Tuesday, November 2, 2010

आली माझ्या घरी ही दिवाळी..

ह्या दिवाळीला बायको आणि मुलगा ’माझ्या माहेरी’ आहेत, त्यामुळे इथे एकटाच.. अर्थात तरी दिवाळीचा उत्साह कमी नाहीच. कंदील लावला आज आणि हो फराळ केलाय, म्हणजे बनवलाय :-))

अर्थात वैदेहीने http://www.chakali.blogspot.com/ इथे दिलेल्या आधाराशिवाय हे कठीणच होतं, म्हणजे पूर्वी कधितरी मी ओगले आजींच्या पुस्तकांचे संच आणले होते वाहून अमेरिकेत, पण मायबोली, मिसळपाव आणि मुख्यत्वे चकलीवर वैदेहीच्या रेसिपीज मुळे ती पुस्तक उघडायची आताशा गरज राहीली नाही.

शंकरपाळे करताना मैदा मस्त मळला, कणकेचा वापर कटाक्षाने टाळला. थोडं मोहन घातलं मैदा मळत असताना, त्यावरुन आठवलं - ’मोहन’ हा शब्द कुठून आला असावा ह्या स्वयंपाकात? मला शब्दांची व्युत्पत्ती शोधायला फार आवडतं, त्यातून जुन्या संस्कृतीचं एखादं रुपडं, त्या काळातील माणसांची विचार करण्याची पद्धती चटकन उडी मारुन डोळ्यासमोर येऊ शकते. असो, तर माझ्या दोन्ही आज्या पट्टीच्या सुगरणी. दोन्हींमध्ये साम्य म्हणजे स्वयंपाक करताना त्यांचं नामस्मरण तरी चालू असे किंवा अभंग, ओव्या ह्यांचा स्त्रोत गोड गळ्यातून अखंड सुरु असे. शिवाय पदार्थ तयार झाला की आधी देवापुढे ठेवणे असेच. त्यामुळे नेहमीचा स्वयंपाक करतानाही त्यांची एकतानता, तलिन्नता बघण्यासारखी असे, आणि असे दिवाळीचे पदार्थ करायचे असले तर बघायलाच नको. एकमेकीकडे जाऊन सगळ्या बायका अतिशय उत्साहाने पदार्थ करणार दिवाळीचे. तर देवाचे चिंतन करत स्वयंपाक करताना त्या मन-मोहनाचा मोह पडल्याने, तेलाच्या फोडणीला मोहन नाव पडले असेल का? असेलही, कुणास ठाऊक!!

लाडू करताना केवळ वासावरुन आणि रंगावरुन बेसन कसं आणि किती भाजलं गेलय ओळखण्याच काम जमून आलं आणि लाडू मनासारखे छान वळलेही गेलेत. शंकरपाळे तळतानासुद्धा तेल किती तापायला हवं, कोणत्या रंगावर ते तळून काढायला हवेत हे एकदा लक्षात आलं की काम सोप्प होतं. पूर्वी आजी करायची तेव्हा नाही म्हटलं तरी थोडी लुडबूड असायची स्वयंपाक घरात, बोलता बोलता आजीही स्वयंपाकातल्या खाचाखोचा सांगायची. मग नंतर स्वयंपाकघर जे सुटलं ते सुटलं. इथे एकटा असतानाही कधी तळणीचा विचार केला नाही (बॆचलरपणीचा सामूहीक आळस बहुधा) नंतर बायकोने लाड पुरवले, पण ह्यावेळी ओट्याशी उभं राहून फराळ करताना खरच मजा आली, बायकॊचाही टेलिफोनिक सपोर्ट होताच :) त्यामानाने चिवडा सरळ सोप्पा करायला, अर्थात तो खालून न जळून देता मिक्स करणं आणि पोहे कच्चे न राहाणं हे साधलं की झालं.


असो, तर शंकरपाळे, पातळ पोह्याचा चिवडा आणि बेसनाचे लाडू असा फराळ दिवाळीला तय्यार, सोबत कंदील आणि तोरणं आहेतच. फटाक्यांची अनुपस्थिती अर्थातच जाणवतेय पण फटाके न लावण्याची सवय आता अंगवळ्णी पडलेय, मुलाबरोबर पुन्हा लहान होईन तेव्हा करुच धमाल.

तमसो माSSSS ज्योतिर्गमय:
सगळ्याना शुभ-दिपावली !

Tuesday, October 19, 2010

आमचे साहेब..

खरं म्हणजे इतक्या दिवसांनी लिहितोय, इतका खंड पडेल लिखाणात असं वाटलं नाही, पण चलता है, गेले काही माहिने घर आणि नंतर कामात इतका व्यस्त होतो की वाचन तसं थंडावलच पण मनात असूनही कागदावर उतरवण्या इतका वेळ काढू शकलो नाही. लक्षमणचे ते लाजवाब डाव, सचिनने दिलेले दणके, कॊमनवेल्थ मधला भ्रष्टाचार आणि मग भारतियांनी लुटलेली पदक, बिहारच्या निवडणूकांतली रणधुमाळी, अयोध्याकांडाचा पुढचा अध्याय आणि असं बरच काही बघत, वाचत होतो.. बरेचदा मनात असूनही लिहायचं राहून गेलं, असो.. पण बाळासाहेबांची दसयाची डरकाळी ऐकली आणि अगदी उचंबळून आलं सगळं, म्हटलं लिहून मोकळं व्हायलाच हवं.

तर, परवाच्या सेनेच्या (आता सेना म्हटली कि फक्त ’शिव’सेनाच, आता ’शिव’ हा शब्द वड्यापासून उद्योगापर्य़ंत वापरून टाकलाय तो भाग सोडा!) दसयाच्या सभेचा इतिवृत्तांत वाचला आणि जुने दिवस आठवले. गिरगावात शाखा म्हणजे संघाची नाही तर सेनेचीच असं त्यावेळी वातावरण. दसयाची सभा म्हणजे घरचं कार्य असल्यासारखी तयारी असे. म्हणजे सकाळी घरोघरी पूजा करुन, उन्हातान्हात शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे विचार ऐकायला वडिल-काका आणि आजूबाजूचे सगळेच जात असू. तो भगव्याचा गजर, बाळासाहेबांचा करारी आवाज आणि मिश्कील चिमटे, परखडपणा.. त्यांच्या विचाराचं सोनं लुटत आम्ही पांगायचो एक समाधान घेऊन. एक तरी व्यक्ती आहे जी मनापासून आणि मनातलं बोलते, निर्भिडपणे आग ओकते आणि हो, मराठी माणसाचा विचार करते हे सुखावणारं होतं, निदान त्या काळात तरी. तेव्हा शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करणारी होती म्हणून असेल पण मध्यमवर्गीय तरुणांत आणि नवतरुणांत (केवळ मराठीच नाही तर गुजराथीही) बाळासाहेबांनी एक चैतन्य निर्माण केलं होतं. शिवसेनेचा बंद म्हणजे बंद (धाकामुळे किंवा केवळ साहेबांचा शब्द म्हणून) असे मंतरलेले ते दिवस. ९२-९३ च्या दंगलीत बाळासाहेबांचा निर्भीडपणा आणि वचक आम्हा गिरगावकरांना तरी सुखावूनच गेला होता. पुढे ९५ मध्ये युतीचं सरकार आलं आणि शिवशाही येणार अशा अपेक्षांच ओझं घेऊन सेना भाजपाने कारभार सुरु केला. त्याक्षणी बाळासाहेबांनी स्वत: मुख्यमंत्री पद न घेता (रिमोट कंट्रोल हातात ठेवून अर्थत) जे शुचितेचं दर्शन घडवलं (न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चारं!) ते त्यांच्याविषयी आदर द्विगुणीत करणारं ठरलं. पण हा सगळा इतिहास झाला, केव्हा.. जेव्हा सेनेचा हा वाघ, ढाण्या वाघ, स्वत:च्या कर्तुत्वावर जंगल गाजवत होता, जीवाला जीव देणाया मराठ्यांची फौज उभी करुन भिडत होता, आपल्या निर्भीड. तर्कशुद्ध वकृत्वाने सभा गाजवत होता. पण मग निसर्गनियमाप्रमाणे उतरती कळा लागली आणि गेल्या काही वर्षात जे बघायला मिळतय त्याने वाईट, विषण्ण, उद्विग्न, असहाय्य आणि हो लाजिरवाणं ही वाटतय. ज्या बाळासाहेबांववर जीवापाड प्रेम केलं, प्रसंगी, त्यांनी पु.ल. / सचिन ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मोहयांवर केलेला शाब्दिक हल्ला सुद्धा दुर्लक्षित केला, त्या बाळासाहेबांबद्द्ल आता केवळ सहानुभूतीच वाटून राहिलेय.

तर परवाच्या भाषणाच्या अनुषंगाने.. शरद पवारांनी कोलांट्या मारल्या तर आपण स्वीकारतोच हो, पण बाळासाहेबांनी तसं करावं हे कसं पचनी पडणार? आयुष्यभर, घराणेशाहीचा आरोप करत शेवटी मुलगा कार्याध्यक्ष म्ह्णून पुढे आणून वर ही घराणेशाही नाही ही मखलाशी कशासाठी ते कळलं नाही. शिवसेनेत सगळे निर्णय बाळासाहेबच घेतात ना, मग हा निर्णय कृष्णकुंजवरुन घेतला गेला ह्याला काय अर्थ आहे, जर बाळासाहेबांना तो पटला नस्ता तर तुम्ही तेव्हाच कार्याध्यक्ष पद दुसया कुणाला तरी द्यायला हवं ना! ते जाउंदेच पण आदित्यला लॊंच करताना त्याचा भाऊ म्हणजे दुसरा नातू माझ्यासारखाच हे सांगण्याचा केविलवाणा अट्टाहास कशासाठी? त्यांना (आदित्य/ तेजस) करु दे ना त्यांच्या लढाया, घेऊ देत ना केसेस अंगावर. गेले कित्येक दिवस सामन्यात पद्धतशीर पणे आदित्यला फोकस केलं जातय, त्यामुळे त्याला लॊंच करणार हे अभिप्रेत होतच पण मग प्रश्न पडतो सामान्य शिवसैनिकाचं काय? शिवाय तुम्ही घराणेशाही विरुद्ध वाजवलेल्या फुसक्या बाराचं काय? शिवसैनिकांनीच निवडून दिलं आणि त्यांच्या इच्छेखातर असं झालं हे म्हणायचं असेल तर तसच राजीव गांधी, राहूल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्याबाबतर्ही म्हणता येईल की. उलट त्यांनी घराणेशाही नको अशा घोषणा तरी दिल्या नाहीत. माझ्या मते घराणी शाही असण्यात खास चूकही नाहीच कारण घरात ज्या वातावरणात तुम्ही वाढता त्याचा तुम्हाला लहानपणापासून व्यावसायिक गोष्टी जवळून अनुभवता आल्याने फायदा होतोच (जसा इंदिरा गांधींना नेहरूंचा झाला), पण पुढच्या पिढीला त्यासाठी तयार करणं एकवेळ समजू शकतो, आदित्यला पुढे आणणं हा त्याचाच एक भाग असू शकतो हे ही बुद्धीला पटतं पण ’ही घराणेशाही नाही’ ही मखलाशी करणं, ती करावी लागणं आणि ते ही बाळासाहेबांना ह्याच वाईट वाचल्यावाचून राहत नाही. प्रबोधनकारांनी असं बाळासाहेबांना लॊंच केल्याचं ऐकीवात नाही आणि राज ठाकरेंना बाळासाहेबांनी लॊंच केल्याचं ऐकीवात नाही, असो कालाय तस्मै नम:!

साहेबांनी भाषणात म्हटलं की ज्या मुद्द्यावर सेना उभी राहीलीत्याच जुन्या मुद्द्यावर ते (राज) लढतायत. आता साहेबांच्या ह्या विधानात अनेक अर्थ निघतात, एक म्हणजे मराठी हा मुद्दा अजून इतक्या वर्षांनतरही राजकीय होऊ शकतो ह्यात नाही म्हटलं तरी सेनेचं अपयश आहेच की. दुसरं म्हणजे, मराठीचा मुद्दा सेनेने सोडलाच, त्याशिवाय राजसाहेबांना एवढा पाठींबा मिळालाच नसता. ’दोपहर का सामना’ मुंबईत काढण्याची गरज तेव्हा सेनेला का भासली? ह्यातून कुणाचं लांगुलचालन चाल्लल होत, हे मराठी माणसाला कळत नव्हतं का? सेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मजबूत होण्यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावर पसरायचा प्रयत्न केला. झाले काय की इथले बुरुज ढासळत गेले. शिवसेनेसारखी एक संघटना उभारण्यात बाळासाहेबांचे जितके यश, कौतुक आहे तितकेच खंदे शिलेदार गमवून ती एकसंध ठेवण्यात आलेले अपयशही आहे. भुजबळ, राणे, गणेश नाईक ह्यांसारखे पुढच्या फळीचे नेते तसेच बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, सदा सरवरणकर ह्यांसारखे तरुण रक्त शिवसेना एक संघटना म्हणून बांधून ठेवू शकली नाही, ह्यां सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षांचे मेळ, एक नेता म्हणून, बाळासाहेब घालू शकले नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव असं वाटल्यावाचून राहात नाही. परवाच्या भाषणात त्यांनी भुजबळांचा उल्लेख केला, मला तर हसू आले. लखोबा म्हणून एके काळी सैनिकांनी ज्याला दणका दिला, ज्याने बंडखोरी म्हणजे काय हे सेनेला पहिल्यांदा दाखवून दिले एवढेच काय तर बाळासाहेबांना अटक करण्याचे मनसुबे केले, त्यांची सदिच्छा भेट! राजकारणात सगळं क्षम्य असतं मान्य, पण बाळासाहेबांना हे शोभत नाहीच, अहो त्यापेक्षा राज आणि उद्धव एकत्र यावेत यासाठी जे शिवसैनिक प्रयत्न करतायत त्यांचा तरी उल्लेख करायचा, बरं वाटलं असतं! बाळासाहेबांच्या भाषणात प्रमुख हल्ला होता राज ठाकरेंवर ह्यातच सगळं आलं. राजसाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावर जे वातावरण पेटवलय त्याचे चटके सेनेला बसत आहेतच. मला खात्री आहे कुठेतरी मनाच्या कोपयात बाळासाहेब राजचं कौतुक करत असणारच. इतक्या छोट्या कालावधित मनसेने जे आक्रमक धोरण ठेवलय त्याची दखल बाळासाहेबांनी घेतली हीच पोचपावती.

दरम्यान, अयोध्येच्या निकालानंतर सामान्य जनतेने दाखवलेला समजूतदारपणा, प्रसार माध्यमांनी आणि राजकारण्यांनी दाखवलेली परिपक्वता (असन्माननीय अपवाद वगळता) पाहून खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. गेल्या १७ वर्षात शिक्षण वाढलेय, जागतिकरण वाढलय, जीवनाचा वेग वाढलाय, लोकांना विकासाचं वेड लागलय. आपापसात लढ्ण्यात काहीच हशील नाही, प्रगति करायला हवी असं नवी पिढी, प्रसंगी जुन्या पिढीला सांगतेय, त्यामुळेच हे शक्य झालं असं वाटतय. उदाहरणच द्यायचं झालं, तर १७ वर्षांपूर्वी माझे अयोध्येविषयी दृष्टीकोन होते ते आमूलाग्र बदलले आहेत, तेव्हा ते चूक होते असं म्हणणार नाही, त्यावेळच्या परिस्थितीत ते योग्य असतिलही, पण आता आपण एक समाज म्हणून पुढे जायला हवं हे उमगतं आणि असं एकत्रित प्रगती करण शक्य, आवश्यक आणि अपरिहार्य आहे हे ही समजतं. तर ह्यातून सांगायचा मुद्दा हा की, जसं शिक्षणाचं प्रमाण वाढतय, माहितीचा अधिकार वापरण्याचं प्रमाण वाढतय, परकीय गंगाजळी वाढतेय, उद्योगधंदे वाढताहेत तस तस लोकांना समृद्ध जीवनाचे फायदे दिसायला लागलेत, त्याची फळं चाखायला मिळालेयत. असं असताना भावनेच्या राजकारणातून विशेष काहीही होणार नाही हे आता राजकीय पक्षांनाही जाणवू लागलेय. गुजराथचे उदाहरण पाहाता तर हे अधोरेखित होतय. नरेंद्र मोदींनी केवळ ’समतोल विकास’ ह्या एका मुद्द्यावर अगदी पंचायत समित्या आणि नगरपालिकाही निर्विवाद जिंकून आणल्या. बिहार मध्ये नितिशकुमारही विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करत आहेत. दक्षिणेत चंद्राबाबूंनीही तो प्रयत्न केला पण विकासात ते समतोल साधण्यात अपयशी ठरले. केंद्रात मनमोहनसिंग सरकारही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन भारताच्या अर्यव्यवस्थेच्या वाढीच्या गतीची स्वप्ने जगाला दाखवत आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, बाळासाहेबांच्या भाषणात, ’विकास’ हा मुद्दा अभावानेच आढळला. वीस वर्षांपूर्वीचा तरूण आणि आजचा तरूण ह्याच्या विचारात बराच फरक आहे हे समजायला हवे. केवळ अर्वाच्य शब्दात इतरांची हेटाळणी करुन मने जिंकण्याचे दिवस गेले, त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेत इतके वर्ष सत्ता असताना सेनेने काय काय केले ह्यावर लक्ष वेधले असते तर नक्कीच छान वाटले असते.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, आदित्यच्या बरोबरीने आदेश बांदेकरांचे सेनेने केलेलं लॊंचिंग. गेले कित्येक दिवस त्यासाठी सामन्यात मोर्चेबांधणीसुरु होती, म्हणजे आज भाऊजींनी बाळासाहेबांची भेट घेतली, भाऊजींनी मराठी दांडीया सुरु केला वगैरे वगैरे! ज्या भाऊजींवर दादर मधून पडण्याची नामुष्की आली (कारण काहीका असेना!) त्यांना शिवसेनेत सचिवपद? म्हणजे इतके वर्ष घासलेल्या शिवसैनिकाने करायचं काय? कुठल्याही पक्षात सचिवपद म्हणजे कार्याध्यक्षाशी समन्वय साधण्यासाठी, थिंक टॆंक म्हणून तसेच लोकांकडून कामं करुन घेण्यासाठी अतिशय महत्त्वांचं, जबाबदारीचं आणि तितकच व्यस्त पद. इतर उद्योग सांभाळताना ह्या पदाला भाऊजी न्याय देऊ शकतील ? त्यांचं पहिलं ध्येय मिडीया म्हणूनच राहाणार ना मग डमी म्हणून त्यांना इथे पुढे केलय की काय अशी शंका यायला जागा आहेच, म्हणजे एखाद्या सच्चा शिवसैनिकाची ह्या पदासाठीची जागा बाहेरून आलेल्याने घेतली, हेच अगदी विधानसभा निवडणूकीत झालं दादर मतदारसंघात आणि परिणाम दिसलेच. व्यक्तिश: कुणाला विरोध नाही पण कुठेतरी चुकतय असं वाटत राहातं.

एकंदर, हे असं आहे. शिवसेनेचा प्रवास म्हणजे माझ्यासारख्या कित्येकांचा तारुण्याचा प्रवास. बाळासाहेबांचे विचार ऐकत आम्ही घडलॊ, एका दिशेने पुढे गेलो. त्यामुळे हे असं काही पाहिलं की पोटतिडकीने तितक्याच हक्काने काही सांगावसं वाटतं, चुकीचं वाटतं असलं की मन मोकळं करावसं वाटतच. असेच पुढचे दसरे मेळावे येतील, पन्नाशीही पार करतील, पिढ्यान पिढ्या वाघाची डरकाळी ऐकायला येतील पण जर आवाजातील धारचं कमी होत चालली असेल, तर न्यायालयाला डेसिबल मध्ये आवाजाची क्षमता घालायची वेळच येणार नाही हे तितकच खरं!

Sunday, July 11, 2010

If you can..

गेले काही दिवस, कामाचा वाढलेला व्याप आणि पसारा, घरात तारक बरोबर जगत असलेलो माझं बालपण, तसेच समर मधील भटकंती ह्यामुळे इच्छा असूनही इथे लिहिता आलं नाही. अकरावीच्या प्रवेशांचा खेळखंडोबा, फुटबॊलचा विश्वचषक, राज-का-रण, बेळगावप्रश्नी केंद्र सरकारने घातले वाकडे शेपूट, वाढती महागाई, त्यातून झालेले बंद, ’डबल डीप’ रिसेशनची इथे अमेरिकेत जाणवत असलेली भीती खूप काही लिहीण्यासारखं आहे, पण सद्ध्या वेळेचं गणित काही जमत नाहीये. वाचनही थांबलय म्हणावं इतपत थंडावलय.
स्पेन जिंकली आज.. मस्त झाली आजची मॆच. इतकी पिवळी कार्ड एका गेम मध्ये कधी बघितली नव्हती. खूप धुसमसळा झाला आजचा खेळ पण हॊलंडला त्याच्यामुळेच दहा खेळांडूंनी शेवटी बचाव करायला लागला आणि तिथेच स्पेनने संधी साधली. एकंदर विश्वचषकच मस्त झाला, कायम लक्षात राहील असाच.

दरम्यान एक नितांत सुंदर कविता वाचनात आली ती इथे लिहितोय -
एका वडिलांनी मुलाला उद्देशून लिहिलेली.. कसं जगावं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय करु नये ह्याची परिपूर्ण जंत्रीच जणू. एकेका ओळीत विलक्षण अर्थ भरला आहे. वाचताक्षणी भारुन टाकलं, जिंकलं ह्या ओळींनी.. कवीचे मनापासून आभार.

"If"
If you can keep your head when all about you
Are losing theirs and blaming it on you;
If you can trust yourself when all men doubt you,
But make allowance for their doubting too;
If you can wait and not be tired by waiting,
Or, being lied about, don't deal in lies,
Or, being hated, don't give way to hating,
And yet don't look too good, nor talk too wise;

If you can dream - and not make dreams your master;
If you can think - and not make thoughts your aim;
If you can meet with triumph and disaster
And treat those two imposters just the same;
If you can bear to hear the truth you've spoken
Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to broken,
And stoop and build 'em up with wornout tools;

If you can make one heap of all your winnings
And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
And never breath a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
To serve your turn long after they are gone,
And so hold on when there is nothing in you
Except the Will which says to them: "Hold on";

If you can talk with crowds and keep your virtue,
Or walk with kings - nor lose the common touch;
If neither foes nor loving friends can hurt you;
If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
With sixty seconds' worth of distance run -
Yours is the Earth and everything that's in it,
And - which is more - you'll be a Man my son!

--Rudyard Kipling

Monday, March 15, 2010

विंदा

विं.दा. गेल्याची बातमी आली. वाईट वाटलं, पण एक समृद्ध आणि यशस्वी जीवन जगलेल्या मनस्वी माणसाला दीर्घायुष्याचं वरदान लाभलं हे समाधान होतं. पाडगांवकरांइतक्या सहजतेने मला विं.दां.च्या खूप काही कविता ऐकायला मिळाल्या नाहीत पण ज्या ऐकल्या त्यांनी अशी पकड घेतली की बस्स.. ’शुभ्र फुलांची ज्वाळा’ ही कॆसेट मला भेट मिळाली होती, त्यातल्या सगळ्याच गझला आम्हाला दोघांनाही इतक्या आवडल्या की मागच्या भारत भेटीत सीडी आणली. पद्मजा फेणाणीचा आवाज तर मस्तच, पिळवटून टाकणारा..अप्रतिम.. गझल आवडणाया व्यक्तिकडे संग्राह्य असायलाच हवी ही सीडी.

राज्यसभेत महिला विधेयक पारित झालेलं ऐकलं तेव्हा खरं तर विंदांचेच शब्द ओठावर आले आणि मागोमाग ते गेल्याची बातमी. त्यांच्याच ह्या दोन्ही गझल इथे लिहून विंदांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.










सर्वस्व तुजला वाहूनी

मागू नको सख्या रे

सर्वस्व तुजला वाहूनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहूनी ॥

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतूनी ॥

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती कांच रे, दिसतोस मजला त्यांतूनी ॥

संसार मी करीते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आद्न्या तुझी ती मानूनी ॥

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानूनी ॥

- विं. दा. करंदीकर

मागू नको सख्या रे, माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले ।।

स्वप्नांतल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग का रे, सर्वस्व वाहिलेले ।।

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू, अन हात शापिलेले ।।

स्वप्नात पाहिलेले, म्हणूनी कसे असत्य
स्वप्नास सत्य सते, सामिल जाहलेले ।।

स्व्प्नातल्या कळीला, स्वप्नात ठेवूनी जा
हे नेत्र घेउनी जा, स्वप्नांत नाहलेले ।।

जा नेर घेउनी जा, स्वप्नांध पांगळीचे
आता पहावयाचे, काही न राहिलेले ।।

- विं. दा. करंदीकर

Thursday, February 25, 2010

विठठला....



प्रिय सचिन, काल तू द्विशतक काढलंस आणि आपल्या घरातला कोणी बोर्डात आल्यावर जसा आनंद होईल तसं झालं अगदी, अटकेपार झेंडा लावल्यावर तेव्हा मराठ्यांना वाटलं असेल ना तस्सच.. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची आणि ’सचिनने आता निवृत्त’ व्हायला हवं’ म्हणणाया ढुढ्ढाचार्यांची एकाच वेळी पिसं काढत ज्या कमालीच्या एकाग्रतेने तू २०० काढलेस नतमस्तक तुझ्यापुढे राजा. तुझी ती नजर, बॊलवर तुटून पडणं, रनिंग बिट्विन विकेट्स, फूटवर्क, टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन म्या पामराने काय बोलावं ह्या सगळ्याबद्दल. काल पुन्हा पुन्हा हायलाईट्स पाहिले आणि डोळ्यांचं पारणं फिटलं अगदी कडा ओलावल्या सुद्धा. कालचा दिवस तुझा होता असं म्हणून मी अन्याय करणार नाही तुझ्यावर, तू म्हणशील तो दिवस तुझा हे सगळ्यांनाच माहित झालय आता. २४ तारीख काल (तुझी जन्म तारीखही २४ च, संख्याशास्त्रीय अनुकूलता असणार म्हणजे :) आणि आज नुकतच वाचलं की, विनोद बरोबर शारदाश्रम मध्ये बरोबर २२ वर्षापूर्वी, म्हणजे २४ फेब्रु. १९८८ रोजी ६६४ धावांची जगप्रसिद्ध भागीदारी केली होतीस. असो, मागे ऒस्ट्रेलियाविरुद्ध १७५* काढताना तू रीटायर्ड हर्ट झालास, न्यूझीलंड विरुद्ध १८६* पेक्षा जास्त करायची संधीच मिळाली नाही पण मला माहितेय तू त्या दोन्ही खेळीतून बरच शिकलास (आणि तू असं अनुभवातून शिकत खेळाची पातळी उंचवू शकतोस म्हणून तू तू आहेस). त्यागोष्टींची तू पुनरावृत्ती होऊन दिली नाहीस हे लगेच जाणवलं. सईद अन्वरने काढलेले ते १९४ आठवतायत.. मे महिना होता आणि खोटं कशाला बोला सॊलिड जळली होती, निम्म्याहून अधिक डाव तर रनर घेऊन खेळला तो. असो, पण स्टॆमिना काय असतो हे तू काल दाखवून दिलस. तुझ्या पहिल्या शभर धावात एकही षटकार नसावा ह्यात संयम म्हणजे काय ते दाखवलस आणि इतकं करुन स्ट्राईक रेट आठ आणि नऊ? तुला महान हे विशेषणसुद्धा तोकडं पडावं. अगदी दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज सुद्धा तुझ्या वादळापुढे काल नतमस्तक झाले असतील.

तुझं कौतुक काय करावं महाराजा, स्टेनची बॊलिंग बघितली मी, कॆलिस सुद्धा जीव तोडून टाकत होता. अशा बॊलिंगची लिलया पिसं काढणं आणि समोरच्या कार्तिक, पठाण, धोनीला प्रोत्साहन देत राहाणं तुलाच जमणार. बॊलरच्या डोक्यावरुन उलट टोलवलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बायसेक्ट करत जाणारा चेंडू खासा मेजवानी होती काल. स्टेनचा ऒफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तू ऒफला शफल होत फ्लिक करुन लेग ला टोलवलास, कसं काय जमतं तुला इतकं अतर्क्य टायमिंग, स्टेन सारख्या फास्ट बॊलरपासून निघालेला चेंडू तुझ्या पर्यंत पोहोचेपर्यंत हे सगळं करायला वेळ आणतोस कुठून? इतकं पदलालित्य, ठेका तुला जमतं कस? आणि ते ही ह्या वयात?? १९९* वर असताना धोनीने तुला नॊन स्ट्रायकींग एन्ड वरुन परत पाठवलं ना तेव्हा सांगतो, ठोका चुकला होता.. अंग ठणकत असणार ना इतक्या झटपट हालचाली करत असताना.. पण २०० च्या सिंहासनावर तुलाच विराजमान झालेलं बघायचं होतं.. तू ’छ्त्रपती’ आहेस, दुसया कोणी तिथे जाण्याआधी तू तिथे जाणंच आम्ही स्विकारु शकतो. २०० हा जॆकपॊट असूच शकत नाही तो फक्त एक क्लास आहे. काल रात्री भारतातला प्रत्येक गरिब श्रीमंत ज्याची क्रिकेटवर श्रद्धा आहे, तो तृप्त झाला असेल, दोन घास जास्तीचे जेवला असेल. दिवाळी, गणपती दरवर्षी येतात पण तुझं असं येण आणि बरसणं त्यात न्हाऊन चिंब होणं ह्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं बाबा. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे!! तसं आहे हे..
असाच खेळत राहा, मनमुराद! गावस्करने घेतलेली ती १०००० वी धाव आणि तुझी २०० वी, भारत काय करु शकतो हे जगाला दिलेलं एक सणसणीत उत्तर.. आमचं भाग्य की आम्ही तुझ्या पिढीत जन्मलो आणि तू भारतात, तुझ्याबरोबर मोठं होत तुझा प्रत्येक चौकार, षटकार उपभोगण्याचा निर्भेळ आनंद दिलास, त्या आनंदाने कित्येक दु:ख, प्रसंगी एकाकीपण विसरायला लावलय.. तुझ्या आणि तुझ्या खेळाच्या त्रृणात राहाण्यातच धन्यता बाबा.. आज तुझ्या खेळाचं वर्णन इथे अमेरिकन, पाकिस्तानी आणि जमैकाच्या मित्रांमध्ये बसून करताना कसं वाटतय काय सांगणार, माझीच कॊलर ताठ. भारतीय आणि मुंबईकर असल्याचा यथार्थ अभिमान वाटतोय आणि तू.... मॆच नंतर तुझं नेहमीचच, dinesh, pathan & Dhoni played well, ball was coming on to the bat.. वगैरे वगैरे.. किती हा विनम्रपणा, बाबा रे, बॊल सगळ्यांच्या बॆटवर येत होते पण त्यांना अचूक दिशा देणं, टायमिंग साधणं, क्षेत्ररक्षकांच्या मधून किंवा डोक्यावरुन भिरकावणं आणि २०० धावा जमवणं, हे फक्त तुझ्या बॆटला आणि थंड डोक्याने खेळणाया तुलाच जमणार ना! कसे रे राहातात तुझे पाय इतके घट्ट जमिनीवर, कोणती वीट पायी घेतलेयस.. विठ्ठला.. ’तुझाच झेंडा माझ्या हाती...........’

एक साठवण:
पंधराव्यावर्षी मुंबईतल्या आझाद मैदानावर टॊम अल्टरने घेतलेली सच्च्याची कटींग पिताना घेतलेली अनौपचारीक मुलाखत..
http://www.youtube.com/watch?v=oez4TSdZvJI

- गेल्या २८ वर्षांपासूनचा तुझा भक्त

Friday, January 22, 2010

कुण्या देशांचं पाखरू...

बयाच दिवसांनी लिहितोय, घरात लहान मूल असलं की वेळ कसा जातो कळत नाही, ह्याचा प्रत्यय घेतोय, ’बाप’ होण्याचा सुखद अनुभव आणि वाढत्या जबाबदायाही.. :-)

तसे बरेच विषय डोक्यात आहेत लिहिण्यासाठी पण सद्ध्या सगळ्यात जोरात विचार चाल्लेत ते "For here or to go?" चे :-) अपर्णा वेलणकर च्या ह्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी ह्या ब्लॊगवर लिहिलं होतं आणि त्यातलं नेमकं पुढे कुठे जायचं त्या दृष्टीने पावलं टाकायची वेळ आता आली आहे असं वाटायला लागलय, आम्हाला सगळ्यांनाच. योगायोगाने हे डोक्यात घोळत असतानाच मायबोलीवर रैनाने ’परतोनि पाहे’ हा बीबी सुरु केला आणि मग ह्या प्रत्येक भारतीय इमिग्रेंट्सच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सखोल लिहावसं वाटलं. ह्या अनुषंगाने येणारे मुद्दे, उपमुद्दे ह्यांची सविस्तर चर्चा घरातील सगळ्यांबरोबर बरेचदा झालेय शिवाय समकालीन, समवयीन आणि समस्थितीतिल मित्रमंडळींमध्येही झालेय. प्रत्येकाने आपापल्या परिने "For here or to go?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलय, शोधायला घेतलय किंवा नंतर बघू म्हणून चक्क पुढे ढकल्लय. तर ह्या ब्लॊग मध्ये माझ्या मायबोलीवरच्या लेखातले मुद्दे उचलून ’अमेरिकेत थांबायचं कि भारतात परतायचं?’ ह्याचं उत्तर शोधताना एखाद्यास कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो आणि कशी तयारी करावी लागते ह्याबद्दल लिहीणार आहे. हे वाचणायास अमेरिकेतल्या आयुष्याची कल्पना नसेल तर थोडी माहिती मिळेल पण माझ्यासारख्याच X = X + 1 सिंड्रोम (ह्या बद्दल पुढे लिहीलय) मधल्या कुटुंबास मुद्देसूद विचार करण्यास चालना मिळेल.

हे लिहिताना माझी थोडक्यात पार्श्वभूमी अशी की मी सध्या अमेरिकेत आयटी मध्ये आहे, व्यावसायिक आयुष्याला भारतात सुरुवात केली मग दोन वर्षे भारतीय कंपनीतर्फे अमेरिकेत काम केले, पुन्हा भारतात जाऊन भारतीय़ कंपनीत वर्षभर काम केले. त्यानंतर पुन्हा अमेरिकेत येऊन गेले पाच वर्ष इथे काम करतोय. हे सगळं सांगायचा उद्देश असा की, भारतात तसेच अमेरिकेत (प्रॊग्रेमर लेव्हलपासून प्रॊजेक्ट मॆनेजर, आर्कीटेक्ट लेव्हलवर) काम करण्याची आणि करुन घेण्याची पद्धत, दोन्हीकडचे बदलते जीवनमान, राहाणीमान, सामाजिक प्रश्न अशा संक्रमणातून एकापेक्षा अधिक वेळा गेल्यामुळे काही गोष्टी खूप जवळून अनुभवल्यात. एक महत्त्वाचे म्हणजे माझे व्यावसायिक अनुभव अमेरिका आणि भारत ह्या दोन देशांपर्यंतच आणि सांसारिक अनुभव फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादीत आहेत. तसेच सुदैवाने भाषा हया महत्वाच्या माध्यमाचा मोठा प्रश्न (जो जपान, चायना मध्ये काम करणायांना अपरिहार्यपणे येतो) आपोआपच नाहीये.

मूळातून विचार करण्यासाठी ’जाओनी किंवा राहोनी पाहे’ या अनुषंगाने आधी मुद्दे माडतोय म्हणजे परतण्याचा विचार त्या त्या गटात वेगळा कसा हे लक्षात येईल. आपले प्रश्न त्याची उत्तर वैयक्तीक पातळीवर बदलतात पण मग जी कारण असतात निर्णय प्रक्रीयेमागे (परतण्याच्या किंवा न परतण्याच्या) ती कोणती ह्यांच्या अभ्यासाचा (analysis) जेव्हा विचार होतो तेव्हा ज्या मुद्द्यांवर एखादा निर्णय घेतला जाईल ते मुद्दे कोणते, प्रत्येक मुद्द्याचं (त्या व्यक्ती/कुटुंबसापेक्ष) महत्त्व काय [म्हणजे तो मुद्दा घडेल ह्याची शक्यता (probability) किती आणि त्याचा परिणाम (impact) किती] ह्या सगळ्यांचा आपल्या अनुभव आणि सदसदविवेकबुद्धीला अनुसरून एकत्रित विचार केला गेला पाहिजे. हे एकदा समजलं की मग उकल काढण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय बैठक मिळू शकते.

असो, तर अमेरिकेत येणारा प्रत्येक जण एकाच सारख्या मार्गाने येत नाही, शिवाय येणाया प्रत्येकाचे उद्दीष्ट ’अमेरीकन ड्रीम’ हेच असते, असेही नाही उलट बरेचदा ते बदलत असते मृगजळासारखे, तर ढोबळमानाने इथे भारतातून आलेल्यांपैकी काही महत्त्वाचे गट -
१. अमरिकेत एम एस किंवा एम बी ए किंवा पीएचडी करू म्हणून उच्च शिक्षणासाठी आलेले लोक
२. भारतात शिकून अमेरिकेत नोकरीसाठी म्हणजे पैसा कमवण्यासाठी आलेले लोक
२.अ. एल १ म्हणजे कंपनी ट्रान्सफर वर आलेले जे इथे नोकरी बदलू शकत नाहीत आणि कंपनीच्या इशायावर केव्हाही परत जावे लागू शकते
२.ब. एच १ म्हणजे जे इथे नोकरी बदलू शकतात आणि नोकरी सुटल्यास व दुसरी न मिळाल्यास काही एक दिवसात परत जावे लागण्याची शक्यता असते
३. भारतातून येनकेनप्रकारेण नातेसंबंधातून इथे ग्रीनकार्ड घेऊन आलेले लोक (उदा. बरेचसे पटेल आपण बघतो..)
४. अमेरिकेत असणाया वरील पहिल्या दोन प्रकारच्या भारतीयांबरोबर लग्न करून आलेले डीपेंन्ड्ट व्हिसावरचे लोक
५. इमिग्रेशनची अडथळा शर्यत पार करून आलेले लोक - जीसी किंवा सिटीझनशिप असलेले

आता ह्या गटांच्या ढोबळ आर्थिक स्थैर्य आणि साधारण अपेक्षांचा आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर (कौटुंबिक पातळीवर थोडं नंतर पाहू) परतीच्या शक्यतेवर होणाया परिणामाचा थोडक्यात विचार करु -

गट १.
ह्यातील बयाचशा लोकांनी इथे येऊन शिकण्यासाठी पदरमोड केलेय अगदी स्कॊलरशिपवर आला असाल तरी किमान दोन वर्षे वेळेची गुंतवणूक केलेय. शिवाय, स्टुडंट लाईफ मधे कॊलेज फुटबॊलपासून एक वेगळी अमेरिका अनुभवलेय, त्यांची अमेरिकेशी थोडी वेगळीच नाळ जुळलेय. शिवाय, वैयक्तीक पातळीवर व्यावसायिक आयुष्यात त्यांना अमेरिकेत शिकल्याने प्रचंड संधी आहे, मागणी आहे. त्यामुळे रीटर्न ऒन इन्व्हेस्ट्मेंट तसेच ऒनर ऒफ टेलेंट ह्या दोन्हीवर विचार करता अशी लोक अमेरिकेत पटकन स्थिरावू शकतात, बरेचदा ह्याच गटातला जोडीदार ते निवडतात. आर्थिक प्रॊब्लेम सुटलेले असतील तर परतण्याचे विचार मनात येऊ शकतात किंवा अमेरिकन ड्रीमच्या दिशेने वेगात वाटचाल तरी करू शकतात. अर्थात, इथे शिकूनही नोकरी मिळत नसेल, ओपीटी नंतर एच वन आणि एच वन नंतर जीसी होत नसेल तर शिक्षणावरचा खर्च, लग्नाचे वय ह्यातून बरीच ओढाताण होऊन परतीच्या शक्यता सक्तीच्या होऊ शकतात. अर्थात ह्या गटातील लोकही गट २ बच्या माध्यमातूनच इमिग्रेशन मधून जात असल्याने त्यांना बयाच सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

गट २.
ह्यातील २.अ. लोकांना अमेरिकेत कायम राहाणे तसे फार शक्य नसल्याने त्यांना कधी ना कधी परतायचेच आहे हे लक्षात ठेवावेच लागते.
२.ब. अमेरिकेतले मार्केट, तुमच्या व्यावसायिक निपुतणतेला इथे असलेली मागणी, तुमचा अनुभव आणि मुख्य म्हणजे इमिग्रेशनचे नियम ह्या सगळ्या कचाट्यात ही लोक व्यवस्थित भरडून निघत आहेत. लग्नाची समस्या होऊ नये किंवा नक्की काय करायचे हे ठरत नाही किंवा कंपनी तयार होत नाही अशा विविध कारणांनी जीसी लांबणीवर पडले की मग एक चक्र सुरु होते. वर्षानुवर्षे जीसीची वाट पहाणे आणि त्याअनुषंगाने येणारे निर्वासिताचे जीवन चालू होते. बद्लती प्रोजेक्ट्स, जीसी फाईल केलेल्या कंपनीकडून होणारी अडवणूक, ऒनसाईट ऒफशोअर मॊडेल असेल तर कामाचे विचित्र तास ह्याबाबींमुळे अस्थिर जीवनमान सुरु होते. प्रोजेक्ट एकाच ठिकाणी असेल ह्याची खात्री बहुधा नस्तेच शिवाय एच वन वर असल्याने घर घेऊन राहाणे ही मोठीच रीस्क बनते. ह्या मंदी मध्ये होत्याचे नव्हते झालेल्या फॆमिली आपण पाहिल्या असतीलच. शिवाय जीसी येईपर्यंत तांत्रिक दृष्ट्या तुम्ही वर्षानुवर्षे तुमचा कामाचा प्रोफाईल वाढवू शकत नाही त्यामुळे प्रसंगी व्यावसायिक हतबलताही येऊ शकते. समजा एखाद्याला वयाच्या पस्तीशी पर्यंत जरी जीसी मिळाले तरी त्यानंतर वीस वर्षांचे होमलोन, इतका वेळ नोकरी टिकवून ठेवणे आणि संसार उभा करणे म्हणजे मोठी जबाबदारी होऊ शकते. ह्याचा एकत्रित विचार करता ग्रीनकार्ड हा एक जुगार झाला आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे ग्रीनकार्ड मिळूनही सीटीझन शीप मिळेपर्यंत ह्यातून सुटका नाहीच.

गट ३.
ह्यांचा इथे येऊन राहाणे हा एकच उद्देश असल्याने परतीचा काही प्रश्न येत नाही.

गट ४.
हा एक महत्त्वाचा घटक आहे. ह्यात आपण बहुसंख्य शिकलेल्या मुली निव्वळ एच ४ वर नोकरी करणे शक्य नाही म्हणून घरी बसलेल्या बघतो. ह्यात त्यांचे करीअरचे वैयक्तिक नुकसान झाल्याची बोच असतेच पण जर अशा व्यक्तीने ड्राइव्हीग, सोशल नेटवर्कींग, इथे वेळेचा स्वत:साठी कसा सदुपयोग करता येईल ह्याचा विचार केला नसेल तर अमेरिकेचा कंटाळा येऊ शकतो आणि मग भारतात परत जाऊया असा दबाव त्यांच्याकडून येऊ शकतो किंवा उलटपक्षी इथले सांसारिक स्वातंत्र्य आवडायला लागून भारतात जायलाच नको असाही सूर आळवला जाऊ शकतो. थोडक्यात, परत जायचं का ह्या मुद्द्यावर ह्या गटाचा प्रभाव अपरिहार्यपणे असतोच.

गट ५
ह्या गटातली माणसं बहुतांश इथे पोहोचेपर्यंत आर्थिक दृष्ट्या यशस्वी, स्थिरावलेली असतात. इतके वर्ष जीसी/सिटिझनशीप साठी लढलॊ त्याचे फळं खाण्याचे दिवस असं मनात येतं असतं. कुटब सुद्धा बरच स्थिरावलेलं असतं. अशावेळी आई वडिलांसाठी इथली बसलेली घडी मोडायची असेल तर कुटुंबाला खूप विश्व्वासात घेणं गरजेच वाटतं. परत जाण्यासाठी ह्यांना थोडं जास्तच धैर्य दाखवावं लागतं., इतके वर्षात इथे चांगला जम बसला असेल तर ह्यावर्षी जाऊ पुढच्या वर्षी जाऊ म्हणत (क्ष + १ सिंड्रोम) इथेच राहातात लोकं असं बरेचदा दिसतं.

एक कुटुंब परततं म्हणजे त्यात साधारणपणे कमावणारी (एक वा क्वचित अधिक)व्यक्ति आणि अवलंबित व्यक्ती (जी इथे कमवू शकत नाही पण कमवण्याची पात्रता आहे किंवा जी शिकतेय किंवा शिकण्यायोग्य होतेय). आता परतणाया कुटुंबप्रमुखास तीन पिढ्यांचा विचार करायचाय, आधीची (म्हणजे आई वडील..), स्वत:ची म्हणजे स्वत: तसेच बायको कसा परतीचा बदल मानवू शकेल आणि पुढची पिढी म्हणजे मुलं. हल्ली बयाच वेळा ’मागच्या पिढीसाठी परत जायचं’ ह्याला सरसकट टाळ्या वाजवल्या जातात, पण ते एका चौकटीतच खरं आहे. म्हणजे वृद्ध आई वडिलांसाठी परत जात असाल पण मुलांचे नुकसान होतेय तिथे गेल्याने किंवा अमेरिकेतल्या शिक्षणाची त्यांची संधी हुकली अशी बोच असेल तर मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचे नुकसान केले असं म्हणायला वाव आहे. ह्याउलट पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी इथे थांबलं तर मागच्या पिढीवर अन्याय होण्याची शक्यताही आहेच. सगळ्यांना पटेल असं ह्याचं उत्तर काढण म्हणूनच शक्य नाही हा असा वैयक्तीक प्रश्न आहे की जिथे तुम्हाला काय हवय आणि काय नकोय हे नीट माहिती असायला हवं आणि जो निर्ण्य घेऊ तो ठामपणे तडीस नेऊन जीवनाची अपरिहार्यता समंजसपणे स्वीकारता यायला हवी.

-- ’मी इथे का आलो?’ ह्याचं उत्तर अमेरिकेत जगायला, अमेरिकन ड्रीम पूर्ण करायला असं असेल तर तुमची दिशा अमेरिकेत राहाण्याकडे झुकतेय त्यामुळे गणिताची उकल सोप्पि हॊइल. जर फक्त पैसे कमवायला, जगाच्या दुसया टोकावर काय चाल्लय पहायला हे उत्तर असेल तर अजूनही परतीची धुकधुकी व्यवस्थित आहे. तुमची आर्थिक उद्दीष्ट जेवढी सुस्पष्ट असतिल तेवढं परतीच गणित सोप्प होईल.
-- इथल्या इमिग्रेशन सिस्टीमच्या कचाट्यात २ब गटामधील बहुसंख्य लोकं मोडतात. जीसी फाईल करण्याचा उपयोग फार तर एच वन सहा वर्षांपलिकडे वाढवायला होईल पण जीसी मिळायला (इबी२ किंवा इबी३ असेल) तरी अंदाजे दहा एक वर्षे लागतील. एवढे वर्ष निर्वासितासारखे (आपण आणि कुटुम्बियांनी) आयुष्य जगायचे का हे ज्याचे त्याने ठरवायचे. स्थैर्य हे तुमचे प्रमुख उद्दीष्ट असेल तर अशा स्थितीत नोकरीत, घर खरेदी, मुलांच्या शाळा, त्यांचा कौटुंबिक सहवास ह्या सगळ्या प्रकारांत स्थैर्य मिळणे दुरापास्त आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे इमिग्रेशन लॊज. ह्या गटातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय नाही (तसं अपेक्षित आहे असं नाही, पण नाहीये हे महत्त्वाचं) कारण ग्रीन कार्ड -सिटीझन आणि एच वन ह्यांना कामाचे स्वरुप, मर्यादा, संध्या ह्यात फरक आहे.
-- जोडीदार जर नोकरी करु शकत नसेल (उदा. एच ४ किंवा मुलांना द्यावा लागणारा पूर्ण वेळ किंवा नोकरीची संधी नसणे) आणि महत्वाकांक्षी असेल तर इथे घालवलेला प्रत्येक दिवस त्याच्या व्यावसायिक आयुष्यास त्रासदायक ठरु शकतो आणि कुटुंब अस्थिर करु शकतो.
-- इथली प्राथमिक शिक्षणसंस्था एका मर्यादेपर्यंतच चांगली आहे असे वाटते. म्हणजे लॆब, हुशारीप्रमाणे शिक्षण, व्यावसायानुषंगिक शिक्षण हे सगळ छान आहेच पण इथल्या शालेय वातावरणात मुल वाढवायला तुमच्या मनाची तयारी असायला हवी. तसच तुम्ही जितक्या लवकर अमेरिकन कल्चर आत्मसात कराल तितकं मुलांना सोप्प जाईल. तिथे शिकले तर आपल्यातले पुष्कळ जण आले तसे उच्चशिक्षणासाठी मूल इथे येऊही शकेल मोठे झाल्यावर. भारताल्या प्राथमिक शिक्षणपद्धतीत मुलांवर बोजा खूप आहे, मान्य पण आता तिथेही शाळा अभ्यासक्रमांत हा मुद्दा विचारात घेत आहेत आणि घरी स्पर्धेतून मुलाचा कोंडमारा होत नाही ना ही काळजी आपण घेतली तर बराच फायदा होऊ शकतो.
-- इथे ठरलेले सणवार (बयाचदा) सोयीस्कर विकेंडला करायचे, दोन वर्षातून एकदा भारतात तीन आठवडे जाऊन ’जी ले तेरी जिंदगी’ करायचं आणि त्यावर समाधान मानायचं हे तात्पुरतं जमेल पण कायमस्वरूपी जमेल का ह्याचा नक्की विचार करायला हवा. अमेरिकेत म्हातारपण घालवायची तयारी आहे का ह्याचाही विचार करायला हवा.
--एक पालक म्हणून, मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण व्हावी असं मनापासून तुम्हाला किती वाटतं आणि ते किती गरजेचं वाटतं? वाटत असेल तर इथे राहून ते अजिबात सोप्प नाही. तुम्हाला वाटेल ते पुण्यातही शक्य नाही पण ते पटत नाही. अजूनतरी पुण्यामुंबईत मराठी मेलेली नाही उलट ’राज’कीय कारणांमुळे तिला पुन्हा बळ येतय. नुसती भाषा नाही तर मराठी संस्कृतीशी पुढच्या पिढीची (ती त्याच्या पुढच्या पिढीत्त तशीच जुळलेली राहावी असा हट्ट नाही) नाळ जुळावी असं वाटत असेल तर नीट विचार होणं आवश्यक आहे. उदा. ’पु.लं. चा नारायण’ मी मुलाला समजावू शकलो पाहिजे, ’चाफ्याच्या फुला’ त्याच्याबरोबर बसून समरसून ऐकू शकलो पाहिजे साहित्याची, वाद्मयाची गोडी त्याला लावता आली पाहिजे अशी इच्छा असेल तर ते इथून वर्षाकाठी काही पुस्तक मागवून पूर्ण होण कठीण वाटतं. शिवाय, ते तिथे (हो बदलत असले तरीही) वातावरणामुळे आपोआप घडून येईल इथे राहिलो तर मात्र नाही म्हटलं तरी मुलांवर मराठी लादावं लागेल आणि जे मराठी भाषेचं आहे तेच अभिजात हिदुस्थानी संगीताच. तिथे सवाई गंधर्व, वसंतोत्सवासारखे उत्सव आणि जर त्याला आवड असेल तर दिग्गज संगीत तन्द्न्य गुरुस्थानी मिळू शकतील, इथून ती आवडं निर्माण करणं थोडं आडवळणाच हॊईल असं वाटतं. अर्थात उदा. इथे राहून व्हायोलिन शिकता येईल तिथे जाऊन हिंदुस्थानी संगीत मुलाने शिकायलाच हवे असे नाही असे एखाद्यास वाटत असेल तर ते वावगे नाही. पालकत्व हा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. हा फक्त मराठीचा मुद्दा झाला पण जर पुढे संस्कृत, उर्दू शेरो शायरी असं काही वेगळं शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते भारतातच जास्त सोप्प आहे.

’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’, प्रत्येकाला इथे राहा किंवा तिथे राहा समस्या आहेत. आपण जगतोय म्हणजेच चांगले वाईट असे भोग भोगतोय. त्यामुळे आपल्याला येणाया समस्यांवर आणि त्यांच्या निवारण्यावर आपलं किती नियंत्रण आहे हे महत्त्वाचं. भारतात तुमच्याकडे पैसा असेल तर बयाच प्रश्नांवर चांगले नियंत्रण येऊ शकते असे म्हणतात.

कौटुंबिक पातळीवर -
इथे जोडपं काम करत असेल तर विकेंड घरकामात, पुढच्या आठवड्याच्या पूर्वतयारीत जातात, रोज सकाळ संध्याकाळ ताजं जेवण मिळतच असं नाही, मुलांना डेकेअर मध्ये ठेवणं अपरिहार्य असतं. ह्याउलट भारतात मनुष्यबळाचा अभाव नाही. तुमचं आर्थिक नियोजन नीट असेल आणि विश्व्वासू माणसं तुम्ही निवडू आणि टिकवू शकलात तर बरीच काम आऊटसोर्स करता येऊ शकतात. शिवाय, आइ वडिलांचा तसेच शेजार्यापासून इतर नातेवाईकांचा आधार मिळवू शकता, धोबी, इस्त्री, पोळ्याला बाई, स्वयंपाकाला बाई, केरवारं करायला बाई अशा अनेक पातळ्यांवर आपण आपली काम करवून घेऊ शकता आणि वेळ वाचवू शकता. नातेवाईकांबरोबर येणार्या लग्न मुंजी बारशी डोहाळेजेवणं अशा कार्यांना पैठण्या नेसून दागिने घालून मिरवणे अशा मजांबरोबरच कुत्सितपणा, भोचकपणा, चोमडेपणा अशा अवगुंणांचाही आपल्याला सामना करावा लागतो पण ते कसं परतून लावायचं की त्याचा ताण घ्यायचा हे पूर्णत: तुमच्यावर आहे. एकूणात दहीहंडी, संक्रांत, गणपती, दिवाळी, पाडवा आणि प्रत्येक सणच जोरदार उत्साहात साजया होणाया ठिकाणी (उदा. गिरगाव, दादर, ठाणे) तुमचं आयुष्य गेलं असेल तर एका उत्सवी जीवनाच आकर्षण आपल्याला असतं, अमेरिकेतलं जीवनमान त्यामुळेच कित्येकदा तेच ते आणि चाकोरीबद्ध वाटू शकतं.
भारतात परतल्यावर तुमचे तसेच जोडीदाराचे आई वडील जवळ असतील, त्यांनाही बरं वाटेल, सहवासाचं प्रेम वाढेल, त्यांच्या तब्येतीची इथे राहुन जी काळजी असेल तर ती उरणार नाही. त्यांनाही मुला-नातवाबरोबर जीव रमवता येईल, नातवालाही डेकेअरची गरज भासणार नाही असं सगळं जूळून आलं तर तुमचं काम सोप्पच होईल खूप.
तिथले गड किल्ले, धार्मिक स्थळे किंवा डोंगर दया, गावं, शेतं तुम्हाला खुणावत असतील तर भारतात असाल तर निदान काही महिन्यातून रजा टाकून ह्यातलं थोडं थोडं तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. प्राजक्त, रातराणी, सोनटक्का, चाफा, मोगरा, बकुळी अशा नानाविध फूलांचे सुगंध तुम्हाला नॊस्टेल्जिक करत असतील किंवा देवगड हापूस तुम्हाला इथे अमेरिकेत कोरडे उसासे टाकायला लावत असेल तर भारतात हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना भरभरून आहे हे लक्षात असलं पाहिजे.

व्यावसायिक पातळीवर-
भारताच्या विकासाचा वेग अमेरिकेच्या विकासाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे. मान्य आहे भारतात भ्रष्टाचार आहे पण त्यामुळे अब्दुल कलाम आणि नारायण मुर्थी घडायचे थांबत नाहीत. भ्रष्टाचारामुळे, राजकारण्यांमुळे वेग कमी होत असेल पण जागतिक रेट्यामुळे, माहितीच्या स्त्रोतांमुळे बरेच फायदे होत आहेत. कोणी सांगावे. अशाच वेगात धावत राहिला तर भारत येत्या पंचवीस वर्षात अमेरिकेच्या आसपास येईलही, हे स्वप्नरंजन मुळीच नाही. शिवाय, भारत विकसनशील असल्याने आणि आपल्यासारख्यांनी विकसित देश म्हणजे काय हे अनुभवले असल्याने भारतात लघु उद्योगाच्या (विशेषत: आय टी क्षेत्रात) प्र चं ड संधी आहेत. एस एस एन सारखी सिस्टीम भारतातही येतेय. आर्थिक क्षेत्रातही सेबीने बरीच शिस्त आणलेय, आयसीआयसीआय डीरेक्ट सारखी पोर्टल्स व्यवस्थित काम करताहेत. लोकसंख्येचा बोजा भारतावर आहे हे मान्य पण हीच लोकसंख्या शिकतेय, ह्यात सुशिक्षित तरुणांचे प्रमाण वाढतेय आणि त्यांना संधी उत्पन्न करुन दिली तर खूप काही करता येईल (जे टाटा, अंबानीने केलं..). त्यामुळे परत गेल्यावर काय असा प्रश्न तूर्त तरी पडत नाही, थोडक्यात इथल्या अनुभवाला भारत बयापैकी न्याय देऊ शकेल असा विश्वास वाढतोय.
कामाच्या बाबतीत अमेरिकेतल्या लोकांना जरा जास्त सहानुभूती मिळतेय असं वाटतं. एन जे (जर्सी सिटी नव्हे) मधे राहून न्यू यॊर्कला अपडाऊन करणारे मित्र सकाळी सहाला जाणार ते रात्री आठ्ला घरी, अगदी कडाक्याच्या थंडीतही. याउलट पुण्यात बाईक वरुन मी १५ मिनिटात ऒफीसला जायचो. मला एवढच म्हणायचं की तुम्ही योग्य ठिकाणी असाल आणि तुमचा व्यावसायिक अनुभव पाठीशी असेल तर घराच्या जवळ किंवा वर्क फ्रॊम होम असा जॊब तुम्ही कुठेही मिळवू शकता नाहीतर कार पुलिंग सारखा उपाय आहेच. इथे अमेरिकेत आयबीएम मधे काम करताना आठवड्यातून चार दिवस क्लायंट कडे आणि एक दिवस घरुन काम अशी कन्स्ल्टींग जॊब मधे जबाबदारी पेलणारे पाहिलेत, त्यांच्या घरच्यांना खरच सलाम.

सामाजिक पातळीवर-
भारतातलं जीवनमान नक्की सुधारतय. प्रत्येक भारतवारीत ते प्रकर्षाने जाणवतय. आज इंटरेनेटवरुन पुण्याच्या जागेचं विजेचं बील मी भरू शकतोय. रस्ते, वाहतूक ह्या समस्या आहेत मान्य पण त्यांना कसं टाळायच हे तुमच्यावर आहे. मुंबईतल्या गर्दीला घाबरून तुम्ही मुंबईत गेलाच नाहीत तर तुम्हाला मुंबईची नशा कशी कळणार.. आणि गर्दी शिवाय मुंबई हा तुमचा हट्ट असेल तर ते शक्य नाही हे स्वीकारता यायला हवंच, कुरबूर करुन काहीच साध्य होणार नाही. एकंदर भारतातही सुविधा येत आहेत. वीज, पाणी अशा समस्या जरूर आहेत, लोकसंख्येचा बोजा आहे पण भारताने शिक्षणाबरोबर दिलेल्या इतर अनेक चांगल्या गोष्टीबरोबर ही कडू गोळीही गिळायला हवी ना. तिथेही माणसं राहात आहेत आपण नक्की ऎडजस्ट करू असा विश्वास आहे.

मग करायचं काय?
एक मात्र नक्की, भारतात जाणार असाल तर व्यवस्थित आर्थिक नियोजन करुनच (त्यात बॆंक बॆलन्स बरोबर योग्यवेळी घर घेणे आलेच) जायला हव असं मनापासून वाटतं. दुसरं म्हणजे तुम्ही योग्यवेळी निर्ण्य घेतला नाहीत किंवा तो लांबवणीवर टाकत राहिलात तर तुम्ही वेळेचा अपव्यय करण्याची शक्यता बळावते. जेथे तुम्हाला आयुष्यातील जास्त काळ राहायचे तिथे कौटुबिक जीवनास लवकर सुरुवात करणे (होमलोन, स्कूलिंग वगैरे च्या दृष्टीने) कधीही सयुक्तिक आहे. म्हणूनच मुलांना थोडे इथले आणि थोडे तिथले असे प्राथमिक शिक्शण द्यायला लागणार नाही ह्याचा जरूर विचार करायला हवा. अशावेळी मुलांना मित्रमैत्रिणी जोडणे, सोशल एक्सेप्टन्स ह्या पातळ्यांवर ताण सहन करायला लागण्याची शक्यता आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व ज्या काळात घडते त्याकाळात अस्थैर्यामुळे किंवा बदलांमुळे त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्ण अमिरेकेतले की पूर्ण भारतातले शिक्षण द्यायचे हा निर्णय मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत घेता आला तर केव्हाही उत्तमच अर्थात तुमचा ’पॊईंट ऒफ नो रीटर्न’ तुम्ही ठरवायचा.

परतीची वा न परतीची एका पेक्षा अधिक कारणं असू शकतात, ती किती सबळ आहेत हे ठरवता येण्यासाठी अशा चर्चेचा अंशत: तरी उपयोग होऊ शकेल असं वाटतं. तशी ती पुरेशी सबळ असतील तर घेतलेला निर्णय हा जाणीवपूर्वक असल्याने कुठलीही (इथे राहिलात तर इथे किंवा तिथे गेलात तर तिथे) एडजेस्टमेंट होऊ शकतेच. तर आपल्यापुरतं ती कारणं शोधणं आणि त्यांची सबळता ठरवणं महत्त्वाचं.

शुभं भवतु!

Sunday, November 29, 2009

कोण मेले? कुणासाठी? रक्त ओकून..

२६ नोव्हेंबर च्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला एक वर्ष झालं. अशा प्रसंगी हुतात्म्यांची आठवण काढायची आणि भरत आलेल्या जखमांवरच्या खपल्याही काढायच्या. होय! असं मुद्दाम म्हणतोय कारण एकूणच प्रशासन मुर्दाड झालय़ आणि लोकांचं आयुष्य इतकं वेगवान झालय की काळाचं औषध बेमालूम वठतं आणि लोक विसरतात, पचवतात आघात.

एका वर्षापूर्वी ह्याच ब्लॊगवर लिहीलेल्या उतायाची ही लिंक.. सरणार कधी रण..प्रभोsssssssss.

काय झालं एका वर्षात --
१. पाकिस्तानने अतिरेकी हे पाकिस्तानी आहेत हे आधी जाहीर नाकबूल केलं पण काही दिवसांनी ते तेथलेच आहेत हे कबूलही केलं. तोयबाच्या नेत्यांना अटक करण्याची नाटकं केली आणि मग सोडूनही दिलं. भारतीय राजकारणी आणि प्रशासन, अमेरिका आणि जगाला पुरावे देऊन आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन हातावर हात ठेवून गप्प राहिलं.
२. करकरेंचं बुलेटप्रूफ जॆकेट हरवलं म्हणून देशाच्या ग्रृहमंत्र्यांनी वीरपत्निची जाहीर माफी मागितली. ते जॆकेट निकृष्ट दर्जाचं होतं म्हणे! :(
३. कसाबचा खटला कोर्टात उभा करून त्याच्या सुरक्षेवर अत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्चे करावे लागलेत, आणि एकीकडे आपदग्रस्तांना पूर्ण मदत मिळू शकली नाही सरकारकडून. त्याचा खटला अजून किती दिवस चालेल प्रश्नचिन्हच आहे आणि एवढं करुन दयेचा अर्ज राष्ट्रपतींना करुन तो अफझल गुरू सारखी फाशी रद्द करवून घेतो की काय बघायचे, सगळाच पोरखेळ.
४. महाराष्ट्र पोलिसदलातले वाद चव्हाट्यावर आलेत आणि गफूर, रॊय, मारीया आणि वरिष्ठ पोलिस अधिकायांतली वादावादी जनतेपुढे उघड झाली. २६ नोव्हेंबरला दुसरा कसा बेजबाबदार वागला हे सांगण्याची सगळ्य़ांतच अहमहमिका लागलेय.
5. राम प्रधान समितीचा अहवाल नेमके काय सांगतो कळू शकेल काय? त्यात मांडलेल्या त्रुटी काय आहेत आणि त्या कश्या दुरूस्त केल्या गेल्या ह्याचे नि:पक्षपाती उत्तर मिळेल काय?
६. अतिरेक्यांचे मृतदेह रासायनिक प्रक्रीयेने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानने ते घेण्यास इन्कार केलाय आणि भारत सरकारही त्यांची विल्हेवाट लावण्यास उत्सुक दिसत नाही.
७. भारताच्या सागरी सीमा खरचं सुरक्षित आहेत काय याचे अजूनही ’होय’ असे ठाम उत्तर देता येत नाही. समुद्रमार्गे पूर्वी आलेले आरडीएक्स. अत्ता आलेले अतिरेकी आणि त्यानंतरही गस्त नौकांमधल्या त्रूटी, समन्वयाचा अभाव हीच त्याची मुख्य कारणे.
८. महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी कमांडॊंचे एक खास पथक तयार केले आहे, ही एक खरोखरच चांगली बाब. तसेच सरकारने काही अद्ययावत शस्त्रे खरेदी करुन पोलिस खाते अधिक शस्त्र सज्ज केले आहे.

पुढे काय? काही प्रश्न..
१. आजही माझ्यासारख्या एखाद्या सामान्य नागरीकास आपत्कालीन परिस्थितीत कसे तोंड द्यायचे, काय करायचे आणि काय करायचे नाही ह्याचे प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे का? असे उपक्रम राबवून सुजाण नागरिकांची फळी निर्माण करता येणे का शक्य नाही? सरकार नाही तर निदान एखादी सेवाभावी संस्था यात लक्ष घालु शकेल का?
२. मिडीया ही आज एक अतिशय संवेदनशील बाब झाली आहे आणि वेगवान माहिती स्त्रोतांमुळे ती अधिक जबाबदार असणे आवश्यक आहे. हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ८०% मोबाईल्स मधे दृक-श्राव्य रेकॊर्डींगची सुविधा असतेच. शिवाय एसेमेस मुळे बातम्या (खया किंवा खोट्या) भराभर पसरतात. एकूणच ह्या मोबाईल नेटवर्क्सवर ल्क्ष ठेवणे, अतिरेक्यांनी मोबाईल वापरले तसे कोणाला वापरता येऊ नयेत ह्याची अंमलबजावणी करणे आवश्यक नाही का? सरकारने ह्यासाठी काय पाऊले उचलली आहेत ते कळायलाच हवे.
३. वरच्याच मुद्द्याला अनुसरून पीत पत्रकारीते पासून लांब राहून आपला टी.आर.पी वाढावा म्हणून कुठल्याही थराला न जाता, लोकांच्या संवेदनशील भावनांना भडकवण्याचे साधन होऊ न देण्याची जबाबदारी हे सत्राशे साठ चॆनेल्स घेतील का? ते स्वत:च अशी एखादी आचारसंहीता तयार करतील का किंवा तसा त्यांच्यावर दबाव आणता येईल का?
४. दुर्दैवी रीत्या अशा किंवा दुसया कुठलाही प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडून झालाच तर भारत सरकारची भूमिका काय असेल? ते असेच गप्प राहाणार का? शिवाय, मुंबईतल्या जनतेच्या सुरक्षितेविषयी महाराष्ट्र सरकारची, भारत सरकारची नेमकी जबाबदारी विषद होईल काय, जेणे करुन एकमेकांकडे बोटे दाखवली जाणार नाहीत.
५. आपली गुप्तहेर यंत्रणा ह्या हल्ल्याची आधीच माहिती काढण्यात अपयशी ठरली, असे का झाले आणि ही जबाबदारी कोणाची हे कळू शकेल का, आणि पुन्हा असे कूचकाम गुप्तहेर यंत्रणेकदून होणार नाही याची हमी भारत सरकार देईल काय? तसेच ह्या यंत्रणेतील पोकळ्या भरण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरात काय केले ते कळू शकेल का?

एका वर्षानंतर मुंबईकरांच्या मनातली भीती अजूनही डोळ्यांत तशीच दिसतेय, सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येईल ह्याची खरच शाश्वती उरलेली नाही. प्रचंड वाढलेली गर्दी आणि सोयी सुविधा, प्रशासनावर त्यामुळे पडणारा ताण ह्यात सामान्य मुंबईकर पूर्वीसारखाच होरपळून निघतोय आणि अपरीहार्यपणे व अगतिकपणे (मुंबई स्पिरीट हे त्याचं गोंडस नाव) ट्रेनला लोंबकाळत खस्ता खातोच आहे, दुसरा इलाजच काय म्हणा.. !!

ह्यावेळी २६-नोव्हेंबरला रक्तदान शिबीरे आणि वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ह्या ब्लॊग मार्फत माझ्या भावनांना वाट देऊन माझीही श्रद्धांजली.

"पब्लिक मेमरी इज शॊर्ट" म्ह्णणणायांना तसेच येणाया पिढ्यांना हा हल्ला नेमका कसा होता त्याची दाहकता, विषण्णता कळत राहाण आवश्यक आहे. नाहीतर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचे विस्मरण जसे आमच्या पिढीला होतेय तसे कैक वर्षांनी ओंबाळे, साळसकर, कामटे, शिंदे विसरले जातील.. "कोण मेले कुणासाठी रक्त ओकून.." असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल.
म्हणूनच २६-नोव्हेंबर-०८ च्या थराराचे हे फोटो इथे देत आहे.

विशेष सूचना
ह्या फोटॊतील काही फोटॊ खूप्पच अंगावर येणारे, मन, बुद्धी आणि संवेदना बधीर करुन सोडणारे आहेत त्यामुळे ही खालची लिंक आपल्या जबाबदारी वर उघडावी.
२६-नोव्हें. २००८ चा थरार पहाण्यासाठी इथे क्लिक करा..

जय हिंद!