Thursday, June 25, 2009

भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग १

ईस्ट कोस्टवरच्या मर्टल बीच वरून परतेपर्यंत एकीकडे पश्चिम किनायावरच्या सुट्टीचे आणि भटकंतीचे प्लान्स तयार होत होते. २५ च्या लॊंग विकेंडला धरुन साधारण दहा दिवसांची ट्रीप आम्ही आखत होतो. आमच्या बयाच मित्रमैत्रिणींनी ह्या ट्रीपविषयी आणि प्लानिंग विषयी विचारल्याने त्याबद्दल थोडं इथे लिहीण्याचं ठरवलय. कुठेही फिरायला जाण्याचा विचार करण्यापूर्वी तिथे नेमकं आपण कशासाठी जात आहोत हा विचार आधी करण आवश्यक आहे (पु,ल. नी ’म्हैस मध्ये कोकणाच्या प्रवासात मी इथे का आलो असा विचार करत हळहळ व्यक्त केलेय म्हणून म्हटलं आपण सुधारावं! ;) ). कधी कोणाला फक्त भेटायला म्हणून तर कधी धार्मिक स्थळास भेट म्हणून, कधी निव्वळ विश्रांती किंवा हवापालट म्हणून तर कधी इथल्या पार्कांमध्ये मानवनिर्मित अचाट प्रयोग अनुभवण्यासाठी तर कधी निसर्गाची भव्य आणि दिव्य रुपे बघत अचंबित होण्यासाठी आपण फिरतो. मीना प्रभूंसारखं भेट देणाया भागाबद्दल विस्तृत वाचन करणं जरी शक्य नसलं तरी इंटरनेटच्या कृपेने बरीच माहिती मिळू शकते. ही माहिती वाचून आपल्याला त्यातलं काय बघायचंय, कसं बघायचय, किती प्रवास स्वतः करायचाय, कुणाला भेटायचय हे सगळं नोंदवलं आणि सुसंगत केलं की झालं प्लानिंग. प्रवास जास्तीत जास्त आरामदायी आणि आनंददायी असण्याकडे आमचा कल होताच. पश्चिम किनायावर राहाणाया बयाच मित्रमैत्रिणींकडून मूलभूत माहिती मिळाली होती त्याचा फायदा झाला. लॊंग विकेंड असूनही तीन महिने आधी बुकींग केल्याने सुदैवाने आम्हाला विमानाची तसेच इतर सोयीची तिकीटे मिळाली.

पूर्वतयारी
१. फ्लाईट टिकीट्स -मागच्यावर्षी ईस्ट कोस्ट फिरायला जाताना डॆलास वरून व्हर्जिनियाला विमानाने गेलो होतो आणि परतलो न्यू जर्सीवरुन. ही अशी वन वे फ्लाईट्स थोडी महाग पडली तरी वेळेच्या बचतीच्या दृष्टीने आणि प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी पडतात, दगदगही कमी होते. ह्यावेळी सुद्धा कोलंबिया ते सॆन फ्रान्सिस्को आणि लॊस एंजिल्स ते कोलंबिया अशी वन वे टिकीट्स काढली होती.
२. प्रवासी कंपनी टीकीट्स -
बरीच शोधाशोध केल्यावर आम्ही’ ’गो टू बस’ ह्या प्रवासी कंपनीची निवड केली. प्रवासी कंपनीचा विचार करण्याची कारणे म्हणजे
अ. कमी वेळात अधिक ठिकाणे पहाता येणे
ब. सोबत असलेल्या गाईड द्वारे अधिक आणि अचूक माहिती मिळणे
क. ह्या स्थळांना भेट देणे हे मुख्य प्रयोजन (तिथे काही दिवस/रात्र राहून एखादे ठिकाण एक्स्प्लोअर करावयाचे असा विचार नव्हता)
ड. प्रवास आरामदायी व्हावा आणि दगदग होऊ नये, जेणे करून वेळेची आणि श्रमांची बचत होईल
इ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास व्हेगाज ला सगळी मजा रात्रीच अनुभवायची असल्याने दिवसा गाडीत विश्रांती होईल आणि रात्री कॆसिनोज मध्ये फिरायला उत्साह राहील असा विचारही त्या मागे होता. तसेच नेवाडाच्या रुक्ष वाळवंटातून उन्हातून गाडी हाकताना होणारी दमछाक, नको तितका डोळ्यांवर येणारा आणि वाळूकणांवरून परावर्तित होणारा प्रखर सूर्यप्रकाश हे टाळायचं असेल तर बसचा प्रवास हा मार्ग सगळ्यात उत्तम होता.
त्यांच्या साईट वर विविध प्रकारची पॆकेजेस गोटू बस ने दिली आहेत, त्यांविषयी माहिती http://www.gotobus.com इथे पहाता येईल. आम्ही सॆन फ्रान्सिस्को, योसेमिटी, लास वेगास, ग्रॆंड कॆनियन (वेस्ट रीम) असं चार दिवसांच प्रवासी पॆकेज निश्चित केलं होतं.
३. एमट्रॆक टिकीट्स -
सॆन फ्रान्सिस्कोवरुन लॊस एंजल्सला येण्यासाठी ’स्टार लाईट’ ह्या निसर्गसौंदर्याने परिपूर्ण अशा कोस्टल रेल्वे लाईनची आम्ही निवड केली. एक महिना आधीच बुकिंग केल्याने आम्हाला एक स्वतंत्र केबिन वाजवी दरात बुक करता आली.
४. स्थानिक आकर्षणांची टिकीट्स -
सॆन फ्रन्सिस्को सिटी टुर्स तसेच स्थानिक फिरणाया ठिकाणांची तिकीटे आधीच काढल्यास पुष्कळदा स्वस्त पडतातच शिवाय वेळही वाचतो.
५. कार रेंटल आणि हॊटेल रेंटल -
तुमचं वेळापत्रक ठरलं की हे सुद्धा वेळेवर करण महत्त्वाचं आहेच. (तुमच्याकडे AAA चे सभासदत्व असेल तर दरांत थोडी फार सूट नक्कीच मिळते.)

विमान, रेल्वे आणि वर म्हटलेल्या सर्व प्रकारच्या तिकीटांची एक फाईल करून बरोबर ठेवली होती. त्याच फाईल मध्ये संपूर्ण दहा दिवसांचे ढोबळ वेळापत्रक, ज्या ठिकाणी जायचय त्यांचे पत्ते, फोन नंबर एकत्र करून ठेवले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे मॆप्सही मॆपक्वेस्ट वरुन घेऊन फाईलमध्ये ठेवले होते. जीपीएस जवळ असला तरी न जाणॊ ऐनवेळी गडबड नको. शिवाय अनोळखी ठिकाणी प्रवासापूर्वी रस्त्याचा साधारण अंदाज असलेला केव्हाही चांगला.

दिवस पहिला (कोलंबिया ते सॆनफ्रान्सिस्को):
शुक्रवारी संध्याकाळी कोलंबिया एअरपोर्टवरून आम्ही निघालो आणि अटलांटाला कनेक्टींग फ्लाईट पकडून रात्री सॆन फ्रान्सिस्कोला पोहोचलो. प्रवास जरी सहा सात तासांचा असला तरी वेळेच्या फरकामुळे पोहोचेपर्यंत रात्रीचे साडे नऊच झाले होते. एअरपोर्टवरून बाहेर रस्त्यावर येताच पहिल्यांदा जाणवलं ती सॆन फ्रान्सिस्कोची थंड आणि प्रसन्न हवा :)

दिवस दुसरा (योसेमिटी नॆशनल पार्क):शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता सॆन मटीओ येथून गो टू बस कंपनीच्या बसने आम्हाला घेतले. बस (व्होल्वोसारखी) चांगली ऐसपैस आणि वातानुकूलित होती. शिवाय त्यात मागे रेस्ट रूमही होती. बसच्या काचा मोठ्या असल्याने बाहेरच्या गोष्टी बघणे सहज शक्य होते. आमच्या बरोबर प्रवास करणायांपैकी बहुतेक जण अमेरीका फिरायला आलेले एशियन होते. त्यात बरेचसे चायनीज आणि थोडेफार भारतीयही होते. सॆन मटिओ वरुन बसने माऊंटन व्ह्य़ू मधून चक्कर मारून सिस्को, ऎप्पल ह्या अव्वल दर्जाच्या कंपन्यांच्या मुख्यालयातून फिरवून फ्री मॊंटच्या दिशेने कूच केले. तिथून काही प्रवाशांना घेऊन आम्ही योसेमिटीच्या दिशेने निघालो. योसेमिटीला पोहोचायला आम्हाला साधारण दोनशे माईल्स अंतर कापायचे होते. दोन्हीबाजूस शेते, फळबागांमधून बस पळत होती. कॆलिफॊर्नियाचा हा शेतीसमृद्ध भाग, लांबपर्यंत पसरलेली आधुनिक तंत्रद्न्यानानी नटलेली शेते, त्यावर थुईथुई नाचणारे स्प्रिंकलर्स, अवजड यंत्रे सगळं बघत बघत आम्ही पुढे सरकत होतो. आमचा गाईड (त्याचं नाव हॆंस) प्रत्येक ठिकाणाची माहिती चायनीज आणि इंग्रजीतून देत होता. दुपारी वाटेवरच जेवण उरकून आम्ही आमचा प्रवास पुढे सुरू केला आणि योसेमिटीला साधारण दोनच्या आसपास पोहोचलो. साधारण १२२० चौ. मैल पसरलेले योसेमिटी १८९० मध्ये ’राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित झाले. अमेरिकेत एकूण अशी ६२ राष्ट्रीय उद्याने आहेत. दरसाल जास्तीत जास्त पर्यटक येणारे योसेमिटी हे तिसया क्रमाकांचे राष्ट्रीय उद्यान. स्मोकी माऊंटन नॆशनल पार्क हे नॊर्थ कॆरोलिना मधले प्रथम क्रमांकाचे असून ग्रॆंड कॆनियनचा दुसरा क्रमांक लागतो. लक्षात घेण्यासारखा फरक असा की स्मोकी माऊंटन येथे बाराही महिने चांगले हवामान उपलब्ध असल्याने, पर्यटक वर्षभरात कधीही येऊ शकतात परंतु भरपूर स्नो, खूप थंड किंवा खूप उष्ण अशा हवामानांमुळे योसेमिटी तसेच ग्रॆंड केनियन मध्ये पर्यटक वर्षातील विशिष्ट काळीच येणे पसंत करतात. प्रत्येक नॆशनल पार्कमध्ये साधारण वीस ते चाळीस डॊलर प्रवेश फी भरावी लागते. पण सिनियर्स सिटीझन्स ना अगदी मामुली दरात कुठल्याही नॆशनल पार्क मधे प्रवेश मिळतो.

मे च्या दरम्यान योसेमिटीला येण्याचा आम्ही विचार केला ह्याचं अजून एक कारण म्हणजे वरच्या डोंगरांवरचा बर्फ वितळून ठिकठिकाणी कोसळणारे विलोभनीय धबधबे ह्या वेळे दरम्यान (केवळ चार ते सहा आठवडेच) पहावयास मिळतात. त्यानंतर हा भाग वाढत्या उन्हाळ्यामुळे शुष्क होऊ लागतो. योसेमिटी दरी ही सात मैल लांब आणि एक मैल रूंद असून उंची समुद्रसपाटीपासून साधारण ४००० फूट आहे. एल कॆप्टन शिखर, हाफ डोम अशा ठिकाणी ती ८००० फूटांपर्यंत जाते. बसमधून जाताना हंस आम्हाला व्हॆलीविषयी माहिती देत होता, शिवाय मधूनच डोकावणारे धबधबे, त्यांची पर्यटकांनी दिलेली नावे, दूर दिसणारी एल कॆप्टन, हाफ डोम ची पर्वत शिखरे, त्यांवर चमकणारे बर्फ (ग्लेशियर), अगदी ’पहाता किती पाहशील दोन नयने’ होत होते.

बस ठिकठिकाणी थांबून आम्ही हजारो फूटांवरुन कोसळणारे धबधबे दोन्ही बाजूस पहात होतो. घोड्याच्या शेपटी सारखा दिसणारा हॊर्श टेल वॊटरफॊल खूप्पच छान दिसत होता. न संपणाया पर्वतरांगांमधून वळणावळणाचा रस्ता घेताना अगदी मुंबईतून देशावर किंवा कोकणात जाताना लागणाया घाटांची आठवण येत होती. मध्येच थांबून आम्ही जवळच असलेल्या ब्रिडल व्हील फॊल (Bridal Veil Fall) पर्यंत थोडं चालत गेलो आणि उभ्या सुळक्यामधून कोसळणारा धबधबा पाहिला. तेथेच बाजूला वहात असलेली मर्सिड रीव्हरही पाहिली.

रेस्ट एरियामध्ये बस थांबली आणि आम्ही जथ्थ्याने पायी फिरायला बाहेर पडलो. जवळच असलेल्या लोअर योसेमिटी फॊलपर्यंत थोडं चालत गेलो. प्रत्यक्ष धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिथे लाकडी ट्रेल बनवला आहे. तापमान साधारण ७५ फॆ च्या आसपास असावे. वळणावळणाने ट्रेलवरुन जात पाण्याच्या आवाजाच्या दिशेने सरकत आम्ही थेट धबधब्यापाशी जाऊन पोहोचलो. पाण्याचा स्त्रोत इतका प्रचंड आणि वेगात होता की मान वरुन करुन पाहाणेही शक्य नव्हते. पांढया शुभ्र पाण्याचा धबधबा जोरदार आवाज करत कोसळत होता. सगळे वातावरण मिस्टी आणि दुधाळ झाले होते. प्रत्यक्ष धबधब्याजवळ पाण्याचे थंडगार तुषार झेलत भिजण्यात (विशेषत: बाहेर इतकं जास्त तापमान असताना) विशेष मजा येत होती. थंड हवेच्या ठिकाणी असल्यासारखेच तिथे वाटत असल्याने ह्या लोअर योसेमिटी धबधब्यात भिजण्याचा हा अगदी चिंब आल्हाद दायक अनुभव! त्याच वाटेवरुन एल कॆप्टनच पर्वत शिखर दिसतं. हा म्हणजे साधारण ३००० फूटांचा अतिप्रचंड सुळका. पूर्ण ग्रॆनाईटचा बनलेला हा पर्वत सर करणे जगातील प्रत्येक रॊक क्लायंबर्सचे स्वप्न. सरासरी एवढी उंची रॊक क्लायंबिंग करून गाठायला तरबेज क्लायंबरला सुद्धा चार ते पाच दिवस लागतात. ह्या अतिविशाल दगडावर सुद्धा स्पीड क्लायंबिंग करून काही तासात जाणारे महाभाग आहेत. :-)

योसेमिटीशी माझी पहिल्यांदा ओळख झाली जेव्हा मी एका पुस्तकात हाफ डोमविषयी वाचलं. हाफ डॊमने मग कुतुहूल इतक जागृत केलं की आम्ही दोघं हाफ डोमवर ट्रेकींग करता येईल का असा विचार करू लागलो. त्या अनुषंगाने करी व्हिलेज मध्ये राहायची व्यवस्था (जवळ जवळ सहा महिने आधी बुकिंग करावे लागते), शरीराला सवय होण्यासाठी नियमित व्यायाम वगैरे तयारी करणं आवश्यक होत, One Best Hike: Yosemite's Half Dome हे Rick Deutsch चं पुस्तकही विकत घेतलं. पण मग वेळेअभावी हा विचार सोडून द्यावा लागला. ह्यामुळे दुरून का होईना पण हाफ डोम पाहाता येणार म्हणून आम्ही दोघेही उत्सुक होतो. ८८४२ फूट उंच असलेला हाफ डोम ग्रेनाईटचा बनलेला आहे. हा मुळत: पूर्ण डोंगर असून आईस एज दरम्यान बर्फाने दुभंगला गेल्याने ह्याचा अर्धा भाग कोसळला असे म्हणतात. हाफ डोम वर जाणारी हाईक साधारण १७ मैलांची असून साधारण १० ते १२ तास लागतात. प्रचंड हिमवर्षाव, पाऊस होत असल्याने ही हाईक वर्षातील चार ते सहा महिनेच शक्य होते. तसेच हाईक एकाच दिवसात पूर्ण करावी लागते त्यामुळे पहाटे लवकर निघून दुपार पर्यंत हाफ डोमवर पोहोचावे लागते. हाईकचा शेवटचा टप्पा विशेष कठीण असून केबलच्या तारांवरून जवळ जवळ ८०-९० अंशातून शरीरावर ओढून अरूंद मार्गावरून पुढे सरकावे लागते. अर्थात वर पोहोचल्यावरचे दृश्य विहंगम असणारच ह्यात शंका नाही. जगातील कुठल्याही कसलेल्या गिर्यारोहकाला सर करण्यात अभिमान वाटेल असा हा हाफ डोम. निव्वळ हाफ डोम सर करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील गिर्यारोहक अमेरिकेत आणि योसेमिटीमध्ये येतात. तर असा हा हाफ डोम डोळे भरून पाहून घेतला आणि आम्ही बसने टनेल व्ह्यू च्या दिशेने निघालो.


योसेमिटीच्या पार्कच्या कुठल्याही माहितीत सगळ्यात जास्तीवेळा वापरण्यात येणारा कुठला फोटॊ असेल तर ह्या टनेल व्ह्यू स्पॊट वरुन घेतलेला. सगळं योसेमिटी पार्क सौंदर्य उघडून उभं राहतं समोर.योसेमिटीत येणाया प्रत्येकाने आलच पाहिजे असं हे ठिकाण. डाव्या बाजूस एल कॆप्टन, समोर क्लाऊड्स रेस्ट आणि हाफ डोम हे सुळके, त्याच्या उजव्या बाजूस सेंटिनेल डोम, सगळ्यां उजवीकडे कॆटेड्रेल स्पायरस हा सुळका आणि त्याच्या मधून कोसळणारा ब्रिडल व्हील फॊल्स. त्यातून भर म्हणजे डोंगर माथ्यावर पांढया जावळा सारखं दिसणारं आणि उन्हात चमकणारं ग्लेशियर (बर्फ). अगदी पंचपक्वान्नाची मेजवानीच निसर्गाने मांडून ठेवलेय. आयुष्यभरात इतक नयनरम्य दृश्य आपण क्वचितच पाहिलं असेल असं वाटल्यावाचून राहात नाही आणि वेगवेगळ्या कोनांतून कितीही फोटॊ काढले तरी मन भरत नाही. तृप्त मनाने आम्ही योसेमिटीतून बाहेर पडलो आणि रात्रीच्या मुक्कामी फ्रेस्नो शहराकडे निघालो.

- क्रमश:

Wednesday, June 3, 2009

यह शाम मस्तानी..


स्प्रिंग सुरु झाला आणि गेले दोन महिने भटकंती सुरु झालेय. म्हटलं ऊन मी म्हणायच्या आत बाहेर पडावं, मोकळेपणे भटकून घ्यावं. ’लेक मरे’ आणि जवळपासच्या ठिकाणांवर भटकतानाच पटकन व्हर्जिनिया टेक वरुन वरती वॊशिंग्टन डीसी पर्यंत ड्राईव्ह करुन आलो, ते चेरी ब्लॊसमची धुंदी अनुभवण्यासाठी.

मे मधल्या दहा तारखेच्या विकेंडला आम्ही मर्टल बीच आणि आसपास फिरून आलो. पूर्वी साधारण २००२ मध्ये लिंचबर्ग मध्ये असताना आम्ही सगळे बॆचलर्स आलो होतो इथे. माझा हा एक अतिशय आवडता बीच ईस्ट कोस्ट वरचा. आता पुन्हा तो नव्यानेच सामोरा आला.

मर्टल बीच हे खरं म्हणजे ’फॆमिली व्हेकेशन’ म्हणून वसवण्यात आलेलं ठिकाण. सगळ्या वयांच्या माणसांना हरखून टाकतील असे त्या त्या वयातील उद्योग इथे आहेत, इतके छान की केवळ प्रत्येकासाठी तरी इथे यावच. लहान मुलांसाठी उत्तम वॊटर पार्क आहे, इतर खेळ/ पार्कही आहेतच. पूर्व किनायावरची अतिशय उत्तम शॊपिंग आऊटलेट्स इथे आहेत. नायकी, रीबॊक, हॆगर, व्हॆन हुसेन, नॊटीका, पोलो, गॆप तसेच इतर अनेक नामांकीत ब्रॆंडसची दुकानं इथे टॆंजर मॊल मधे आहेत. आम्हाला दोघांना अशी आऊटलेट आवडण्याच कारण म्हणजे चांगल्या ब्रॆंड मध्ये खूप चांगली विविधता पहायला मिळते शिवाय किंमतही बरीच वाजवी असते. मर्टल बीच परिसरात नुसतं रस्त्यानं फिरलं तरी हार्ले डेव्हीडसन घेऊन बायकींगची नशा अनुभवणारे बघितले की मस्त वाटतं. ह्या बाईकांचे (बायकांसारखेच) नखरे तरी किती, उंच हॆंडल वाली, मागे रेलणारी, लांब दांड्याची काय न काय. त्यावर बसणायांचा थाट तर विचारू नका. असं सुसाट तरुणाईने भारलेलं वातावरण बीच च्या आसपास. ह्याशिवाय इथे उत्तम गोल्फ कोर्सेसही आहेत. साऊथ कॆरोलिना हे राज्य गोल्फ साठी अतिशय सुप्रसिद्ध आहेच, इथे ऒगस्टा मध्ये अतिशय प्रतिष्टेच्या गोल्फ स्पर्धा दरवर्षी होतात. केवळ गोल्फ खेळण्यासाठी मर्टल बीचला येणारा (बयाचश्या निवृत्त) धनदांडग्यांचा अजून एक वर्ग आहे. अजून एक इथली आवडलेली बाब म्हणजे, समुद्रकिनायाला खेटूनच हॊटेल्स आहेत. हॊटेलच्या आवारात गाडी पार्क केली तर पार्कींगचा मोठा प्रश्न सुटतो. हॊटेल मधून बीच वर जायला हॊटेलच्या आतूनच रस्ता असल्याने समुद्रकिनायावर कितीही धुमाकूळ घालायला आपण मोकळेच. तिथल्या लांबच लांब समुद्रकिनायाच्या ओल्या वाळूत फिरण्यात विलक्षण मजा आहे. इथे पूर्व किनायावर अटलांटीक सीटी, न्यू जर्सीचं पॊईंट प्लेजर ते अगदी खाली मियामीचा साऊथ बीच, की वेस्ट अशा बयाच समुद्रकिनायांवर अत्तापर्यंत भटकंती झालेय. आम्हाला दोघांनाही सूर्यास्त पहाण्याचं वेड आहे. त्यावेळची ती बदलती रुपं, लाल पिवळा तेजोनिधी लोहगोल, त्याचं ते मावळतीचं तेज, संध्येच्या रंगाची उधळण आणि बघता बघता मावळणारा सूर्य, ती कातरवेळ, ते ’मावळत्या दिनकर’ चे मनात उमटणारे स्वर. दररोजचा सोहळा पण प्रत्येक वेळा नवीन रुपात, अगदी नव्या कोर्या उत्साहाने निसर्गाने मांडलेला. हे सगळं वेगवेगळ्या किनायांवरून बघायला आवडतच, इतकच काय तर एखाद्या निवांत संध्याकाळी घराबाहेरच्या तळ्याशेजारुनही सूर्यास्त खुणावतोच. ’की वेस्ट’ चा सूर्यास्ताने असंच वेडं केलय पूर्वी (त्याचा फोटॊ मी ऒरकूटवर लाईफ टाईम मोमेंट्स मध्ये ठेवलाय), बाकी ह्या इतर ठिकाणी पूर्व किनारा असल्याने समुद्रातून ’सूर्योदय’ होतो आणि ’सूर्यास्त’ किनायावर. मियामीला मुद्दाम मी असा समुद्रातून होणारा सूर्योदय टिपला होता. माझ्यासारख्या (पश्चिम किनारी) मुंबईत वाढलेल्याला हे एक अप्रूपच! (त्याच्या आदल्याच दिवशी सूर्यास्ताच्यावेळी मियामीच्या साऊथ बीच वर समुद्रावर निरभ्र विस्तीर्ण आकाशात एकावेळी दोन इंद्र्धनुष्य पाहाण्याचाही योग आला होता).


बरेच दिवस खोल समुद्रात जाऊन सूर्यास्त पहाण्याचं मनात होतं आणि मग तसं ठरवून मर्टल बीच पासून एका तासावर असलेल्या जॊर्ज टाऊन हया छोटेखानी शहरात आम्ही एक प्रायव्हेट यॆच (शिडाची होडी) बुक केली. संध्याकाळी साडेसात चा सूर्यास्त होता. साधारण साडेपाच च्या आसपास आम्ही तिथे पोह्चलो. जॊर्ज टाऊन हे इथल्या टीपीकल जुन्या, छोट्या शहरांसारखं एक मेन स्ट्रीट आणि कोर्ट स्ट्रीट सारखे एक दोन मोजके रस्ते आणि छॊटी दुकानं/ जुन्या वळणाची घरं असलेलं गाव. पटकन कुठल्यातरी गल्लीतून टांग्यात बसून साहेब येईल असं वाटावं इतकं सुबक आणि नेटकं. तिथे थोडं भटकून आम्ही लगेच बोटींचा ताफा असलेल्या किनायावर आलो. आमचा नाविक डेव्ह वाट बघत होताच. साधारण साडेसहाच्या सुमारास आम्ही तिथून एका छोट्याश्या कनू मधून किनायापासून लांब उभ्या असलेल्या शिडाच्या बोटीकडे (यॆच) निघालो. कनूवरुन त्या बोटीवर पोहोचलो आणि निवांत पसरलेलं ते अटलांटीक समुद्राचं पाणी पहाताक्षणी वेगळ्या विश्वात घेऊन गेलं. डेव्ह हा रीटायर्ड मरीन ऒफीसर. ही बोट हेच त्याचं घर. त्याच्या बायकोने आम्हाला त्या बोटीची आतून सफर करवून आणली. खाली उतरून आत जायला जिना होता, बोटीतल्या त्या तळघरात अद्ययावत सोयी होत्या. दोन बेड, किचन अगदी व्यवस्थित आणि इंटरनेटही. ही बोट हेच ह्यांच आयुष्य आणि उपजीविकेचं साधन देखील. सोबतीला एक गलेलठ्ठ बोकाही. पुन्हा वरती डेक वर येऊन आम्ही जागा घेतली आणि वायाचा अंदाज घेत डेव्ह ने शिड सोडलं. पूर्वी कीवेस्ट ला स्नॊर्कल्रिंग करताना एकदा आम्ही शिडाच्या बोटीत बसलो होतो पण आज फक्त आम्हीच बोटीवर असल्याने वेगळीच मजा होती. समुद्राचं वारं पित आणि बोटीवर आदळणाया लाटांचा मंजूळ आवाज ऐकत आमची बोट जसजशी पुढे जाऊ लागली तसतसा किनारा हळू हळू दिसेनासा झाला. बदलणारी हवा आणि त्याचा वेग ह्याचं व्यवस्थित द्न्यान असल्याने डेव्हने बोटीचा वेग आणि दिशा अचूक पकडली होती. अशा छोट्या शिडाच्या बोटींचा फायदा असा की वायावर बोट हाकली जाते त्यामुळे इंधनाची बचत, शिवाय डीझेल वापरले जात नसल्याने त्या दुर्गंधीने मळमळीचा त्रासही नाही. जसजसं सूर्यास्त जवळ येत होता तशा आमच्या गप्पा अबोल झाल्या. दिड्मुख होऊन ते क्षण आम्ही अनुभवत होतो.

लांब दिसणाया डोंगरा आड बघता बघता तो लाल गोळा खाली जात होता. असंख्य रंगाची उधाळण एव्हाना सुरु झाली होती. ते सूर्याला लपवणारे लांबचे डोंगर सोडले तर पाणीच पाणी चहूकडे असल्याने ही रंगांची उधळण कुठल्याही अडथळ्याविना अनुभवता येत होती. ’सूरमयी शाम’, ’वो शाम कुछ अजीब थी’, ’ये शाम मस्तानी’, ’संधिकाली या अशा’ अशी काय न काय गाणी आम्हाला आठवायला लागली. किती उपकार करुन ठेवलेत नाही ह्या गीतकारांनी, संगीतकारांनी आणि गायकांनी. त्या संध्याकाळचे अगदी कातरवेळेत रुपांतर होऊन संध्याछाया भिवविती हृदया अशी मनाची स्थिती होईपर्यंत आम्ही त्तो सोहळा अनुभवला, उपभोगला आणि साठवला. मावळत्या दिनकरास दोन्ही करांनी वंदन केलं तेव्हा समुद्राच्या लाटांवर अवखळपणे पसरलेल्या त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्याने आम्हाला कधी वेढलं कळलही नाही. आम्ही सगळेच अगदी निश:ब्द झालो होतो. मग डेव्हने परतीच्या प्रवासासाठी शिडाची दिशा बदलली आणि किनायाच्या ओढीने आमची बोट सरकू लागली. इथे येताना खारा वारा कितीही प्यायला तरी तृप्त वाटत नव्हत, पण जाताना तेच आता शांत, संयत आणि गंभीर वाटत होतं. त्या पिठूळ चांदण्याच्या प्रकाशातच पाण्यातच आम्ही बोटीवरून केनूवर उतरलो आणि समुद्रकिनायाकडे परतलो. तिथून पुन्हा गाडीने तासभर प्रवास करून मर्टल बीचवर. हॊटेलवर येताना लक्षात होतंच अनायसे पौर्णिमा आहे.
अतिशय शांत समुद्र आणि चमचमणारी वाळू, पिठूळ चांदण्यात आपलं सौंदर्य उघडून बसलेला तो समुद्रकिनारा अगदी हॊटेलमधून सुद्धा प्रसन्न दिसत होता. ह्यावेळचा वाढदिवस अशा भारलेल्या वातावरणात साजरा करता आल्याने हे असं कायम लक्षात राहील.


इथून परततोय तोच लग्गेचच्याच शुक्रवारी आमची पश्चिम किनायाची सफर ठरली होती. त्याच्या आखणीविषयी लिहिण्याचं बयाचं मित्रमंडळींनी सांगितलय, वेळ झाला की इथेच हातावेगळं करेन. तोपर्यंत च्याव!

Monday, March 30, 2009

Netflix rocks!!

बर्‍याच दिवसांनी लिहितोय. थंडी बरोबर तिने आणलेला थोडासा आळसही निघून गेलाय. झाडांचं रुप पालटताना बघण हा विलक्षण सुंदर अनुभव जाणवतोय इथे. थंडी ओसरतेय तसा बर्‍याच झाडांवर पांढर्‍या फुलांचा मोहोर येतोय आणि आठवड्याभरात तो गळून पडून नवीन हिरवी कंच पालवी फुटतेय. त्यात पाऊस पडला की सगळी झाडं न्हालेल्या गृहिणी सारखी तेजःपुंज आणि प्रसन्न दिसतात. एकंदर निसर्गाने अगदी उधळून बरसात केलेय इथे. आता वेळ मिळेल तशी आणि तितकी भटकंती सुरु..

कोलंबिया डायरी:
नवीन ठिकाणं, नवीन काम, नवीन माणसं ह्यात आता आम्ही छान रुळलोय. थंडी बरीचशी ओसरून आता
हवा छान झालेय. चेरी ब्लॉसम बघण्याचे तसेच भटकंतीला बाहेर पडण्याचे कार्यक्रम ठरू लागलेत.
कामाचा जोर (सुदैवाने) खूप आहे इथे आल्यापासून, वाचन बरच मंदावलय. दरम्यान नेटफ्लीक्सची व्हिडीओ लायब्ररी लावलेय (Yes! Netflix rocks!), त्यामुळे खूप चांगले चित्रपट पाहून होत आहेत सद्ध्या. काही जुने पिक्चर्स त्याच्या साईटच्या माध्यमातून चकटफु पाहाण्याचीही सोय केली आहे त्यांनी, हा त्यांचा अतिशय स्पृहणीय उपक्रम. थँक्स गिव्हींगच्या वेळी सोनी ब्रॅव्हियो घेतला (३२ इंच फ्लॅट स्क्रीन) त्यामुळे असे चित्रपट पहायला खूप मजा येतेय. तर गेल्या दोन महिन्यात पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांची ही यादी :-
Beatiful Mind
Big Daddy
Life is beautiful
Father of the bride - 1
Father of the bride - 2
Forest Gump
Finding Nemo
Ice Age
Miss Congeniality - 1
Miss Congeniality - 2
Cast Away
Honey I shrunk the kids
Not without my daughter
Phone booth
Eagle eye
The mask

डिस्ने चे चित्रपट आम्हाला दोघांनाही खूप आवडतात. ते पहाणे आहेच शिवाय फ्रेंड्स च्या सगळ्या सिझन्सची पारायणे झाली आहेत, एव्हरी बडी लव्हस रेमण्ड्स सुद्धा बघतोय आम्ही. त्यातले निख्खळ विनोद, परिस्थितीजन्य विनोद नकळत दाद घेऊन जातात.

शिवाय बावर्ची, रंगबीरंगी, रब ने बना दी जोडी असे काही हिंदी चित्रपटही पाहिले गेल्या महिन्याभरात. स्लम डॉग मिलिनेअर तर चक्क इथे थिएटरला लागला होता जवळच तर तिथे जाऊन पाहिला. माझ्या लाडक्या मुंबईला पहाताना अगदी भरून आलं (तसच काहीसं 'तारे जमीन पर' मधल्या गाण्यातली दक्षिण मुंबई डॅलसला थिएटर मध्ये बघताना झालं होतं). हो पण स्लम डॉग मिलिनेअर अंगावर आला पण पहाताना.

पाहिलेल्या ह्या प्रत्येक चित्रपटाबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे, पण वेळेअभावी ते शक्य नाही तरीही
प्रत्येक पिक्चर आम्ही अगदी छान उपभोगलाय. कधीतरी वेळ झाला, मूड लागला तर अवश्य लिहीन कुठल्या ना कुठल्या चित्रपटाविषयी, त्यातलं काय अपील झालं, रुचलं, आवडलं नाही त्याविषयी. शिवाय पिक्चर पाहून झाला की त्याचा एक हँग ओव्हर चढतो. कधी डोक्यात जातो तर कधी तरंगायला लावतो. मग आमची घरात त्याविषयी चर्चा चालते. पिक्चर पहाण्याबरोबरच अशी नंतरची चर्चा विशेष आनंददायी असते.

ह्यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा संपूर्ण पाहिला. भारतीय चित्रपटाला मिळालेले पुरस्कार पाहून ऊर अभिमानाने भरून आला. ए आर रहमान ला ऐकत आमची पिढी मोठी झालेय, त्याच्या रंगीला, बॉम्बे, दिल से वर थिरकत आम्ही शाळा कॉलेजात इतकच काय गणपतीतही नाचलोय. तो खरा जिनियस आहे, त्याला ऑस्करने मिळालेली दाद हा त्या पुरस्काराचा सन्मान आहे.

गुढीपाडव्याला ह्यावर्षीही गुढी उभारली, श्रिखंड पुरीचा बेत होता, त्यामुळे एकंदर मज्जाच..!

तुम्हा आम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखा समाधानाचे, सुरक्षिततेचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो!

Friday, December 26, 2008

सरणार कधी रण... प्रभोsssssssss

बयाच गोष्टी खूप वेळ मनात असूनही लिहायला वेळ मिळत नव्हता आणि शांतपणाही. मुंबईत अतिरेक्यांनी घडवलेलं हत्याकांड, मिडीयाचा नंगा नाच आणि राजकारण्यांचे बळी, अगदी काही दिवसात खूप उलथापालथ झाली. खूप काही वाचायला, ऐकायला मिळालं ह्या दरम्यान. आता नक्की काय झालं, का झालं ह्याचा अंदाज आल्याने लिहायच ठरवलं आज..

वयाची २२ वर्ष दक्षिण मुंबईत गेल्याने गेट वे, ताज, सी.एस.टी. सगळ्याच ठिकाणांशी माझं अतूट नातं आहे. आजही चर्चगेट, व्ही.टी., महानगरपालिका, फ़ाउंटन च्या इमारती, राजाबाई टॊवर पाहिला की माझं उर भरून येत. त्या दगडी इमारतींचा गारवा आणि भक्कमपणा अगदी नवख्या माणसास सुद्ध रोमांचित करेल. सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, रस्त्यावरचे विक्रेते, मार्केट मधे काम करणारे कामगार, मुंबई बघायला तसच तिची झिंग अनुभवायला आलेले जगप्रवासी सगळ्यांची इथे रेलचेल. अगदी सळसळत्या तारूण्यापासून वाकलेल्या काठीपर्यंत प्रत्येकाची ही मुंबई. दहा पोरसवदा माणसं बोटीने येतात काय आणि मुंबईला ओरबडतात काय, सगळं अविश्वसनीय होतं. तिथे त्यारात्री फायरींग सुरु झालं आणि दुसया मिनिटाला याहू वर बातमी आली. ही बातमी इथे सी एन एन, फॊक्स न्यूज वर पुढचे दोन दिवस ब्रेकींग न्यूज म्हणून कव्हर करत होते. बयाच अमेरीकन लोकांशी ह्यावेळी बोलताना जाणवलं की एकूणच इथल्या जनमानसात भारताविषयी आणि भारतीयांविषयी आपुलकी निर्माण होतेय. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर तुमचा आणि आमचा शत्रू एकच असं काहीसं.

साळसकरांसारखा पोलिस अधिकारी ज्याने मुंबईतलं गॆंगवॊर मोडून काढलं, कामठे, करकरेंसारखे अधिकारी मिसरूड सुद्ध न फुटलेल्या टिनपाट पोरांच्या अंदाधुंद गोळ्यांना बळी पडले हे पचवण अजूनही जड जातय. दहशतवादी हल्ला, त्यातून घडलेले राजकीय नाट्य तसेच पुढे काय ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडलेत, त्यांची उत्तरे मिळतील किंवा नाही पण प्रश्न विचारून तरी चिडचिड, विषण्णता, असहाय्यता बाहेर पडेल म्हणून हे लिहायच झालं --

१. अतिरेक्यांचा हल्ला होताक्षणी ’दक्षिण मुजाहीदीन’ कडून एका चॆनेलला मेल गेलं असं म्हटलं गेलं. प्रत्यक्षात असा ग्रूप आहे का? नसल्यास त्याचं नाव कोणी पुढे आणलं? पाकिस्तानने आपला हात झाकण्यासाठी हे खोटं पिल्लू सोडलं नसेल ना? हा धागा पोलिस खणून काढतील?

२. गुप्तचर यंत्रणा नावाचा काही प्रकार असतो हे सांगाव लागेल असा अश्लाघ्य प्रकार घडलाय. आपल्या देशाच्या सागरी सीमा सुरक्षित नसल्याने शत्रूची हिम्मत झाली आतपर्यंत पोहोचायची. गुप्तचर यंत्रणा आणि गस्तपथकाने त्यांच्या कामात कसूर केल्याने कर्तबगार अधिकायांना प्राण गमवावे लागलेत ह्याची किंमत कधीच भरून येणार नाही. हे असे पुन्हा घडू नये म्हणून सरकारने काय खबरदारी घेतली आहे? दुसरं म्हणजे गुप्तचर यंत्रणांचा हल्ली राजकीय वापर होतोय असं जाणवू लागलय. राजकारणी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, दुसयास कोंडीत पकडण्याची संधी साधण्यासाठी किंवा आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यास कोण कुठे भेटला ह्याची इत्यंभूत माहिती ठेवण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा वापरत असल्याचे दिसते. शिवाय पोलिस तपासातही राजकीय दबाव आणला जातोय. पोलिसांच्या सगळ्या नाड्या प्रशासनाच्या हाती असल्याने कर्तव्यपूर्ती म्हणजे पुढायांची हाजी हाजी असं समीकरण बनलय. जर एखादा पोलिस अधिकारी खरच प्रवाहाविरुद्ध पोहायचं धाडस दाखवू लागला तर त्याची बदली कर किंवा त्याच्या मागे विभागीय चौकशी लाव असं केल जातय. सारांश हा की पोलिस खात्यातला राजकीय हस्तक्षेप काढायला किंवा निदान कमी करायला हवा. पोलिसांना न्यायव्यवस्थेसारखी थोडी स्वायत्तता असायला हवी. हे सोप्प नाही हे मान्य पण त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असं काही करता येऊ शकेल?

३. पोलिस अपुया शस्त्रांनी लढतोय. एके-४७ शी लढायला तो प्रशिक्षितही नाही आणि शस्त्रसिद्धही. तरीही केवळ धाडस आणि शौर्याच्या बळावर तो अतिरेक्यांशी भिडला. सी.एस.टी स्थानकात पिस्तुलानिशी शिंदेनी केलेला सामना आणि चौपाटीवर ओंबाळेंनी अतिरेक्याच्या गोळ्या अंगावर झेलत स्वीकारलेलं हौतात्म्य. एखादा जीवावर उदार झालेला जिहादी अतिरेकी जिवंत पकडण्याच धाडस जे जगात कोणी करू शकलेलं नाही ते मुंबई पोलिसांनी केलं ते ओंबाळेंसारख्या शूरवीरामुळेच शक्य झालं. एफ. बी. आय., मोसाद चे अधिकारी कसबच्या जबानीतून खूप सारी नवीन माहिती मिळवत आहेत. पोलिसांना पुरेश्या शस्त्रांनी, शिक्षणाने कधी सुसज्ज करणार? आम्हाला नुसती आश्वासन नको, कृती आणि अमंलबजावणीचं वेळापत्रक हवय. दुसरं म्हणजे दहशतवादाशी मुकाबला करणारी स्वतंत्र शाखा हवी. त्यांना वेगळ्याप्रकारंच प्रशिक्षण तसेच अधिकार हवेत. दुसया विभागतल्या पोलिसांच्या इथे तात्पुरत्या बदल्या करून काम साधणार नाही. ह्या विशेष पथकातील पोलिसांकडे खास क्षमता असायला हवी. हे सगळ करायचं असेल तर राजकीय इच्छाशक्तीची आज गरज आहे. सरकार ह्याकडे प्राधान्याने लक्ष देईल का?

४. अतिरेक्यांनी गुगल अर्थ वापरून नकाशे अभ्यासले, व्ही. ओ. आय. पी. तंत्रद्न्यान वापरून फोन कॊल्स केले. आपले पोलिस दल, गुप्तहेर खाते ह्या आधुनिक तंत्रद्न्याने सुसज्ज करायलाच हवे. त्यासाठी संगणकीय तसेच आधुनिक तंत्रद्न्यान अवगत असलेले किंवा ते आत्मसात करु शकतील असे तुलनेने तरूण पोलिस तयार करावे लागतील, ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शासनाची योजना काय?

५. सामान्य नागरीकांनी दक्ष राहावं तसंच अशा काळात कसं वागावं ह्यासाठी त्यांच्यासाठी काही ड्रील्स (इथे अमेरिकेत जसे फायर ड्रील्स/ टॊर्नेडॊ ड्रील्स असतात त्यासारखे), छोटे अभ्यासक्रम ठेवता येतील का? अफवा पसरवू नयेत, तसच त्या पसरवणायांवर कडक कारवाई केली जावी म्हणून काही निश्चित उपाय योजना आवश्यक आहे. १९९३ च्या दंगली नंतर जशी मोहल्ला कमिटी बनवण्यात आली त्याचा पुढे बराच फायदा झालाय तसच काहिसं करता येणं शक्य आहे का? राज्यस्तरावर प्रशिक्षित कमांडॊजच पथक तयार ठेवण्याचा विचार स्तुत्य आहेच पण त्याही पुढे जाऊन सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं आवश्यक ठरेल. रेड क्रॊस सारखेच काही प्रथमोपचार करणारे प्रशिक्षित नागरीक आपण तयार ठेवायला हवेत. आपत्कालीन परिस्थितीत धाव घेऊन ते देवदूतासारखे काम करू शकतील. शासनाच्या, स्वयंसेवी संस्थांच्या ह्यासंदर्भात काय योजना आहेत?

६. अशा प्रकारच्या ह्ल्ल्यानंतर करण्याच्या उपाययोजना पुढे येत आहेत पण असं होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देणं अधिक महत्त्वाच आहे. आपल्या आजूबाजूस कॊण रहातय,काही संशयास्पद चालू आहे का हे सामान्य नागरीकास पोलिसांना पटकन कळवता यायला हवं. त्याला पोलिसाचा धाक किंवा कटकट न वाटता तो मित्र वाटायला हवा. नागरीक आणि पोलिसात सौहार्दाच नात निर्माण करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शासन काय करतय त्यादृष्टीने?

७. हल्ल्याचा एकंदर वृत्तांत पहात असताना एक लक्षात आलं की पोलिसांच्या कंट्रोल रुमला हल्ल्याचा अंदाज यायला वेळ लागला. त्यामुळेच नेमके किती अतिरेकी आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रे काय आहेत ह्याचा सखोल विचार न करता तीन मोठे अधिकारी एकाच गाडीतून कामा होस्पीटल जवळ गेले. क्लोज सर्किट टिव्हीवरून टेहळंणी करणारी खूप सारी पथके अविरत तयार असायला हवीत. हे सोप्प नाही ह्याची जाणीव आहे पण आवश्यक मात्र आहेच. जिथे शक्य होईल तिथे हीडन कॆमेरे लावले गेलेच पाहीजेत. सरकारी यंत्रणा यद्ययावत करण्यासाठी शासन काय पावले उचलत आहे?

८. मला आठवतय की पाच सहा महिन्यांपूर्वी सामना आणि सकाळमध्ये मुख्य बातमी होती की मुंबईला सागरी मार्गाने धोका संभवतॊ असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. असे बरेच इशारे गुप्तचर यंत्रणा देत असेलही पण (राज्य आणि केंद्र) शासनाने दुर्लक्ष का केले ह्याचं उत्तर कोण देणार? ज्यांनी आपल्या कामात बेजबाबदारपणा दाखवला त्यांना उघडं कधी पाडणार?

९. करकरे युद्धाला निघाले, त्यांनी चिलखत घातलय, हॆल्मेट घालत आहेत असं सगळं मिडीयावाले कव्हर करत होते. त्यातून नेमकं काय साधलं त्यांनी? समस्त मिडीया एक शुद्ध आचारसंहिता बनवू शकत नाही का? किंवा प्रसारभारती सारखी शासकीय संस्था बातम्या सेंसॊर करू शकत नाही का? तशी वेळ आता आलेय असं वाटतं. ब्रेकींग न्यूज मिळवण्यासाठी आणि टी आर पी वाढवण्यासाठी ह्या वाहीन्या कुठल्याही थराला जातील. ह्याच वाहिन्या सामान्य माणसाच्या बुद्धीभेदास आणि अफवा प्रसूत करण्यात आघाडीवर असल्याचं वाटतं. त्यांच्यावर चाप बसायलाच हवा ना? दुसरी धक्कादायक बाब म्हणजे वृत्तपत्रातील बातम्या. ’करकरेंची हत्या दहशतवाद्यांनी केली नाहीच?’ किंवा ’पाकिस्तानी सैन्याची सीमेवर जमवाजमव?’ अशा प्रक्षोभक बातम्या पुढे प्रश्नचिन्ह टाकून पेपरात दिल्या जातात. ह्या प्रकाराची मनस्वी चीड येते. उगाच काहीतरी पिल्लू सोडायचं आणि मग ’पेपरात आलय’ म्हणजे खरच असणार असं धरून चालणारा जो वर्ग आहे समाजात त्याची दिशाभूल करायची. बरीचशी वर्तमानपत्रे अशा बेजबाबदारीने वागताना दिसतात आणि मन अधिक विषण्ण होतं.

१०. दहशतवादी हा अतिरेकीच आहे, कुठल्याही धर्माचा का असेना. अशावेळी तो मुस्लिम असेल तर मुस्लिम संस्थानी पुढे येऊन त्याचा धिक्कार करायला हवा. हा जिहाद, ही नाहक निरपराध माणसं मारणं ही इस्लामची शिकवण नाही हे सगळ्या मुस्लिम धर्मगुरुंनी ठणकावून सांगायला हवय. तरच हे अतिरेकी एकटे पडतील. मेलेल्या अतिरेक्यांना इस्लाम धर्माप्रमाणे संस्कारीत न करता त्यांची बेवारस म्हणून विल्हेवाट लावण्यात आली तर इतरांना चांगलीच चपराक बसेल. त्यातूनच सामान्य हिंदू मुस्लिम जास्त जवळ येऊन दहशतवादी विरुद्ध भारतीय हे नवीन समीकरण तयार होईल. मुस्लिम धर्मगुरू ह्या दहशतवाद्यांना काफीर ठरवून मुस्लिम धर्मातून पदच्युत करतील काय?

११. संसदेवरील हल्ल्याला इतकी वर्षे झाली, तिथेही आपल्या प्राणांची बाजी लावून आर.एस.पी च्या जवानांनी आपल्या संसदेची लाज राखली. न्यायालयाने अफजल गुरुला दोषी ठरवून फाशी सुनावूनदेखील केवळ राजकारणाने त्याला अजून जिवंत ठेवलाय. उद्या असच कोणीतरी कंदाहारप्रमाणे विमान हायजॆक करून त्याला सोडवून नेतील आणि आपण बघत बसू. ह्याची विलक्षण चीड येतेय. पिचक्या कणाच्या ह्या राजकारणी लोकांनी देशाची सुरक्षा सुद्धा विकलेय का असं वाटायला लागतं. ह्याबातीत कितीही नाही म्हटलं तरी शिवसेनाप्रमुखांना आपण मानायलाच हवं. जिवंत पकडलेल्या कसबला त्याच सी. एस. टी. समोर किंवा ताज समोर हजार वेळा फाशी द्या अशी जरब बसवा की पुन्हा कोणी वाकडी नजर करून मुंबईकडे बघू शकणार नाही. पण मतांसाठी लाचार असलेल्या सरकारला हे जमेल काय?

१२. पाकिस्तानने फार फार कोलांट्या उड्या मारल्या आहेत ह्या संदर्भात. पुरावे नाहीत म्हणून गळे काढण्यापलिकडे ते काहीच करत नाहित. मागे पाकिस्तानची क्रीकेट टीम भारतात आली होती तेव्हा वानखेडेची खेळपट्टी उखडली होती शिवसैनिकांनी. तेव्हा शिवसेनेचं असं आंदोलन माझ्यासह सगळ्यांनाच खटकलं असलं तरी आता पाकिस्तानचा दौरा भारत सरकारने रद्द करायला लावला त्यात आपल्याला तथ्य वाटतय. शिवसेना प्रमुखांचं मोठेपण कशात असेल तर अशा द्रष्टेपणात आहे हे जाणवतं. माझही मत आधी; राजकारण, संगीत, क्रीडा ह्यात देश, धर्म आणू नये असं होतं पण आता डोक्यावरून पाणी जातय. सरकारने कडक धोरण अवलंबलच पाहिजे. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक सगल्याच पातळींवर आपण असहकार पुकारायला हवा. आपण वेळ पडलीच तर किंवा वेळ पाडूनच अतिरेक्यांचे अड्डॆ पाकिस्तानात घुसून उखडलेच पाहिजेत. भारत पाक सीमांवर तणाव निर्माण करून अफगाण तालिबान च्या सीमांवरच पाकिस्तानी सैन्य भारताच्या सीमांकडे वळवण्याचा तालिबान्यांचा प्रयत्न असेलही पण आपण केवळ राजकीय मुत्सद्दीचे, टीप्पण्यांचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यायला हवा. पाकिस्तान हे राष्ट्र दहशतवाद्यांना पोसून जागतिक भय निर्माण करत आहे हे आपण सगळ्या जगाला पटवून द्यायला हवय. तिकडे कराची चा शेअर बाजार पार ढासळलाय. पाकिस्तानातली अर्थव्यवस्था कोलमलडतेय. सामान्य लोकांची अन्नान्न दशा होण्याचा दिवस दूर नाही. सद्ध्या अमेरिका जो पैसा त्यांना पुरवतेय त्याचा त्यांना खूप आधार आहे. अजून डबघाईला गेल्यास कुरापती काढून युद्ध करण्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय दिसत नाही. युद्ध न करता त्यांची कोंडी करता आली तर आपल्याला तेही हवच आहे. संसदेवरचा हल्ला, बॆंगलोर तसेच इतर शहरांमध्ये झालेले हल्ले ह्यातून सरकारने काहीच बोध घेतलेला जाणवला नाही, आता तरी सरकार काही करेल अशी अपेक्षा करावी काय?

अशा अनेक प्रश्नांनी मी, माझ्यासारखे तरूण जर्जर आहोत. माहितीचा अधिकार असला तरी तो वापरण्याचे द्न्यान, उत्साह आणि पुढाकार घेण्याची कोणाची इच्छा नाही. पूर्वी सारखी तत्वद्न्यांनींची भाषण ऐकायला कदाचित मिळणार नाहीत पण ह्याविषयांवर लिहीणारे राजकीय मुत्सुद्यांचे, विश्लेषकांचे ब्लॊग्स मिळतील का ह्याचा शोध सुरु आहे. नुकतेच यु ट्युब वर अविनाश धर्माधिकारी यांनी केलेल्या भाषणांच्या, आवाहनाच्या चित्रफिती पहाण्यात आल्या. मनापासून आवडल्या, कोणतरी चांगलं करतोय, तळमळीने करतोय हे पाहून बरं वाटलं. रेडीफ वरचे अनेक विचारवंतांचे लेखही आवडले.

बातम्या पहाताना मला जाणवत होतं की ताज जिंकलं, ट्रायडेन मिळवलं अशा बातम्या येत होत्या. सखेद आश्चर्य वाटलं ते ह्या गोष्टीचं की आपल्या इथे घुसून अतिरेक्यांनी आपलीच वित्तहानी, जिवितहानी केली. त्यांच्याकडून आपण आपलाच भूभाग शूरवीर पोलिसांच्या बदल्यात मिळवला म्हणून जल्लोष करायचा? आपण त्यांना इतक्या सहज घुसू दिलं ह्याची आधी लाज वाटायला हवी. एखाद्या फितूरामुळे मुघलांना मिळालेला किल्ला परत मिळवताना तानाजी गेला तेव्हा राजे कसे हळहळले असतील ह्याची कल्पना येऊ शकते. अंगावर गोळ्या झेलत दोन्ही हातांनी दांडपट्टा चालवत शत्रूला एक इंचही पुढे येऊ न देणारे बाजी.. ’सरणार कधी रण..’ म्हणत तोफांचे आवाज येईपर्यंत यमाला सुद्धा थांबवणारे बाजी... आणि अतिरेक्याची बंदूक हातात पकडून ठेवून देहाची चाळण झाली तरी न कोलमडणारे ओंबाळे ह्यांच्या शौर्यात काहीच फरक नाही. असे आदर्श इतिहासाच्या पुस्तकातून तरुण पिढी पुढे यायला हवेत. ह्या पोलिसांच्या शौर्यावर प्रतिभावंतांनी पोवाडे लिहायला हवेत आणि प्रभातफेर्यांमध्ये किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये ते गौरवाने गायले जायला हवेत.

आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईचे रक्षण करणाया पोलिसांना/ सैनिकांना तसेच हॊटेलमधील, कामा रुग्णालयातील कर्मचारी ज्यांनी इतरांची सुटका केली त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. पोलिसांनी अतिरेक्यांना तिथेच रोखलं म्हणून पुढचा अनर्थ टळला ह्याची सगळ्यांना जाणीव आहेच. "भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी...." हे आज एकदिलानं मुंबई पोलिसांना, कमांडोज ना आपण सांगूया.

स्वतःच्या प्रांणांची पर्वा न करता सदरक्षणाय खलनिर्दालनाय सरसावणाया सगळ्या द्न्यात, अद्न्यात वीरांसाठी बोरकरांच्या शब्दात ही आदरांजली --

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती........

यद्न्यी ज्यांनी देऊन निजशिर
घडले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर
नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती.. !!

मध्यरात्री नभ घुमटाखाली
शांतिशिरी सम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती..
तेथे कर माझे जुळती.. !!

-------------------------------------------------------------------------------------
कोलंबिया डायरी:
कोलंबियामध्ये येऊन महिना उलटला, दोघेही स्थिरावलोय आता बयापैकी. थंडीच प्रमाण त्यामानाने कमीच दिसतय इथे, तसच अजूनही इथे हिरवी कंच झाडी आहेत, पूर्ण पानझड अजून तरी दिसत नाहीये. सकाळी बरच कुंद वातावरण असतं, अशावेळी दोन्ही बाजूंनी फांद्या झुकलेल्या दाट झाडीतून नाजूक थंडीने झाकोळलेल्या सूर्याचे कवडसे झेलत आणि कॆसेटप्लेअरवर कुमार सानू किंवा किशोरदाची गाणी किंवा मग परवीन सुलतानाची ठुमरी ऐकत जाण्यात एक वेगळीच मजा अनुभवायला मिळतेय. ऒफीस तसं १० मिनिटांच्या ड्राईव्हवरच आहे आणि वाहतूकही तुरळक त्यामुळे गाडी चालवताना वेळ कसा जातो कळतच नाही. रानडे रोड, मुंबई २८ आणि लक्ष्मी रोड, पुणे ३० इथे मिळत नाही (पु. लं. नी म्हटलय) तसच टू नॊच रोड, कोलंबिया, साउथ कॆरोलिना-२९२२३ इथे मिळत नाही असं काही नाही असं म्हणता येईल. वॊलमार्ट, टार्गेट, पोस्ट ऒफीस, सगळ्या प्रकारची हॊटेल्स, इंडियन ग्रोसरी स्टोअर सगळं सगळं इथे आहे, हाच इथला एक मुख्य रोड असल्यामुळेही असेल कदाचित, त्यामुळे एकाच फेरीत सगळी कामं होऊन जातात. एकंदर इथे जम बसायला लागलाय नवीन ओळखीही होत आहेत. शिवाय इथे अपार्टमेंट घेताना ते लेक फेसिंग (विंड्सर लेक) घेतलय त्यामुळे बाल्कनी मध्ये उभ राहून किंवा खुर्च्या टाकून तळं, त्यातली बदक, बगळे, होड्या, झाडं सगळं काही वेगळ्याच विश्वात घेऊन जातं, उन्हाळ्यात खूपच छान असेल इथे असं दिसतय.

Monday, November 3, 2008

एदिऒस डेलस..

तसं बघायला गेलं तर आम्ही कन्सल्टींग मधले सॊफ्टवेअर इंजिनिअर्स म्हणजे मुशाफ़ीरीत वाकबगारच. एके ठीकाणच काम संपलं किंवा अधिक चांगलं काम मिळालं की दुसरीकडे मुक्काम वळवणारे. त्यातूनच नविन माणसे, नविन ठिकाण, नविन अनुभव यांनी संपन्न होत जाणारं हे आयुष्य मला खूपच आवडतं. घराबाहेर पडलोच आहोत तर जग बघून घ्यावं हा हेतू कायम मनात असतोच त्यामुळे जिथे आपल्या बुद्धी आणि कष्टांच अधिक चीज होईल तेथे जाण्याकडे कल अधिकच असतो. ह्याचबरोबर आर्थिक जगतातील बद्लांचे आडाखे बांधत कामात सुरक्षितता, स्थैर्य, मोबदला ह्यात समन्वय साधायला जमणं हे देखील व्यक्तिगत आणि तितकच महत्त्वाचं.

या अवाढव्य अमेरीकेत एकूण सहा टाईम झोन आहेत आणि सगळीकडे भाषा एकच असली तरी हवामान, वाहातूक ह्यांच्याशी जुळवून घेताना दरवेळी वेगवेगळे अनुभव येतात. तरीही स्टारबक्स, डंकीन डोनट्स, वॊलमार्ट, सॆम्स क्लब, पिज्जा हट, सब वे सगळं प्रत्येक ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या कुठल्याही कोपयात गेलो तरीही एक साचेबंद जीवनमान आढळते. भारताशी तुलना केली तर हे विशेषत्त्वाने जाणवते. मुंबईच्या माणसाला पुण्याला राहायला जायचे असेल तरीही खाण्यापिण्याच्या, राहाण्याच्या आणि किराणामालाच्या खरेदी पासून सगळ्या गोष्टी नव्याने समजून घ्याव्या लागतात हा माझा स्वानुभव आहे. भारतात एका राज्यातून दुसया राज्यात जाऊन स्थायिक व्हायचे तर भाषेपासून अनंत अडथळ्यांवर मात करावी लागते (कॊस्मोपॊलिटन मुंबई पुण्यात येणारे बाहेरील लोक त्यातल्या त्यात नशीबवान म्हणायचे!). त्यामानाने इथे सगळंच सोप्प आणि साचेबद्ध आहे, आमच्यासारख्या फिरण्याची हौस असणाया जोडप्यांना खूप्पच सोप्प पडतय त्यामुळे. मर्यादित सांसारीक जबाबदयांमुळे ते सहज शक्य होतय हे ही तितकच खरं.

अमेरिकेतल्या माझ्या आयुष्याची सुरुवात लिंचबर्ग ह्या व्हर्जिनियातल्या लहानशा गावातून झाली. खूप सारे समवयीन तसेच शांतेश, अनिरुद्ध सारखे जीवाभावाचे मित्र, वॊल्डन पॊड सारखं सुंदर अपार्टमेंट कॊंप्लेक्स, शांत आणि प्रसन्न गाव. शिवाय डोंगरांच्या जवळ. काम खूप असलं तरी खूप फ़िरता आलं तिथे असताना. महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम सगळे लांब होत असले तरी मी ३-३ तास ड्राईव्ह करून जात असे. अगदी मंतरलेले दिवस होते ते. पुढचा टप्पा कॆसस मधल्या ऒव्हरलॆंड पार्कातला. सुदैवाने मुकुंद-वैशाली, उदय-गौरी ह्यांसारखे मित्र शिवाय शांतेश-सोनालीही तिथे असल्याने खूप आनंदात गेले दिवस. आमच्या कंपनीतल्या मित्रांचा खूप छान ग्रूप झाला होता, एक छोटस कुटुंबच. ह्या भागात सगळं सपाट, डोंगर दर्या समुद्र असलं काही नसलं तरी शेतं खूप. बरेच मित्र एकत्र असल्याने आणि सगळ्यांना भटकायची आवड असल्याने चिक्कार फिरलॊ. इथलं महाराष्ट्र मंडळ बर्यापैकी कार्यरत असल्याने बर्याच कार्यक्रमाना उपस्थिती लावता आली. नंतर मग न्यू जर्सी मध्ये होतो बराच काळ. तिथे ट्रफिक खूप असलं तरी एडीसनच्या जवळ राहाण्याची मजाच निराळी. कॆंसस मधे आणि मग इथे कडाक्याची थंडी म्हणजे काय ते अनुभवता आलं. मराठी विश्वच मनोहर सभागृह अगदी जवळच असल्यानं सगळ्याच कार्यक्रमाना माझी उपस्थिती असायची. शिवाय त्यांनी सुरु केलेल्या मराठी वाचनालयाचा मी पहिला सभासद होतो, ती भूकही छान भागवता आली. सेअरव्हिल्ली मधल्या तळ्याभोवतीचा दोन अडीच मैलाचा फेरफटका ही माझी विशेष आवडाती गोष्ट त्या दिवसातली. तळ्याकाठी तासंतास बसून वाचत किंवा सूर्यास्ताच्या रंगाची उधळण बघत किंवा पक्षी, फुलपाखरं पहात बसण्याची गोडी निराळीच.. मधे जेव्हा कौमुदी आणि मी न्यूजर्सी/ न्यूयॊर्क फिरायला गेलो तेव्हा मुद्दाम ह्या तळ्यापाशी घेऊन गेलो होतो तिला, असो! तर आता हे गेले सोळा सतरा महिने डेलस मधे कसे गेले खरच कळ्लं नाही. आशीष, सारीका सारखे जवळचे मित्र आणि किरण, कालिंदी सारख्या रसिक जोडप्याचा सहवास मिळाला हे आमचं अहोभाग्यच. इथून लांब गेल्यावर त्याची खरी किंमत अजून जाणवेल हे निश्चित. किरण कडची मराठी पुस्तके तसेच इथले कोजागिरी, गणपती सारखे घरगुती कार्यक्रम, क्रिकेट ह्यामुळे इथले सगळेच वीकेन्ड्स कुठे ना कुठे लागलेले असायचे. डेलास महाराष्ट्र मंडळ तसेच डेलास मेहफील ह्यांचे विशेष आभार मानायला हवेत. मेहफील ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे आम्हाला खूप साया शास्त्रीय गायकांना जवळून ऐकता आलं, ते क्षण कधीच विसरता येणार नाही.

सगळ्या ठिकाणांचा उल्लेख करताना अजून एक गोष्ट आठवते म्हणजे प्रत्येक ठिकाणची देवळे. ’जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरोनिया’ ह्या उक्तीवर दृढ विश्वास असल्याने प्रत्येक ठिकाणची देवळे हा आमच्या रोजच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनलाय. तेथे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे ह्यातून अतिशय ह्रुदय तसेच निस्पृह संबंध जोडले गेलेत. अनेक सदविचारी, सदविवेकी, विद्वान तसेच अभ्यासू माणंस मला इथूनच भेटलीत. पार्सिपेनितील इस्कॊनचे देऊळ तसेच डॆलस मधील इस्कॊनचे कालाचंदजी देऊळ मला विशेषत्वाने आवडते. न्यू जर्सी मधील ब्रिजवॊटर टॆंपल सुरेख आहेच पण तिथले उपहारगृह विशेष चवदार आहे! :-) डेलास मधल्या एकता मंदीरातले कार्यक्रम पण विशेष उल्लेखनीय आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे सरिता गायतोंडे यांनी घेतलेले आमचे योगाभ्यासाचे वर्ग ही इथली अजून एक उल्लेखनीय बाब. तसेच देवळात वरच्या मजल्यावर एक मेडीटेशन हॊल बांधलाय. तेथे मृगांक जोशी ह्या प्रसिद्ध चित्रक्रारांनी दोन वर्षे मुक्काम करून भारतातील संत महात्म्यांची आठ आठ फूटी चित्रे रेखाटली आहेत. अक्कलकोट स्वामी, संत रामदास, संत द्न्यानेश्वर तसेच मीराबाई, जलाराम बापा, कबीर अशा बयाच संतांचा मेळाच तिथे भरलाय. अवश्य भेट देण्याचे हे ठिकाण. विठठल रखमाईची मूर्ती तसेच दत्तात्रयप्रभूंची मूर्ती हा अजून एक सुखद धक्का देवळातला. अनल आपटेंचं उत्कृष्ट जेवण ही अजून एक तिथली आवडती गोष्ट.

सुरुवातीला मला लोकं प्रश्न विचारायचे काय मग, ’अमेरिका बरी वाटतेय की भारत?’ जसजसा काळ बदलला मी इथे फिरलो, रुळलो तसा प्रश्न बदलला आता. ’अमेरिकेतल काय आवड्त मग वर्जिनिया, कॆसस, न्य़ू जर्सी की डेलस?’ असं आता विचारलं जातं. गूळही गोड, साखरही गोड, मधही गोड. मेनका, रंभा सगळ्याच अप्सरा. तुलना करून मन संकुचित करणं मला तरी अवघड जातं, अयोग्य वाटतं. जे आहे ते तसं तिथल्या निसर्गासह, माणसांसह मला आवडलं, त्यांनीच माझं आयुष्य इतकं समृद्ध केलय असं मी आज आत्मविश्वासाने म्हणू शकतोय!

’चालणायाचे भाग्य चालते’ असं म्हणतात, पुढे जायलाच हवं.. नव्याच्या शोधात, जुन्या आठवणी सुगंधी कुपित ठेवून.. मग एखाद्या निवांत संध्याकाळी त्या सुगंधी आठवणींनी उजळून जायचं.. जुन्या डायरीच्या पानासारखं.. नविन माणसं, नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आयुष्याच्या कुठल्यातरी पुढच्या अद्न्यात टप्प्यावर मग तेही जुनं ठरवित अजून पुढे, अधिक नवीन.. अधिकाधिक नवीन..

असं मनमोकळं, नाविन्याला आसुसलेल आयुष्य जगण्यात विलक्षण नशा आहे, मजा आहे! जोपर्यंत साचेबद्ध आयुष्याची अपरिहार्यता समोर येत नाहीये.. निदान तोपर्यंत तरी, पुढे जायलाच हवं, आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने!

एक राह रुक गयी तो और जुड गयी
मै मुडा तो साथ साथ राह मुड गयी
हवा के परों पे मेरा आशियाना...
मुसाफीर हू यारो, न घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है.. बस्स चलते जाना..

Monday, October 20, 2008

तुझे नाम नाही असा श्वास नाही..

श्री स्वामी समर्थ
अक्कलकोटच्या स्वामींसाठी लिहिलेला हा गझलेच्या अंगाने जाणारा स्तुतिपाठ 'मायबोली गझल कार्यशाळा -२' मध्ये सामील करण्यात आला होता. 'नाही' असा रदीफ घेऊन कोणत्याही वृत्तात गझल लिहिण्याचा कार्यशाळेचा उपक्रम होता.

वृत्त - भुजंगप्रयात
गण - ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
उदा. : गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा


तुझे नाम नाही असा श्वास नाही
तुम्हावीण स्वामी दुजा ध्यास नाही

असे केशरी दूध नी गोड पोळी
दिल्यावीण त्वा या मुखी घास नाही

नको वेदशास्त्रे, नको कर्मकांडे
नको ध्येय ज्याला तुझी कास नाही

अणू आणि रेणू तुवा व्यापलेला
न ब्रह्मांड जेथे तुझा वास नाही

तुझ्या पादुकांच्या वरी डोइ माझी
कुठे पाप ज्याला तिथे नास नाही

तुझा हात पाठी भिऊ मी कुणाला
भवाच्या भयाचा मला त्रास नाही

गुरु मार्ग दावी घडे मोक्षप्राप्ती
प्रशांताप्रमाणे दुजा दास नाही

- प्रशांत

Wednesday, October 15, 2008

आर्थिक अस्थैर्याचे दिवस..

यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?
अर्थः जोपर्यंत जगताय सुखात जगा, कर्ज घ्या, तूप प्या.. एकदा हे शरीर गेलं (म्हणजे मृत्यू नंतर) ते पुन्हा कुठं येणार आहे?

तर एकंदर अमेरिकेचा हलणारा आर्थिक डोलारा पहाता हे त्यांच्या इन्वेस्ट्मेंट बँक्सचे तसेच ताकदीपेक्षा जास्त कर्ज घेणार्‍यांचे ब्रिदवाक्य असायला हरकत नाही. गेल्या काही दिवसात अमेरिकेत जो आर्थिक पेचप्रसंग उभा राहिलाय तो जवळून बघता आला, समजून घेता आला. त्यावर घडणार्‍या चर्चा, विवाद, बेल आउट प्रकरण, त्याला झालेला उशीर आणि त्यादरम्यान वाढलेले नुकसान, आकस्मिक तळ गाठणारा वॉलस्ट्रीटचा बाजार आणि मग मागोमाग कोसळणारे जगभरातले बाजार असं बरच काही घडत गेलं. अचानक आयुष्याचा वेग वाढल्यासारखं झालं. इथे अमेरिकेत सामान्य माणूस सुद्धा शेअर, म्युच्युअल फंड्स यामधे गुंतवणूक करतो. बर्‍याच निवृत्ती योजना (ज्यांना इथे ४०१के म्हणतात) त्या म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक करतात. त्यामुळे ज्यांच्या मुलांची शिक्षण आहेत किंवा जी निवृत्तीच्या जवळ आली आहेत त्यांचे ४०१के प्लान्स अक्षरश: वितळत आहेत त्यामुळे ते अतिशय चिंतातूर आहेत. तसच सामान्य माणूस आर्थिक मंदीच्या चाहूलीने हबकलाय. ह्या सगळ्याचे मूळ जो सबप्राइम घोटाळा झाला त्यात तसेच भरमसाठ नफा कमवण्याच्या हावरटपणातून झाल्याचं दिसून येतय. एकामागून एक बँका कोसळण्याच कारण हेच की लघुकालीन अमाप फायदा डोळ्यासमोर ठेवून अनेकांना वाजवी पेक्षा खूप जास्त तात्पुरती सवलत देऊन, पत न बघता घरांसाठी कर्जे दिली गेली आणि ती फेडता न आल्याने कर्जे घेणार्यांनी हात वर केले, हळूहळू वसुली करणे अशक्य झाले आणि कर्जे देणार्‍या बँका स्वत: आर्थिक चणचणीत सापडल्या. ही गुंतागुंत प्रचंड मोठी होत गेली तसेच सरकारचे ह्यावर काडीचेही नियमन नसल्याने सगळीकडेच लिक्विडीटी क्रंच निर्माण झाला. क्रेडीटवर चालणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेला तरण्यासाठी पैंशांचा तातडीने पुरवठा करण्याशिवाय सरकारकडे पर्याय नव्हता. खूप खोलवर जाऊन विचार केला तर अमेरिकी समाजाच्या चैनी वृत्तीत तसेच क्रेडीट वर आधारीत जीवनपद्धतीत ह्याच अजून एक मूळ लपलय हे दिसून येतय. ह्यावर वेंकटेश यांनी स्व्देशी जागरण मंचाच्या सभेत बोलताना केलेला *हा अभ्यासपूर्ण उहापोह* खूपच आवडला. भारततील एकत्र कुटुंबपद्धती तसेच जबाबदारीने वागण्याची सामाजिक समज ह्यामुळे आपल्या इथे जी सेव्हींग्ज बेस्ड आर्थिक जिवनपध्दती आहे त्यामुळे भारतात इथल्या इतकीत बिकट समस्या होण्याची शक्यता कंमी आहे असे दिसते, अर्थात भारतापुढे गरिबी, लोकसंख्या, भ्रष्टाचार असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेतच. एकंदर काय की भांडवलशाहीची शेखी मिरवणार्‍या अमेरिकेला आज त्यांच्या तत्वाविरुद्ध जावं लागतय. सरकारला हस्तक्षेप करावा लागतोय बँकांना पैसा पुरवण्यासाठी. दुर्दैवाची गोष्ट अशी की येउ घातलेल्या निवडणुकातील दोन्ही उमेदवारांमध्ये ह्याविषयी तितकी समज आणि दूरदृष्टी दिसत नाही. आमच्या शेजारीच इथे, मेरी म्हणून एक अमेरिकन बाई राहाते. तिला आशियाई संस्कृतीचे आकर्षण आहे आणि आम्हालाही इथल्या अमेरिकन सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल बरच कळत राहात तिच्याशी बोलताना, त्यामुळे आमच्या गप्पा नेहमीच रंगतात. अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगताना ती म्हणते की अमेरिकन आर्थिक जीवन म्हणजे मोठा ब्रॉड वे शो आहे. पुढे सगळं छान, आकर्षक तुम्ही अगदी ज्याला वर्ल्ड क्लास म्हणाल असं, पण मागे तो एक मोठ्ठा घोळ आहे जो निस्तरायची कोणाचीच इच्छा नाही आणि आता तर ताकदही नाही.
ह्या सार्‍यांतून एक गोष्ट निश्चित दिसतेय. येत्या काही वर्षात नोकरकपात, बेरोजगारी वाढेल. त्याला तोंड द्यायचे असेल तर सगळ्यांनीच आपली सेव्हिंग्ज क्षमता वाढवायला हवी, अनावश्यक खर्च टाळायला हवेत. इथे महागाई जाणवण्याइतपत वाढतेय. भारताच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या इथे बाहेरच्या संस्थानी पैसा काढून घेतल्याने बाजार कोसळलाय. स्वतःच्या पायावर उभ रहायला शिकायला हवं भारताने आता. अणुकरार झाला ही भारताची जमेची बाजू. पंतप्रधान तसेच सरकारी ज्येष्ठांनी दाखवलेल्या मुत्सुदेगिरीमुळेच हे शक्य झालं ह्यात वाद नाही. तसच गुंतवणूकदारांनी बाजारातल्या सगळ्या चढ उतारांकडे बारकाईने पहायला हवं. खाली आलेला बाजार ही गुंतवणूकीची उत्तम संधी असू शकतेही. माझ्या सारखे तरूण ज्यांचे भारत आणि अमेरिका ह्या दोन्ही दगडांवर पाय आहेत त्यांच्यासाठी येता काळ विशेष कसरतीचा आहे. ह्या जागतिकरणाच्या लाटेवर स्वार होणार्‍यात आम्हीही आहोतच. लहान वयात जग बघण्याची संधी, तौलनिक आर्थिक संपन्नता, विशाल दृष्टीकोन ह्या जमेच्या गोष्टींबरोबरच वैयक्तिक, कौटुंबिक पातळ्यांवर अस्थिरता, अपरिहार्य बदल, स्थित्यंतरे ह्यातून कमालिचे वेगवान आयुष्य, रॅट रेस मधे धावण्याची वृत्ती असं बरच काही वाट्याला येतय. त्यातूनच शिकायलाही मिळतय.

डॅलस डायरी:
महाराष्ट्र मंडळाचा गणपती उत्सव छान झाला. दोन छोटी नाटकं बसवली होती स्थानिक कलाकारांनी. शिवाय जेवणही उत्तम होते अनल आपटे यांचे. इथे बर्‍याच मित्रांकडे घरगुती गणपतीला जाण्याचाही योग आला ह्यावेळी. नवरात्रात देवळात नऊ दिवस गरबा होता. काही जणांच्या घरी घट बसले होते तिथे जाऊन आरत्या, जोगवे म्हणता आले. किरण आणि कालिंदी साठये यांच्याकडे कोजागिरीचा छान कार्यक्रम झाला. पु. लं ची 'एक शून्य मी' हा त्यांनी ७४ सालच्या म. टा. दिवाळी अंकात लिहिलेला लेख मी तेव्हा वाचला. भेळ, मसाले भात, मसाला दूध, गप्पा गाणी खूपच खास झाली कोजागिरी ह्यावेळची.
आता दिवाळीची तयारी सुरु आहे. इंडीयन असोशिएशनचा, महाराष्ट्र मंडळाचा असे दिवाळीचे भरघोस कार्यक्रम आहेत.
दरम्यान येथे विजय कोपरकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. खूप आवडला. त्यांनी वसंतराव देशपांडेंच 'सावरे अज्जय्यो' हे गाणं म्हटलं ते केवळ अप्रतिम. मुलतानी, राजहंस हे सायंकाळचे राग त्यांनि आळवले. ठुमरीही खास झाली. वियज कोपरकरांच्या गायन मैफलित व्हायोलिन, पेटी, तबला ह्यावर साथ देणारे कलाकार होते ते सगळे पुण्याचे. त्यांचा पूर्ण चमूच मला वाटतं 'सीओईपी' चा. ह्याच चमूचा 'भैरव ते भैरवी' हा अजून एक कार्यक्रम इथे झाला.
दरम्यान बरेच दिवस मनात असलेली गोष्ट अचानक जमून यावी असं घडलं, ज्याला आपण योग येणं असही म्हणतो. तर इथे सौ. सरिता गायतोंडे यानी प्राणायम, योगासने ह्यांचे अभ्यासवर्ग सुरु केलेत. सुदैवाने मला तिथे सामिल होण्याची संधी मिळाली. स्वत: सरिता काकू गेले दहाहून अधिक वर्ष योग शिकत आहेत. कैवल्यधाम येथे दरवर्षी जाऊन त्या पूर्ण योगाभ्यास शिकल्या आहेत. त्यांचा पातांजली योगाचा अभ्यास आणि ते शिकवण्याच कसब वादातीत आहे. दहा सप्ताहांतांच्या ह्या वर्गाचा आम्ही पंचवीस विद्यार्थी लाभ घेतो आहोत. श्वसनमार्गशुद्धी, कपालभाती ह्या शुद्धीक्रिया, पवनमुक्तासन, मार्जारासन, व्याघ्रासन, पवनमुक्तासन, वज्रासन, चक्रासन्, भुजंगासन ही आसने, त्राटक प्राणायामाचे प्रकार आणि प्रत्येकाचे फायदे हे सगळं छान समजून घेता येतय. मुख्य म्हणजे आम्हाला प्रत्येकाला सरिताकाकूंच वैयक्तिक मार्गदर्शन मिळतय. योग्य वयात काहितरी चांगलं शिकत असल्याच खूप समाधान मिळतय.

योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलम शरिरस्यच वैद्यकेन
योपाकरोत्तम प्रवरम मुनिनाम, पाताजलिं प्रांजलिरानतोस्मि