं मीटर आणि भाडं ते वेगळच. शिवाय कार पुलिंग करणारे कमीच त्यामुळे प्रदुषणात भर, वाहतुकीत भर. ह्या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे उपनगरीय रेल्वे. वेळेची बचत, इंधनाची बचत, पैशांची बचत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे हया मुंबईच्या रक्तवाहीन्या झाल्यात, लाखो कामगार आज केवळ तिच्याच सहाय्याने मीठ भाकर कमवत आहेत. मुंबईकरांच्या जीवनात म्हणूनच रेल्वेला अनन्य साधारण महत्त्व आहे. हजारो चाकरमान्यांसारखाच मी ही मग सवयीप्रमाणे दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसतो, उत्सुकता असते की पासाचे दर किती वाढले, तिकीटांचे किती वाढले आणि काही नवीन सुविधा आहेत का? बोरीवली विरार मार्गाचं चौपदरीकरण तर वर्षानुवर्ष अडकून पडलं होतं, तर काही वेगळे प्रकल्प धसास लागत आहेत का?

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, रेल्वे केवळ नफ्यातच आणून न थांबता, लालू साहेबांनी २0२५ पर्यंत रेल्वेला कुठे न्यायचय ह्याचा चक्क आराखडाच मांडलाय. सगळ्याच थरातून रेल्वेच्या अर्थसंकल्पाच स्वागत गेले चार वर्ष होतय. हे होणं शक्य नाही असं म्हणणार्या भल्या भल्या मॆनेजमेंट गुरुंना लालूने विचार करायला भाग पाडलय. मालवाहातुकीतून जबरदस्त उत्पन्न वाढवून प्रवासी वाहतूकीवर ज्याचा सामान्य माणसावर सरळ परिणाम होतो, सुविधांचा वर्षाव केलाय. सामान्य प्रवासी डोळ्यासमोर ठेवून हे बजेट बनवल जातय असं लालू म्हणत आहेत ते खरं वाटतय.

आठवतय की कॊलेज मधे असताना एक फॊर्म भरून घ्यायचो रजिस्टारकडून आणि मग तो रेल्वेचा पास काढताना द्यायचो. विद्यार्थ्यांना अर्ध्या दरात पास मिळतो. ह्यावर्षी तर मुलांना १२ वी पर्यंत तर मुलींना पदवीपर्यंत फुकट पास देण्याची योजना मांडलेली बघून कौतुक वाटलं. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे. अजून एक आवडलेली बाब म्हणजे हाय टेक लालू. चर्चगेट किंवा सी.एस.टी. येथे ठेवलेल्या मशीन मधून लांब पल्ल्याच्या गाड्य़ांची टीकीट अगदी सामान्य माणसाला विनासायास काढताना, तंत्रद्न्यानाचा अगदी निम्नस्तरावरही होणारा उपयोग पाहून मला नेहमीच कौतुक वाटायचं. योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात तसं ह्या तांत्रिक गोष्टीचा कुशलतेने वापर करून घेणं महत्त्वाचं. लालूने रेल्वेला हायटेक करायचं मनावर घेतलेय हे अतिशय स्तुत्य आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी कशी होते हे बघणे महत्त्वाचे. कूपन्स टिकीटांसारख्या सोयी आहेत पण मशिन्स चालत नाहीत अशी स्थिती दिसून येते, असं काही होऊ नये ह्यासाठी खास लक्ष द्यायला हवं. सी. एस.टी सारख्या मोठ्या स्थानकांवर पार्कींग लॊट्स, तसेच अत्याधुनिक सोयी, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यासाठी विशेष प्रयत्न, गाड्यांमधे जास्त स्वच्छता ठेवण्यासाठी चांगल्या टॊयलेट्स चा वापर, मोबाईल वरून रेल्वे टीकीट बुकींगची सोय, सरकते जिने आणि येत्या दोन वर्षांत रेल्वे टीकीटांसाठी रांग हटवण्याचा उद्देश ह्या सगळ्याच योजना स्वागतार्ह आहेतच. ह्यातून टीकीटांच्या काळाबाजाराला आळा बसेलच शिवाय सामान्य माणसाचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.
इथे परदेशात बरेच ठीकाणी बस आणि रेल्वे ह्यांचा समन्वय दिसून येतो. म्हणजे एकच टीकीट दोन्हींच्या प्रवासाला चालते आणि ते खूपच सोयीचे होते. माझ्या मनात असा विचार नेहमीच यायचा की मुंबईसारख्या ठीकाणी ते का शक्य असू नये, म्हणजे रेल्वे साठी काढलेला पास बी. एस. टी. ला चालला तर बरे नाही का? ह्यावेळी लालूसाहेबांनी ’गो मुंबई स्मार्ट कार्ड’ ची योजना मांडलेय तिचे स्वरुप काहीसे असेच दिसतेय.

आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्शिततेच्या दृष्टीने बजेट मध्ये वेगळी सोय करण्यात आली आहे. शिवाय अजून एक चांगली गोष्ट म्हणजे काही हमालांना रेल्वेत गॆंगमन म्हणून भरती केले जाणार आहे.
रेल्वे कर्मचार्यांनाही ह्यातून आपण चांगले काम करत आहोत असा आनंद, समाधान मिळतंय असं लालू म्हणतात. त्यांनी ह्या कर्मचार्यांना सुद्धा खूष ठेवायचा प्रयत्न केलाय. सगळ्यात आनंदाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या सगळ्या वर्गांच्या भाड्यात थोडी थोडी कपात केलेय. ज्येष्ठ महिला नागरीकांना तिकीटात सवलत ३० टक्क्यांवरुन ५०% वर दिलेय. एवढं सगळं करून एकंदर बजेट कोट्यावधी रुपयाच्या नफ्याचे मांडलेय.

गेले चार वर्ष आणि आता अजून पुढचे एक वर्ष उपनगरीय रेल्वेच्या टिकीटांच्या किमती स्थिर ठेवण्याचं कसब लालूने दाखवलय, लाखो उपनगरीय प्रवशांना, चाकरमान्यांना त्याने दिलास दिलाय. अर्थात पुढच्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून त्याने हे केलय हे जाणवतय पण वारेमाप उधळंपट्टी करून लोकांना खूष करायचं तंत्र आहे असंही म्हणता येणार नाही, पुढच्यावर्षी आणि २0२५ पर्यंत काय उद्दीष्टे आहेत हे त्याने मांडलय. चारा घोटाळयात अडकलेल्या लालूने रेल्वेला मार्गाला लावलं असं म्हणायला, (निदान गेले पाच रेल्वे अर्थसंकल्प बघता ) आता नक्कीच वाव आहे!

लालू-आख्यान -
http://www.youtube.com/watch?v=iVe966Rrr5c&feature=related

अर्थसंकल्प मांडल्यावर -
http://www.youtube.com/watch?v=fhequbKB-bc

लालूच्या रेल्वे अर्थसंकल्पाचं सहर्ष स्वागत!

Sunday, February 17, 2008

प्रश्नच प्रश्न...

इथे प्रेसिडेंट डेची सुट्टी असल्याने आणि बाहेर वातावरण थोडे थंडच असल्याने सद्ध्या घरीच थोडा आराम. तर आज लिहीणार आहे मी एका चांगल्या कार्यक्रमाविषयी.

इथे डॆलास मध्ये पहिले २४X७ देसी एफ एम प्रसारण केंद्र (रेडीओ सलाम नमस्ते, १०४.९ एफ. एम.) आहे. खरं तर मी त्याच्या अतिशय प्रेमात असण्याची बरीच कारणं आहेत पण त्यातल्या त्यात काही प्रमुख म्हणजे वैविध्यपूर्ण कार्यक्रम, नवीन तसेच जुनी तुम्हाला आवडतील अशी गाणी, तदनुषंगे समालोचन आणि खिळवून ठेवतील असे कॊल इन प्रॊग्राम्स. जुनी फर्माईशी गाणी ऐकण्याव्यतिरीक्त नवीन टॊप टेन तसच ऐशी नव्वदच्या दशकातली उत्तम गाणी सुद्धा सहज जाता जाता कानी पडतात आणि आपण कधी शाळा कॊलेजच्या त्या दिवसात हरवून जातो कळत देखील नाही. त्याचबरोबर एखाद्या गायकाचा, गीतकाराचा, संगीतकाराचा, अभिनेत्याचा , अभिनेत्रीचा, निर्मात्याचा, दिग्दर्शकाचा वाढदिवस असेल तर काहीवेळा त्याचा स्पेशल प्रोग्राम ऐकायलाही तितकीच मजा येते. शिवाय मधून मधून बॊलीवूड ट्रीव्हीया क्वीझेस असतातच तुमचं बॊलीवूड्च अगाध द्न्यान तपासायला. त्याशिवाय बयाच आध्यत्मिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल असते. शनिवारी संध्याकाळची हिंदू देवळातली आरती सुद्धा प्रसारीत करण्यात येते. ह्या प्रसारणाचा मुख्य श्रोतृवर्ग देसी म्हणजे डॆलसस्थित भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी आणि बांगलादेशी असा असल्याने कार्यक्रम बहुढंगी होतात. शिवाय देसी डॊक्टर्स, सी.पी.एज, विमा एंजंट्स, हॊटेल्स ह्यांची माहिती सुद्धा मिळते. एकंदरच देसी कम्युनिटीच्या वाढीस आणि एकत्रिकरणास चांगलाच हातभार लागतोय ह्या प्रसारण केंद्रामुळे. तर आज मी मला ह्या केंद्रावरून प्रसारीत होणाया अशाच एका कार्यक्रमाविषयी लिहिणार आहे.

सदाफ म्हणून एक आर.जे (रेडीओ जॊकी) दर शुक्रवारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान हा कार्यक्रम सादर करते. एखादा राजकीय किंवा सामाजिक विषय घेऊन आणि त्याच सूत्र संचालन स्वतःकडे ठेवून सदाफ लोकांना त्यावर आपली मत प्रदर्शित करायचं आव्हान करते आणि मग वेगवेगळे लोक आपली मत मांडण्यासाठी ऒन एअर फोन करतात आणि मग एकावेळी एक एक कॊलरशी संभाषण करीत सदाफ कार्यक्रम छान रंगवते. म्हटलं तर तसं सोप्प आहे आणि म्हटलं तर हे काम कठीण सुद्धा. लोक बरेचदा भावूक होतात फॊन वर, शिवाय सगळ्यांना बोलायला संधी देता यावी म्हणून तिला बोलताना काटेकोरपणे वेळ द्यावी लागते प्रत्येकाला. मला ह्यात सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या लोकांची माहिती मिळते तसच वेगवेगळ्या शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या माणसांचे विचार, अनुभव ऐकायला मिळतात. अगदी मायबोलीवरच्या व्ही ऎण्ड सी (म्हणजे व्ह्यूज ऎण्ड कमेंट्स) सारखं.

दोन आठवड्यांपूर्वी सदाफने अमेरीकेतल्या प्रायमरी विषयी प्रश्न मांडला होतात त्यातून स्त्रीवर्गाचा पाठींबा हिलरीला का आणि किती आहे शिवाय ओबामालाही मिळणारा पाठींबा ह्याची झलक मिळाली. विशेषतः डॆलास मधे तरी बरेच देसी अमेरीकन्स आहेत ज्यांचा डेमोक्रेटीक पार्टीला पाठींबा आहे.

मागच्या वेळी सदाफने पाकिस्तानातले सद्य राजकारण हा विषय घेतला होता. बेनझीरची राजकीय हत्या आणि त्यानंतर आज होत असलेल्या निवडणूका ह्यावर बरीच चर्चा झाली. खूप पाकीस्तानी लोकांनी कॊल करून पाकिस्तानच्या सद्य परिस्थिती बद्दल चिंता तसेच विषाद व्यक्त केला. भारताशी तुलना करता पाकिस्तानची लोकशाहीतली अधोगती अर्थातच अधोरेखित झाली. गमतीची गोष्ट अशी की मुशर्रफ ह्यांना सगळ्याच थरातून वाढता पाठींबा दिसून आला. इथे असलेले पाकिस्तानी हे बरेचसे सुजाण आणि सुविद्य पाकिस्तानी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. एकंदरच पाकिस्तानात बोकाळलेली सरंजामशाही बेनझीर, नवाझ शरीफ ह्यांनी कमवलेली अफलातून संपत्ती, भ्रष्टाचाराचा कळस ह्यामुळे तेथील जनता इतकी जर्जर झाली आहे की विचारता सोय नाही. ह्या पार्श्चभूमीवर मुशर्रफांकडे दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने बघत लोक पाठींबा देत आहे. मूलतत्त्ववाद्यांचा धोका, दह्शतवाद आणि राजकीय अस्थैर्य ह्यात पाकिस्तानी जनता अक्षरशः भरडली जातेय. दुर्दैवाने दूरदृष्टी असलेला नेता त्यांच्याकडे नाही. शिवाय लष्करशाहीने लोकशाहीचा खेळ करून टाकलाय आणि ह्याचेच सुविद्य पाकिस्तानींना जास्त दुःख आहे. स्त्रियांचे शिक्षण, पुढच्या पिढीत मूलतत्ववाद्यांचे वाढते धोकादायक आकर्षण आणि वाढती धार्मिक. सामाजिक विषमता ह्यामुळे प्रगतीच्या विरुद्ध दिशेने पाकिस्तान जात आहे असं दिसतय. शिवाय तालिबान तसेच अफगाणिस्तानचा काही प्रदेश ह्यांकडून त्यांना टॊळ्यांचा धोका आहेच. अत्तापर्यंतचे सगळेच राज्यकर्ते भारताचा द्वेष हे एकच धोरण मध्यभागी ठेवून जनतेची दिशाभूल करत राहीले परिणामतः साठ वर्षांनतरही पाकिस्तानातली सुंदोपसुंदी संपताना दिसत नाही, उलट अस्थैर्य आणि आर्थिक विषमता वाढतच आहे. मूठभर धनिकांच्या हातात अजूनही देशाच्या नाड्या आवळलेल्या आहेत आणि लष्कराच्या अकारण हस्तक्षेपामुळे बर्याच राजकीय, सामाजिक निर्णयांना वेगळे वळण लागून सामान्य नागरीकाची सुरक्षितता आणि स्वातंत्र्यच धोक्यात येत आहे. पाकिस्तानात रहाणाया अतिशय थोड्या हिंदूचे हाल तर कल्पनातीत आहेत. इतर अनेक विषमतांबरोबर धार्मिक विषमता त्यांना सहन करावी लागते आणि अर्थात पाकिस्तान तसेच त्यांचा इस्लाम हा काही सहिष्णू नव्हेच. एका पाकिस्तानी हिंदूने रेडीओवर सांगितलेली प्रतिक्रीया पुरेशी बोलकी होती. सद्ध्या पाकिस्तानात रोटीचा प्रश्न गाजतोय. तेथे गव्हाचे उत्पन्न खूप होते. गहू हेच मुख्य खाणे आणि नंतर भात. तर अचानक गहू आणि आटा बाजारातून गायब झालाय. इतका की काळ्याबाजाराला उत येतोय. मुशर्रफ सरकार म्हणते गहू आहे पण तो लोकांपर्यत पोहोचत नाहीये. मधले दलाल त्याला परस्पर बाहेर विकत आहेत. इतकं टोकाला गेलय हे की लष्कराचे सैनिक गव्हाच्या गोदामांना राखण्यासाठी ठेवावे लागत आहेत. ह्याच खरं कारण असं दिसतय की सरकार जरी म्हणत असलं की गव्हाच चांगलं उत्पन्न झालय तरी बराचसा गहू त्यांना निर्यात करावा लागलाय, नाहीतर देशाला पैसा मिळणार कुठून. एकंदर कठीण काळातून जात आहे पाकिस्तान. त्यातच ह्या निवडणूकांचे ओझे. लालमशीद प्रकरण, अमेरीकेचा दबाव, संरजामशाहीकडे झुकलेल्या आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सिस्टीमचा आडमुठेपणा ह्या सगळ्यांशी लढताना मुशर्रफना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि त्यातूनच हाच एक माणूस पाकिस्तानासाठी निदान काहीतरी करू शकेल अशी भावना तेथे मूळ धरत आहे. जे असेल ते, पण भुकेने पेटलेल्या आणि बजबजपुरीने विटलेल्या जनतेचे लोंढे बांगलादेशासारखे पुन्हा इथे वळायला नकोत ह्यासाठी भारतीय लष्कराला मात्र डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करावं लागतय.

अजून एक विषय सदाफने चर्चेला घेतला होता तो म्हणजे जोधा अकबर आणि मतमतांतरे. त्याविषयी माझं मत. चित्रपट कितीही चांगला बनवला असला तरी तो करमणुकीसाठी आणि निव्वळ पैसे कमवण्यासाठी बनवलाय त्यामुळे हाच खरा इतिहास असं पुढच्या पिढीला सांगण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. आपल्या अभ्यासक्रमातल्या इतिहासात सन सनावळ्या पाठ करण्यावरच भर असतो आणि त्याच्याव्यतिरीक्त काय आहे खरा इतिहास हे वाचावं हे शालेय जीवनानंतर सहसा वाटत नाही आणि वाटलं तरी वेळ मिळतोच असं नाही. त्यामुळे असं चित्रपटात दाखवलेलं खरं मानून तेच इतिहास म्हणून पुढं केलं जातं. ह्यामुळे खरच नुकसान होतय इतिहासाचं. आशुतोष गोवारीकरने तरी चित्रपटाच्या सुरुवातीला हा खरा इतिहास असेलच असं नाही असंं लिहायला हवं होतं. राजपूतांच्या भावना दुखावल्या जाणारच ह्यात. राणाप्रतापासारखे तुरळक अपवाद सोडले तर बयाच राजपूत नायकांनी मुघलांबरोबर रोटी बेटी व्यवहार करून मांडिलकी पत्करली. जर राजपूत स्त्रियांच्या ह्या असहाय्यतेला प्रेमाचं स्वरूप दिलं गेल असेल तर ते कोणालाही आवडणार नाहीच, शिवाय मुगलांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करून प्राणार्पण करणाया कित्येक राजपूत स्त्रीयांचा तो अपमानही ठरेल. तुम्ही चित्रपटात अर्थात काहीही दाखवू शकता पण हाच इतिहास हे लादण्याचा अट्टाहास कशासाठी? ज्याला खरंच काय आहे खरं, ती जोधा होती की नव्हती, तिच शत्रूतुल्य अकबरावर प्रेम होतं की न्हवतं ह्याचा शोध घ्यायचाय तो संशोधन करेलही. शिवाय अकबर हा सम्राट असला आणि त्यातला त्यात बरा मुगल राजा असला तरी शेवटी परकीयच त्यामुळे स्थानिकांवर अत्याचार होतच असणार. बिरबल तसेच नवरत्नांमुळे आणि कलोपासनांमुळे तो चांगला प्रसिद्धिस पावला इतकेच. सांगायचा मुद्दा असा की जोधा अकबर जरुर पाहा पण एक निव्वळ करमणूक म्हणून, ऐश्वर्या छान दिसतेय म्हणून, लढाया चांगल्या चित्रीत केल्यात म्हणून, ह्रुतिक भरजरी कपड्यात उमदा दिसतोय म्हणून.. हा खरा इतिहास आहे असं समजून नको... उद्या अशुतोष गोवारीकरच्या लगान मधे जी मॆच झाली तशी खरोखरच झाली होती असं म्हटलं तर ते मान्य होईल का? शिवाय पुढे कोणत्या परराष्ट्रीय अभ्यासकाने ऐतिहासिक संदर्भ म्हणून हा चित्रपट घेतला तर योग्य होईल काय? आणि म्हणूनच शिवरायांविषयी किंवा आपल्या गणेशोत्सवाविषयी जेव्हा कोणी उद्दाम आणि सवंग लिहू पाहाते तेव्हा आपणास राग येत असेल तर तसाच राजपूतांना येणे शक्य नाही काय?

Sunday, February 10, 2008

"राज"कारण

उपास, मार आणि उपासमार मधल्या मार विषयी थोडसं लिहीणार आहे आज.. आणि तदनुषंगाने राज-कारणाविषयीही.

गेले आठ दिवस मुंबईत जे काही चालू आहे त्याविषयी ऐकतोय आणि वाचतोय. सगळ्या थरातून संमिश्र प्रतिक्रीया आहेत आणि खरं काय चाल्लय ह्याचा नीट उलगडा व्हायला वेळ लागतोय. खरं तर हे मिडीयाचं अपयश म्हणावं लागेल. सगळेच सवंग पत्रकारीतेच्या मागे असल्याने एखाद्या लहानशा गोष्टीचं भांडवल करून त्याला भडक रूप देऊन breaking news बनवायचं आणि आपला TRP वाढवायचा पद्धतशीर प्रयत्न मिडीया कडून होताना दिसतोय. ह्याची परिणिती मिडीयावरचा विश्वास कमी होण्यात होतेय आणि हे चांगलं लक्षण नाही.

प्रांतीय वाद आणि प्रादेशिक अस्मिता हा विषय तसा नाजूक आहे. भारतीय घटनेने भारतीयास भारतात कुठेही जाऊन राहाण्याचा, घर थाटण्याचा (दुर्दैवाने काश्मीर वगळता - कलम ३७०) हक्क दिला आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही जिकडे स्थायिक व्हाल तिथे तुम्ही शांतता, स्थैर्य राखून स्थानिकांच्या भावनांचा, स्थनिक म्हणून त्यांच्या हक्कांचा विचार करायलाच हवा. सांस्कृतिक, भाषिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक सगळ्या पातळ्यांवर समरसून एकत्र राहाण्याची तयारी असायलाच हवी. ह्या मुद्द्यांवर राज जे काही म्हणतोय त्यात तथ्य वाटतय. भारतातल्या इतर राज्यांशी तुलना करता मुंबईतला मराठी माणूस बराच सहिष्णू आहे, दिवसेंदिवस मुंबईत येणारा लोंढा बघून तो अजूनही शांत आहे. पण विशेषतः उत्तर प्रदेशातले, तेथे हरल्यामुळे रिकामटेकडे असलेले नेते पुनःपुनः मुंबईत येऊन इथले वातावरण विनाकारण कलुषित करत आहेत. तसं पाहाता तात्विक दृष्ट्या विचार केला तर केवळ भैय्या लोकांवर राग असण्याचे कारण नाही. जे जे मुंबईत राहून केवळ तिला ओरबाडतच नाहीत तर इथे येऊन हक्कांची आणि दादागिरीची भाषा करतात त्यांना मराठी माणूस म्हणून बाणा दाखवायलाच हवा. तुम्ही इकडे निष्ठा ठेवत असाल आणि इथल्या सांस्कृतिक आणि भाषिक वातावरणात जुळवून रहाणार असाल तर रहा नाहीतर चालते व्हा असं सांगण्यात काहीच गैर नाही. ह्या बाबतीत मला गुजराथी, जैन समाजाचे विशेष कौतुक वाटते. माझे कित्येक जैन, गुजराथी मित्र मराठी उत्तम बोलतातच शिवाय घरी गणपतीही बसवतात. ह्याला म्हणतात एकात्मता. अजून एक बातमी वाचून डोकं ठणकलं ती म्हणजे मुंबई महानगर पालिकेचा कारभार हिंदीतूनही चालवण्याचा प्रस्ताव. हा प्रस्ताव आणायची हिम्मत होते आणि कित्येकांना त्याबद्दल काही वाटत नाही हे मराठी माणसाच दुर्दैव आहे. हिंदी असेलही आमची राष्ट्रभाषा पण मराठीला ही मान्यताप्रत दर्जा आहे. भाषावार प्रांत रचनेत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्रीय माणसाने १०५ हुतात्म्यांचे मोल देऊन मुंबई मिळवलेय, तिचा कारभार मराठीशिवाय इतर भाषेत होऊ देताच कामा नये. बाहेरून येणायांना मराठीतला कारभार कळत नसेल तर मराठी शिकून या म्हणावं. चेन्नई, कोलकत्ता किंवा इतर कोणत्या ठिकाणी असा प्रस्ताव आणायची कोणी हिम्मत तरी करु शकेल काय? आज आपलं आयुष्य कमालीचं वेगवान झालय आनि सामाजिक मन प्रचंड निष्क्रिय. त्यामुळे मुंबईत मराठीचा टक्का घटण्याचे धोके काय आहेत ह्याचा विचार करायला वेळच नाहीये कोणाला. राज ते करतोय हे नक्कीच चांगलं आहे. शिवसेने सुद्धा मराठी माणसाची तळी उचलली काही वर्षांपूर्वी म्हणून मुंबई मराठी माणसाची अशी ओळख राहीली. पण मग राजकारण्यांनी रेशनीग कार्ड वाटली राजकीय स्वार्थासाठी आणि आता परप्रांतीयांचा टक्का इतका वाढलाय की त्यांचा राजकीय दबावगट तयार झालाय.

आता केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारातून आलेल्या भैय्यांच्या बाबतीत बोलायचं तर मला वैयक्तीक पातळीवर त्यांविषयी आदरच आहे. जे अनेक समूह मुंबईत आहेत त्यातल्या त्यात हा समाज मेहनत करून जगणारा आणी थोडासा पापभिरू. हातावर पोट असलेल्यांपैकी. राज ने ह्या समाजाला निषाण करायचं कारण अर्थात राजकीय जास्त आहे. पण मराठी माणसाच्या उद्योगातल्या उदासीनतुमुळे भैय्या लोकांनी अनेक धंदे काबीज केलेत. दूधवाला, पानवाला, इस्त्रीवाला, भेळवला, चणेवाला इतकच काय तर न्हावी, भाजीवाला अशा सगळीकडे आपल्याला भैय्येच दिसतात. जिथे तुमच्या कामातल्या कौशल्यापेक्षा ढोर मेहनत अधिक लागते तिथे भैय्ये लोक हमखास दिसतील. शिवाय एक भैय्या आला की तो थोडे दिवसानी रायबरेली किंवा तत्सम ठिकाणावरून दुसरा, तिसरा आणि मग त्यांची कुटुंब असं चालूच आहे. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही, मेहनत करणायाला तर कधीच नाही. पाडगावकर एका बोलगाण्यात म्हणतात तसं, कधी कधी एखादा भैया दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची आठवण काढत एकसुरी जगत असेलेला दिसतो. एका खोलीत दहा दहा जण राहून पैसे वाचवून गावाला पाठवताना बरेचदा दिसून येतं. अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाचा अभाव, लग्नावर ऐपतीबाहेर होणारे खर्च ह्यामुळे हा समाज तसा मागेच आहे. तिथल्या राजकरण्यांनी केलेल्या दिवाळखोरीमुळे आणि मुंबापुरीच्या आकर्षणामुळे भैय्ये लोक इथे येतात आणि दुय्यम दर्जाची कामे करून उरलेल्या वेळात भजन किर्तनात वेळ घालवतात. ढोबळ मानाने ह्या भैय्या लोकांच्या मेहनतीचा मुंबापुरीला उपयोगच होतोय. पण त्यांनी इथे समरसून जाणं आवश्यक आहे. रामलीला इतके वर्ष होत आहेच आणि होत राहीलही, पण आपल्या समूहाचा दबावगट तयार करून स्थानिकांवर कुरघोडी करू नये हे त्यांच्या नेत्यांना समजायला हवं.

राजचा मुद्दा तंतोतंत पटण्यासारखा आहे पण झुंडशाहीचा मार्ग बरोबर नाही असे वाटते. शिवाय हातावर पोट असलेल्या सामान्य भैय्याला मारुन काय होणार, आपली रेष मोठी कशी करायची ह्याचा मराठी मनाने विचार करायला हवा, दुसयाची रेष पुसायची गरज नाही, त्याचबरोबर भैय्याला दिली ओसरी भैय्या हात पाय पसरी हे ही होता कामा नये म्हणून स्थानिकांचा आवाज बुलंद असायलाच हवा.

ह्या ग्लोबल युगात संकुचित राहूनही अजिबात चालणार नाही त्यामुळे सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि प्रादेशिक अस्मिता ह्यांचा योग्य मेळ साधायला हवा. मराठी माणसानेही पोटापाण्यासाठी मुंबई सोडलेय तो देशा परदेशात रहातोय. त्यानेही महाराष्ट्र मंडळे चालवून ठिकठिकाणि मराठी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मुंबईतल्या आततायी पणाचा मुंबईबाहेरील मराठी माणसास त्रास होणार नाही हे ही बघणे महत्त्वाचे.

राजच्या मनसे कडून बर्याच अपेक्षा होत्या मला, विशेषतः त्याचा जाहीरनामा वाचला तेव्हा. अत्तापर्यंत त्याने काही ठोस केल्याचे जाणवले नाही आणि हे आंदोलन सुद्धा राजकीय जास्त वाटतय. झुंडशाहीचा त्याचा मार्ग पटत नाही पण मराठीचा मुद्दा बरोबरच आहे. शिवसेनेला काटशह देण्याचाही त्याचा हेतू स्पष्ट दिसतोच आहे. त्याने म टा मधे आपली भूमिका स्पष्ट मांडलेय ह्याचा त्याला नक्कीच उपयोग होतोय. शिवसेनेला मात्र आता थोडी भिती आहे की मराठी पणाच्या चलनी नाण्यात वाटेकरी झाला की काय? बाळासाहेबांना मराठी मक्तेदारी शिवसेनेकडेच हे ओरडून सांगण्यासाठी वेगळा अग्रलेख लिहावा लागला सामन्यात ह्यातच राजच्या करिष्म्याची झलक दिसतेय. बाळासाहेबांच्या बर्याच गुणांची छबी राज मध्ये तंतोतंत दिसतेय. बाळासाहेबांकडे पक्षाची भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवायला जसे मार्मिक आणि मग सामना ही पत्रे होती, तसं काहीतरी राजकडे असणं आवश्यक आहे. गुंडगिरी सोडून विधायक कामांवर राजने जास्त लक्ष दिलं तर एक चांगली लोकमान्यता त्याला नक्कीच मिळू शकेल.

जय हिंद, जय महाराष्ट्र!!