Thursday, August 28, 2008
कवितांच्या गावा..
मला आवडलेल्या दोन कविता ज्या मी केव्हाना केव्हातरी माझ्या ब्लॉग वर टाकल्या असत्याच त्याला हे निमित्त मिळालं इतकच :-)आणि हो असा उपक्रम चालवायचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या ज्या मित्रांचे ब्लॉग्स ह्या ना त्या कारणाने सुप्तावस्थेत गेले आहेत त्यांना पुनर्जागृती..
पहिली कविता बोरकरांची - यशस्वी जीवन म्हणजे काय हे अलगद आणि समर्थपणे उलगडवून दाखवणारी. ह्या कवितेशी माझी पहिली ओळख झाली ती पु. लं. च्या एका लेखामध्ये आणि आता जितकेवेळा वाचतो ऐकतो ती अधिक आवडत जातेय.. सुनीताबाई आणि पु.लं जो बोरकरांवर कार्यक्रम करायचे त्यात ही असायची नेहमीच.
दुसरी कविता पाडगावकरांची, इतकी चपखल लिहिलेय की वाटाव पाडगावकर नक्की एकदा प्रेमभंगातून गेले असावेत. ह्या कवितेशी माझी ओळख करून दिली क्षिप्राने, जिने मला कवितांच्या गावातल्या अशा कित्येक मातब्बर धुरणींशी खूप जवळून ओळख करून दिलेय, कवितांविषयी मला बहुश्रुत व्हायला मोलाची मदत केलेय.
अरुण आणि परागकणास् ही कवितावली पुढे चालवायला देतोय..
ह्या खॊ चे काही नियम संवेदने ठरवलेले त्याच्या ब्लॊगवरून उदधृत करतोय..
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)
----------------------------------------------------------------------------------
जीवन त्यांना कळले हो
जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो..
जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होऊनी जीवन
स्नेहासम पाजळले हो..
सिंधुसम हृद्यात जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर
घन होऊनी जे वळले हो..
दुरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने
फुलले अन परिमळले हो..
आत्मदळाने नक्षत्रांचे
वैभव ज्यांनी तुळले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
घरीच जयां आढळले हो,
उरीच जयां आढळले हो,
जीवन त्यांना क्ळले हो....
-- बा. भ. बोरकर
----------------------------------------------------------------------------------
तेव्हांची ती फुलं..
सगळं संपलं असं समजून उभे होतो
एकमेकांसमोरः आणि एकमेकांपलिकडे
पानगळतीच्या ओंजळीत होती साठवलेली
आपण एकमेकांना दिलेली तेव्हांची ती फुलं..
फुलणं ही जशी फुलाची भाषा असते
तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा
कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी
एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..
न बोलता उभे होतो एकमेकांसमोर
यापुढे भेटलो तरी आपण परके असणार
कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाहीत
हे ज्यांना क्ळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..
- मंगेश पाडगांवकर
डेलसचा ऒगष्ट..
हा ऒगष्ट तसा खूपच उन्हाळ्याचा होता इथे, तापमान बरेचदा दिवसा १०० फॆ च्या वर जायच (म्हणजे ३४ सें.) आणि भाजून काढणारं ऊन नको वाटायचं. पण महिना व्यस्त गेला खेळ आणि भटकणं अशी उत्तम चंगळ झाल्याने.
ऒलिंपिक्सच्या बयाच स्पर्धा बघता आल्या त्या केवळ एन.बी.सी च्या कृपेने. मायकल फ्लेप्स एक शतांश सेकंदाने जिंकला हे पहाताना डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कुठे पोहोचलय तंत्रशास्त्र की इतका सूक्षम फरक सुद्धा पकडता यावा! मायबोलीवर मुकुंदने ऒलिंपिक विषयी, त्यातले संभाव्य विजेते खेळाडू, वेगवेगळ्या स्पर्धा ह्यांची माहिती दिली होती त्याचा बराच फायदा झाला खेळ बघताना. बोल्ट्चा वेगही एकदम सुसाटच. ऒलिंपिक मध्ये पात्र ठरून देशाचे प्रतिनिधित्व करणार्या प्रत्येकाला माझा मनःपूर्वक सलाम. दुसरं आवडलं ह्यावेळी ते म्हणजे चीनची जिद्द. गेले कैक वर्ष अनेक दबावांना सामोरे जात चीनने ऒलिंपीकची तयारी चालवली होती. उद्घाटनाच्या आणि समारोपाच्या कार्यक्रमाने चीनने साया जगास तोंडात बोटे घालावयास लावली, शिवाय त्याबाबतीत त्यांनी एक नवीन मैलाचा दगड बनवून ठेवलाय. तसच नुसते सुनियोजनच नव्हे तर जास्तीत जास्त सुवर्ण घेऊन अमेरीकेच्या खेळातील वर्चस्वाला सरळ आव्हानच दिलेय. अभिनव बिंद्राला सुवर्णपदक देताना लावलेले भारताचे राष्ट्रगीत ऐकताना पुन्हा एकदा रोमांच उभे राहीले. भारताच्या दृष्टिने हे ऒलिंपिक चांगलेच गेले. हेच पथक ऒलिंपीकला जायच्या आधी कलमाडीनी मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते की आम्ही जातोय पण पदकाच्या अपेक्षा ठेवू नका, आणि ही बातमी पेपरात वाचून धक्काच बसला होता. जर एवढ्या जबाबदार पदावरच्या व्यक्तीमध्ये जर इतका कमी आत्मविश्वास असेल तर कसचे काय. ऒलिंपिक हा शारिरीक तर आहेच पण मानसिक कणखरपणाचा खेळ आहे. तुम्ही त्या क्षणाला दबाव कसा झेलता आणि कशी कामगिरी करता हे महत्त्वाचे. म्हणून ह्या पार्श्वभूमीवर भारतीय चमूने विशेषतः बॊक्सिंगपटूंनी केलेली कामगिरी स्पृहणीय वाटते. खूप काही शिकायला मिळालय भारताला यातून हे नक्की.
इतर कार्यक्रमांबरोबरच आठ दिवस सुट्टी टाकून अमेरीकेच्या पूर्व किनायावर फिरायला गेलो होतो. वॊशिंग्ट्न डीसी, न्यू जर्सी, न्यू यॊर्क मनसोक्त फिरून झाले. न्यू जर्सी मध्ये ओक ट्री रोड वर फिरलो, ब्रिजवॊटरच्या देवळात गेलो होतो आणि पॊईंट प्लेजर ह्या बीच वर. न्यूयॊर्क म़धे तर एक दिवस डाऊन टाऊन, एक दिवस अप टाऊन आणि एक दिवस मिड टाऊन अस खूप फिरणं झालं. आम्ही दोघही पक्के मुंबईकर असल्याने न्यू यॊर्क विशेषच आवडलं. प्रचंड महाग असलं तरी तितकच प्रेमळ शहर. न्यूयॊर्क म्युझियम मधून शहराचा पूर्ण इतिहास तसेच टाईम स्क्वेअर, युनियन स्क्वेअर, ब्रॊड वे वरचे शोज (ब्रॊड वे, ऒफ ब्रॊड वे, ऒफ ऒफ ब्रॊड वे) ह्यांची इत्यंभूत माहिती मिळाली. मोमा ह्या आर्ट गॆलरी मधेही पिकासो तसेच इतर जगद्विख्यात चित्रकारांच्या तसेच शिल्पकरांच्या कलाकृती बघता आल्या. अत्तापर्यंत कैक वेळा गेलोय न्यू यॊर्क मधे पण बरेचदा मित्रांना फिरवायलाच आणि मग इंपिरीयल टॊवर, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, टाईम स्केवर, ट्वीन टॊवर्सचा ग्राउंड झीरो, सेंट्रल पार्क ह्याच गोष्टी मुख्यत्वे बघून व्हायच्या. पण ह्यावेळी ह्या गोष्टींव्यतिरीक्त बरंच काही बघता आलं, एखाद शहर समजून घेण्याचा आनंद मिळाला. काहीतरी जागतिक (वल्र्ड क्लास) बघितल्याच समाधान मिळतच मिळतं न्यूयॊर्क फिरताना. शिवाय बस टूर घेतली होती आम्ही त्यामुळे बर्याच गोष्टी समजण्यास मदत झाली. एक अचानक मिळालेलं आणि अतिशय आवडलेल हे नाचो सॆंडविच - http://midtownlunch.com/blog/2008/07/07/off-the-menu-blimpie-sandwich/
एक दिवस संध्याकाळी ब्रुकलीन ब्रिजवर गेलो होतो, अर्ध्याहून पुढपर्यंत चालत गेलॊ आणि अचानक पाऊस आल. मग काय मस्त पैकी मनसोक्त भिजलो. ह्या अशा ठिकणी भिजणं अगदी कायम लक्षात राहील असच.पुन्हा कधीही असं न्यूयॊर्क मधे भटकायला आम्ही दोघेही तयार आहोत बघू कधी संधी मिळतेय का..
सद्ध्या थोडा निवांत झाल्याने पुन्हा वाचनाकडे वळतोय, शिवराज गोर्लेंच ’मजेत जगावं कसं’ हातात घेतलय. पुस्तक वाचायच्या आधीच मला प्रश्न पडला होता की, काय असेल इतकं ह्या पुस्तकात, आणि मजेत जगा हे सांगण्यासाठी आणि कसं ते सांगण्यासाठी पुस्तक कशाला वेगळं, दासबोधात सांगितलय की रामदासांनी, जे बरचस कालातीत आहे म्हणजे इतक्या वर्षांनंतरही समाजाला लागू आहे. पण पहिली काही पाने वाचल्यावर आवडायला लागलय. ह्या माणसाच वाचन चांगलं आहे आणि वेगवेगळ्या घटना, पाश्चात्य लेखकांचे लेखन तसेच पौराणिक दाख्ले उधृत करून बयाच गोष्टी समजावून दिल्यात. पाश्चात्य जग हे भोगवादी आहे तर आपली संस्कृती त्यागवादी. ह्या दोहोंमधे मेळ कसा घालता येईल ह्याचा अभ्यासपूर्ण उहापोह आहे, आवडतय..
आणि हो, मुंबईत पाट्या लागत आहेत बरं का मराठीत असं ऐकलं.. कोणी काही म्हणा हा विषय ढवळून काढायच बरंच श्रेय जातय राजला आणि सरकार सुद्धा ते तसं होऊन देतय थोड्या प्रमाणात कारण मूळ शिवसेनेचा हा मुद्दा नवनिर्माणाने ओढून घेतलाय. एकंदर काय कोणी कितीही भांडा श्रेयासाठी पण काम करा म्हणजे झालं आणि हो आता थोडी विधायक काम सुद्धा येउंदेत.
ठाण्यात ९ थरांचा गोविंदा लावला माजगाव वाल्यांनी असं ऐकलं. कौतुक वाटलं खूप. मी गिरगावतल्या अखिल खोताची वाडीबरोबर जायचो. व्यायामशाळेतली मुल असायचॊ सगळी. २ महिने कचून तयारी करायचो, वजनाचा तसाच तोलाचा सराव चालायचा. दमून भागून ऒफीसमधून आलो की रात्री १० वाजता सराव सुरु. आता बरच व्यावसायिक झालय पण. शिट्टीवर व्यवस्थित थर लावतात, उतरतानाही सांभाळून उतरतात. शिवाय गोविंदांचा विमा उतरवला जातोय. चांगलं वाटलं हे वाचून. माझ्या २००१ च्या गोविंदाच्या व्ही. सी. डी. करून ठेवल्यात त्या रविवारी बघून समाधान मानलं. दहीकाल्याचा आणि काकडीच्या कोशींबीरीचा प्रसाद केला होता.
अजूनही संक्रात, गोकुळाष्टमी आणि गणपती आले की कालवाकालव होते. गणपतीची तयारी सुरु झाली असेल आता, मांडव घातले गेले असतील. मग मांडवातले खेळ, लंगडी, टे टे, वगैरे. शिवाय आरत्या, आवर्तने, प्रसाद, फुले, आरास सगळ्याची तयारी. अगदी उत्सवी वातावरण असेल. दादर, लालबाग तर फुलून गेले असतील गर्दीने. खूपच नॊस्टेलजिक आणि भकास वाटतं इधे ह्यादिवसात.. तरीही इथे मित्रांकडे ग्णपती आहेत आणि महाराष्ट्र मंडळात देखील कायक्रम आहेत म्हणून बरं.
नवलाख विजेचे दीप तळपती येथ
तारकादळे उतरली जणू नगरात
परि स्मरते आणिक व्याकूळ करते केव्हा
ती माजघरातील मंद दिव्याची वात...
(- कुसुमाग्रज)
मिनोतीने नुकतच टॆग केलय, आवडीच्या कविता लिही म्हणून.. त्यामुळे पुढच्या पोष्टमधे ते..
Friday, July 18, 2008
सिंग इज किंग..
पंतप्रधानांनी, ज्या राजकीय मुत्सुद्दीने विश्वास ठरावास सामोरे जाण्याचा निर्णय घेताला आणि तो तडीस नेला, त्याद्वारे त्यांनी एकाच वेळी डावे पक्ष, मायावती आणि नगण्य महत्त्व असणारे पण लुडबुड करणारे प्रादेशिक पक्ष ह्यांना सणसणीत चपराक हाणली. कोटी रुपयांच्या नोटांचा जो देखावा सगळ्यांनी बघितला त्याने भारतीय लोकशाही हादरली नसेल तरच नवल. पण हल्ली आपण एकंदर इतके उदासीन झालोत की साधनशुचिता, नितीमत्ता ह्या गोष्टींचे कुणालाच काही वाटेनासे झालेय. अशावेळी मग पाडगावकरांच्या 'सलाम' ची (पाडगावकरांवरील नक्षत्रांच्या देणे मध्ये शिवाजी साटम ने त्याचं अप्रतिम सादरीकरण केलेलं डोळ्यासमोर आहे ) किंवा 'उदासबोधाची' आवर्जून आठवण येते. अडवाणीं च्या भाषणात तर अभ्यासाचा अभाव, बेजबाबदार विधाने ह्यांची परिसीमा होती. हया माणसास देशाचे पंतप्रधान म्हणून पुढच्या निवडणूकीत निवडून द्यावे काय हा प्रश्न पडावा इतपत अडवाणींनी विश्वासार्हता गमावलेय. पंतप्रधानांनी अचूक धागा पकडून आपल्या भाषणात अडवाणींना सडेतोड उत्तर दिलय. शिवाय अडवाणींचे जे आत्मचरित्र प्रकशित झालय त्यातून त्यांनी जसवंतसिंह तसेच बर्याच भाजपातील नेत्यांची मने दुखावलेयत. अगदी कारगिल युद्ध, कंदाहार प्रकरण, संसदेवर हल्ला, गुजरात दंगल ह्या सगळ्यांत गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेण्याऐवजी कोलांट्या खात केलेल्या कसरती, पाकिस्तानात जाउन जिनांवर उधळलेल्या स्तुतीसुमनांमुळे संघाचा ओढवलेला राग त्यामुळे अडवाणींची स्थिती घर का न घाट का अशी झालेय. त्यातूनच ह्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी जे क्रॉस व्होटींग झालय आणि भाजपा खासदार फुटलेत त्यावरून अडवाणींची स्वत:च्या पक्षावरची पकड सुटतेय हे स्पष्ट दिसतेय. एकूण काय तर भाजपाचं काही खरं नाही आणि मुक्त अर्थव्यवस्थेची फळं चाखायची असतील तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. शिवाय काँग्रेस कडे तरूण नेत्रुत्व आहे आणि आगामी काळात त्याचा त्यांना नक्कीच मोठा फायदा होईल. खासदार खरेदी केले हो अशी ओरड करून गळा काढणार्या अडवांणींना मग पत्रकार परिषदेत ह्याला नीट उत्तरे देता आली नाहीतच, शिवाय ज्या पक्षाचे खासदार लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्याने निलंबित होतात तसेच ज्या पक्षाचे प्रमुख बंगारू लक्षमण, पक्षासाठी लाच घेताना पकडले गेल्याने त्यांना हाकलावावे लागले तो भाजप नैतिकता केव्हाच गमावून बसलाय. ह्या कोटींच्या लाचेचा खरा निकाल यथावकाश (सावकाश) लागेलच पण भाजप म्हणजे सरळ सूत, प्रामाणिक आणि नैतिक पक्ष हे केव्हाच मागे पडलय. असं जर असतं तर त्यांनी अणुकराराला विरोध करत डाव्यांची साथ दिलीच नसती. सगळेच आता एकदम तोंडावर आपटल्याने कधी नव्हे ते काँग्रेस जिंकल्याच समाधान सामान्य माणसाला वाटतय असं जाणवतय. ह्या सगळ्यांत पंतप्रधानांनी दिलेलं भाषण जबाबदार तर वाटतच पण सकारात्मक आहे. अणुकरार हे एकच उद्दीष्ट नसून सरकार पुढे महागाई, चलनवाढ, गरीबी असे अनेक जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या दृष्टीने सरकारचे काम चालू आहे अशी ग्वाही त्यांनी दिलेय हे नक्कीच स्तुत्य आहे. सामान्य माणसाला खरा दिलासा मिळाला असेल तर ह्यातून. शिवाय अणुकरार झाला तर वीजनिर्मिती वाढून भारनियमन कमी होईल अशी रास्त आशा प्रत्येकाला आहेच. त्यामुळेच विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने काँग्रेसची प्रतिम उंचावलेय बघू आता ते शिबू सारेन सारख्या असंतुष्टांना कस शमवतात ते. ओमर अब्द्दुल्लांच भाषण सुद्धा सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण झाल्याच वाचलं, असं तरूण नेत्रुत्व काश्मीर कडून हवंच आहे भारताला.
मला आठवतं मी तिथे असताना, असे काही विषय समाजापुढे असले की अभ्यासपूर्ण विचार असलेल्या आणि नावजलेल्या व्यक्तिंना बोलावून व्याख्याने आयोजित केली जात असत. लोकमान्य व्याख्यनमाला, टोपीवाला व्याख्यानमाला, उद्यान व्याख्यानमाला, अमरहिंद व्याख्यानमाला ही काही नावे मला प्रकर्षाने आठवतात. ह्या श्रेष्ठ वक्त्यांचे विचार समजावून घेणे, भाषणानंतर त्यांना इतरांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर त्यांची उत्तरे ऐकणे हा एक अतिशय आनंददायी अनुभव असायचा. ह्यातूनच कुठेतरी विचारशक्ती वाढायला मदत होत असणार. आता अशा व्याख्यानमाला किती होतात आणि किती जण तिथे जातात हे माहित नाही पण तरटा च्या सतरंजीवर बसून, पिशवीत चपला ठेवून त्यावर बसून भर रस्त्यात शिवाजीराव भोसले, मिलिंद गाडगीळ, मुजफ्फ्रर हुसेन, बाळासाहेब ठाकरे, माधव गडकरी, कुमार केतकर, विजय तेंडुलकर, प्रमोद नवलकर, प्रमोद महाजन, बाबासाहेब पुरंदरे आणि कित्येक दिग्गजांची भाषणे ऐकतच आम्ही मोठे झालो. कदाचित अजूनही तिथे अशाच वैचारीक मैफीली रंगत असतील, पण ते दिवस आठवल्यावाचून राहिले नाहीत. मिलिंद गाडगीळ असते तर असं सुद्धा क्षणभर वाटून गेलं.
-------------------------------------------------------------------------------------
डॅलास डायरी
असो!.. गेल्या आठवड्यात इथे राहूल देशपांडे आला होता त्याची गाण्यांची सुरेल मैफल ऐकता आली. अगदी घरगुती स्वरुपाची अशी मैफल मला आणि कौमुदीला खूपच आवडते. त्याने आजोबांची नाट्यगीतं, भजनं गायलीच शिवाय फर्माईशी सुद्धा घेतल्या. एक तरूण कलाकार जो गाण अगदी पुढपर्यंत यशस्वीरीत्या नेउ शकतो त्याच्याशी छान संवाद साधता आला. दरवर्षी पुण्यात जानेवरी महिन्यात वसंतोत्सव सुरु केला आहे राहूल आणि त्याच्या चमूने. त्या दरम्यान भारतात असलं तर जरुर जमवायला हवं. सवाई गंधर्वानंतरचा तेथला हा अजून एक मोठा उत्सव. पुणेकरांची चंगळ आहे हेच खर..
दुसर्यादिवशी रविवारी आषाढी एकादशी निमित्त अमित केळकर ह्या स्थानिक कलाकाराचा भजनाचा उत्तम कार्यक्रम देवळात झाला आणि प्रसाद म्हणून अनल आपटेंनी केलेली साबुदाणा खिचडी, काकडीची कोशींबीर, चटणी, खीर तर अप्रतिम.
बरं, तर सद्ध्या हातात पुस्तक नाहीये पण इकडलं तिकडलं असं वाचन चाल्लय. काही लिंक्स --
हेमलकसाबद्दल माहितीपूर्ण लेख --
http://www.maayboli.com/node/2479
समतोल - विजय जाधव ९८९२९६११२४
http://loksatta.com/daily/20080614/ch06.htm
लेले..
http://www.maayboli.com/node/2550
Thursday, June 26, 2008
बर्याच दिवसांनी बरच काही..
देवकी पंडितांची शास्त्रीय संगीताची मैफल सुरेल आणि सुरेख झाली. कौमुदी बरोबर असल्याने गाणं ऐकायचं कसं हे सुद्धा कळायला लागलय हळू हळू आता.
फयूजन ग्रुप तर्फे ह्यावेळी "सुपर ८" अशी क्रिकेटची साखळी स्पर्धा ठेवली होती. "डलास मावळाज" असं आमच्या मराठमोळ्या संघाचं नाव ठेवून आम्ही स्पर्धेत उतरलो. फारशी तयारी नव्हतीच. टेप लावलेल्या टेनिसच्या चेंडूवर आठ आठ षटकांचे सामने झाले. पस्तीस संघ उतरले होते स्पर्धेमध्ये. शनिवार आणि रविवार अश्या दोन दिवसात ही स्पर्धा झाली. बाहेर १०३ फॅ. तापमानामध्ये एका मागोमाग एक सामने खेळणे खरोखरच आव्हानात्मक होते. आमच्यातील काही चांगल्या फलंदाजांच्या जोरावर आम्ही उप्-उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचलो. एकूणच स्पर्धेचे आयोजन आणि स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. गिरगांवात निकद्वारी लेन मधे मला आठवतय ओपन बॉक्स्चे असे सामने व्हायचे पूर्वी, मी रात्री उशीरापर्यंत जागून बघत असे. एकदा तर प्रेक्षकांत असताना डोळ्याला चेंडू इतक्या जोरात लागला माझ्या की सरळ बाजूला जैन हॉस्पीटल मधे जायला लागलं होतं. अर्थात तरीही हे गल्ली क्रीकेट मी सोडलं नाहीच. तेथेच मग सचिन आला होता एक वर्ष बक्षीस वाटायला, मला वाटतं तेव्हा तो पंधरा वर्षाचा असेल, त्याच्या आंतरराष्टरीय कारकीर्दीला सुरुवात व्हायची असावी तेव्हा. त्यावेळी मी त्याची स्वाक्षरी घेतली होती ती अजून जपून ठेवलेय. ह्यावरूनच आठवलं ते १९८३ च्या विजयोत्सवाविषयी. मी पाच वर्षाचाच होतो, पण तेव्हा कपिल चा मोठ्ठा फोटो आणि त्या कपाच्या प्रतिमेसह गिरगाव रोड वर मिरवणूका निघाल्या होत्या ते आठवतय. मला तर स्पष्ट वाटतं की भारत काही करू शकतो आणि जगात ठसा उमटवू शकतो हे कपिलच्या संघाने जगाला पटवून दिलं. त्यातूनच कपिलदेव हा अगदी सामान्यातल्या सामान्याचा एक आदर्श बनला. जिद्द, लढाऊ बाणा ह्या गोष्टी कपिलच्या त्या वर्ल्डकपने भारतीयांना दिल्या. ध्येय ठेवा आणि त्या ध्येयासाठी चिवटपणे लढा हे कपिलने स्वत: लढून दाखवून दिलं. ह्यातूनच भारत जगात ठसा उमटवू शकतो असा आत्मविश्वास तरुण पिढीस मिळाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर क्रीकेटची लोकप्रियताही प्रचंड प्रमाणात वाढली भारतामध्ये, ते शास्त्रीला मिळालेल्या ऑडी मुळे आणि अर्थात चँपियन्स ऑफ दी चँपियस ह्या किताबामुळे! पुढे मग अझर आणि गांगुलीने संघास कित्येक वर्षे उपांत्य, अंतिम् फेरीत आणले ते ह्याच जिद्दीच्या जोरावर...
असो, तर गेल्या काही दिवसात वाचन सुद्धा चाल्लय थोडफार, अर्थात वेग मंदावलाय हे नक्की.सद्धया व. पुं. काळेंच "आपण सारे अर्जुन" वाचतोय. हे पुस्तक वाचनीय म्हणण्यापेक्षा मननीय आणि चिंतनीय आहे. आपलं रोजच आयुष्य म्हणजे अर्जुनाच युद्धभूमीवरच संभ्रमित मनच आहे हे व. पु. नी छान मांडलय. ज्यांना व. पुं. च लिखाण अपील करतं त्यांनी जरुर जरुर वाचवं असं हे पुस्तक. दरम्यान, पी. एम. पी. ही प्रॉजेक्ट मॅनेजमेंटची परि़क्षा उत्तीर्ण झालो. त्याचा अभास चालू होता दोन महीने. कुणाला त्यासंदर्भात कुठलेही मार्गदर्शन हवे असेल तर मदत करायला नक्कीच आवडेल.
गेल्याच आठवड्यात आम्ही इथून जवळच असलेल्या केनडी म्युझियमला भेट दिली. त्याला सिक्स फ्लोअर मयुझियम असं नाव दिलय आता. १९६३ च्या नोव्हेंबर मधे अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष केनडी ह्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ते हे ठिकाण. ह्या संग्रहालयात केनडींच्या जीवनप्रवासाची संपूर्ण माहिती तसेच हत्येच्या दिवशी व नंतर कसे आणि काय काय घडले ह्याची विस्तृत माहिती चित्रफिती तसच प्रतिकृतींद्वारा देण्यात आली आहे. ज्या खिडकीतून कथित मारेकर्याने गोळी झाडली ती खिडकी अजून जशीच्या तशी जपून ठेवण्यात आली आहे. केनडी हे त्यांच्या पत्नीसह लोकांना अभिवादन करत त्यांच्या उघडया छताच्या लिंकन गाडीतून पुढे जात असताना जेव्हा त्यांची गाडी ह्या इमारती जवळून पुढे सरकली तेव्हा तीन गोळ्या त्यांच्या दिशेने आल्या आणि त्यातल्या एका गोळीने त्यांचा वेध घेतला. दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाल्याचे घोषित झाले. साधारण दीड च्या सुमारास ओस्वाड ह्या युवकास संशयित म्हणून पकड्ण्यात आले. ह्याच इमारतीत सहाव्या मजल्यावर एक रायफल सापडली आणि ओस्वाड ह्या इमारतीत काम करत असून ही त्याची असल्याचे पोलिसांनी तपासात शोधले. अर्थात ओस्वाड ने हत्येशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. ह्या कटामधे नक्की कोण आहे ह्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडे होते आणि दोनच दिवसांनी जेव्हा ओस्वाड ह्यास पोलिसांनी हस्तांतरणासाठी आणले तेव्हा काही कळायच्या आतच एका व्यक्तीने ओस्वाड वर गोळ्या झाडल्या आणि त्यास तिथेच कंठस्नान घातले. त्यांनंतर मात्र एकूणच केनडी हत्येमागचे खरे सूत्रधार कोण हे कायम अंधारात राहिले. वॉरेन कमिशनने ओस्वाड हाच खरा खुनी असल्याचा अहवाल मांडला तरीही प्रत्यक्षात केनडींची हत्या मागून येणार्या गोळीने झाली नसून त्याच दरम्यान एक गोळी पुढून आली होती असे बरेच जणांचे म्हणणे आहे. आशर्याची गोष्ट अशी की अमेरीके सारख्या देशातही, देशातील सर्वोच्च व्यक्तीला मारुन सुद्धा हत्येमागचे सूत्रधार मिळत नाहीत. एकूणच लाडक्या नेत्याची हत्या आणि त्यामागचे गणित सोडवण्यात आलेले अपयश ही अमेरीकन नागरींकाची ओली जखम आहे असे जाणवते. शेवटी कुठल्याही नवीन निकालाप्रत न येता ही केस अमेरीकन शासनाने १९८८ मध्ये म्हणजे पंचवीस वर्षांनी बंद केली. संग्रहालयाचा विचार करता, ह्या सहाव्या मजल्यावर ती खिडकी आणि आजूबाजूची परिस्थिती अतिशय व्यवस्थित जपून ठेवलेय. काहीतरी माहितीपूर्ण पाहिल्याचं समाधान मिळत हे नक्की! मनात आलच की भारताने असे दोन तीन धक्के सहन केलेत. गांधीजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांच्या हत्येसंदर्भात पण अशीच संग्रहालये उभारली तर येणार्या पिढीस बरच काही समजू शकेल. नाहीतर इतिहासाच्या पुस्तकातल्या पानावरच्या सनावळ्या आणि परीक्षेला किती मार्क असतील ह्याला, ह्याशिवय त्यांना ह्या घटनांमध्येच काहीच स्वारस्य रहाणार नाही कदाचित.....
Monday, March 24, 2008
SCJP5.0 Experiences
This is the first time I am putting something here in English.
Normally, the purpose of this blog is to write on the lines of 'Philosophy-Critic & Hunger' and then my feelings, sentiments, views and understandings of the events happening around me or for that matter all over the world. As an obvious effect, this also helps me keeping my sensitivity alive and encourages me to share my thoughts with others. At the same time, sharing information, knowledge is helping me in creating environment of openness, trust and moving forward with the people I come across in day-to-day life, helping each other in living this beautiful life cheerfully.
I am glad to convey that Yashashree (my significant other) cleared SCJP1.5 (http://www.sun.com/training/catalog/courses/CX-310-055.xml) with 90% score in her first attempt. Being into Java-J2EE profession for more than eight years it was immense enjoyment for me to guide her in certification planning and execution efforts. Many of our friends, especially who are already in Java field requested to let us know the strategies we applied and days we went through, while preparing for the exam. So, here are few points based on our experiences --
1. SCJP1.5 is very good certification to have on resume for any Java Programmer. First let us tell you that it is not easy to have it unless you plan for it and remain focused through out.
2. Start of the starting point -->
Understand the objectives of SCJP1.5, it’s scope and find out the answer why you want to go for it?
Having too much of information available, many times creates problems as it takes time to decide where to start from and what path to continue. Definitely, different people have different technical appetites and responsiveness but still there are few preferred tools, books and approaches.
http://saloon.javaranch.com/ is the site you never want to miss. Thanks to people who are doing good work in this forum. This is example of how, good people can help others and create chain for goodwill and encourage others to do better.
Thanks to Kathy Sierra & Bert Bates for their masterpiece they created in the form of SCJP5.0 study guide.
http://www.amazon.co.uk/exec/obidos/ASIN/0072253606/qid%3D1145235860/203-2307724-7521531
3. Plan your journey before you execute-->
Depending on the experience you have and your familiarity with language you can pace your journey. Thorough reading of SCJP5.0 guide is absolutely essential. We divided preparation in three phases.
Phase one:
1. Read SCJP5.0 guide word to word. Understand and assimilate each and every concept learned. This book definitely helps you remain focused. Solve the exercise questions at the end of each chapter.
2. Do use textpad or IDE (eclipse, WSAD etc.) to write java programs. Do get used to compiling and executing java programs through command line. Writing code is extremely important. Understand all the basic concepts making sure that you are in a position to guestimate compilation errors, runtime errors in the given program. Create your thumb rules and decide what you will do to see if there are compilation issues in the given program. This is where writing program helps.
3. Another important thing is to use java class decompiler tool (e.g. JAD). Get into habit of opening class files and understanding how java code is transferred into class files by compiler. Many times just looking in class files solves big puzzles.
4. Keep browsing through Java Ranch forum to get an idea of experiences of other SCJP students.
5. Keep reading through "2 minute drills" (in SCJP guide) at least once in two days for the chapters you have completed.
Phase two:
1. Reading SCJP5.0 again and this time concentrating more on the concepts which were difficult to digest. You can go for one more, i.e. third reading if required. Keep your focus only on the concepts where you feel, you need more preparations. This will save your lot of time.
2. This thorough reading will help you in building very solid technical base for the exam. From here you need to practice more on answering questions.
3. Keep browsing through Java Ranch forum and reading through "2 minute drills" at least once in two days.
Phase three:
1. To prepare for question answer mode, maintain an excel sheet where you will write answer to every question you ever solve. This is especially important to track your progress. You may give same exam again and again, thus keeping all the answers and score handy will help you measure your progress and build your confidence. This is also important to find out exactly when you will be ready to call prometric to schedule the exam.
The very important thing to keep in mind is "We learn more from mistakes than from correct answers". Thus doing thorough analysis of mistakes and developing attitude of not repeating them is absolutely important. As you progress based on the mistakes you are making you will like to put your own notes/points and append them to 2 minutes drill so that it will be part of your daily revision.
2. Start solving questions at the end of each chapter, 5 chapters at a time. This will bring your mindset in question-answers mode. This will also help you in keeping your concentration for long periods such as 3 to 3.5 hrs and make you sit at one place. This is important as exam lasts for nearly 3 hrs and you obviously have to look at every question & its options critically while answering it. If you are not used to, then keeping concentration high for such a long period is not easy at all.
3. Solve various mock tests mentioned in the forum. Again, key here is to write your answers in the excel, keeping track of your score and analyze every question you answered wrong. Keep appending your own 2 minute drill. In mock exams you will face questions from various topics randomly, e.g. first question may be from generics, next from threads and then next from fundamentals. You must get habitual to answer questions on random topics.
4. SCJP1.5 study guide also comes with Mock exam and bonus exam. It's difficulty level is almost same as that of actual SCJP.
Whizlab also have good set of mock tests. Do take all the tests and make sure that you give each test with enough seriousness. These tests are slightly difficult than actual SCJP. Besides here you do not know actual no. of correct answers out of the given options, so tests become more difficult.
5. In this phase your daily routine should be -
Take mock test(s)
Analyze previous mock test
Read 2 minute drill
Read Java Ranch forum
Generally, 2 to 3 weeks are required to complete all the mock tests or practice questions (i.e. Whizlab diagnostic tests & mock exams, tests mentioned in Java Ranch forum and SCJP guide mock exam & bonus mock exam).
6. Keep taking exams till you start scoring 80% consistently. This is time when you can call prometric and tell them you are ready.
7. Just sit back, concentrate and relax in the day prior to exam. Revise your 2 minute drill and get ready for the cracking score.
Quick tips:
1. There are around 8 to 10 drag and drop questions. Review function does not work in drag and drop so be careful.
2. You exactly get to know how many options to choose from given set of options to answer given question in actual exam.
3. If you are already working on Java 1.4 and planning to go for SCJP1.5 be cautious. Do make sure that you have understood the differences between Java1.4 & Java1.5 before you start your preparations. Also, do make sure that you are taking mock tests of Java1.5 and not that of 1.4 (for e.g. Java 1.5 has autoboxing and same question may end up in different answer based on which Java version you are using.)
4. Do keep practice of drawing object diagrams. This typically helps in answering questions related to garbage collection.
Few important points:
1. SCJP5.0 certified does not mean you are java guru. It only shows that you have general good understanding of Java as a language and your employer doesn’t have to send you for Java training.
2. SCJP5.0 certification is the basic building block and start of a bigger journey in Java technical world. More sound & confident, you are, better it is going to be. SCWCD, SCBCD, SCEA are other milestones you may want to think of once SCJP is completed.
3. Keep revising SCJP5.0, 2 minutes drill till the time you (or Java 1.5) remain in profession. Sadly, I have seen people who are certified long back and have completely lost grasp even on basic java concepts. This will degrade the certification as well as the certification holders.
4. Rather than the milestone of SCJP5.0 what you enjoy more is the journey and transformation you go through while preparing for it. This is as valuable as (or may be more valuable than!) the actual certification. It is definitely good achievement to have it on your professional resume.
If this inspires you to go for it, please proceed. Let us know if you need any kind of help. Our best wishes with you always!
As Bert says – If you're not on the edge, you're taking up too much room.
- Prashant & Yashashree
Saturday, March 8, 2008
आपले खरेखुरे आयडॊल्स..
या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे....
आजकालच्या जगात अशी समर्पित जीवनशैली असलेली माणसे विरळीच. पण तरीही आपल्याला आजूबाजूला अशी काही माणसं दिसतात की त्यांच कर्तुत्व समाज, देश, मानवता अशा कुठल्याना कुठल्या पातळीवर अतुलनीय कामगिरी करतं, इतकं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यातून स्फूर्ती, दिशा तर मिळू शकतेच पण अजूनही ध्येयवादी माणसं आपल्यात आहेत आणि आपणही मनात आणलं तर बरच काही करू शकतो, असा दिलासा त्यांच्याकार्याकडे बघता सहज मिळू शकतो. आज मी अशाच काही मला आवडलेल्या महाराष्ट्रातील आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीबद्दल थोडं लिहिणार आहे, संदर्भ आहे नुकतंच वाचलेलं युनिक फीचर्सचं ’खरेखुरे आयडॊल’ आणि हो, अत्यंत घाईगडबडीत असूनही मला हे पुस्तक आवर्जून भेट देणार्या सौ. शर्मिला फडके यांचे विशेष आभार.
आपल्या आधीच्या पिढीत खरेच ध्य्वेयवादी लोक होवून गेले, दुर्देवाने आपली पिढी तितकी संस्कारक्षमही राहिल्याचे वाटत नाही आणि मुख्य म्हणजे कोणाच्या पावलावर पाउल टाकाव, घर संसार ओवाळून टाकावा असा एकही विचारवंत, नेता राजकारणात किंवा समाजकारणात तळ्पताना दिसत नाही. ऐंशी ते पन्नासवर्षांपूर्वी स्वातंत्र्य आणि मग सुराज्य ह्या प्रेरणेने झपाटलेले अनेक नेते आपल्या देशाला मिळाले. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर काही जणानी गांधीवादाचे अनुकरण केले तर काही जणांनी आंबेड्करांचे. काही जण स्वातंत्र्यवीर तात्यारांवांच्या हिंदुत्ववादी तर काहीजण कॊ. डांगेंसारख्या समाजवादी विचारधारेत ओढले गेले. ह्या प्रत्येक नेत्याची अशी स्वतंत्र शैली, विचारधारा आणि व्यक्तीमत्वाची धार होती की त्यांच्या कर्तुत्वाकडे सहजच आकर्षले जाऊन सामान्य माणसांचे आदर्शस्थान ह्या व्यक्तीना आपोआपच मिळाले. दुसरे म्हणजे एखाद्या विचाराचे, सुधारणेचे चळवळीत रुपांतर करण्याचे महनीय काम ह्यांनी करून दाखवले म्हणून ते आयडॊल. आता असे आयडॊल होऊ न शकण्याची दोन कारण म्हणजे एखाद्या विचारधारेला सर्वसमावेशक बनवून त्याला बहुजनसमाजाचा पाठींबा मिळण्याइतपत आणि चळवळ उभारण्याइतपत कसलेलं नेतृत्व हल्ली बघायलाच मिळत नाही. दुसरं त्याहून अधिक महत्त्वाच म्हणजे सुशिक्षित पांढरपेशा वर्गात आलेली कमालीची सामाजिक अनासक्ती. मी, माझं आणि मला ह्यापलिकडे विचारशक्तीचा अभाव. खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा ह्या वर्गाला बर्याच प्रमाणात झाल्याने वाढलेले उत्पन्न, चैनीच्या बदलत्या सवयी, परदेशातील संधी, जागतिक स्तरावर विस्तारलेल्या दृष्टीबरोबर आलेला निकटदृष्टीता दोष, जास्त पैसा मिळवायचा हे एकच ध्येय आणि ते करताना हरपलेलं सामजिक भान, आनंद आणि मनोरंजनांच्या कल्पनांच बदलतं स्वरूप तसंच एकंदरच ’आहे रे’ आणि ’नाही रे’ वर्गात पडत चाल्लेल अंतर. व्यक्तीचा आर्थिक विकास होतोय पण त्यांमागे मूल्य नसतील तर समाजाचा, राष्ट्राचा विकास होणार नाही. एका गटाचा उत्कर्ष होत राहून दुसर्या गटाची मात्र फरफट होत राहील. शिवाय राजकीय अनभिद्न्यता, त्यातल्या वाईट गोष्टी बदलता येणार नाहीत असा चुकीचा अनुग्रह तसेच आपण काही चांगलं करू शकू ह्या आत्मविशासाच अभाव आणि मुख्यत्वे काहीतरी करायला हवं अशा अस्वस्थेचा अभाव त्यामुळे ह्या समाजाच मन दगड होतय. शेतकर्यांच्या आत्महत्या, कुपोषणाचे बळी ह्यातून ही वाढत असलेली दरी जाणवते आहेच. हे चित्र विदारक आहेच, पण मूठभर का होईना काही लोक तन मन धन अर्पून दिवसरात्र झटत आहेत, थोडेसे प्रकाशकिरण नक्कीच आहेत बोगद्याच्या शेवटी!
वैयक्तीक आणि मर्यादित स्वरुपातील सामाजिक पातळीवर असे काम करत असलेल्या बर्याच व्यक्तीची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख हे पुस्तक वाचताना झाली. ह्यातली बहुतेक नावं पेपर मधून किंवा टी. व्हीवर आपण बरेचदा पहातो, पण ह्या पुस्तकातून त्यांच्या जास्त जवळ जायला नक्कीच मदत होईल. अवचटांच कार्यरत वाचताना अशा अनेक व्यक्ती आपल्यलाला भेटल्या अगदी तशाच. श्री. सुहास कुलकर्णी यांनी पुस्तकाची प्रस्तावना इतकी समतोल आणि अचूक लिहिलेय की सगळेच मुद्दे तंतोतंत पटतात आणि विचार करायलाही भाग पाडतात.
पुस्तकाचा उद्देश विषद करताना लेखक म्हणतो, की नाचगाणी करून मनोरंजन करणायांना डोक्यावर घेण्यापेक्षा तळाच्या माणसांसाठी जे लोक काम करत आहेत त्या खयाखुया व्यक्तींकडे लक्ष देणे आज आवश्यक आहे. ’खरेखुरे’ आयडॊल्स कुणी असतील तर हे लोक आहेत. मला स्वतःला तरी हे पटलय.
कुणी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटतय तर कुणी संशोधन करून शेती उत्पन्न वाढवायला मदत करतय. कुणी रोंगांवर उपाय शोधून गोरगरीवांच्या आरोग्याची काळजी घेतय तर कुणी नियोजन आणि निधी यांची योग्य सांगड घालून प्रशासकीय व्यवस्थेवर ठसा उमटवत आहे. कुणी गावपातळीवर काम करताहेत तर कुणी राज्यपातळीवर तर काहींच्या कामाची जागतिक दखल घेतली जातेय. ही प्रत्येक व्यक्ती तुमच्या आमच्यासारख्याच परिस्थितीत वाढली असून संघर्षातूनच वर आली आहे.
हे सगळं इथे विषद करण्याचा उद्देश इतकाच, की ह्या काम करणाया व्यकींच्या प्रती आपण कृतद्न्य राहायला हवच शिवाय जमेल तसा त्यांच्या सामाजिक कार्याला हातभारसुद्धा लावता आला तर उत्तमच!
पुस्तकातल्या सगळ्या आयडॊल्सची नावं लिहून त्यांच्या कामाची एका वाकयात ओळख करून देतोय. त्यांचे पत्ते पुस्तकात दिले आहेत, कोणाला हवे असतील तर मी जरूर देईन.
१. डॊ. अभय आणि डॊ. राणी बंग - गडचिरोलीतील शोधग्राम, वैद्यकीय संशोधनाचा आदिवासींना फायदा. बालमृत्यूंचा अभ्यास व उपाययोजना. आरोग्यदूत प्रशिक्षण कार्यक्रम.
२. डॊ. आनंद कर्वे - हाडाचे संशोधक, शेतकी शास्त्रद्न्य, ग्रामीण विकासासाठी कार्यरत ’आरती’ (ऎप्रोप्रिएट रुरल टेक्नॊलॊजी इन्स्टीट्यूट) संस्थेचे सर्वेसर्वा.
३. डॊ. विकास आमटे - आनंदवनातलं पुढचं पाऊल, नियोजन आणि संवर्धन.
४. डॊ. हिंमतराव बावस्कर - जागतिक मान्यताप्राप्त विंचूदंशावरील संशोधन. हजारॊ विंचू दंश रुग्णांचा प्राणदाता.
५. मेधा पाटकर - नर्मदा बचाव आंदोलन, धरणांमुळे विस्थापित भूमीपुत्रांच्या प्रश्नाला वाचा आणि सामाजिक न्यायासाठी शासनावर दबाव. कुशल संघटक.
६. अण्णा हजारे - राळेगणसिद्धी आदर्श गाव. माहितीचा हक्क मिळवण्यासाठी सामजिक जन आंदोलन. त्यातील उणीवा दूर करण्यासाठी सत्याग्रह, उपोषण यांद्वारे सरकारवर दबाव.
७. डॊ. शशिकांत अहंकारी - हेल्थ ऎंड ऒटॊ लर्निंग ओर्गनायझेशन (हॆलो). मराठवाड्याच्या दुष्काळी भागात भरीव कार्य.
८. नसिमा हुरजूक - स्वतःच्या अपंगत्वावर मात करीत लाखो अपंगांसाठी भरीव सामाजिक कार्य, ’दिलासा’ हा मतिमंद मुलांसाठी निवासी प्रकल्प, ’स्वप्ननगरी’ हे अपंगांसाठी पुनर्वसन केंद्र. ’चाकाची खुर्ची’ हे त्यांनी लिहिलेंलं पुस्तक खूप यशस्वी. आजपर्यंत जवळजवळ ३२ पुरस्कारांनी सन्मानित.
९. सुरेश खोपडे - आय पी एस कॆडरमधील ज्येष्ठ पोलिस अधिकारी. समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन शास्राने अनेक जटील प्रकरणांची उकल आणि पोलिसदलात आमुलाग्र बदल. समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यावर भर. मोहल्ला कमिटी योजना आणि दंगलीवर प्रभावी उपाययोजना.
१०. सी. ए. जामगडे - गरीब आणि पिडित वर्गाला महिला बचत गटांद्वारे क्रांतिकारी मदत. प्रचंड जनसंपर्क. सूक्श्म त्रृण विभागाचे स्टेट बॆंकेचे प्रबंधक.
११. डॊ. नरेंद्र दाभोळकर- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नाजूक सामाजिक विषयांवर चर्चा, संघर्ष, आंदोलन ह्यांद्वारे जनजागृती.
१२. मनिषा म्हैसकर - रोजगार हमी योजना आणि जलसंवर्धनाची सांगड घालून दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात मोलाचं कार्य. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य यांची मोट बांधून अनेक अडचणींवर मात. कुशल प्रशास्कीय अधिकारी म्हणून कर्तुत्वाचा ठसा.
१३. वसंतराव टाकळकर - वनीकरण, जलसंवर्धन क्षेत्रांत अतुलनिय कामगिरी. माथा ते पायथा ह्या धोरणाच अवलंब करून पाणी अडवा, पाणी जिरवा ह्या सूत्रानुसार अनेक सलग समतल चर बांधण्यात आणि सुमारे पाच कोटी झाडे लावण्यात यश.
१४. डॊ. भारत पाटणकर - चळवळींद्वारे शेतकर्यांना समान पाणी वाटप मिळावे ह्यांसाठी प्रयत्न. शासनावर पाणी वाटपाच्या पुनर्नियोजनासाठी दबाव. धरणग्रस्तांच पुनर्वसन करण्यासाठी उभारलेल्या चळवळीच नेतृत्व.
१५. डॊ. माधव चव्हाण - मुंबईतील गरीब वस्त्यातं बालवाड्या सुरु करून ’प्रथम’ संस्थेद्वारे वस्तीतल्याच दहावी-बारावी शिकलेल्या मुलीस प्रशिक्षण देऊन शिक्षक बनवण्यास प्रोत्साहन. केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न रहाता, निधी मिळवण्यासाठी उद्योजक आणि आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मदतीचा ओघ मिळवण्याचं कसब.
१६. गणपतराव पाटील - कोंडिग्रे ग्रामपंचायत, परदेशापर्यंत किर्ती पोहोचलेल्या श्रीवर्धन ग्रीन हाउसचेसचे सर्वेसर्वा. प्रयोगशील, जागतिक आणि व्यावसायिक दृष्टीकोन असलेले शेतकरी. शेतीनिष्ठ शेतकरी, विद्न्याननिष्ठ शेतकरी, कृषिसम्राट पुरस्कारांनी सन्मानित. ७०% गुलाबांची परदेशात निर्यात. इंटरनेटद्वारा विक्री करणारा शेतकरी.
१७. आमदार नरसय्या आडाम - आडाम मास्तरांचा सोलापूरात दीड कोटी विडी कामगारांसाठी लढा. त्यांना हक्काच संकुल मिळवून देण्याचं मोलाचं काम. यंत्रमाग कामगारांसाठी दिलेल्या लढ्यात उल्लेखनीय कामगिरी. कार्यकुशल जनसेवक आणि लोकप्रतिनिधी.
१८.आमदार राजू शेट्टी - बड्या साखरसम्राटांविरुदध शेतकयांच्या न्याय्य संघर्षाचे नेतृत्व. जिगरबाज प्रवृत्ती आणि जनजागरणाद्वारे लोकांच्या मनात आपुलकीचे स्थान.
१९. पॊपटराव पवार - हिवरे बाजार गावाचे सरपंच. आदर्श गाव योजनेद्वारा हिवरे बाजारचा कायापालट. नशाबंदी, चराईबंदी, कुर्हाडबंदी, नसबंदी आणि श्रमदान ह्या सूत्राचा अवलंब. पाणलोट विकास कार्यक्रम आणि सुनियोजनाद्वारे झालेल्या हिवरे बाजाराच्या ग्रामविकासाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल.
२०. चंद्रकांत पाठक - अपारंपारिक उर्जा स्रोत आणि त्याचा शेतीसाठी वापर करण्यासंबंधी मोलाचं संशोधन. नवनवीन उपकरणांचा शोध लावून शेतीसाठी आधुनिक उर्जाय़ंत्राची निर्मिती.
२१.अशोक बंग - स्वावलंबी शेतीचा प्रयोग विकसित करण्यात मोलाचे योगदान. संशोधन आणि वैद्न्यानिक शेती करतानाच शेतकर्यांना पाण्याचे नियोजन आणि शास्त्रीय मार्गदर्शना करण्यात यशस्वी भूमिका.
२२. तीस्ता सेटलवाड - मुंबई दंगल, श्रीकॄष्ण आयोग, गुजराथ दंगल केसेस, झहिरा प्रकरण ह्यांसारख्या विषयांत जनजागरण. निर्भिड पत्रकार.
२३. उल्का महाजन - रायगड जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींसाठी मोलाचे कार्य. सर्वहारा संघटेनेद्वारे कातकर्यांच्या दळी जमिनिच्या प्रश्नाची शासनदरबारी सोडवणूक. दारुबंदी, शिक्षण, आरोग्य यांविषयी कातकर्यांमध्ये जाणीव जागृती.
२४. अविनाश पोळ - ग्रामीण भागात शेतकीविषयक सुधारणा राबवून गाव तन मन धनाने एकत्र ठेवून आदर्श बनवण्यात यश. निर्मल ग्राम पुरस्काराने साताया जिल्ह्यातील त्यांची गावे राष्ट्रपतींद्वारा सन्मानित.
२५. डॊ. बी. आर. बारवाले - संकरीत बियांणांवर यशस्वी संशोधन. कपाशीच वाण निर्माण करणारया सर्वात मोठ्या कंपनीच महिकोचं नाव आंतरराष्ट्रिय स्तरावर पोहोचवण्यात मोलाच योगदान.
Tuesday, February 26, 2008
भारतीय रेल्वे - राष्ट्राची जीवनरेखा..
लालूप्रसाद यादवांनी आपल्याभोवती नेहमीच एक प्रसिद्धीचं वलय ठेवण्यात यश मिळवलय. मुरब्बी राजकारणी आहेतच पण संधीचा फायदा कसा करून घ्यायचा आणि मॆनेजमेंटच्या बरोबरीने मार्केटींग सुद्धा कसं करायचं, स्वतःचा वेगळा ब्रॆंड तयार करून तो कसा पसरवायचा ह्याचं कसब त्यांच्याकडे आहे हे मान्य करावंच लागेल.
भारतीय रेल्वे हा एक मोठ्ठा हत्तीचं. लालूने Elephants can dance!! हे दाखवून दिलय. त्यानी मांडलेल्या ह्या पाचव्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणालाही तक्रारीला जागा ठेवलेली नाही. दरवेळेस भारतात मी तीन आठ्वड्याच्या सुट्टीवर गेलो तरी रेल्वेचा पास हटकून काढतो. गर्दी वाढतेय, अगदी अंगावर येण्याइतकी वाढतेय दरवर्षी हे जाणवतं पण रेल्वेचा मोह काही सुटतं नाही. गेल्यावेळी तर मी Office time मध्ये कित्येक वेळा सकाळ संध्याकाळ प्रवास केलाय रेल्वेने, गिरगांव बोरीवली असा. कारण Office time मधे तुम्ही रस्त्याने म्हणजे बस किंवा टॆक्सीने जायचा विचार केलात तरी दोन अडीच ताशांची गच्छंती आणि वाढणारं मीटर आणि भाडं ते वेगळच. शिवाय कार पुलिंग करणारे कमीच त्यामुळे प्रदुषणात भर, वाहतुकीत भर. ह्या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे उपनगरीय रेल्वे. वेळेची बचत, इंधनाची बचत, पैशांची बचत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे हया मुंबईच्या रक्तवाहीन्या झाल्यात, लाखो कामगार आज केवळ तिच्याच सहाय्याने मीठ भाकर कमवत आहेत. मुंबईकरांच्या जीवनात म्हणूनच रेल्वेला अनन्य साधारण महत्त्व आहे. हजारो चाकरमान्यांसारखाच मी ही मग सवयीप्रमाणे दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसतो, उत्सुकता असते की पासाचे दर किती वाढले, तिकीटांचे किती वाढले आणि काही नवीन सुविधा आहेत का? बोरीवली विरार मार्गाचं चौपदरीकरण तर वर्षानुवर्ष अडकून पडलं होतं, तर काही वेगळे प्रकल्प धसास लागत आहेत का?
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, रेल्वे केवळ नफ्यातच आणून न थांबता, लालू साहेबांनी २0२५ पर्यंत रेल्वेला कुठे न्यायचय ह्याचा चक्क आराखडाच मांडलाय. सगळ्याच थरातून रेल्वेच्या अर्थसंकल्पाच स्वागत गेले चार वर्ष होतय. हे होणं शक्य नाही असं म्हणणार्या भल्या भल्या मॆनेजमेंट गुरुंना लालूने विचार करायला भाग पाडलय. मालवाहातुकीतून जबरदस्त उत्पन्न वाढवून प्रवासी वाहतूकीवर ज्याचा सामान्य माणसावर सरळ परिणाम होतो, सुविधांचा वर्षाव केलाय. सामान्य प्रवासी डोळ्यासमोर ठेवून हे बजेट बनवल जातय असं लालू म्हणत आहेत ते खरं वाटतय.
आठवतय की कॊलेज मधे असताना एक फॊर्म भरून घ्यायचो रजिस्टारकडून आणि मग तो रेल्वेचा पास काढताना द्यायचो. विद्यार्थ्यांना अर्ध्या दरात पास मिळतो. ह्यावर्षी तर मुलांना १२ वी पर्यंत तर मुलींना पदवीपर्यंत फुकट पास देण्याची योजना मांडलेली बघून कौतुक वाटलं. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे. अजून एक आवडलेली बाब म्हणजे हाय टेक लालू. चर्चगेट किंवा सी.एस.टी. येथे ठेवलेल्या मशीन मधून लांब पल्ल्याच्या गाड्य़ांची टीकीट अगदी सामान्य माणसाला विनासायास काढताना, तंत्रद्न्यानाचा अगदी निम्नस्तरावरही होणारा उपयोग पाहून मला नेहमीच कौतुक वाटायचं. योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात तसं ह्या तांत्रिक गोष्टीचा कुशलतेने वापर करून घेणं महत्त्वाचं. लालूने रेल्वेला हायटेक करायचं मनावर घेतलेय हे अतिशय स्तुत्य आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी कशी होते हे बघणे महत्त्वाचे. कूपन्स टिकीटांसारख्या सोयी आहेत पण मशिन्स चालत नाहीत अशी स्थिती दिसून येते, असं काही होऊ नये ह्यासाठी खास लक्ष द्यायला हवं. सी. एस.टी सारख्या मोठ्या स्थानकांवर पार्कींग लॊट्स, तसेच अत्याधुनिक सोयी, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यासाठी विशेष प्रयत्न, गाड्यांमधे जास्त स्वच्छता ठेवण्यासाठी चांगल्या टॊयलेट्स चा वापर, मोबाईल वरून रेल्वे टीकीट बुकींगची सोय, सरकते जिने आणि येत्या दोन वर्षांत रेल्वे टीकीटांसाठी रांग हटवण्याचा उद्देश ह्या सगळ्याच योजना स्वागतार्ह आहेतच. ह्यातून टीकीटांच्या काळाबाजाराला आळा बसेलच शिवाय सामान्य माणसाचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.
इथे परदेशात बरेच ठीकाणी बस आणि रेल्वे ह्यांचा समन्वय दिसून येतो. म्हणजे एकच टीकीट दोन्हींच्या प्रवासाला चालते आणि ते खूपच सोयीचे होते. माझ्या मनात असा विचार नेहमीच यायचा की मुंबईसारख्या ठीकाणी ते का शक्य असू नये, म्हणजे रेल्वे साठी काढलेला पास बी. एस. टी. ला चालला तर बरे नाही का? ह्यावेळी लालूसाहेबांनी ’गो मुंबई स्मार्ट कार्ड’ ची योजना मांडलेय तिचे स्वरुप काहीसे असेच दिसतेय.
आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्शिततेच्या दृष्टीने बजेट मध्ये वेगळी सोय करण्यात आली आहे. शिवाय अजून एक चांगली गोष्ट म्हणजे काही हमालांना रेल्वेत गॆंगमन म्हणून भरती केले जाणार आहे.
रेल्वे कर्मचार्यांनाही ह्यातून आपण चांगले काम करत आहोत असा आनंद, समाधान मिळतंय असं लालू म्हणतात. त्यांनी ह्या कर्मचार्यांना सुद्धा खूष ठेवायचा प्रयत्न केलाय. सगळ्यात आनंदाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या सगळ्या वर्गांच्या भाड्यात थोडी थोडी कपात केलेय. ज्येष्ठ महिला नागरीकांना तिकीटात सवलत ३० टक्क्यांवरुन ५०% वर दिलेय. एवढं सगळं करून एकंदर बजेट कोट्यावधी रुपयाच्या नफ्याचे मांडलेय.
गेले चार वर्ष आणि आता अजून पुढचे एक वर्ष उपनगरीय रेल्वेच्या टिकीटांच्या किमती स्थिर ठेवण्याचं कसब लालूने दाखवलय, लाखो उपनगरीय प्रवशांना, चाकरमान्यांना त्याने दिलास दिलाय. अर्थात पुढच्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून त्याने हे केलय हे जाणवतय पण वारेमाप उधळंपट्टी करून लोकांना खूष करायचं तंत्र आहे असंही म्हणता येणार नाही, पुढच्यावर्षी आणि २0२५ पर्यंत काय उद्दीष्टे आहेत हे त्याने मांडलय. चारा घोटाळयात अडकलेल्या लालूने रेल्वेला मार्गाला लावलं असं म्हणायला, (निदान गेले पाच रेल्वे अर्थसंकल्प बघता ) आता नक्कीच वाव आहे!
लालू-आख्यान -
http://www.youtube.com/watch?v=iVe966Rrr5c&feature=related
अर्थसंकल्प मांडल्यावर -
http://www.youtube.com/watch?v=fhequbKB-bc
लालूच्या रेल्वे अर्थसंकल्पाचं सहर्ष स्वागत!