Saturday, December 18, 2010

आमची शाळा, आमचे शिक्षक..

विचारांच्या तंदरीत असताना, आज एकदम काहीतरी झालं आणि शाळेचे दिवस आठवले.. आणि मग ते लहानपण, शाळा, आजी, माऊ-बाबा, शेजारच्या टिळक मामी, बंडू मामा आणि बरच काही काही... जुने दिवस आठवले की एक हुरहुर लागते, गोड नॊस्टेल्जिया सतावतोच.. मग आठवणींच्या ह्या मोहजळात किती डुबक्या मारल्या तरी समाधान होत नाहीच, दर वेळा तळाला वेगळाच मोती मिळतो. कसं अजब आहे ना हे सगळं.. कित्येक वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी बारीक तपशीलासह अशा नजरेसमोर येतात, अगदी अनलिमिटेड स्टोअरेज आणि किती जोरदार अनुक्रम लावलाय त्याचा इवल्याश्या मेंदूनं, काही क्षणात त्या मन:पटलावर येतात सुद्धा, चक्क धक्काबुक्की करत गर्दी करतात मुंबईतल्या रेल्वेच्या डब्यासारखी.

चिकीत्सक शाळेतल्या छोट्या शिशुतल्या प्रवेशाचा हा प्रसंग. मला चांगलाच आठवतोय. रांगेत उभं राहून अगदी फॊर्म वगैरे आणला होता, तेव्हा मुलाखत की काय माहित नाही पण मला आईबरोबर एका खोलीत बोलावलं आणि बाईंनी काहीतरी प्रश्न विचारला. मी आपला औत्स्युकाने सगळ्या खोलीतल्या गोष्टी न्ह्याहाळतोय. टेबलावर एक खेळण्यातला पिंजरा आणि त्यात पोपट ठेवला होता. आठवत असेल तर बयाच ठिकाणी दारावरच्या बेलसाठी तो पूर्वी वापरायचे, म्हणजे बेल वाजवली की हा पोपट ’विठू विठू’ करणार. तर त्यावेळी तो पोपट आणि पिंजरा मला इतका आवडला की मी कुठल्याही प्रश्नाच उत्तर न देता, तो पिंजरा घेऊन तेथून बाहेर जो धुम्म पळालो की बस्स! अर्थातच आमच्या व्रात्यपणामुळे पुढे काय वाढून ठेवलय हे बाईंच्या लक्षात आलं असावं आणि साहजिकच त्यावर्षी शिशु वर्गात प्रवेश मिळाला नाही. माझं वर्ष आता वाया जाणार की काय अशा चिंतेत असतानाच, गिरगावात त्याच वर्षी जयाताईंनी (रेळेकर) शिशु वर्ग सुरु केल्याचं बाबांना कळलं आणि मग त्यांच्या शिशु निकेतनचा मी पहिला विद्यार्थी झालो. तिथून मला शाळा ह्या प्रकाराची आवड निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही (श्रेय जयाताईंनाच). थोडं असही आठवतय की त्याआधी (बहुधा घरी खूप्पच त्रास देत होतो म्हणून ) मी देवभुवन मध्येही काही दिवस डबा खायला जायचो.

असो, तर पहिलीला पुन्हा प्रवेशासाठी अर्ज करुन (आणि मी मागच्यावेळसारखा पुन्हा गोंधळ करणार नाही असा सज्जड दम खाऊन) चिकित्सक समूहाच्या पोतदार प्राथमिक शाळेत प्रवेश करता झालो. पहिली, दुसरी दुपारचे वर्ग असायचे, एका सुरात आम्ही कविता म्हणताना, गाताना जो ताल असायचा तो अजून कानात घुमतोय. पुतळ्याच्या मागचाच वर्ग होता आमचा. अगदी तिसरी पर्यंत हा पुतळा कोणाचा हे तिथे नाव लिहिलेले असूनही (श्री. पोतदार) मला कळले नाही बहुतेक. पगडी घातलेले एकमेव पुरुष पुतळ्याच्या रुपात माहिती होते ते म्हणजे लोकमान्य टिळक. शाळेतल्या प्रत्येक वर्गात असलेल्या वीणाधारी, मोरावर बसलेल्या सरस्वतीचा फोटॊ हे त्याकाळातलं अतिशय आकर्षण. वर्ग सुरु होताना सुरुवातिला जी प्रतिद्न्या आणि मग जन-गण-मन म्हणायचो त्यातून जे भारलेलं वातावरण निर्माण व्हायचं त्याची तुलना फक्त सार्वजनिक गणेशोत्सवात गुरुजींनी केलेल्या सामूहिक मंत्रोच्चाराशीस होऊ शकेल. शाळा संपताना वंदे मातरम, अहाहा काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे कानांचे! त्यातला तो ’जाड्या’ शब्द मला आजपावेतो कळला नाही. पहिलीच्या वर्गात्तील ’फुलपाखरु छान किती दिसते’ हे तर अजून आठवतेय मला, गाण्याच्या आंतरकरबाईंनी शिकवलेल्य हावभावासहित. दुसरीत असताना आम्ही दिंडी काढली होती तेव्हा वारकयांच्या वेषभूषेतला फोटॊ जपून ठेवलाय अजून :) तेव्हा प्राथमिक शाळेच्या सहली नॆशनल पार्क, तानसा वैतरणा अशा गेलेल्या आठवतात. शाळेत शिरतानाच प्रवेशद्वाराजवळ एक फळा आहे. त्यावर सुविचार आणि मग प्रदर्शने, आंतरशालेय स्पर्धा, नाटके ह्यात बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे नाव लिहिले जायचे. वर्षानुवर्षे तेच वळणदार अक्षर. फळ्यावर नाव लागणे म्हणजे अटकेपार झेंडा, अगदी अभिमानास्पद गोष्टच. तिसरीमध्ये असताना ऐन परीक्षेच्या धामधुमित म्हणजे मार्च मध्ये माझी मुंज झाल्याचे आठवतेय. बयाच जणांची त्यावर्षी मुंज झाली होती, तुळतुळीत गोटे करुन शाळेत बिचकत यायचो तेव्हा वेगळंच वाटायचं. माझा वाढदिवस मे मध्ये असल्याची मला कायम बोच होती. एकतर वाढदिवसाच्या दिवशी गणवेशा व्यतिरीक्त छान छान ड्रेस घालायची चैन, मग तुमचा वेगळा ड्रेस बघून तुम्हाला त्या दिवशी असलेला स्पेशल भाव असलं काही मिळायचं नाही मला. तसच वाढदिवसाच्या दिवशी शाळेत गिफ्टपण वाटता यायची नाहीत कधी, एकेकाचे नशीब! चौथीचं शिष्यवृत्तीचं वर्ष. जयकर बाईंनी विशेष मेहनत घेतली तेव्हा आमच्यावर. सकाळी साडेसहाला मोजक्या मुलांसाठी जास्तीचे वर्ग घ्यायच्या बाई. कष्टाचं चीज झालं आणि मिळाली स्कॊलरशीप. तेव्हा पेपरात फोटो आलेला जपून ठेवलाय, त्यावेळी आजीच्या चेहयावरचं कौतुक अजून आठवतय.

प्राथमिक शाळेतली ही वर्ष भुर्रकन उडून पाचवीत आलो आणि हुशार मुलांची ’क’ तुकडी असायची त्यावेळी शाळेत, त्यात येऊन पोहोचलो. ’क’ तुकडी साठी एन.सी.आर.टी. असल्याने तेव्हाच भौतिक आणि रसायनशास्त्राशी ओळख झाली, तसच इंग्लिशही शिकणं सुरु झालं. पाचवी मध्ये प्राविण्य आणि प्रद्न्या ह्या गणिताच्या परीक्षा उत्तीर्ण झालॊ आणि सहावीला बालवैद्न्यानिकसुद्धा. ह्या दोन तीन वर्षात टीळक विद्यापीठाच्याही काही परिक्षा दिल्या, का दिल्या माहिती नाही! पाचवीपासून मी शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात (त्याला आम्ही गॆदरींग म्हणत असू) भाग घेत असे. दीड एक महिना आम्ही सराव करत असू. कधी बेडेकरांच्या गच्चीत तर कधी कुणाच्या घरी. 'डोल डोलतय वायावर बाय माझी' ह्यावर कोळी नाच, 'ए नाम रे सबसे बडा रे तेरा नाम उचे शेरोवाली' ह्यावर गरबा तसच 'डोगराचे आडून एक बाई' ह्यावर असे नाच बसवलेले आठवतायत. मयुरी पालेकर आमचे नाच बसवायची. डिसेंबर महिना आला की मग स्पोर्ट्स आणि शाळेतल्या विद्न्यान प्रदर्शनाची धामधुमही असायची. वर्गाच्या लंगडीच्या टीममध्ये मी असायचो नेहमी. माझा एखादा प्रोजेक्ट असायचाच प्रदर्शनात. बक्षिसाच्या आशेने नव्हे तर माहिती व्हावी, चौकसपणा यावा, सभाधीट पणा यावा ह्यासाठी भाग घ्यायलाच हवा असा आजीचा कटाक्ष असे. मरीन लाइन्सच्या मैदानात आमचे तीन दिवस स्पोर्ट्स असायचे. मी कधीच खेळात चमकलो नाही पण हे तीन दिवस म्हणजे धमाल असायची नुसती. एकीकडे शाळेत ही धामधुम सुरू असताना संक्रांतीचे वेध लागलेले असायचे. पतंगासाठी जीव टाकायचो अगदी.. वाईट्ट म्हणजे वाईट्ट वेड होतं (अजूनही आहे!) आणि शाळेत तिळगूळ समारंभ असायचा. मग आम्ही सगळी मुलं वर्ग सजवून तिळगूळ वाटायचॊ, खायला आणायचो, फिशपॊंड द्यायचो. मुले-मुली एकत्र असल्याने एक वेगळीच मजा असायची त्या वयांत, त्या दिवसांत..

शाळेला खाली पटांगण, मागच्या बाजूला अंगण आणि सगळ्यात वरती मोठ्ठी गच्ची. तिसया मजल्यावर वागळे सभागृह आहे. त्यात कितीतरी जणांच्या हातून बक्षिस घेण्याचा आणि कित्येकांची भाषणं ऐकायचा योग आला. पाचवी पासून वक्तृत्व स्पर्धात भाग घ्यायचो तेही आठवतेय. टिळक पुण्यतिथीनिमित्त एक ऒगस्टला स्पर्धा असायच्या. पण एकूणात वक्तृत्वात मी मागेच असायचो (आमचे उद्योग पडद्यामागचे)! सातवी पुन्हा शिष्यवृत्तीच वर्ष, त्यात गोट्या, पतंग आणि क्रीकेट मुळे पुढे काय अशी घरच्यांना काळजी असतानाच, शिष्यवृत्ती मिळाली, नंबरही बराच वरचा आला. मिळणारी रक्कम अगदी दहा-पंधरा रुपये असायची महिन्याला पण ती घ्यायला बोलावलाय खाली ऒफिसात अशी नोटीस आली वर्गात किती एकदम ढॆंट्डढॆंड वाटायचं. मग आठवीत पुन्हा प्राविण्य आणि प्रद्न्या मिळवून बालवैद्न्यानिक उत्तीर्ण झालो. तेव्हा रुपारेल मध्ये बी.टी.एस. चे वर्ग भरायचे, त्यात मात्र मी रमलोच नाही विशेष. पण दर शनिवारी रेल्वेने माटुंग्याला जायचॊ, मजाच. त्यावेळीच मुंबईतल्या हुशार विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्या (अमित पटवर्धन, जो आमच्या ९३ च्या बॆचमध्ये गुणवत्ता यादीत पहिला आला तो इथेच मित्र बनला). बालमोहन, पार्लेटिळक, चोगले हायस्कूलच्या माझ्या बॆचच्या बयाच हुशार मुलांच्या इथे ओळखी झाल्या. आठवीत आमचा वर्ग होता त्यात सांगाडा होता कपाटात कोपयात ठेवलेला. प्रयोगशाळेच्या बाजूचा हा वर्ग, सापळ्याचा वर्ग म्हणायचो त्याला. बेफाम मस्ती, इतकी की एकदा वर्गातल्या ३० मुलांपैकी २८ जणांना शाळेतून बाहेर काढले होते, कारण काय तर कागदी रॊकेट बनवून उडवणे. तरीही, पुढे एकदा कागद दुमडून ते रबरबॆंडमध्ये अडकवून जोरात मारणे आणि त्याने बेंचवर उड्यामारत युद्ध खेळणे ह्यावरुन बराच प्रसाद खाल्लेला आठवतो. आठवीत असताना आम्ही कुमार कला केंद्रातर्फे घेण्यात येणाया आंतरशालेय स्पर्धेत ’तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटक बसवलं होतं, शिंदेबाई सर्वेसर्वा त्या नाटकामागे. अखिल मुंबईत प्रथम क्रमांक मिळवला, कौस्तुभ सावरकरनं त्यात जोतिबाचं काम केलं होतं. आठवीमध्ये आंतरशालेय विद्न्यान प्रदर्शनातही बक्षिस मिळालं होतं. परेश वैद्य (आमच्या मागच्या म्हणजे ९४ च्या बॆचमद्ये मुंबईत गुणवत्ता यादीत प्रथम) बरोबर ह्या प्रदर्शनात मांडलेल्या प्रकल्पावर आणि कुमार कला केंद्राच्या नाटकात कामही केल्याचं आठवतय. खूप शिकायला मिळालं ह्या काळात बरोबरीच्या मुलांकडून. माझ्याबरोबरची बहुतेक मुलं ह्यावेळी तबला, पेटी किंवा मग तालमीत व्यायाम असं काहीतरी शिकत असताना माझ्या मात्र सर्रास उनाडक्याच चालू होत्या ह्या दिवसांत, नाही म्हणायला वाचनाची गोडी लागली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामुळे. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही शाळेत सकाळी सहाला बॆडमिंटन खेळत असू. आठवी आणि नववी एन.सी.सी. चं वर्ष. उंची चांगली असल्याने मी एअरविंग मध्ये निवडलो गेलो पण तासन तास परेड करण्यात आणि जड बूट पायात घेऊन उन्हात फिरण्यात मला रस नसायचा. पण तरीही कडक पॊलिश असलेले बूट, स्टार्च केलेला तो निळा ड्रेस, बिल्ला असलेली टोपी असा मोठा रुबाब असायचा. ते कपडे धुवायला सुद्धा आम्हाला वॊशिंग अलाउन्स मिळायचा. नववी मध्ये आम्ही अंबरनाथला एन.सी.सी. च्या कॆंपला गेलो होता. घरापासून दूर, फक्त मित्रांसोबत आठ दिवस राहाण्याचा माझ्या (आणि बरोबरच्या जवळजवळ प्रतेकाच्या) आयुष्यातला पहिला प्रसंग. सकाळी पाच वाजता उठून आवरून परेड ते रात्री दहा पर्यंत दंगा चालूच. इतकं असूनही घरच्यांची आठवण यायचीच. विनायक पंडितने तबलावादनाने आणि मी आंतरशालेय चेस मधे अशी दोन पदक कॆंपमध्ये शाळेला मिळवून दिल्याचं आठवतय.

पुढे दहावीच वर्ष सुरु झालं आणि शाळा, क्लास ह्यांच वेळापत्रक सांभाळताना तारांबळ व्हायला लागली. गोडबोले सरांचा दादरला व्हेकेशन क्लास असायचा तेव्हा. इतरही क्लास होतेच. शाळेत सगळ्याच शिक्षकांनी मेहनत घेतली आमच्यावर. अभ्यासाच्या नादात दहावीच वर्ष कधी गेलं कळलंच नाही. तसं सेंड ऒफच्या वेळी थोडं जड वाटलं होतच पण एकतर येऊ घातलेल्या परिक्षेचं टेंशन आणि पुढच्या कॊलेज जीवनातल्या स्वातंत्र्याची ओढ त्यामुळे तेव्हा ते विशेष जाणवलं नसावं. आता मागे वळून पाहाताना, सगळं लख्ख दिसतय. इतके कसे मोकळे झालो शाळेपासून पटकन ह्याचं आश्चर्य वाटतय.

शाळेचा फोटॊ ठेवलाय माझ्या ओर्कुटवरच्या अल्बम मधे. कुणितरी म्हटलं, हे काय किती वर्षात रंग काढला नाहीये शाळेला! अरे हो खरंच की, पण मला कसं खटकलं नाही हे, कदाचित शाळेचं अंत’रंग’, तिची माया अनुभवली असल्याने तिच्या बाहेरच्या रंगाकडे, दिखाऊपणाकडे लक्षच गेलं नसावं. खरं सांगायचं तर, जगात कुठेही गेलो तरी मनाच्या कुपीत लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत आणि एखाद्या निवांत क्षणी ज्या मोराच्या पिसांर्या सारख्या फुलून समोर येतात त्यात ह्या शाळेतल्या वर्षांच्या (की भुर्रकन उडालेल्या क्षणांचा!) मोरपिसांचा मोठ्ठा वाटा आहे. ’मज आवडते मनापासूनि शाळा, जशी माऊली लळा लाविते बाळा’ ह्याचा तंतोतंत प्रत्यय.

सहज मनात आलं की शाळेतल्या प्रत्येक इयत्तेच्या वर्गशिक्षकांची नावं आठवतायत का पहावं आणि गंमत म्हणजे ती आठवली सुद्धा.. मलाच खूप प्रसन्न वाटलं अंगावरुन आठवणीची ही मोरपिसं हलकेच फिरवताना..

पहिली ’अ’ - फडणीस बाई
दुसरी ’अ’ - पेवेकर बाई
तिसरी ’अ’ - गोडबोले बाई
चौथी ’ब’ - साने बाई
प्राथमिक मुख्याध्यापिका - वालावलकर बाई/ जयकर बाई
पाचवी ’क’ - राजवाडॆ बाई
सहावी ’क’ - पाटील बाई
सातवी ’क’ - भातखंडे बाई
आठवी ’क’ - देशमुख बाई
नववी ’क’ - पाटील बाई
दहावी ’क’ - मांजरेकर बाई
उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका - केळकर बाई, पाडगावकर बाई
शिपाई - रघू काका, गायकवाड
ऒफीस स्टाफ - विचारे सर

यांखेरीज ज्या शिक्षकांच्या मुशीतून घडलो ते श्री. घरत सर, भूगोलाचे नारखेडे सर, चित्रकलेचे जोशी सर, मराठीच्या परांजपे बाई, संस्कृतच्या गारखेडकर बाई तसेच दळवी बाई, पीटीचे नलावडे सर, गणिताच्या पाठारे बाई, राणे बाई, इंग्लिशच्या प्रभू बाई, केणी बाई, मुलांवर जीव लावणारे पालकर सर तसेच पालकर बाई अजून कितीतरी नावे घेता येतील. लहानसहान प्रसंगातून ह्या सगळ्यांनी आमच्या संस्कारक्षम वयात पाठ्यपुस्तकाबाहेरचं किती तरी शिकवलं. पु.लं चे चितळेमास्तर वाचताना, बोकीलांचं शाळा वाचताना किंवा प्रकाश संतांच लंपन वाचताना मनातल्या मनात माझी शाळा आणि त्यातले कैक प्रसंग माझ्यासमोर आले ते ह्यातल्या कुण्या ना कुण्या शिक्षकाबरोबरच. विद्यार्थी हा परिक्षार्थी हवाच पण त्यापलिकडे एक चौफेर, चौकस व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आणि तेही एकावेळीस अनेक गोळ्यांवरुन हात फिरवण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलं. शिक्षकी पेशा पलिकडे जाऊन ह्या शिक्षकांनी जे काही दिलय त्याच्या त्रुणात राहाणच परम भाग्याचं. कधी मायेने गोंजारून, कधी पाठीवर शाबासकी देऊन तर कधी घणाचे घाव घालून ह्या सायांनी वर्षामागून वर्षे विद्यार्थी ’तयार’ केले, त्यांच भविष्य अक्षरश: विणलं, घडवलं. ’शीलं परम भूषणं’ हे शाळेचं ब्रीदवाक्य आम्हाला घडवत गेलं ते अशा शिक्षकांमुळेच. आज ह्या सगळ्या शिक्षकांची आठवण यायला गुरुपौर्णिमेचं निमित्त नाही आणि हा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रमही नाही. एका निवांत क्षणी, मागे वळून बघताना, शाळेतल्या क्षणांचा हा धांडॊळा आहे आणि ते क्षण उजवळवणाया ह्या शिक्षकांविषयी मनातली अपार कृतद्न्यता कागदावर उतरते आहे.

दरम्यान इतकी वर्ष उलटली शाळेतून बाहेर पडून, तर पुन्हा एकदा जमता येतय का पहावं असा उत्साही प्रयत्न मिलिंद दामले, वैशाली दळवी, प्रिया बेडेकर, स्वप्निल जोशी यांनी एक-दोनदा केलाय. ह्या फेसबुक आणि ऒरकटच्या कृपेने आम्ही बरेच जण एकमेकांच्या संपर्कात आहोत इतकच, त्यापुढे जाऊन एकत्रित भेटण्याची शक्यता आता बहुतेक म्हातारे होऊन सांसारिक जबाबदाया संपल्यावरच. नाही म्हणायला आमचा वर्गातल्या मुलांचा खास ग्रुप अजून एकत्र जमतो, कधीतरी गिरगावतल्या व्हॊइस ऒफ इंडियाच्या इराण्याकडे चार कप चहावर शाळेतल्या दिवसांच्या रम्य आठवणी अजूनही रंगतात. असंच गप्पांच्या ओघात, आम्ही वर्गातल्या मुलांची सगळी नावं त्यांच्या हजेरीपटाच्या अनुक्रमासहित आठवायचा प्रयत्नही करतो.. धम्मालच!

आता भारतात गेलो की प्रत्येक वेळी शाळेत जातो, स्टाफ रुम मध्ये ओळखीच्या बाई भेटतायत का बघतो, भेटता क्षणीच ओळख पटतेच, कुठल्या बॆचचा वगैरे सांगावं लागत नाही. शिक्षकांच्या चेहर्यावरचा आनंद, अभिमान, कौतुक ह्याचं मिश्रण सारं सारं बघून घेतो, मनोमन सुखावतो. मग खाली तळमजल्यावर येतो, घंटा आहे मोठी तासाचे टोले रघूकाका द्यायचे, जे घरपर्यंत ऐकू येतात. तिच्या खाली उभे राहून अंगणात बेफाम धावणाया मुलांकडे बघत हातात वडापाव घेऊन उभा राहतो. ह्यातलाच कोणीतरी उद्या जगाच्या दुसया टोकावर जाईल आणि ह्याच क्षणांची त्तेव्हा अशीच उजळणी करेल काय, आठवण काढेल काय असा विचार करत भरलेल्या डोळ्यांनी, डॊळे भरुन, त्या धावणाया मुलांना मी कौतुकाने पहात रहातो.. पहातच रहतो.

Sunday, December 12, 2010

दाम करी काम येड्या दाम करी काम..

सध्या ऒफिसात बराच व्यग्र असलो तरी एकीकडे वाचन चाल्लय याचं समाधान आहे. एक महत्त्वाचं म्हणजे पूर्वी सारखं एखादं पुस्तक घ्यायचं आणि मग ते डोक्यात घोळवत चवीचवीने वाचायचं किंवा एकदम तुटून पडून संपवायचं असं हल्ली होतं नाही. नेट वरच्या मुबलक लिखाणाच्या वाचनाची आता इतकी सवय आणि चटक लागलेय की निरनिराळे ब्लॊग्स, मराठी संस्थळे, दिवाळी अंक, रोजची वर्तमानपत्रे असं बरच काही डोळ्या खालून जातच. तसंच हे वाचलस का? इथे काय आहे ते पाहिलस का? अशी इ-मेल्स येऊन पडलेली असतातच. त्यामुळेच बरेच विचार घोळतायत सद्ध्या, खूप विषयही आहेत हातावेगळे करण्यासाठी जसं जमेल तसं लिहीनच.

दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांनी निवडणूक एक हाती जिंकली, ती सुद्धा अशी की लालूसह कॊंग्रेसचा सुकडा साफ. बिहारी जनतेचे अभिनंदन करायलाच हवे. भारतात लोकशाहीची मूळे घट्ट असल्याचे पुन्हा एकदा जाणवले हेच खरे. गुजराथ पाठोपाठ आता बिहारनेही जनतेला लागलेली विकासाची ओढ दाखवून दिलेय. ह्याचे दूरगामी परिणाम केंद्रातील राजकारणावर न झाले तरच नवल. जे आमचा विकास करत नाहीत त्यांना आम्ही हकलवणारच हे समीकरण जर लोक दाखवून देत असतील तर निदान जनभयास्तव इतर राज्यसरकारांना आणि केंद्र सरकारला विकास करुन दाखवावा लागणारच. अर्थात नितिशकुमार सरकारवर बिहारला पुढे न्यायची जबाबदारीही आहेच पण तूर्त तरी बिहारच्या विकासासाठी त्यांची अत्तापर्यंतची वाटचाल स्पृहणीयच आहे.

जगाच्या दुसया टोकावरुन ह्या सगळ्याकडे बघताना भारतात एकाच वेळी परस्परविरोधी राजकीय, सामाजिक बदल घडताना दिसतायत. उदाहरणच द्यायची झाली तर, बिहार आणि गुजराथ विकासाच्या रथावर घौडदौड करत असताना, तिथे दक्षिणेत आंध्र आणि कर्नाटकात तसेच आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या नाटकांचे दोन-तीन अंक झाले, राजकारणाला ऊत आला अगदी. एकीकडे भारताची वेगात होत असलेली आर्थिक प्रगती, शिक्षणाचा वाढलेला स्तर, वाढता शेअरबाजार आणि बाहेरच्या जगातून येणारा पैशांचा ओघ, ’तुम्ही ग्रेट आहात’ हे येऊन सांगणारा ओबामा, कॊमनवेल्थ मध्ये कमावलेली पदकं, भारतीय क्रीकेट संघाने मिळवलेले सलग विजय ह्यामुळे भारतीय म्हणून अभिमान वाटत असतानाच एकामागोमाग बाहेर पडणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे (राष्ट्रकूल स्पर्धेतला भ्रष्टाचार, ’आदर्श’ चा भ्रष्टाचार, २ जीस्पेक्ट्रम चा भ्रष्टाचार, कॊंग्रेसच्या महाअधिवेशनात झालेला भ्रष्टाचार, पेण अर्बन बॆंकेचा भ्रष्टाचार इ. इ.) राज्यस्तरीय आणि केद्रस्तरीय पातळीवर वर्षभर चालूच राहीली. म्हणजे करदात्यांचा पैसा ह्या लबाड आणि लुच्च्या, भ्रष्ट राजकाराण्यांनी खाऊन लोकांना हातोहात फसवलेय. जोपर्यंत एखाद्या भष्ट व्यक्तिला (आणि त्याच्या लाभार्थींनाही) तातडीने शिक्षा (प्रसंगी फाशीही) होत नाही, तोपर्यंत भष्टाचार करू पाहाणारे हात आणि मने तयार होत राहाणारच. शैक्षणिक संस्थांमध्ये निती मुल्ये शिकवण्याचे आणि त्यांची जपणूक करण्याचे महत्त्व ठसवण्याचे दिवस आता गेलेत असं निराश होऊन म्हणावसं वाटतं. भष्ट वागण्याविरोधातला शैक्षणिक आणि सामाजिक धाक कमी होत चाल्लाय, जिथे शैक्षणिक संस्थाच डोनेशनचा हट्ट करतात आणि भरमसाट फीया वसूल करतात तिथे त्या मुलांवर त्याविरोधात कसे संस्कार करतील हा प्रश्नच आहे. २०१० हे वर्ष भारतासाठी घोटाळ्यांचे वर्षच ठरावे इतके काळे धंदे एकामागोमाग उजेडात येत आहेत. अति झाले अन हसू आले, अशातला प्रकार होत असून आणि सगळेच राजकीय पक्ष ह्या भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने (आठवा साधनशुचितेच्या गप्पा मारणार्या भाजपाच्या अध्यक्षांनी पैसे घेतल्याची दिलेली कबुली) कुणालाही नैतिक पाया नाही भष्टाचाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी उभे राहाण्याचा, आणि अधिक दुर्देवाची गोष्ट म्हणजे ’हे असंच होणार.. आपण काही करु शकत नाही’ ह्या अगतिकतेपायी, वैषम्यापायी जनता अधिकाधिक उदासीन होत चाल्लेय, ह्या दाहकतेची संवेदनशीलता गमावत चाल्लेय. एकीकडे आपण म्हणतो ’यथा राजा तथा प्रजा’ तर दुसरीकडे ’People deserves the Governance’ म्हणजे लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते असेही परस्परविरोधी बुद्धीभेद करतो. होते काय की एक्मेकांवर ढकलण्यापलिकडे ह्यातून मार्ग निघत नाहीत.

हे असे विचारांचे कल्लोळ चालू असतानाच उदास वाटू लागते, आपला युद्धभूमितला अर्जुन झाल्यासारखं वाटतं आणि मग थोडं खोलात शिरल्यावर, म्हणजे, जे काही भष्टाचार उघड झालेत ह्यावर्षी ते सगळे ह्याच एका वर्षातले आहेत की वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत, मग काय वेगळं घडलं ह्यावेळी.. अशा मार्गाने विचार केला तर मग जाणवतं.. किती तरी समाजसेवकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत, ह्यातले बरेच घोटाळे बाहेर काढलेत. माहितीच्या अधिकाराबाबतची सजगता जसजशी वाढेल आणि त्याचा धाक जसजसा निर्माण होईल तसतशी भष्टाचाराची वृत्ती कमी होईल अशी आशा करायला जागा नक्कीच आहे. शिवाय, युयुआयडी (म्हणजे प्रत्येक माणसास एक क्रमांक, अमेरिकेत एसे.एस.एन. आहे तसा..) योजना जसजशी मार्गी लागेल तस तसा समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत मोजदाद (अकांऊंटिबिलिटी) वाढेल, भष्टाचारास मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.

भारतातील पिढी आता विकासाच्या वेगाला सरावतेय. महाराष्ट्र जर २०१२ पर्यंत वीजेच्या बाबतित स्वयंपूर्ण झाला तर बराच फरक पडेल. रोटी, कपडा, मकान और बॆंडविड्थ ह्यातल्या शेवटच्या उद्देशाला आपल्याला लवकरात लवकर हात घालायला हवा, टेलिकॊमचे जाळे जितक्या लवकर आणि स्वस्त पसरेल तितकी महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या कायमस्वरुपी विकासासाठी ती लाभदायी ठरेल. आमेन! त्याचबरोबर, लवासा सारखे जागतिक पातळीवर दखल घेतलेले प्रोजेक्ट्स आणि जैतापूरचा अणूउर्जा प्रकल्प हे औद्योगिक दृष्टया स्पृहणिय वाटत असले तरी सामाजिक विषमता आणि स्थैर्य अबाधित राहील हे पहाण्यातच सरकारची परीक्षा आहे. आपल्याला ’इंडिया आणि भारत’ तसेच ’भारत आणि हिंदुस्थान’ ह्यांमधले धुमशान परवडणारे नाही त्यामुळे स्थानिक, प्रादेशिक आणि प्रांतिक अस्मिता जपत जग जिंकायचं हे लक्षात ठेवायला हवं.

नुकताच काही म्युच्युअल फंड्स पाहात असताना,
http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=15774 हा लेख वाचनात आला. सद्ध्या, अमेरिकेने नोटा छापायला घेतल्याने डॊलरचं अवमूल्यन झालय. अर्थात हा प्रश्न माझ्या सारख्या अनिवासी भारतियांना अर्थकारणासाठी जिव्हाळ्याचा असल्याने जागतिक अर्थकारण आणि घडामोडींवर लक्ष असतेच. असो, तर प्रस्तुत लेखांत, चीनने जर त्यांच्या मालाला अंतर्गत बाजारपेठ निर्माण केली नाही (internal consumption वाढवले नाही) तर तो स्वत:सकट सगळ्या जगावर आर्थिक संकट ओढवू शकतो. तसेच भारताचा विकासाचा दर हा चीनच्या तुलनेत थोडा मागे असला तरी भारतातला विकास हा भांडवलशाही रुजत असल्याचे आणि पर्यायाने कायमस्वरुपी तसेच स्वयंपूर्ण विकास असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे भारतात लोकशाही असल्याने दाखवलेले आकडे हे चीनच्या आकड्यांपेक्षा विश्वासार्हच आहेत. सांगायचा मुद्दा काय, तर चीनची भीती बाळगायचं कारण नाही, इतके कोट्यावधी रुपयांचे भष्टाचार उघडकीला येऊनही जागतिक बाजार भारतात पैसे गुंतवतोय म्हणजे आज जग भारताकडे विश्वासाने, आशेने बघतय, आपण तो विश्व्वास सार्थ ठरवायलाच हवा. चीनमध्ये मानवी मूल्यांची होणारी पायमल्ली, सरकार करत असलेली सामाजिक दडपशाही, मिडीयाला नसलेले स्वातंत्र्य, इटरेनेटवर प्रतिबंध ह्यामुळे समाजवादापुढे अपारदर्शकतेचे, स्वातंत्र्याच्या गळचेपीचे प्रश्नचिन्ह. रशिया आणि इतर ठिकाणी झालेला साम्यवादाचा पाडाव. इथे अमेरिकेत अनिर्बंध भांड्वलशाही आणि Too big to fall म्हणत नंगानाच करणाया बड्या कंपन्यांनी सरकारला वाकवूवन जनतेचे पैसे TARP (Troubled Assets Relief Program) द्वारा हडप करुन वर त्यातून बोनसही घेतल्याचे आपण पाहिले, भारतात लायसन्स राज, लाल फितीचे राजकारण संपून कॊर्पोरेट स्पर्धेतून विकास सामान्य माणसापर्यंत पोहोचतोय पण ह्या भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय आणि किती खोल लागलेय वाळवी कळत नाहीये, मग काय योग्य या जगात हेच कळेनासं झालय ह्या क्षणाला, पुन्हा एकदा युद्धभूमीवरचा अर्जुन!

मिसळपावर सुधीर काळे यांनी http://www.misalpav.com/node/15799 येथे एका पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केलेय, "भारतीय - कसा मी? असा मी". वाचायला हवंच हवं असं हे पुस्तक, मूळ लेखक आहेत श्री. पवनकुमार वर्मा (भारताचे सद्ध्याचे भूतान येथील राजदूत). आजच्या घडीच्या भारताच्या प्रगतीचा वेग, भारताची जगाला असेलेली ओळख ह्याचा यथार्थ आणि अभ्यासपूर्ण उहापोह या पुस्तकात केलेला आहे असं कळतं.

एकूणच, समाजवाद की भांडवलशाही हे द्वंद्व डोक्यात सुरु झालं की लहानपणी चाळीत वासुदेव गिरक्या घेत गायचा त्याचं हटकून आठवणारं गाणं.. बाबूजींनी गायलेलं माझं अतिशय आवडतं.. लोकसंगीताचा उत्तम नमुनादेखील..

वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


पैशाची जादू लयी न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागून धाव
जल्मापासनं साधी मानसं ह्या पैशाची गुलाम रे..
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

कुनी जुगार सट्टेबाज, कुनी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुनी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखूर सुटला फेकला त्याने लगाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

या कवडी दमडी पायी कुनी राखूस ठेवी जीव
कुनी डाका दरोडा घाली कुनी जाळून टाकी गाव
बगलं मंधी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळाला फास
ठरल्यालं लगिन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं श्रीमंतिनं हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

वाड्यात पंगती बसल्या लयी अग्रव जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आगं
संसाराचं ओझं घेउन कुनी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

नाचते नारीची अब्रू छन छुम्मक तालावरती
पैशानं बायको खूस पैशानं बोलते पीरती
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम..
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

आपले भ्रष्टाचारी तर हेच म्हणत नसावेत, दाम करी काम? :(